Pages

Tuesday, November 27, 2012

जस्ट लाईक दॅट १८

आत्तापर्यंत:
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३, भाग १४, भाग १५, भाग १६, भाग १७

सेमेस्टरच्या फाईनल एक्झाम्स जवळ आल्या होत्या. पुन्हा एकदा असाईनमेंटस,रिपोर्ट्स, प्रेसेंटेशनस वगैरेची धावपळ सुरु झाली होती. सगळेजण अभ्यासात बिझी होऊन गेले होते. आदित्यचा लॅब रोटेशनचा प्रोजेक्ट संपत आला होता त्यामुळे तो जास्तच गडबडीत होता. रमाशी अभ्यास आणि जुजबी गोष्टी सोडून बाकी गप्पा होत नव्हत्या. अजून महिनाभराने कोण कुठे राहणारे ही चर्चा त्या दोघांनी सोडून इतर सगळ्यांनी करून झाली होती. दोघांनी अर्थात जाणून-बुजून तो विषय एकमेकांशी बोलायचा टाळला होता. एक दिवस संध्याकाळी लॅबमधून घरी येताना आदित्यला जीत भेटला. दिवाळी नाईट झाल्यावर पहिल्यांदाच त्याला आदित्य एकटा सापडला होता.
"ठाकूर बुवा, तुम्ही आत्ता घरी? मला वाटलं की बराच बिझी आहेस रिसर्चमध्ये"
"अरे फाईनल्स आहेत ना.मग सध्या रुटीनमधून ३-४ दिवस ब्रेक घेतलाय"
"हं...रुटीन ही एक गमतीशीर गोष्ट आहे..म्हणजे रुटीन चालू असतं तेव्हा आपल्याला त्यातून सुट्टी हवी असते आणि जेव्हा सुट्टी मिळते तेव्हा आपण रुटीन मिस करतो"
"आदित्य, दरवेळी भेटल्यावर काहीतरी बोलायला हवंच का?" जीतने हसत विचारलं.
"अरे खूप दिवसात मी काहीच बोललेलो नाहीये..अभ्यासातून वेळच नाहीये.."
"कसा चाललाय अभ्यास?"
"ठीक..तू बोल..तू कधी फ्री होतोयस?"
"एक्झाम लौकर होऊन जाणारे...पण रिपोर्ट सेमच्या लास्ट डेला डयू आहे...म्हणजे मी तो नक्की आधी सबमिट करत नाही...सो मी लास्ट डे पर्यंत बिझी..असो, माझा दिवाळीचा फराळ फायनली आलाय काल..तर येऊन जा नंतर" जीत आळस झटकत म्हणाला.
"अरे वा! झकास! खारे शंकरपाळे आहेत का त्यात?"
"आहेत की...राजने संपवले नसतील तर"
"चल आत्ताच येतो मग"  
आदित्य जीतच्या घरी आला.
"राजसाहेब कुठायत?" 
"इंटेन्स रिसर्च...त्यांनी एक पेपर सबमिट केलेला..करेक्शनस आलेत...त्याचं काम सुरु आहे..कियोमी आणि राज दोघे को-ऑथर आहेत"
"मग तर तो काही एवढ्यात येत नाही..बाकी अजून काय खबर?" आदित्यने हसत विचारलं.
"विशेष काही नाही.तुम्ही बोला.तुला नितीनने फोन केला का?" जीतने त्याला शंकरपाळ्यांचा पुडा दिला.
"नाही अजून तरी"
"हं"
"मला एका गोष्टीचं अलीकडे खूप नवल वाटायला लागलं आहे...आपण सेम अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये राहतो, एकाच कॅम्पसमध्ये शिकतो आणि तरी आठवडा-आठवडा आपल्याला एकमेकांचं काय चाललंय याचा नीट पत्ता नसतो"
"चालायचंच! बाय द वे, त्या अनिताचा विसा झाला का?"
"नाही माहित रे...गेल्या सोमवारी विसा इंटरव्यू होता म्हणे..नंतर तिने काही कळवलं नाहीये"
"राजला अपेक्षा आहे की अजून एक बरी मुलगी यावी" जीत किचनकडे वळत म्हणाला.
"तू एकट्या राजच्या अपेक्षेचं बोलू नकोस..मी आलो त्या दिवशी पण माझ्यापेक्षा जास्त तुम्ही दोघांनीही रमाची चौकशी केली होतीत" 
आदित्यला तो अमेरिकेला आला तो दिवस आठवला.
"मला आता तो दिवस आठवून पण हसायला येतं,तुम्ही दोघे रमाची चौकशी करत होतात.मला तिच्याबद्दल काहीच माहित नव्हतं, आम्ही एका फ्लाईटने आलो हेसुद्धा मला इथे आल्यावर कळलं होतं"
"आणि आता?" जीतने बाहेर येत एकदम विचारलं.
"आता काय?"
"आदित्य, तू आणि रमा? सगळं नॉर्मल आहे ना? आय मीन नॉर्मलवालं नॉर्मल?"
"ते काय असतं?"
"दिवाळी नाईटला तू त्यांचा अख्खा डान्स फक्त रमाकडे बघत पाहिलास..एकूणच तुझं लक्ष नव्हतं त्या दिवशी"
"नाही रे तसं काही नाही..म्हणजे झालं असं की ज्या मुलीबरोबर मी एका घरात राहतो तिला 'असं' बघायची सवय नाहीये ना मला" जीतकडे काही बोलायला हरकत नव्हती.
"ओह..." जीत मान डोलवत म्हणाला. 
"आणि ती चांगली दिसत होती रे त्या दिवशी" आदित्यने अजून एक वाक्य टाकलं.
"परचुरे,ती नेहमीच चांगली दिसते. पण तुला हे अचानक लक्षात आलंय हे नॉर्मल आहे की?" आदित्यला क्षणभर मनात आलं की सगळं बोलून टाकावं.जीतने कदाचित काहीतरी चांगला सल्लासुद्धा दिला असता. पण मग त्याच्या डोक्यात रमाचा विचार आला. रमाला जीतकडे त्याने असलं काही बोललेलं आवडलं नसतं. त्याने नकारार्थी मान डोलावली. जीत पुन्हा बोलायला लागला.
"हे बघ, मला कल्पना आहे की माझ्या अशा चौकशा करण्याने तुला माझा राग आला असेल. पण मी तुला आपल्यातलं अंडरस्टॅंडिंग कंसिडर करून स्पष्ट विचारणं प्रिफर केलं. अनोळखी असताना तुम्ही दोघांनी परक्या देशात येऊन एकत्र राहण्याचा निर्णय घेतला याचा सगळयांना कितीही हेवा,कौतुक वाटलं तरी प्रत्येकाला आपापले डाऊट्स आहेत. तेव्हा तुमच्याकडे ऑप्शन नव्हता. आता असणारे आणि आता तुम्ही काय निर्णय घ्याल यावर सगळ्यांचं लक्ष असणारे. म्हणून मी तुला विचारलं की तू आणि रमामध्ये सगळं नॉर्मल आहे ना?"
"जीत,तू स्पष्टपणे सांगितलंस ते बरं झालं..पण खरंच सगळं ओके आहे. राहण्याच्या अरेंजमेंटबद्दल मी रमाशी बोललेलो नाही.अनिताचं यायचं कन्फर्म होईपर्यंत मी विषय न काढायचं ठरवलं आहे. सध्या अभ्यासाची गडबड पण आहे. अनयुज्वल गोष्टी होत का होईना पण गेल्या सेमला सगळं नीट झालंच ना? कुणास ठाऊक या सेमला अजून नवीन गोष्टी घडतील...अजून नवीन ट्रेंड्स सेट होतील"
"हं"
"चलो...मी निघतो...घरी सांग तुझ्या की शंकरपाळे झकास होते..उरले तर परत खायला येईन..."
"हे काय? तू चहा न पिता निघतोयस?" 
"नेकी और पूछ-पूछ?"  
"साखर कमी चालेल का?" जीतने हसत चहा ठेवत विचारलं.
जीत म्हणत होता ते खरं होतं. जर का अनिता आली तर एकत्र राहण्याचं काही कारणच उरत नव्हतं. पण रमाशिवाय राहायचं आदित्यला मनापासून मान्यच होत नव्हतं.

लहानपणापासून आत्तापर्यंत रमाने कायम तिच्या 'वेगळं' असण्याचं, हुशार असण्याचं दडपण घेतलं होतं. लहानपणी वादविवाद स्पर्धेत बक्षिसं मिळवणारी रमा काळाच्या ओघात बरीच अलिप्त होऊन गेली. आई-वडलांनी तिला हवं ते शिकू दिलं पण आपल्या कुठल्याच करीअर चोईसबद्दल ते कधीच समाधानी नव्हते याची तिला कायम बोच राहिली. पुढे श्री भेटला. भेटल्या दिवसापासून त्याला आपल्याबद्दल काहीतरी वाटतंय हे तिला जाणवलं होतं. त्याने तिला वेळोवेळी मदतसुद्धा केली. तीसुद्धा त्याच्यात गुंतली. मग अचानक अमेरिकेला जायची संधी आली. तेव्हा श्रीला ते आवडलं नाही. त्याचा रमावर हक्क आहे हे समजून त्याने तिच्या जाण्याबद्दल नाखुशी दाखवली. अमेरिकेला आल्या आल्या तिला आदित्य भेटला. कन्फ्युस्ड, अन्प्लांड! त्याने कायम रमाच्या अभ्यासाचं,तिच्या प्लानिंगचं कौतुक केलं. आयुष्यात पहिल्यांदाच तिला हवं तसं शिकायला मिळत होतं आणि तिच्या हुशारीने माणसं जवळ येत होती. प्रश्न विचारणारं, नापसंती दर्शवणारं कुणी नव्हतंच! आदित्यबरोबर राहायच्या तिच्या निर्णयाचा बाकी मुलींना थोडासा हेवा वाटलाच होता. आई-बाबा जवळ नव्हते. मुंबईचा गोंगाट, ट्रेन्स, सण-वार काहीसुद्धा नव्हतं. पण काहीतरी चांगलं शिकत असल्याचं समाधान होतं आणि आदित्य या सगळ्यात पहिल्यापासून बरोबर होता. तिच्या अपेक्षेपेक्षा पहिल्यांदाच घरापासून लांब काढलेले ५ महिने खूपच चांगले गेले होते. म्हणूनच आदित्य यापुढे आपल्याबरोबर नसेल हा विचार करून तिला अस्वस्थ व्हायला होत होतं. अलीकडे श्रीने फोन केला की तो आधी रमाच्या अभ्यासाची चौकशी करायचा. मग त्याचं नवीन ऑफिस, तिथलं काम, तिथले लोक अशा जुजबी गोष्टी सांगायचा. शेवटी हळूच विषय काढायला मिळाला तर मग तो आदित्यची चौकशी करायचा. रमाच्या ते लक्षात आलं होतं.त्यामुळे ती त्याला आदित्यबद्दल विचारायची कमीत कमी संधी द्यायची. श्रीबरोबर त्याच्या नवीन ऑफिसमध्ये एक मुलगी जॉईन झाली होती. तो रमाला तिच्याबद्दल सांगुन तिच्याकडून काही प्रतिक्रिया मिळायची अपेक्षा करायचा. पण रमा त्याला पुरून उरायची. या सगळ्या गोंधळात तिची इच्छा नसतानाही तिची पत्रिका श्रीच्या घरी पोहोचली होती. त्यामुळे अजून महिना-दीड महिन्यात पत्रिका जुळवणं होणार आणि मग पुढच्या सगळ्या गोष्टी सुरु होणार हे तिच्या लक्षात आलं होतं. गेल्याच आठवड्यात आदित्यला अमृताचा फोन येऊन गेल्याचं त्याने रमाला सांगितलं. अमृताचा साखरपुडा होणार होता. त्या दोघांनी एकमेकांना सॉरी म्हणून झालं होतं. आदित्य तिच्या विचारातून बाहेर पडल्याचं त्याच्या बोलण्यातून रमाला जाणवलं पण त्यामुळे आपल्याला का मनोमन बरं वाटतंय याचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. आदित्यच्या घरून कुणी त्याच्या लग्नासाठी मागे लागलेलं नव्हतं. तिला त्याचा या बाबतीत हेवा वाटला. श्रीच्या बाबतीत असं का नाहीये हा विचारही तिच्या डोक्यात येऊन गेला. 

