Pages

Friday, February 11, 2011

पुन्हा एकदा "स्वदेस"

आशुतोष गोवारीकरने स्वदेस नावाचा चित्रपट काढून भारतीय चित्रपटसृष्टीला एक सर्वांगसुंदर कलाकृती दिली हे विधान कुणीही चोखंदळ प्रेक्षक नाकारणार नाही! गेल्या वर्षभरात स्वदेस तीन-चारदा तरी पहिला, गाण्यांची ऐकून पारायणं केली. शाहरुखला अभिनय येतो (येऊ शकतो!) याची खात्री पटली.चर्चा झाल्या, सादरीकरण, संगीत, गीते (आणि अर्थातच गीता ) यांची तारीफ झाली. गाण्यांची, प्रसंगांची पारायणं करून पुन्हा youtube च्या hits वाढवल्या..आणि मग अचानकच सगळं थांबलं!

भारतात असताना स्वदेस पहिला होता, आवडला होता पण जाणवला नव्हता..कदाचित तो जाणवून घ्यायला परदेशात येणं गरजेचं होत.आणि नेमकं इथेच गणित चुकलं. स्वातंत्रोत्तर काळातली ही देशभक्तीपर कथा Bay area आणि Silicon Valleyतल्या भारतीयांना जितकी जवळची वाटली तितकी कदाचित मुंबई, दिल्लीच्या तरुणांना वाटली नाही! आणि मग भारतात राहून आपल्या जाणिवा बधीर होत्या की दृष्टी धूसर होती हा प्रश्न पडला.

नंतरच्या काही संपूर्ण वेगळ्या विषयावर झालेल्या discussionsमधून पहिल्या पडलेल्या प्रश्नाचं काही अंशी उत्तर मिळालं..पाहिली घटना होती अमेरिकेत एका बोगस विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचं भासवून बेकायदेशीर काम करताना पकडल्या गेलेल्या १५०० आंध्र प्रदेश निवासी भारतीय विद्यार्थ्यांची बातमी! अमेरिकेत दरवर्षी हजारोंच्या संख्येने शिकायला येणाऱ्या विद्यार्थांना पैशांची गरज असते आणि तो मिळवण्यासाठी जो तो हातपाय मारतो हे गृहीत धरलेलं आहे पण म्हणून आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावून अमेरिकेत येऊन कुठल्याशा पेट्रोल पंपावर लोकांना दारू आणि सिगरेट्ट्स विकून आयुष्याची धन्यता मानणारी ही मंडळी पाहिली की चीड यावी की कीव यावी हेच कळत नाही..कुणीतरी हळहळतो, कुणी शिव्या देतो, कुणाला आपल्या आयुष्यात काही फरक पडत नाही हे महत्वाचं वाटत, तर कुणी आन्ध्रातली मुलं धरली ना?** मग कुठे काय बिघडलंय असं म्हणून काहीसा खुश होतो..(** अमेरिकेत गेल्या ११ महिन्यात मी अमेरिकन्स पेक्षा जास्त तेलगु लोक पहिले आहेत..इतके की तिथे भारतात ते राज्य रिकामं आहे की काय असा प्रश्न पडावा)..So again that takes me back to perceptions of people around me!