रात्री झोपण्यापूर्वी रमा बाहेर आली तर आदित्य अभ्यासाला बसला होता. 
"तू रात्रभर अभ्यास करणारेस का?"
"नाही गं झोपेन थोड्या वेळाने. मला कळतच नाहीये की हा विषय संपवावा कसा?" त्याने सुस्कारा सोडला.
"हं..आदि,तुला एक नेहमी विचारावसं वाटतं मला..म्हणजे बघ. आपल्याकडे घडणाऱ्या प्रत्येक सिचुएशनवर तुझ्याकडे काहीतरी लॉजिकल उत्तरं,कमेंट्स असतात. पण जेव्हा तुझा अभ्यास,तुझा रिसर्च, तुझे मित्र-मैत्रिणी असे तुझ्याशी संबंधित विषय येतात तेव्हा तू गोंधळून कसा जातोस?"
आदित्यने तिच्याकडे पाहून त्याला काहीच कळलं नसल्याच्या थाटात खांदे उडवले. 
"काय?" तिने पुन्हा विचारलं. त्याने पुन्हा काहीच उत्तर दिलं नाही.
"बघ...पुन्हा तुझ्याशी रिलेटेड प्रश्न आहे..तर तुझ्याकडे उत्तर नाही. काहीतरी सुचत असेल ना तुला?"
"अ..रमा आता तुला उत्तर हवंच असेल तर मला जे सुचतंय ते सांगतो..मला लहानपणापासून कुणी माझे निर्णय घ्यायला शिकवलं नाही. बाबांची बदली झाली की माझी शाळा बदलली. एका काकाने चौथीत असताना सायकल भेट दिली म्हणून मी सायकल चालवायला शिकलो. माझ्या एका मामाला सिनेमांची खूप आवड आहे. त्याच्याबरोबर राहून सिनेमे पाहायला शिकलो. बाबांनी पुस्तकांचं दुकान सुरु केलं आणि पुस्तकं वाचायला शिकलो. यातलं काहीच मला आवडलं म्हणून करायला मी सुरुवात केलीच नाही. घरी विचारशील तर माझ्या घरी टूथपेस्ट कुठली आणायची ते उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे फिरायला जायचं हे निर्णय आईच घ्यायची, बाबा ऐकून घ्यायचे. घरचा कारभार चालवणं हे आईचं डिपार्टमेंट आहे हे बाबांनी बहुतेक संसार थाटल्यापासून मान्य केलं. बाबांची बदली झाली की आई न कुरूकुर करता घर हलवायची कारण बाबांची फिरतीची नोकरी तिने बायको म्हणून मान्य केली होती. आम्ही पुण्यात सेटल झालो तेसुद्धा बऱ्याच नातेवाईकांच्या सल्ल्याने. असं सगळं आयडियल ऐकून मी यांत्रिक किंवा काल्पनिक जगात राहिलो की काय असा तुला संशय येईल पण हे सगळं खरं आहे. आमच्याकडेही कुरबुर, तक्रारी असतात पण इन जनरल कुठल्या गोष्टीला विरोध होणं, वाद होणं मी फारसं पाहिलंच नाही. या सगळ्या सगळ्यामुळे असेल कदाचित पण आपल्याला आई-बाबा, काका,मामा, दादा जे काही सांगतायत ते ऐकायची सवय लागली मला. मी खूप आज्ञाधारक, आदर्श होतो असंही नाही. अमृताबद्दल,माझ्या नॉन-व्हेज खाण्याबद्दल मी कधी घरी सांगितलं नाही. तुझ्याबरोबर राहतोय हेसुद्धा मी घरी बोललेलो नाही"
"आदि, तुला असं म्हणायचंय का की तू रेबेल वगैरे आहेस?"
"छे छे...रेबेल वगैरे म्हणायला माझ्यावर कधी अन्याय, अत्याचार वगैरे झालेला नाही. माझ्यामते मुलांनी आई-वडलांशी खोटं बोलणं तीन लेव्हलला होतं. एकतर लहानपणापासून आई-वडील मनाविरुद्ध वागत आले म्हणून बंडखोरी, रेबेलीयन वगैरे.पण ते फार दिवस लपून राहत नाही.मुलांना आणि आई-वडलांना त्रासच होतो त्याचा. दुसरा प्रकार म्हणजे सद्सदविवेकबुद्धी गहाण ठेवून मूर्खपणा करायचा आणि लाजेखातर लपवाछपवी करायची. माझ्या मते तो छछोरपणा झाला.आणि तिसऱ्या लेव्हलचं लपवणं आदरापोटी होतं. संस्कारांची,कुटुंबाची किंमत आपल्याला कळत असते म्हणून आपण काही गोष्टी लपवतो. फक्त प्रॉब्लेम इतकाच आहे की आपली लपवाछपवी कुठल्या लेव्हलची आहे हे जो तो स्वतः ठरवतो"      
"मग तुझी लपवाछापवी लेव्हल तीनची ना?" तिने हसत विचारलं.
"अर्थात...रमा, आपण स्वतःबद्दलचे कुठलेही निर्णय ऑब्जेक्टीव्हली घेऊच शकत नाही आणि म्हणून तुझ्या ओरिजिनल प्रश्नाचं उत्तरसुद्धा हेच की मी स्वतःच्या बाबतीत लॉजिकल, ऑब्जेक्टीव्ह होऊ शकत नाही..डीप डाऊन मला 'केओटिक सेल्फ'ची सवय झालीय"  
"आदि, मी झोपते..तू खूप अवघड बोलायला लागला आहेस.." ती हसत म्हणाली. 
"ओके..गुड नाईट"
रमा झोपायला आत वळली तेव्हा तिला पुन्हा तिच्या आणि आदित्यच्या आयुष्यातला,विचार करण्यातला मुख्य फरक जाणवला. 'केओटिक सेल्फ' आवडणारा आदित्य तिच्या विरुद्ध टोकाचा होता. पण त्याचं बरोबर असणं तिला हवं होतं. दुर्दैवाने लॉजिकल, ऑब्जेक्टीव्ह विचारही होत नव्हता. 

दुसऱ्या दिवशी सकाळी रमाचा फोन वाजला. 
"बोल गं दर्शु"
"रमा, मेघाला आत्ताच अनिताचा फोन येऊन गेला. तिचा विसा झाला एकदाचा.. ती येतेय"
"ओह ओके.."
"आता आपण माईकशी जाऊन बोलायला हवं दुसऱ्या अपार्टमेंटचं.."
"अ..हो हो.." रमाने फोन ठेवला.  
आदित्य आणि तिने एकत्र राहण्याचं मुख्य कारण बाद झाल्याचं तिला जाणवलं होतं.

क्रमशः 

टीप: पुन्हा एकदा...मी गोष्ट लांबवत नाहीये...या भागानंतर फक्त शेवटचे दोन भाग असणारेत..गोष्ट वाचत असणाऱ्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार!

Monday, November 19, 2012

जस्ट लाईक दॅट १७


आत्तापर्यंत:

रविवारी सकाळी सकाळी मनिषाचा फोन आल्यावर रमा थोडी चपापलीच. मनिषाशी तिची चांगली ओळख वगैरे असली तरी आत्तापर्यंत तिला मनिषाने असा भल्या सकाळी फोन केला नव्हता. तिने विचार करतच फोन उचलला.
"
रमा, तुला एक विचारायचं होतं"
"काय गं? सगळं ठीके ना? सकाळी सकाळी फोन?"
"अगं, मला आज शॉपिंगला जायचं होतं..तू येशील का बरोबर?"
"मी? येईन की.."
"म्हणजे मला तुझा ड्रेसिंग सेन्स आवडतो..तुझी चांगली मदत होईल सिलेक्शनला..मला बरीच खरेदी करायची आहे....दोन आठवडेच राहिले" 
रमाला आठवलं. मनिषा दोन आठवड्यांनी लग्न करायला घरी जाणार होती. तिच्या लग्नाचं कळलं त्याच दिवशी तर तिने श्रीला फोन करून आदित्यबद्दल सांगितलं होतं.
"
तुझी शॉपिंग करायची आहे की अजून कुणाची?"
"
अगं, मयूरच्या बहिणींसाठी काहीतरी घेऊन जायला लागणारे आणि बाकी पण बरीच खरेदी आहे...वेळ जाईल तसा..तुला चालेल ना?"
कोणती मुलगी शॉपिंगला जायला नाही म्हणणारे?
"हो..चालेल की..तू मेघा, दर्शुला नाही विचारलंस का? आणि प्रिया?"
"प्रिया आणि मेघाला काम आहे..दर्शु येईल बहुतेक..."
"ओके...भेटू मग..कळव कधी निघायचं आहे ते"   
आदित्य झोपेतून उठून बाहेर आला तेव्हा रमा तयार होऊन पुस्तक वाचत बसली होती.
"
आज रविवार आहे ना?" त्याने झोपेतच कन्फ्युस होत विचारलं.
"हं" तिने मान डोलवली. तो तसाच तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत राहिला.
"मग तू अशी तयार होऊन का बसलीयस?"
"मनिषाबरोबर बाहेर जायचंय"
"ओके.." तो पुन्हा त्याच्या खोलीकडे वळला.
"आदि, तू पुन्हा जाऊन झोपणारेस?"
"अ..नाही..उठलोय मी..." त्याने जांभई देत उत्तर दिलं. 
"मी चहा केलाय तुझ्यासाठी..."
"ओके..थॅंक्स...दुपारी बाहेरच खाणार असाल ना काहीतरी?"
"माहित नाही पण बहुतेक खाऊ..तुला काही आणायचं आहे का?"
"फोन कर मला..."
"ओके.."
"मी जातो आवरायला..मी येईपर्यंत तू गेली असशील...बाय.."
"बाय"
आदित्य पुन्हा खोलीत जाऊन आडवा पडला आणि त्याला झोप लागली. तासाभराने तो नीट जागा झाला. रमा निघून गेली होती. त्याने आवरून चहा गरम केला आणि सवयीप्रमाणे लॅपटॉप उघडून बसला. मेलबॉक्समधल्या तिसऱ्या मेलकडे त्याचं लक्ष गेलं आणि तो चपापला. त्याने मेल उघडली.

आदित्य,
बिलेटेड हॅप्पी दिवाली. कसा आहेस? तुझ्याशी बोलायचं होतं. जमलं तर फोन करशील? वाट बघतेय..
अमृता 

आदित्यला क्षणभर काय करावं तेच सुचेना. जवळपास दीड महिना अस्वस्थपणे घालवल्यावर तो अमृताबाबत घडलेल्या प्रसंगातून बाहेर पडत होता. अमृताने त्याच्याशी गेल्या चार-साडेचार महिन्यात अजिबात संपर्क केला नव्हता आणि आता अचानक तिचा मेल. त्याने फोन करायचा नाही असं मनाशी ठरवलं खरं पण दहा मिनिटांनी त्याने घड्याळ पाहिलं आणि खूप उशीर झाला नाहीये अशी स्वतःचीच समजूत घालत अमृताला फोन लावला. तिने फोन उचलला.
"अमृता, आदित्य बोलतोय.."
"हाय..थॅंक्स कॉल केल्याबद्दल..मी अजिबात शुअर नव्हते की तू फोन करशील.."
"आणि मी शुअर नव्हतो की तुझा फोन लागेल..मला वाटलं होतं की आत्ता तू 'त्याच्याशी' बोलत असशील आणि त्या दिवशीसारखा माझा फोन वेटिंगवर राहून कट होईल.." तो तुटकपणे म्हणाला.
ती काहीच बोलली नाही.
"तुला काहीतरी बोलायचं होतं" आदित्यने विचारलं. 
"अ..हो..आदि..माझी एंगेजमेंट ठरलीय...पुढच्या महिन्यात..." 
"...ओह..ग्रेट...अभिनंदन.." त्याने खूप वेळाने उत्तर दिलं. ती पुन्हा काही बोलली नाही.
"आदित्य, तुला आता तरी पटतंय ना की मी लाँग डिस्टंस रिलेशनला का नाही म्हणत होते?"
"मला काही पटण्या- न पटण्याचा प्रश्न येतोच कुठे? आणि आता आपण ही गोष्ट डिस्कस करून उपयोगसुद्धा नाहीये.."
"मी तुला फसवलं हे ओझं घेऊन मला लग्न नाही करायचं.."
"अमृता, तू मला फसवलंस असं मी कधीच म्हणणार नाही. पण आपण एकमेकांशी खोटं बोललो..आपल्यात चूक कोण हे ठरवण्याची ही वेळ नाही...तू कुठल्या ओझ्याखाली लग्न करावंस अशी माझी अजिबात इच्छा नाही..असं म्हणतात की झालेल्या सगळ्या गोष्टी तशाच का घडल्या याची स्पष्टीकरणं नंतर आपोआप मिळतात आणि देन इट ऑल मेक्स सेन्स..जस्ट लाईक दॅट"
"आदि, जे काही झालं..त्याबद्दल खूप खूप सॉरी"
"तसं असेल तर मीपण सॉरी म्हणतो...अजाणतेपणी मीही तुझ्यापासून काहीतरी लपवून ठेवलंच की.."
"नाव काय तिचं?" 
"रमा. रमा फडके"
"हं...मुंबईची आहे ना ती?"
"हो..का?"
"नाही...सहज चौकशी केली..आदित्यमला विचारायचा काहीच हक्क नाहीये...पण तू आणि रमा एका घरात-"
"हो..एका घरात राहतो...वेगवेगळ्या खोलीत.." त्याने तिचा प्रश्नाचा रोख ओळखून उत्तर दिलं.
"मला कधीच वाटलं नव्हतं की तू एखाद्या मुलीबरोबर राहशील..इथे मला कधी घरीसुद्धा घेऊन गेला नाहीस.."
"तुला माझा स्वभाव माहितीय अमृता..मी अजूनही माझ्या घरी तिच्याबद्दल सांगितलं नाहीये...निव्वळ तडजोड म्हणून आम्ही एकत्र राहायला लागलो. तिनेही घरी फक्त तिच्या वडलांना सांगितलंय..सांगायचं इतकंच की मी ठरवून काहीच वागलो नाही" त्याने पुन्हा टोमणा मारला.
"आदि, मीसुद्धा काहीच ठरवलं नव्हतं रे...खरंच..आणि तूच म्हणालास ना आत्ता की झालेल्या सगळ्या गोष्टी तशाच का घडल्या याची स्पष्टीकरणं नंतर आपोआप मिळतात आणि देन इट ऑल मेक्स सेन्स" तिने उत्तर दिलं. त्याला अजूनही तिचा थोडा राग येत होता.
"बाय द वे अमृता, तू नेहमी म्हणायचीस ना की मी निर्णय घेत नाही, जबाबदारी घेत नाही.रमाबरोबर राहून मी निदान तो प्रयत्न करायला शिकलो.ती खूप कंपोस्ड, प्लांड मुलगी आहे.तिचं नेहमी काय वागायचं,बोलायचं हे ठरलेलं असतं. तिच्याबरोबर राहून कळत-नकळत मीसुद्धा बदलतोय थोडा.आयुष्याकडे,करिअरकडे सिरीअसली बघतोय. तू ज्याला ओळखायचीस, जो तुझ्यात गुंतला तो आदित्य मी राहिलेलोच नाही....हां, हे सगळं दोन-तीन वर्षांपूर्वी केलं असतं तर आज आपण दोघे-" त्याने वाक्य अर्धवट सोडून दिलं. तिला चिडवण्याच्या प्रयत्नात तोच अस्वस्थ झाला.  
"ठीके आदित्य...माझ्या मनात तुझ्याबद्दल राग नाही...हे सगळं असंच होणार होतं बहुतेक"
"हं"
"मग आता काय करणारेस पुढे? घरी परत कधी येणारेस?" तिने विषय बदलला.
"घरी परत एवद्यात नाही..आत्ता तर आलो मी चार-पाच महिन्यांपूर्वी..आणि पुढे काय करणारे विचारत असशील तर सध्यातरी सिरीअसली पीएचडी करायचं ठरवलंय कारण आता मला काहीच बदल करणं शक्य नाही.याच्यापुढे आणि याच्यापेक्षा जास्त चांगलं शिकताच येत नाही. त्यामुळे कुणी काही नवीन सल्ला द्यायचा प्रश्न नाही. रिसर्चमध्ये इंटरेस्टही डेव्हलप होतोय..काहीतरी चांगलं करायची इच्छा आहे..बघू..बाकी स्वैपाक करायला शिकलोय.."
"अरे वा..मग चिकन करतोस की नाही?" आदित्य घरी न सांगता बाहेर चिकन खायचा त्यावरून अमृता त्याला नेहमी चिडवायची.
"रमाच्या राज्यात चिकन नाही होत..पण एक-दोन थाई डिशेस शिकलोय..."
"छान छान.." ताण बराच निवळला होता आणि दोघे थोड्या नॉर्मलपणे गप्पा मारायला लागले होते.
"तुझ्या साखरपुड्याची तारीख काय ठरली?"
"पुढच्या महिन्याची वीस"
"ग्रेट...पुन्हा एकदा अभिनंदन" 
"हं"
"चलो..ठेवू मी फोन...बराच उशीर झाला असेल ना?"
"हं..आदित्य, एक सांगू?"
"सांग ना.."
"गैरसमज करून घेऊ नको..पण...यावेळी रमालातरी जाऊन देऊ नको.."
"सॉरी?"
"मला माहित नाही आदित्य की मी बरोबर विचार करते की चूक? म्हणजे आपण लाँग डिस्टंस रिलेशन न ठेवणं योग्य आहे हे जसं मला वाटलं तसंच तू रमाला सोडू नयेस असंही आत्ता वाटतंय...सो मी तुला सांगून टाकलं..मी काहीतरी चुकीचंसुद्धा बोलले असेन...पण..एनीवेज..मी ठेवते आता..बाय"
"बाय..गुड नाईट"  
आदित्यने फोन ठेवला आणि खिडकीबाहेर सुन्न होऊन पाहत राहिला.
'अमृताला फोन ठेवता ठेवता असला सल्ला द्यायची काय गरज होती? रमाला सोडू नकोस..मला नाहीये इच्छा तिला सोडायची...पण आपल्या मनाला पाहिजे तसं नाही होऊ शकत जगात..माझा असा विचार करणं मॉरली योग्यसुद्धा नाही..मी आणि रमा निव्वळ रूम मेट्स, चांगले फ्रेंड्स आहोत..बास..'
तो वैतागला आणि पुन्हा खोलीत जाऊन आडवा पडला.