साधारण चारेक दिवसांपूर्वी एक कल्पना समोर आली..एक चळवळ म्हणा किंवा मोहीम सुरु करायची..ज्याचं ध्येय असेल कसाबला फाशी मिळवण्यासाठी प्रयत्न! Social Networking, RTI अर्थात right to information चा  जास्तीत जास्त वापर वगैरे गोष्टीसुद्धा विचारात घेतल्या गेल्या! आजपर्यंत बरेच लोक पकडले गेले, त्यांना फाशीची शिक्षा झाली, अनेक वर्ष खटले चालत राहिले पण कसाबच्या बाबतीत तरी तसं होता कामा नये आणि कसाबच का? तर २६/११ चा हल्ला आम्ही खूप जवळून अनुभवला म्हणून..आजूबाजूला खूप काही घडत असतं, त्याला आपण react व्हायला हवं हा साधा शुद्ध हेतू! अचानक एकाने प्रश्न टाकला.."पुढे काय?"..म्हणजे कसाबच्या खटल्याचा बरं-बुरा निकाल लागायचा तेव्हा (म्हणजे कदाचित काही वर्षांनी) लागेलही..पण असे कित्येक आहेत..आपण कुठे थांबायचं हे कस ठरवायचं? आणि आम्ही सगळे आमच्या हेतूंशी कितीही प्रामाणिक असलो तरी हा प्रश्न विचारणारा देखील त्याच्या विचारांशी तितकाच प्रामाणिक होता..सध्यातरी आमचा मागे यायचा निर्णय झालेला नाही! पुढे मागे किती यशस्वी होऊ हे देखील माहित नाही..पण सारासार विचार करता आणि कौटुंबिक, शैक्षणिक जबाबदाऱ्या लक्षात घेता "पुढे काय?" या प्रश्नाचं उत्तर मात्र आज देता येत नाहीये इतका खरं!

जाणीवा आणि दूरदृष्टी या मुद्द्यांकडे मी जेव्हा पुन्हा वळलो तेव्हा लक्षात आलं की आमच्या जाणिवा बधीर मुळीच नाहीयेत infact आमच्या जाणीवा खूप जास्त प्रखर आहेत, जाळ निर्माण करण्याइतक्या..पण वाऱ्याचीच दिशा चुकलीय बहुदा! खूप विचार करता करता मन नकळत मोहन भार्गवच्या विश्वात गेलं..आदर्शवादी मोहन, सुशिक्षित मोहन, निर्णय घेणारा मोहन वगैरे वगैरे..पुन्हा मी स्वदेस पाहायला बसलो...चित्रपट नेहमीसारखाच सुखद अनुभव देत संपला..आणि मग प्रश्न पडला "पुढे काय?" मोहन भार्गव कुठ्ल्याच्या खेड्यातल्या नदीकाठी कुस्ती खेळतो आणि नंतर नदीत अंघोळ करतो..Well..That's not what he's here for...!!  मग वाटून गेलं की मोहन भार्गवची कथा सुरु होताच संपली..

असं झालं असतं तर..मोहन भार्गवने चांद्रयान प्रकल्पावर जोमाने काम करायला सुरुवात केली किंवा त्याने दुसऱ्याच कुठल्यातरी गावात वीज निर्मितीसाठी काम सुरु केलं किंवा असं काहीही..साडेचार तास एक आदर्शवादी व्यक्तिरेखा पाहिल्यावर तो पुढे चांगलाच वागणार आहे हे सुजाण प्रेक्षकांनी  समजून घ्यायचं आहे असं म्हणायला ठीक आहे हो पण त्याने भारतात नुसता यायला साडेचार तास घेतले तर तो सगळं छानच करणारे हे त्याला कुस्ती खेळताना पाहून कसं काय गृहीत धरायचं? इथे एक गोष्ट प्रामाणिकपणे नमूद करू इच्छितो की हा चित्रपट मी पाहिलेला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट आहे आणि त्याच्या कथा, अभिनय, गीत, संगीत, निर्मिती मूल्य या सगळ्याच गोष्टीबद्दल मला आदरयुक्त कौतुक आहे,,पण त्याचा नायक "पुढे काय" या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या बाबतीत कमी पडतो असं मला वाटतं..मग म्हणायचंच झालं तर उदात्तीकरणाचा अतिरेक असलेला 3 idiots चा रांचो उजवा ठरतो पण अर्थातच तर्कशुद्ध वाटत नाही.. 

मी नेहमीच्या गोंधळलेल्या परिस्थितीत आहे..त्यामुळे खरं सांगायचं तर कुठल्याही ठोस निर्णयाला मी येऊ शकलेलो नाही! राहून राहून एकच वाटतंय की प्रश्नच उत्तर मिळायला हवं..मग त्याच्यासाठी गोवारीकर बुवांना परत स्वदेस काढायला लागला तरी काय झालं??