मॉलच्या फूडकोर्टमध्ये जागा शोधून तिघी बसल्या.
"मनी, तू खूप एक्साइटेड असशील ना? सगळी तयारी झाली घरी?" दर्शनाने विचारलं.
"हो..म्हणजे हे सगळं तसं घाईतच होतंय..पण मयुरसुद्धा सहा महिन्यात यायचा आहे इथे...सो घरच्यांनी घाई करायला लावली"
"भारी..तू किती दिवस आहेस लग्नानंतर तिथे?"
"अगंलग्न कसलं?? दगदग होणारे फक्त...लग्नाच्या आधी दोन आठवडे जातेय मी आणि लग्न झाल्यावर आठवडाभरात परत.."
"पण तो येतोच आहे की सहा महिन्यात..." आपण काहीच बोलत नाहीये हे जाणवल्यावर रमा एक वाक्य बोलली.
"खरंय...आम्ही गेले दोन-अडीच वर्षं एकमेकांपासून लांब राहतोय खरे..पण लग्न झाल्यावर आम्हाला नाही वेगळं राहायचं जास्त दिवस..मुंबईत आम्ही जेमतेम वर्षभर एकत्र राहिलो..त्यातही शेवटचे दोन महिने त्याचा एक मित्र पण होता आमच्याबरोबर राहत...मला एका ठिकाणी पेइंग गेस्ट म्हणून जागा मिळत होती तेव्हा..पण आम्ही ठरवलं की एकत्र राहायचं..त्याचा मित्र आल्यावर ऑकवर्ड झालं थोडे दिवस पण आम्ही दोघे बरोबर होतो हे महत्वाचं..गेल्या वर्षी तो इथे आला तेव्हा आम्ही ते एकत्र राहणं पुन्हा अनुभवलं..आम्ही एकमेकांना किती चांगले ओळखत होतो,एकमेकात किती गुंतलो होतो हे त्या ७-८ दिवसात जाणवलं आम्हाला..मग त्याने जाऊन घरी सांगितलं..त्याच्या घरच्यांनी पप्पांना फोन करून मला मागणी घातली आणि हिअर वी आर..."
"मस्त" 
दर्शु आणि रमाने माना डोलावल्या. मनिषा तिच्या लग्नाचं,तिच्या नवऱ्याचं कौतुक करण्यात गुंतली होती. रमा आणि दर्शु गुपचूप ऐकून घेण्याचं काम करत होत्या.
"आतासुद्धा सहा महिन्यांनी तो इकडे येणारे...तेव्हासुद्धा आम्ही एकत्र राहणार नाही पण महिन्या-दोन महिन्यांनी तरी एकमेकांना भेटू शकू...कधी एकत्र राहिलोच नसतो तर कदाचित आम्हाला काहीच वाटलं नसतं..एवढंच काय तर आमचं लग्नपण झालं नसतं.."
रमाच्या डोक्यात पुन्हा सगळा गुंता व्हायला लागला होता. मनीषाच्या गोष्टीशी ती पुन्हा एकदा स्वतःला रिलेट करायला लागली होती. तिने सरळ कॉफी घ्यायला जायचं सांगून तिथून काढता पाय घेतला.
"मनी, तू हे सगळं बोलतेयस ठीके...पण मला वाटतंय की तू रमाला उद्देशून बोलते आहेस असं तिला वाटलेलं असू शकतं.."
"म्हणजे?"
"ती आणि आदित्य बरोबर राहतायत ना...तिने तिच्या घरी आईला सांगितलेलं नाही..आम्ही तुझं लग्न ठरल्याचं तिला ज्या दिवशी सांगितलं होतं ना तेव्हा ती तेच आठवून अस्वस्थ झाली होती.."
"मला तर नॉर्मल वाटली..पण तिचं आणि आदित्यचं काही??" मनीषा 
"नाही गं...ती किती अबोल आणि रोखठोक आहे ते पाहिलंयस ना?...ती आणि आदित्य...नाहीच गं...आदित्य बिनधास्त असतो तसा...पण मला तरी वाटतंय की अनिता येणार असल्याचं कन्फर्म झालं की ती लगेच आदित्यला दुसरं अपार्टमेंट बघायला सांगेल.."
"हं" 
रमा कॉफी घेऊन आली आणि विषय बदलला गेला.

'लक्षात ठेव रमा- फार लांबचं प्लानिंग करू नये..कारण ते आपण आपल्या दृष्टीकोनातून करतो..आपले दृष्टीकोण बदलतात..आजूबाजूची माणसंपरिस्थिती सगळंच बदलतं आणि मग नकळत प्लानिंग बदलतं...श्री जवळपास वर्षभरापूर्वी म्हणाला होता. तिने तेव्हा त्याचं बोलणं सिरीअसली घेतलं नव्हतं आणि आता सगळी परिस्थिती विचित्र झाली होती. आयुष्यभर जसं करीअर करायचं तिने स्वप्न पाहिलं होतं, प्लानिंग केलं होतं ते खरं होताना दिसत होतं. पण हा भावनिक गुंता तिच्या प्लानिंगमध्ये कधीच नव्हता आणि तो कधी होईल याचा तिने विचारही केला नव्हता. आदित्यबरोबर राहण्याचा निर्णय सुरुवातीला जरी तडजोड-सोय म्हणून घेतलेला असला तरी स्वतःच्या नकळत तिला आदित्यची सवय झाली होती. अजून महिनाभराने ते दोघे एकत्र राहत नसतील हा विचारच तिला पटत नव्हता. 
"काय विचार करते आहेस?" मनिषाने तिची तंद्री मोडली.
"काही विशेष नाही" तिने उत्तर दिलं. 
दर्शना मेघाने सांगितलेलं काहीतरी घ्यायला गेली होती. मनीषा आणि रमा पार्किंगमध्ये तिची वाट बघत गाडीत थांबल्या होत्या.
"मला मगाशी दर्शु सांगत होती की माझ्या लग्नाची गोष्ट ऐकल्यावर तू अस्वस्थ होतेस..तू आदित्यबरोबर राहत असल्याचं तुझ्या आईला बोलली नाहीयेस ते आठवतं तुला वगैरे.." 
"तसं मी बोलले होते त्या दिवशी पण एवढं काही नाही गं..." रमाने उत्तर दिलं.
"रमा, मी तुला समजून घेऊ शकते...खरंच..तू शिकायला म्हणून घरच्यांना सोडून इथे आलीस...मग काही तडजोडी करायला लागतातच की...नंतर हे सगळं आठवशील आणि आईपासून सगळं लपवलं होतंस हे आठवून वाईट वाटण्याऐवजी हसायला येईल तुला..."
"हं.." रमाने मान डोलावली. 'माझीही तीच इच्छा आहे!' ती मनात म्हणाली.
"आम्ही एकत्र राहायला लागलो तेव्हा मलाही थोडं टेंशन आलं होतं..मी माझ्या पप्पांना काहीच सांगितलं नव्हतं...मला मयूर म्हणाला की थोडं रेबेल असावं माणसाने..मनाला योग्य वाटणाऱ्या सगळ्याच गोष्टी मॉरली, रॅशनली बरोबर नसतात..पण सगळंच सरळमार्गी केलं तर आयुष्यात आठवायला नंतर काही राहणारच नाही...बिसाईडस...जगात कुणीच १००% रॅशनली वागत नाही! मग आपण कशाला प्रयत्न करायचा?" मनीषा सगळं आठवत म्हणाली मग स्वतःशीच हसली. रमाला तिचं कौतुक आणि हेवा दोन्ही वाटला. 
दर्शना आली आणि मनीषाने गाडी सुरु झाली.
"मला असे संडेज आवडतात...शॉपिंगगप्पा..उद्या पुन्हा रुटीन सुरु..." मनीषा 
"उद्या सोमवार नाही का...रमा,त्या अनिताचा विसा इंटरव्यू आहे उद्या..." दर्शना 
"फोन केलेला का तिने?" रमाने विचारलं.
"ती मेघाशी बोलली काल...खूपच प्रश्न पडले होते तिला..पहिल्या वेळी विसा रिजेक्ट झाल्याचं तिने खूप टेन्शन घेतलंय बहुतेक...मेघा तर गमतीत नंतर म्हणाली पण मला...की या मुलीच्या आवाजातल्या टेंशनमुळे तिचा विसा रिजेक्ट होईल या वेळी.." दर्शना हसत म्हणाली. 
रमाने तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा खिडकीतून बाहेर बघत विचार करायला लागली. 
सेमेस्टर संपायला महिना उरला होता.

 क्रमशः 

Thursday, November 8, 2012

जस्ट लाईक दॅट १६


आत्तापर्यंत:

जीत आणि राजकडे आदित्य पोहोचला तेव्हा जीत तयार होऊन बसला होता. त्याने नेहमीच्या जीन्सवर साधा झब्बा घातला होता. 
"हे काय? तू असा येणारेस?" आदित्यने विचारलं.
"मग अजून कसं यायचं?" जीतचा प्रश्न.
"अरे, ही जी काही दिवाळी नाईट इव्हेंट आहे ती पुन्हा पुन्हा थोडीच होणारे...वर्षातला एक दिवस आहे...नटून घे थोडा..." आदित्य कुर्ता 'सावरत' सोफ्यावर बसला. 
"ते काही मला नाही जमत..कुर्ता भारी आहे तुझा...आणि हां, आमच्या अपार्टमेंटमध्ये नटायची जबाबदारी राजची आहे जे की तो इमानेइतबारे पार पाडतोय...त्याने त्याच्या ग्रुपच्या एका जपानी मुलीला पण इन्व्हाईट केलंय...कियोमी काटो..."
"भारी आहे..म्हणजे हा जेवायला त्या कियोमीबरोबर का?"
"काय माहित...मला तर वाटतं ती टांग देणारे..." जीतने टाळीसाठी हात पुढे केला. आदित्यने टाळी दिली.
"हरामखोर आहात तुम्ही दोघं..." राज त्याच्या शेरवानीची 'ओढणी' सावरत बाहेर आला.  
"अरे, बापरे...आज काही खरं नाही...कियोमी नाही आली तरी दोन-चार गोऱ्या तर नक्की असणारेत राजच्या आजूबाजूला..." आदित्य राजच्या कपड्यांकडे बघत थट्टेच्या सुरात म्हणाला.
"काय करणार? नटावं लागतं साहेब...तुमच्यासारखं नाही होत..अमेरिकेला आलात आणि चार दिवसात मुलीबरोबर राहायला लागलात...आम्ही दोन-दोन वर्षं राहून आमची मैत्री सोडा पण धड कुठल्या पोरीशी चांगली ओळखसुद्धा नाही..." आदित्य गप्प झाला. 
"चला, बाहेर पडायचं का?" जीतने  विचारलं.
"अरे मेघा येतेय ना..तिने मला कॉल केलेला..फक्त दर्शना, मनीषा आणि रमा गेल्यात पुढे.."
"म्हणजे बराच वेळ आहे...चहा पिऊन निघू.." जीत हसत किचनकडे वळला.
"रमा, घरूनच रेडी होऊन गेली का रे?" राजने चौकशी केली. 
"माहित नाही रे...मी अंघोळीला गेलो होतो.." राज अजून काही विचारणार तेवढ्यात आदित्यचा फोन वाजला."जीत, चहा नको करत बसू रे...ही आली बघ..." तो फोन उचलत म्हणाला.

आदित्यने रमाला स्टेजवर पाहिलं तेव्हा तो क्षणभर स्तब्ध झाला. तिने मोरपंखी रंगाची साडी नेसली होती. आत्तापर्यंत त्याने तिला जीन्स-टॉप अशा कपड्यांमध्येच पाहिलं होतं. त्याच्यासमोर स्टेजवर असणाऱ्या मुलीला तो पहिल्यांदाच पाहत होता आणि ती खूप छान दिसत होती. पुन्हा एकदा एकमेकांबद्दल 'नवीन' वाटणारं काहीतरी होतं. रमाबद्दल या क्षणाला असणारं फिलिंग त्याला स्वतःकडेसुद्धा मांडता येत नव्हतं. स्वतःला घालून घेतलेल्या 'नैतिक बंधनं' या प्रकाराचा त्याला मनस्वी राग आला. दर्शना मध्ये होती आणि रमा आणि मनीषा एकेका बाजूला. पण त्याचं बाकी दोघींकडे अजिबात लक्ष गेलं नाही. मेघा टाळ्या वाजवण्यात बिझी होती. राज पुढे होऊन फोटो घ्यायला गेला होता. जीतच्या नजरेतून मात्र आदित्यचं रमाकडे पाहणं सुटलं नव्हतं.पण त्याच्या स्वभावाप्रमाणे तो लगेच काही बोलला नाही. डान्स झाल्यावर तिघी खाली आल्या तेव्हा रमाने सगळ्यात आधी आदित्यकडे पाहिलं आणि 'कसा झाला डान्स?' हे विचारायच्या अर्थाने भुवया उंचावल्या. त्याने हसून मान डोलावली. गोंगाटातला एकांत शोधून दोघे पुन्हा ग्रुपचा भाग होऊन गेले. 
"आपली ती सेकंड टाईम स्टेप मिस झाली.." दर्शु म्हणाली. रमा आणि मनीषाने मान डोलावली. 
"आम्हांला तरी असं काही वाटलं नाही...हो की नाही रे राज?" मेघा 
"हो..मी फोटो काढले त्यात तुम्ही तिघी सेम पोसमध्येच आहात...भारी आलेत फोटो" राज 
"हं..तरी आम्हाला सेम कलरच्या साड्या मिळाल्या नाहीत..मला वाटलेलं की प्रियाकडे ग्रीन साडी आहे पण ती इंडियाला घेऊन गेली आणि तिने परत आणली नाही असं तिने सांगितलं" मनीषा 
"तरी..ओव्हरोल रंग सेम वाटत होते...काय आदित्य..बरोबर ना?" जीतने आदित्यकडे अर्थपूर्ण नजरेने पाहत विचारलं.
"अ..काय?"आदित्यचं अजिबात लक्ष नव्हतं. 
"अरे साडीचे रंग..."
"त्यांचं काय? चांगले होते की.." आदित्य शब्द जुळवत म्हणाला. जीत हसला. त्याने आपल्याला 'धरलंय' हे आदित्यला लक्षात आलं. तो उत्तरादाखल हसला. मुली त्यांच्या गप्पांमध्ये बिझी झाल्या होत्या. राज कॅमेरामधले फोटो न्याहाळत होता.
"ए..ऐका...आता जेवायचं ना?" मनीषाने विचारलं.
"मला तरी अजून काही बेटर सुचत नाहीये..पण तुम्ही मुली काय ते जाऊन आवरून येणार असाल ना?" जीत 
"करेक्ट...आलोच आम्ही पाच मिनिटात...तुम्ही तिघे पुढे होताय तर व्हा..." दर्शना.
"मी आणि आदित्य थांबतो...राज बहुतेक जपानी पंगतीला आहे.." जीत राजकडे बघत म्हणाला.
"कप्पाळ जपानी पंगत...अरे ती कियोमी तिच्या दोन-चार लोकांबरोबर आलीय...ती एकटी असली असती तर गोष्ट वेगळी होती...पण ५ जपानी लोकांमध्ये त्यांच्या भाषेत काहीतरी ऐकून घेत,समजून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मी इथेच बरा आहे" 
"कियोमी? ती तुझ्या ग्रुपमधली? आल्यावर बोललंच पाहिजे या विषयावर" दर्शना हसत इतर तिघींच्या मागे गेली. 
"येऊ दे यांना.आपण थांबूया. तरी नशीब की प्रिया नाहीये इथे नाहीतर आपल्याला ऑकवर्डपणे हिंदीत बोलायला लागलं असतं" 

सगळे जण खायला घेऊन येऊन बसले. 
"आदित्य, तू चिकन का खात नाहीयेस?" राज 
"त्याला दिवाळीच्या नावाखाली चिकन खाल्लेलं पसंत नाही" मेघाने उत्तर दिलं.
"एवढा,विचार नाही करायचा रे...जर का आपण अमेरिकन पद्धतीने सण साजरा करतोय तर ते खातात तसं नॉन-व्हेज खायला काय हरकते?" राजचा प्रश्न.
"मी काही म्हणत नाहीये...मी त्यांच्या सणाला नॉन-व्हेज खायला तयार आहे...मी तर म्हणतोय की थॅंक्सगिविंगला टर्की बनवूया.." आदित्यने पहिल्यांदाच एखाद्या प्रश्नाला रोखठोक उत्तर दिलं होतं. रमा मनातल्या मनात खुश झाली.
"ते जाऊ द्या सगळं...राज ही कियोमीची काय भानगड आहे?" दर्शनाने विचारलं.
"भानगड वगैरे काही नाहीये...मी तिला आज इंडियन फेस्टिवल सेलिब्रेशन फंक्शन आहे असं सांगून बोलावलं होतं. ती म्हणे की तिचं तिकीट तिच्या मित्राने आधीच काढलं होतं. तो गेली दोन वर्षं येतोय...त्याला इंडियन जेवण आवडतं..आणि आदित्य, बिलीव्ह मी..हे जेवढे गोरे तू बघतोयस ना त्यातले अर्धेअधिक लोक इंडियन चिकन करी खायला आलेत.." आदित्यने उत्तर न देता मान डोलावली. 
"पुन्हा विषय बदलू नको राज....आपण कियोमीबद्दल बोलत होतो..तू तिला का बरं इन्व्हाईट केलंस?" मेघा 
"तुम्ही मागेच लागलात..."
"कियोमी नाहीये बरोबर तर काय झालं? मी आज त्याचा फोटो काढून त्याच्या घरी पाठवणारे...सध्या स्थळं बघणं सुरू झालं आहे..सो करेक्ट गेट-अप आहे त्याचा फोटोसाठी" जीत भाताचा चमचा तोंडात टाकत म्हणाला.
"आणि तोच फोटो आपण फेसबुकवर टाकू..उतावळा नवरा म्हणून" मनीषा.
"मी काही उतावळा नवरा वगैरे नाहीये...घरचे दोनेक वर्षं मागे लागलेत..त्यांना थांबवायला दुर्दैवाने मला कुणी गल्फ्रेंड नाहीये..आमच्याकडे साताऱ्यात लोकांची एव्हाना लग्न झालेली असतात..म्हणून घरचे स्थळं बघतायत..काय चुकलं?" राज थोडा चिडल्यासारखा वाटला. मनीषा गप्प झाली. पण तो सगळ्यांना उद्देशून बोलला असल्याने कुणीतरी डिफेंड करणं गरजेचं होतं.
"राज,तुला नेमका राग कसला आहे? तुला गल्फ्रेंड नाही याचा की आम्ही तुला तुझं लग्न ठरणारे याच्यावरून चिडवतो आहे याचा? की तुझं अजून काही बिनसलंय?" दर्शनाने विचारलं. राज गप्प झाला. थोड्या वेळाने स्वतःच म्हणाला.
"तुम्हांला सगळ्यांना गंमत वाटत असेल...मला गल्फ्रेंड नाहीये याचा राग मी तुमच्यावर कशाला काढेन? तो स्वतःवरच काढायला हवा ना? पुढच्या वर्षी या वेळी कदाचित माझं एखाद्या अनोळखी मुलीशी लग्न झालेलं असेल..मला नकोय तसं..आय मीन...आधीच पी.एच.डी नंतर मी काय करणार हे नक्की ठरत नाहीये माझं...त्यात मला एखाद्या अनोळखी मुलीची लाईफ पार्टनर म्हणून जबाबदारी घेणंसुद्धा कसंतरी वाटतं.."
"मग नको करूस लग्न.." रमा म्हणाली. सगळ्यांनी चमकून तिच्याकडे पाहिलं.
"तसं नाहीये...लग्न कधीतरी करायचं आहेच ना...आणि गेल्या ७-८ वर्षात मला कुणी भेटलं नाही तर आता कोण भेटणारे?" राज खिन्नपणे म्हणाला.
"म्हणजे तू लग्न एक रुटीन म्हणून करायचं म्हणतो आहेस?" आदित्यच्या प्रश्नावर राजने खांदे उडवले.
"मी अजून गुलाबजाम आणतोय...कुणाला काही हवंय?" राज त्याची प्लेट घेऊन उठला. त्याला या डिस्कशनमधून बाहेर पडायचं होतं.
"तो काही एकटा नाहीये जगात असा. कित्येक लोक आहेत की जे अनोळखी लोकांशी लग्न करतात..त्यात काय एवढं?" मेघा 
"मला असं वाटतं की आपण जगाच्या इतिहासातल्या सगळ्यात कॉम्पलिकेटेड जनरेशनचे लोक आहोत. आपल्यातल्या अर्ध्याअधिक लोकांना कॉलेजमध्ये गेलो न गेलो तेच कुणीतरी आवडतं. प्रेम कशाशी खातात याची अक्कल पण नसते पण आपण प्रेमात 'पडतो'. ब्रेक-अप होणं,नवीन अफेअर या गोष्टी खूप सहज होतात. काही राजसारखे असतात. एखाद्या अनोळखी मुलीबरोबर आयुष्य काढणं जमणार नाही हे त्याला वैचारिक दृष्ट्या पटतं पण लग्न या गोष्टीकडे मात्र तो निव्वळ रुटीन म्हणून बघतो" आदित्यने सुस्कारा सोडला.  
"आपण उगाच कियोमीवरून पिडलं त्याला" मनीषा खट्टू होत म्हणाली.
"काही उगाच नाही...त्याला कधीच कुणी मुलगी भेटली नाही यामुळे त्याला थोडा कॉम्प्लेक्स आहे...आता घरचे लग्नासाठी मागे लागले आहेत, घरच्यांचं काही चूक नाही. पंचविशी उलटून गेली तरी मुलगा अजून शिकतोय. घरच्यांना काळजी की आमचं पोर सेटल कधी होणार?" जीतची निर्विकार कमेंट. 
"तुम्ही मुलं असं म्हणताय मग आम्ही मुलींनी काय म्हणायचं? आमच्या घरून आमच्यावर लग्नासाठी प्रेशर येत नसेल?" मेघा.
"माझ्या जॉब करणाऱ्या, लग्न झालेल्या, मुलं झालेल्या मैत्रिणी मला सारख्या विचारतात की तू लग्न कधी करते आहेस? मला हेवा वाटतो त्यांचा..आयुष्यात काय करायचं हे त्यांना खूप लौकर कळून गेलं आणि आपण स्वतःला हुशार म्हणवून घेत मागे राहिलो असं वाटायला लागतं.." दर्शनाची तक्रार.
"तसं काही नाहीये बरं का दर्शु..सुदैवाने किंवा दुर्दैवाने आपण शिक्षण अशा लेव्हलचं घेतोय की इतका वेळ जाणं सहाजिक आहे" मनीषा 
"हो आणि आपण किंवा जगात कुणीच पीएचडी च्या पुढे शिकू शकत नाही" मेघा अभिमानाने म्हणाली.
"सगळं ठीके पाटकर बाई..पण कधी कधी असं वाटतं की ही इतकी सगळी मेहनत कशासाठी? शेवटी पाट्याच टाकणार आपणसुद्धा" राज परत आला होता.
"हो..पण ते काम आपण जगातल्या हजारो,लाखो लोकांपेक्षा चांगलं करू आणि माझ्या मते ते जास्त महत्वाचं आहे" रमाने त्याला उत्तर दिलं. सगळ्यांनी तिच्याकडे हसत बघत माना झुकावल्या.
तेवढ्यात एक-दोन गोऱ्या मुली त्यांच्या टेबलशी येऊन थांबल्या आणि चर्चा थांबली. त्यांनी सगळ्यांचं जेवण झालं का म्हणून चौकशी केली. त्यांना ट्रेडीशनल इंडियन ड्रेसमधल्या कपलचे फोटो काढायचे होते. जीत आणि आदित्यने एकमताने राजला ढकललं.मुलींमध्ये बरीच चर्चा होऊन रमाला पुढे पिटाळलं गेलं. रमा पुढे आलेली बघून राजने आदित्यला खूण केली. आदित्यने त्याच्याकडे न पाहिल्यासारखं केलं आणि तो दुसरीकडे बघत बसला. रमाबरोबर फोटो काढला गेल्यावर राज मनात सुखावला. सगळे निघायला उठत असताना जीतने सगळ्यांना थांबवलं.
"अरे हो,एक अपडेट द्यायची राहिली. नितीनचा फोन आलेला...तो येतोय...त्याने तुझा नंबर घेतलाय आदित्य,तो तुला फोन करणारे..सो आपल्याला अपार्टमेंटसाठी माईकला सांगायला हवं वेळेवर"
"अरे हो,पण अनिताचं विसाचं काम झालं नाहीये अजून. म्हणजे तिने काहीच कळवलं नाहीये.नितीन येतोय ते ठीके पण मग रमाचं काय?" दर्शुने विचारलं. 
"नितीनचा फोन आलाय फक्त...तो आला की बघूया! रमाला कुणी एकटीला टाकणार नाहीये"आदित्यने उत्तर दिलं आणि प्रतिक्रियेची वाट न बघता तो वळला. तो चालायला लागलेला बघून सगळ्यांनी माना वळवून रमाकडे अपेक्षेने पाहिलं. ती काही उत्तर न देता सगळ्यांकडे बघत राहिली.
 
घरी आल्यावर आवरून रमा बाहेर आली तेव्हा आदित्य हॉलमध्ये क्लिनिंग करत होता.
"हे काय मधूनच?" तिने विचारलं.
"अगं,दिवाळी आली ना? थोडी स्वच्छता करतोय.." आदित्यचं उत्तर.
"अरे बापरे..आत्तापासून?" 
"आता मी प्लांड, अरेन्जड व्हायचं ठरवलं आहे"
"बरं..पण हा साक्षात्कार आज अचानक कसा झाला?"
"रमा, मला आज आपल्या सगळ्या चर्चेतून जाणवलं की तुम्ही सगळे ऑर्गनाईझ्ड आहात..फोकस्ड आहात...राजची मतंसुद्धा कितीही नकारात्मक असली तरी त्याच्या डोक्यात काहीतरी प्लान आहे..म्हणजे पीएचडीनंतर काय करायचं हे त्याला माहित नाही आणि म्हणून त्याला लग्न करून एका अनोळखी मुलीची जबाबदारी घ्यायची नाहीये..माझं असं कधीच काहीच नव्हतं. आय मीन मला आठवतंय की अमृताला मी सहज म्हणून टाकलं होतं की 'चल माझ्या घरी'..कधीच कसला विचार केला नाही..प्लानिंग केलं नाही...सुदैवाने अमृताच्या बाबतीत सोडून सगळं नीट झालं सुद्धा...आता विचार केला तर जाणवतं की अमृताच्या बाबतीत पण जे झालं ते चांगलंच झालं तिच्यासाठी...माझा तिच्याबद्दलचा राग कधी जाणार नाही पण ठीके...आय विल मूव्ह ऑन...ती म्हणाली तसं"
"गुड, मला आनंद आहे की तू सिरीअसली विचार करतो आहेस सगळ्याचा.."
"हं..म्हणजे हे पी.एच.डी., रिसर्च..तू म्हणालीस तसं..पाट्याच टाकायच्या असल्या तरी त्या नीट टाकायला हव्यात..आणि हो, आधीच सांगून टाकतोय की मी प्रामाणिक संकल्प केला आहे...पण म्हणून उद्यापासून माझी प्रत्येक हालचाल ऑर्गनाईझ्ड असेलच असं नाही.."
"हं" रमाने हसून मान डोलावली. तिने कपाळावर लावलेली टिकली तशीच होती आणि केससुद्धा तसेच बांधलेले होते. आदित्यला 'संध्याकाळची रमा' आठवली.
"रमा-" तो थांबला.
"बोल ना.."
"तू संध्याकाळी खूप छान दिसत होतीस.."
"हं.." तिचं एवढंच उत्तर. दोघेही काही न बोलता तसेच उभे राहिले.
"मी आवरून घेते.." ती आत जायला लागली.
"रमा-" त्याने पुन्हा हाक मारली.
"काय?" ती त्याने हाक मारायची वाट बघत असल्यासारखीच चटकन मागे वळली.
"श्रीधरचे फोटोस बघितले मी काल..तुम्ही दोघे चांगले दिसता बरोबर.."
"हं.." ती पुन्हा वळली.
"राज पण वेडा आहे ना.." त्याला तिला जाऊन द्यायचं नव्हतं. तो काहीतरी विषय काढत राहिला.
"का?"
"म्हणजे त्याला असं वाटतं की कॉलेजमध्ये असताना त्याला कुणीतरी भेटली असती, तो तिच्यात इनव्होल्व्ह झाला असता तर आत्ता तो सुखी असला असता...माझ्यामते ही भावनिक गुंतागुंत धड कळतसुद्धा नाही त्या वयात..आत्ता लक्षात येतंय की हे सगळं समजायला,उमगायला नेसेसरी असणारी मॅचुरिटी आणि अनुभव आपल्याला त्या वयात असणं शक्यच नसतं...दुर्दैव हेच आहे की हे कुणी सांगून,शिकवून पटत नाही,अनुभवावं लागतं" त्याने रमाची नजर चुकवली. 
"मग तुला वाटतं की आता आपण रिलेशनशिप्स समजून घेण्याइतके मोठे आणि मॅचुअर झालोय?" तिने विचारलं. आदित्यने चमकून तिच्याकडे पाहिलं. ती त्याच्याकडेच बघत होती. उत्तराची अपेक्षा करत!  

क्रमशः 

Thursday, November 1, 2012

जस्ट लाईक दॅट १५

आत्तापर्यंत:
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११,भाग १२,भाग १३, भाग १४

त्याला जाग आली तेव्हा बाहेरच्या खोलीत कुणीतरी गप्पा मारत असल्याचं त्याला जाणवलं. उशाशी ठेवलेल्या मोबाईलमध्ये त्याने वेळ पहिली. खोलीत अंधार होता. त्याने बेडमधून बाहेर पडून खिडकीचा पडदा उघडला. आपण पाहिलेली वेळ पहाटेची नसून संध्याकाळची आहे याची त्याला जाणीव झाली. मग सगळं आठवलं. रविवारची निवांत दुपार होती. मजबूत जेवण झालेलं होतं.सगळ्या असाईनमेंटस, रिपोर्ट्स, होमवर्क्स करून झालं होतं. आडवं पडून गाणी ऐकताना त्याला झोप लागली होती.झोपेतच कधीतरी त्याने पांघरूण अंगाभोवती लपेटून घेतलं होतं. अशा निवांत झोपेतून उठलं की काळ-वेळाचं भान यायला वेळ लागतो.
आदित्य बाहेर आला तेव्हा मेघा,दर्शु आणि रमा गप्पा मारत बसल्या होत्या. तो अजूनही झोपेतच होता.
"गुड मॉर्निंग" रमा हसत म्हणाली.
"परचुरे, तुम्ही तुमच्याच अपार्टमेंटमध्ये आहात" मेघा 
"पाटकर बाई, कळलं मला ते" त्याने उत्तर दिलं.मेघाने चेहरा कसानुसा केला. 
"बाय द वे, तुमच्यापैकी हे अपार्टमेंट कोण ठेवणारे?" दर्शुने विचारलं.
"म्हणजे?" आदित्यचा चमकून प्रश्न.
"अरे, आता सेम संपली की तुमच्यापैकी एकजण बाहेर पडेल ना?" मेघा पुन्हा संवादात आली. रमाने आणि आदित्यने नुसतं एकमेकांकडे पाहिलं आणि उत्तर द्यायचं टाळलं. मेघा आणि दर्शुनेसुद्धा एकमेकींकडे दोघींनाच कळतील एवढ्याच भुवया वर करत पाहिलं.पण त्यांच्या दुर्दैवाने ते आदित्य आणि रमा दोघांच्याही लक्षात आलं.
"दोघेही उत्तर देत नाहीयेत...तुम्ही कायम एकत्र राहायचं ठरवलं आहे का?" मेघाच्या चौकश्या संपत नव्हत्या. अशा प्रश्नांना उत्तरं देताना एकटा आदित्य असता तर तो गडबडला असता पण गांगरून जाणं, कन्फ्युस होणं हे वाक्प्रचार रमाच्या शब्दकोशात कधीच नव्हते. ती दहा-वीस मेघांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला किंवा निदान प्रश्नाकडे दुर्लक्ष करायला समर्थ होती. 
"सध्या तरी मी चहा करायचं ठरवलं आहे. आदित्य पण उठलाय...तुम्ही दोघी चहा घेणारात ना?" ती उठून किचनकडे गेली. दर्शना आणि मेघाने यावेळी मात्र त्या दोघांच्या नकळत एकमेकींकडे पाहून माना डोलावल्या. रमा गेल्यावर तिघेजण अवघडल्यासारखे शांत बसून राहिले.
"सो..तुम्ही दोघी आज अचानक इथे कशा?" आदित्यने ताण हलका करायला प्रश्न विचारला.
"का...तुला आम्ही आलेलं आवडत नाही का?" दर्शुने विचारलं. तिच्या वाढदिवसाला आदित्यचं अस्वस्थ असणं तिला अजून लक्षात होतं.
"अगं नाही ग..आणि मला माहितीय की तू मला टोमणा मारते आहेस...तू तुझ्या बर्थडे पार्टीचं म्हणत असलीस तर-" रमा आधणात साखर घालता घालता थांबली. तिचे कान आदित्य काही अनपेक्षित बोलत नाहीये ना याकडे होते."- मला त्या दिवशी बरं वाटत नव्हतं. त्या दिवशी काम पण खूप झालं होतं. रमा आणि मेघा तुझ्या बर्थडे बद्दल खूप एक्साइटेड होत्या. मला माझ्या बरं न वाटण्याने त्यांच्या उत्साहावर विरजण घालायचं नव्हतं" दर्शुचं समाधान व्हायला एवढं पुरेसं होतं. 
'एखादी लहान गोष्ट कठीण मराठीत कशी सांगायची हे आदिला बरोब्बर जमतं' रमा मनात म्हणाली. 
"आणि तुला हवं तर आपण पुन्हा पार्टी करू आमच्या घरीच...आणि हां..सेम संपण्यापूर्वी बरं का...म्हणजे फक्त आपण ७च जण.."
'याची काहीही गरज नाहीये' रमाचं सगळं लक्ष आदित्यच्या बोलण्याकडे होतं. 
"ठीके रे...परत पार्टी वगैरे नको..रमा काही आमच्याकडे फिरकत नाही. म्हणजे तुमचे वाद झाले की तू निदान जीत आणि राजकडे तरी जातोस..ती काही आमच्याकडे येत नाही" मेघाचं वाक्य ऐकलं तेव्हा चहाबरोबर रमाचा रागही उतू जायच्या परिस्थितीत होता. आदित्य गडबडला आणि त्याने उत्तर द्यायचं टाळलं. मनात त्याने राजला हजारो शिव्या घातल्या. पुन्हा एक ऑकवर्ड सायलेन्स.
रमा चहाचे कप घेऊन आली आणि वातावरण निवळलं.  
"वा वा वा...झोपेतून उठल्यावर असा छान रंगाचा, आलं घातलेला चहा...रमा फडके, डेव्ह तुमचं कल्याण करो..."
"तुला देव म्हणायचं आहे का?" दर्शना.
"अंहं...डेव्ह...!!"  
"अगं, आपला प्रोफेसर डेव्हिड केम्प...तो मला नेहमी चांगले रिमार्क्स देतो रिपोर्ट्सवर...त्यावरून हा थट्टा करत असतो.."
"ओह.."
"मगाशी तू आमच्या गप्पांच्या आवाजाने उठलास का रे?" दर्शनाने विचारलं.
"नाही...का?"
"कारण आता पुढचे दोन आठवडे मी दर विकेंडला येणारे..आणि मनीषासुद्धा" दर्शना त्याच्याकडे बघत म्हणाली. त्याने न बघताच मान डोलावली. 
"हो...हिने मला दिवाली नाईटला डान्स करायला कन्व्हिन्स केलंय" रमा. 
"डान्स?दिवाली नाईट? पण दिवाळीला अजून महिना आहे" आदित्यने विचारलं.
"इथे यंदा लौकर** आहे..." मेघाने थट्टा करत म्हटलं. 
"अमेरिकेचं मला कौतुक वाटतं...म्हणजे यांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहेच...पण यांनी त्यांचा स्वातंत्रदिन सोडला तर बाकी सगळे सण-वार सोयीने करून घ्यायची पद्धत ठेवली आहे...म्हणजे बघ ना...त्यांचा प्रत्येक सण कुठल्यातरी महिन्याचा गुरुवार, शुक्रवार किंवा सोमवार असतो..म्हणजे विकेंड जोडून सुट्टी साजरी करता आली पाहिजे..." दर्शना म्हणाली.
"म्हणून आपण दिवाळी पण सोयीने साजरी करायची?" मेघाचा पुन्हा प्रश्न.
"हो...इथे राहतो...म्हणजे इथलं कल्चर फॉलो केलं पाहिजे..सोमवार ते शुक्रवार कुणाला वेळ आहे?" दर्शनाचा रिप्लाय.
"खरंय..मला पटलं" आदित्यने कपमध्ये फुंकर घालत वाक्य टाकलं.
"तू तिचीच बाजू घे" मेघा चिडली "मागे जेव्हा गणपतीचा विषय होता तेव्हा तुला भारतातला गणपती चांगला वाटला होता आणि आता तुला इथे साजरी होणारी दिवाळी चुकीची वाटत नाही? कमाल झाली तुझी.."
"अगं तू का चिडतेयस इतकी?" रमा मध्ये पडली.
"रमा,एक मिनिट...मी बोलतो...मेघा,तो विषय वेगळा होता. गणपती श्रद्धेचा भाग होता आणि त्याची पूजा-अर्चा करायला एक शास्त्रोक्त पद्धत आहे, दिवाळीमध्ये श्रद्देपेक्षा सण साजरा करण्याला महत्व आहे..आणि सेलिब्रेशनच करायचं तर सगळ्यांना वेळ असायला नको? मान्य आहे की दिवाळी साजरी करायचे आपले प्रोटोकॉल्स आहेत...पण ते फॉलो करायला काहीच लागत नाही. नरक चतुर्दशीला भल्या पहाटे उठ, अंघोळ कर, घरून आलेला फराळ खा,देवाचं दर्शन घे, भाऊबीजेला माझ्याकडे ये,मला ओवाळ, आपण नवीन कपडे घालून जमू, मेणबत्त्या,पणत्या जे असेल ते लावू...विषय संपला...आणि हे आपण स्पेसिफिकली दिवाळीच्या दिवशी करू..ओके?" त्याने हसत विचारलं.मेघाने हसत होकार दिला.
"आणि दर्शु, मी तुझी बाजू घेतली ते ठीके. म्हणजे वेळ काढून सण करायला माझी हरकत नाहीये..पण दिवाळीला आपण अमेरिकन्सना चिकन खायला घालतो ना...ते मला नाही पटलं"
"आदित्य, बऱ्याच गोष्टी इच्छा नाही किंवा पटत नाही म्हणून करायच्या टाळल्या तर अवघड होईल" दर्शनाने अचानक एक 'परचुरीझम' टाईप वाक्य टाकलं.
"दर्शु या भाषेत कधी बोलायला लागली?"रमाने मेघाला विचारलं.
"हो ना...मलाही तोच प्रश्न पडलाय" मेघाने बाजूला बसलेल्या दर्शुला चिमटा काढला. दर्शुने हसू आवरत तिला दटावलं. 
मुलींनी आपली चेष्टा सुरु केलीय हे कळल्यावर आदित्य गप्प बसून राहिला.

आयुष्यात बरेचदा खूप अवघड क्षण येतात. आपण केलेली एखादी गोष्ट, किंवा घेतलेला एखादा निर्णय चुकीचा होता की बरोबर होता हे ठरवता येईनासं होतं पण आपलं कन्फ्युजन कुणाला बोलूनही दाखवता येत नाही. काही सामाजिक,मानसिक संस्कारांची बंधनं आपण कळत-नकळत स्वतःला घालून घेतलेली असतात. ती बंधनं बरोबर की या क्षणाला वाटतेय ती भावना बरोबर असा विचार कित्येकदा येऊन जातो. परिस्थिती जितकी गुंतागुंतीची होत जाते तितकी भावनेची उत्कटता वाढत जाते आणि अर्थात प्रॉब्लेमसुद्धा तसाच वाढत जातो. आदित्य आणि रमाची एकूण परिस्थिती सध्या अशीच होती. दोघांना एकमेकांबद्दल सगळं माहिती होतं. सहवासाने स्वभाव माहिती झाले होते. श्री रमाला योग्य जोडीदार ठरेल असं प्रायमरी कन्क्लूजन आदित्यने काढलं होतं पण तो ही गोष्ट तिला सांगू शकत नव्हता. त्याच्याबाबतीत अमृता जे वागली तसलं काही रमा-श्रीच्या बाबतीत होऊ नये अशी त्याची मनापासून इच्छा होती. अमृता आदित्यशी जे काही वागली ते रमाला पटलं नव्हतं, आदित्य कितीही कन्फ्युस्ड, अन्प्रिपेअर्ड मुलगा असला तरी त्याच्याबरोबर चांगलं काहीतरी व्हायला हवं होतं हे तिला मनोमन वाटत होतं. गोची म्हणजे एकमेकांमध्ये झालेली भावनिक गुंतवणूक या वेळेला कबूल करताही येत नव्हती कारण पुन्हा एकदा तोच 
नात्याला नावं देण्याचा प्रश्न!! बऱ्याच गोष्टी इच्छा आहे पण करता येत नाहीत म्हणूनसुद्धा अवघड होतं बरेचदा. हल्ली दोघांनी एकमेकांना प्रश्न-प्रतिप्रश्न करणं बंद केलं होतं. दिवसभरातल्या घडलेल्या गोष्टींच्या अपडेट्स एकमेकांना देऊन आपल्या आयुष्यात काय घडतंय हे दुसऱ्याला माहित असेल याची काळजी ते घेत होते.  
मेघा आणि दर्शना निघून गेल्यावर बराच वेळ रमा काही न बोलता बसून राहिली. न राहवून आदित्यने रमाला विचारलं-
"तू चिडली आहेस का? म्हणजे पुन्हा काही बिनसलंय का?"
"का? बिनसलं असेल तर तू राज आणि जीतकडे जाणारेस का?आदि, मला प्रश्न पडलाय की आपले असे कोणते वाद होतात की जे तू राज आणि जीतकडे जाऊन 'मांडतोस'??" मगाचचं मेघाचं वाक्य रमाने ऐकलं असल्याचं त्याच्या लक्षात आलं.
"रमा सॉरी, तू मला असाईनमेंट दिली नाहीस त्या दिवशी संध्याकाळी जीतकडे गेलो होतो, तेव्हा जनरल गप्पा झाल्या होत्या. राज झोपला होता..त्याने काहीतरी अर्धवट ऐकलं आणि सांगून सांगून सांगितलं कुणाला? तर समाजसेविका मेघा पाटकरला?" आदिने सारवासारव केली.
"आदि, प्लीज हे परत होऊन देऊ नकोस...आपण परफेक्ट पार्टनर्स नसू कदाचित पण आपण वरचेवर भांडलोसुद्धा नाहीये. त्यात नशीब की मेघाने तुला डायरेक्ट विचारलं,मला विचारलं असतं तर मला नक्की राग आला असता" रमाला विषय संपवायचा होता. त्याने मान डोलावली.
"तू नवरात्र मिस करत नाहीयेस यंदा?" त्याने विषयांतर करायला विचारलं.
"नाही एवढं..कुणी दांडीयाचे फोटोस शेअर करत नाहीये फेसबुकवर इतकं"ती अजूनही थोडी रागात होती.    
"अरे हां फेसबुकवरून आठवलं अजून एक, मला श्रीधरची फ्रेंड रिक्वेस्ट आलीय.." रमाच्या रागाची जागा उत्सुकतेने घेतली..
"मग? तू रिजेक्ट केलीस की?"
"रिजेक्ट कशाला करू मी?हल्ली लोकांच्या फेसबुकच्या फ्रेंडलिस्टमध्ये असणारा प्रत्येकजण त्याचा फ्रेंड असलाच पाहिजे अशी गरज राहिलेली नाहीये. सोशियल नेटवर्किंगने आपले नाते-संबंध री-डिफाईन केलेत..आणि त्यात काही चुकीचं नाही.आपला सामाजिक गुंता वाढावा हाच तर हेतू आहे या प्रकाराचा! आपण ते चुकीचं वापरतो, आपण स्वतःच्या प्रत्येक कृतीबद्दल वैश्विक बोंबाबोंब करण्याची काहीच गरज नाहीये पण तरी आपण करतो..जुने मित्र-मैत्रिणी शोधा, नवीन माणसांशी मैत्री करा, तुमच्यासारखे विचार असलेली माणसं शोधा हा मूळ हेतू..पण लोक काय करतात माहितीय? ज्यांच्याशी कडाक्याचं भांडण झालंय त्यांची प्रोफाईल निरखत राहायची आणि त्यावरून त्याचं बरं चाललंय की वाईट चाललंय याचे अंदाज बांधायचे , आपल्याला कधी काळी आवडत असलेल्या मुलीचे आणि तिच्या आयुष्यात सध्या असलेल्या मुलाचे फोटो पहायचे...स्वतःच्याच नवीन गल्फ्रेंडच्या जुन्या अपडेट्स पहायच्या आणि त्यात कुणी तिचं फार कौतुक केलेलं दिसलं की त्याची झाडाझडती घ्यायची...कारण माहितीय या सगळ्या गमतीजमतींचं?" 
"काय?"
"कारण लोकांनी फेसबुकला आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवलंय..सगळ्यांना असं वाटतं की आपण एखाद्याचे फ्रेंड झालो की आपण त्याच्या आयुष्याचा भाग बनतोय किंवा एखाद्याला फ्रेंड लिस्टमधून काढून टाकलं म्हणजे त्याला आपण आयुष्यातून बाद केलंय...म्हणजे मी या सगळ्याचा भाग आहे आणि म्हणून मला सर्वस्वी टीका करण्याचा काही अधिकार नाही..पण वर्चुअल आणि रिअल लाईफमधला फरक लोकांनी विसरू नये इतकं मात्र मला वाटतं!" आपलं मत प्रदर्शन खूप लांबतं आहे हे जाणवल्यावर आदिने बडबड थांबवली.
"मग या सगळ्यात श्रीने तुला का रिक्वेस्ट पाठवली आहे असं वाटतं तुला?"
"तो अंदाज घेत असेल की तू मला त्याच्याबद्दल सांगितलं आहेस का नाही? सांगितलं नसशील तर आता मी तुला विचारेन आणि तुला मला सांगावं लागेल..नंतर तो माझे फोटो निरखेल, आवडीनिवडी वाचेल आणि त्यावरून मी माणूस म्हणून कसा आहे ते ठरवण्याचा प्रयत्न करेल" रमा हसली.
"श्री हे सगळं करेल याचे इतके अचूक अंदाज तू कसे बांधलेस?" रमाने पुन्हा पुस्तकात डोकं घालत विचारलं.
"स्वानुभव...गेले दोन तीन आठवडे मी हेच करतोय..फक्त फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू का नको हे ठरत नव्हतं माझं" रमाने वाक्य ऐकलं आणि त्याच्याकडे पाहायला मान वळवली. त्याला समोर बसवून त्याच्याशी काहीतरी बोलण्याची तिला खूप इच्छा झाली पण तो त्याच्या खोलीत निघून गेला होता. ती हातात घेतलेलं पुस्तक मिटून काही वेळ शून्यात पाहत राहिली.

"रमा, मी सारखा सारखा विषय काढला नाहीये पण तुझी मिडटर्म होऊन आठवडा उलटून गेला..तू आदित्य परचुरेशी बोलणार होतीस.."
"श्री,पहिली गोष्ट की मी बाबांशी हा विषय बोलणार होते..तुझ्याशी नाही! पण शेवटी ते तुला कळणारच आहे तर तुलाच सांगूनसुद्धा टाकते..आम्ही बोललो"
"मग? काय म्हणाला तो?"
"तूच विचार की त्याला..तुझा ऑनलाईन फ्रेंड आहे ना तो.."रमाने टोमणा मारला. श्री काहीच बोलला नाही. "मला तू असलं काहीतरी करशील याची कल्पना होती म्हणून मी तुला त्याचं नाव सांगितलं नव्हतं"
"रमा, प्लीज..मी काहीही जगावेगळं केलेलं नाही.."
"हो..हेसुद्धा मला आदित्यने सांगितलं"
"म्हणजे?"
"म्हणजे..तोसुद्धा तेच करतोय सध्या...त्याच्या आयुष्यात असणाऱ्या मुलीने कुणाशीतरी लग्न करायचं ठरवलंय..सो तो हेच करतोय..." श्रीला काय प्रतिक्रिया द्यायची तेच कळेना.   
"म्हणजे...त्याचं लग्न मोडलंय?"
"श्री, लग्न वगैरेचा विचारसुद्धा त्याने केला नव्हता..प्रचंड कन्फ्युस, अन्प्लांड आहे तो...सध्या फसवलं गेल्याच्या फिलींगने निराश आहे"
"मला त्या मुलीची चूक वाटत नाही...तो तुझ्याबरोबर राहत असल्याचं तिला कळल्यावर तिने काय करावं?"
"त्याने तिला काहीच सांगितलं नव्हतं...तिने त्याला सोडण्याचा त्याने माझ्याबरोबर घर रेंट करण्याशी काही संबंध नाही"
"आणि हे सगळं त्याने तुला सांगितलं?"
"तुला काय म्हणायचंय?"
"तुला कळतंय की मला काय म्हणायचं आहे..रमा, त्याने तिला तुझ्याबरोबर तो राहत असल्याचं सांगितलं असणारे आणि म्हणून तिने निराश होऊन कुठल्यातरी लग्नाला होकार दिला असणारे...आणि ही गोष्ट परचुरे तुला फिरवून सांगतोय.."
"तू काहीही बरळतो आहेस श्री..तो जर का तुला समजून घेऊ शकतो तर तू त्याला समजून घेऊ शकत नाहीस? आणि समजून घेणं लांब राहिलं तू त्याच्यावर आरोप करतो आहेस?"
"रमा,तुला त्याच्या निराशेची पडलीय..माझ्या निराशेची नाही याचं मला वाईट वाटतंय..."
"मी तुला फसवलं नाहीये श्री...इनफॅक्ट तुला मी सगळं खरं सांगितलं म्हणून आपण ही इन फर्स्ट प्लेस ही चर्चा करतोय...रिमेम्बर?"
"त्याबद्दल आभारी आहे मी तुझा पण हेही सांगतो की तुला गिल्टी वाटलं म्हणून तू मला खरं सांगितलस" रमा गप्प झाली. 
"काय..आता का गप्प झालीस?"
"विचार करत होते...गिल्टीनेस डिफाईन करणं सब्जेक्टीव्ह असतं असं मला तूच मागे एकदा म्हणाला होतास.."
"शब्दात अडकवू नकोस रमा"
"अडकवत नाहीये श्री..माझी चूक मी कबुल केलीय..पण मला ती गोष्ट पुन्हा पुन्हा बोलून दाखवायला लावून माझ्या आयुष्यात तुला असणारं महत्व वदवून घेऊ नकोस"  
"ठीके...आदित्यचं काय?"
"त्याचं काय?"
"तो काय करणारे पुढे? तू बोलली आहेस का त्याच्याशी काही?"
"श्री, मला त्याच्याशी काही बोलणं गरजेचं वाटत नाही...पण तुझा नेमका प्रॉब्लेम काये? म्हणजे आपला विषय झाला आता आदि.."
"तू त्याला आदि हाक मारतेस का?" श्रीने आवाज शक्य तितका नॉर्मल ठेवत विचारलं.
"हो..आता यातही काही चुकतंय का माझं श्रीधर?" तिने  त्याच्या नावातल्या 'धर'वर जोर देत विचारलं.  
"नाही...ठीके"
"श्री-"
"रमा ठीके...मी काहीच म्हणत नाहीये...म्हणजे तू वागते आहेस ते सगळं बरोबर...मीच काय तो चुकतोय..मी लग्नाची मागणी घातल्यावर गेले ५ वर्ष बरोबर असणारी मुलगी मला 'नंतर बघू' म्हणून अमेरिकेला गेली..दोन महिन्यांनी कळलं की ती तिथे काही राहण्याचे घोळ झाले म्हणून एका मुलाबरोबर राहायला लागली. त्या मुलाचे मी डीटेल्स विचारले तर मी चुकतोय...तू आदित्यला आदि म्हणतेस...तरी मीच  चुकतोय-"
"एक मिनिट...एकच सांग...तू ज्या मुलीची गोष्ट सांगतो आहेस त्या मुलीने तुला गिल्टी वाटून किंवा अजून काही वाटून जर का सगळं खरं सांगितलं आहे तर तिच्यावर विश्वास ठेवावा असं एक क्षणसुद्धा वाटत नाहीये का तुला? उलट तुझे एकामागोमाग एक प्रश्न, आरोप, आर्ग्युमेंटस सुरूच आहेत...तू मला मिडटर्म्स कशा झाल्या? अभ्यास झाला होता का? तु ज्या शिकण्याच्या उत्कंठेने अमेरिकेला गेली होतीस ती पूर्ण होतेय का? हे आजपर्यंत एकदाही विचारलेलं नाहीस..." श्री गप्प झाला. "तुझ्याशी आत्ता लग्न करायला मी ज्या कारणाने नाही म्हणाले ते बेसिक कारण तू विसरून गेलास..तुला माहितीय श्री, त्याची गोष्ट सांगून झाल्यावर त्याने मला आपली सगळी गोष्ट सांगायला लावली. आपण भेटलो तेव्हापासून आत्तापर्यंत सगळ्याची. पुस्तकांमध्ये असते तशी. त्याला गोष्ट सांगताना तुला मी सगळं खरं का सांगितलं असेल, तू इतका महत्वाचा कधी झालास ते माझं मलाच जाणवलं होतं.." 
"सॉरी रमा, चुकलं माझं. मी पुन्हा शांतपणे सगळ्याचा विचार करेन..आता तू मला गिल्टी वाटायला लावू नकोस" श्री खजील होत म्हणाला.
"ठीके..माझी इतकीच इच्छा आहे की सगळं नीट व्हावं..माझ्या निर्णयांना तू आत्तापर्यंत ख़ुशी-नाखुशीत सपोर्ट केला आहेस...तसाच यापुढेही करशील अशी माझी अपेक्षा आहे" 
"हो,नक्की करेन.."

दुसऱ्या दिवशी क्लासला जाताना रमाने आदित्यकडे विषय काढला.
"आदि, मी काल श्रीला बोलले सगळं"
"सगळं?"त्याने चमकून पाहिलं.
"हो..त्याचं समाधान झालंय बहुतेक..पर्यायाने बाबांचंसुद्धा होईल.."
"गुड"
हल्लीच्या दिनक्रमाप्रमाणे रमाने आदित्यला जनरल अपडेट दिली आणि त्यानेही खोदून चौकश्या केल्या नाहीत.दिवसभर दोघे एकत्र असायचे, एकत्र क्लासला जायचे, एकत्र जेवायचे, बाकी सगळ्यांना कायम एकत्र दिसायचे. घरी पोहोचल्यावर एकदा आदित्य त्याच्या खोलीत आणि रमा तिच्या खोलीत गेली की त्यांची विश्वं वेगळी होऊन जायची. खोलीत आडवं पडल्यावर रमाचा, तिच्याबरोबर राहण्याच्या त्याच्या निर्णयाचा विचार आदित्यने केला नाही असा एकही दिवस गेला नव्हता. दुसरीकडे रमाला पहिल्यापासूनच तिचा एकूण स्वभाव आणि आदित्यबद्दलची तिची मतं, तिचं वागणं यातला विरोधाभास कोड्यात टाकायचा. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत तिचं असं पहिल्यांदाच होत असल्याने तिला कारणमीमांसा करता येत नव्हती. 
सेमेस्टर संपायला दीड महिना राहिला होता.


क्रमशः