Pages

Saturday, July 31, 2010

भारतीयत्व आणि प्रादेशिक अस्मिता

 खुप दिवसानी मराठीत लिहितोय!मस्त वाटतय...असो. आज अचानक अशा विषयावर चर्चा म्हणजे जरा विचित्रच वाटेल एखाद्याला..पण याच विषयावर काही वर्षांपूर्वी मी भाषण केल होतं आणि त्या भाषणावर तेव्हा बऱ्याच जणांनी भली बुरी मतं मांडली होती म्हणून आज पुन्हा एकदा तेच विचार जास्त लोकांना ऐकवावेत म्हणून ही पोस्ट...

इथे सर्वप्रथम नमूद करावसं वाटतं की जगातल्या कित्येक देशांमधे जन्मभूमीचा उल्लेख Fatherland  किंवा "पितृभूमी" असा केला जातो, भारत हा असा एकमेव देश असेल जिथे आपण जन्मभूमीला "मातृभूमी" म्हणतो. आपण अभिमानाने तिला आईचा दर्जा देतो, तिला "भारतमाता" म्हणतो. मग ही भारतमाता म्हणजे नेमकी कोण आणि तिचा जयजयकार करणं म्हणजे काय करायचं हेच आपल्याला माहित नसतं. भारतमाता ही थोड़ी लक्ष्मीसारखी, थोड़ी सरस्वतीसारखी दिसणारी कोणी देवी आहे की काय?असा प्रश्नही आपल्याला पडतो. पण आसेतुहिमाचल पसरलेला, विविध संस्कृतींनी नटलेला हा आपला देश म्हणजेच आपली भारतमाता आणि आपण इथे जन्माला आलो याचा ठायीठायी अभिमान असणं म्हणजेच आमचं राष्ट्रीयत्व, भारतीयत्व!!

मग प्रादेशिक अस्मितेबद्दल आपण का बोलायचा आणि प्रादेशिक अस्मिता म्हणजे नेमकं काय?भारतावर इंग्रजांनी दीडशे वर्षं राज्य केलं. या कालावधीमधे मराठी-कानडी, हिंदु-मुस्लिम सर्व खांद्याला खांदा लावून लढले. मग ते १८५७ च स्वातंत्रसमर असो किंवा १९४२ च "चले जाव" च लढा असो! सर्व जाती-धर्मांचे, भाषांचे लोक "भारतीय" म्हणून लढत होते. इंग्रजांनी स्वातंत्र्य  दिलं पण त्यांनी जाता जाता "फोड़ा आणि राज्य करा" या नीतीचा वापर केला आणि अखंड हिंदुस्तानाचे दोन तुकडे केले.फाळणी होण्यात सर्वांचं भलं आहे आणि याच्याइतका चांगला पर्याय कुठला असूच शकत नाही असं तत्कालीन नेत्यांना  का वाटलं कुणास ठाउक? पण फाळणी झाली. पाकिस्तानने स्वतःला मुस्लिम राष्ट्र घोषित केलं तर भारताने धर्मनिरपेक्ष सार्वभौम संविधानाचा स्विकार केला. जागतिक समाजकारणाचा विचार केल्यास हे कृत्य अर्थात स्तुत्य होतं. पण त्यात गोची झाली भाषावार प्रान्तरचना केल्याने! या प्रकाराने महाराष्ट्र म्हणजे मराठी, बंगाल म्हणजे बंगाली, पंजाब म्हणजे पंजाबी अशी आपल्या देशाची अंतर्गत ओळख होउन गेली.आणि मग एक भारतीय म्हणून आपली ओळख विसरून आपण प्रादेशिक विचार करण्यापुरते संकुचित झालो. ही भावना म्हणजेच प्रादेशिक अस्मिता!

जाज्वल्य देशभाक्तिकडून आपण प्रादेशिक अस्मितेकडे कसे आलो असा मुद्दा इथे उपस्थित होतो. मग सहज स्वातंत्रपूर्व आणि स्वातंत्रोत्तर कालाची तुलना होते. स्वातंत्रपूर्व पिढीने गुलामीची कडू चव अनुभवली होती. "चले जाव" चा लढा किंवा "आझाद हिंद" सेनेचं कर्तुत्व त्याना माहित होतं, आणि म्हणून  सर्वात महत्वाच म्हणजे मिळालेल्या स्वातंत्र्याची त्यांना किंमत होती. या आधीच्या पोस्टमध्ये मी स्वातंतोत्तर पीढ़ीबद्दल माझे विचार मांडले होते, त्या पार्श्वभूमीवरच मी म्हणेन, की या स्वातंत्रोत्तर पिढीने कधी पारतंत्र्य अनुभवलंच नाही, याउलट त्यानी पहिली असंख्य राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरे, भारत पाक, भारत चीन युद्ध, आणिबाणी वगैरे वगैरे..आणि इथेच कुठेतरी आपण राष्ट्रभिमानापासून प्रदेशाभिमानाकडे वळलो.

आणि मग धर्मंनिरपेक्ष भारतात हिंदु मुस्लिम दंगे झालेच, पण मराठी- कानडी वादही रंगला. भारत-पाक फालणी भविष्यात अनेक प्रश्नांना, वादांना कारणीभूत होइल असे म्हणणारे तात्याराव सावरकर मात्र शेवटपर्यंत हिंदु नेता म्हणुनच मर्यादित राहिले. एकेकाळी सोन्याची चिमणी वगैरे असणारा भारत मागासलेला, जाती-धर्म-भाषा अशा विषारी प्रश्नांनी ग्रासलेला देश होउन गेला. कधीकाळी अभिमानाने मिरवायच राष्ट्रीयत्व सुरुवातीला होंकी आणि नंतर क्रिकेट पुरतं मर्यादित झालं. याच कालात अनेक प्रादेशिक पक्षांचा उदय झाला. आणि वर्षानुवर्षं वाढत्या प्रादेशिक अस्मितेबरोबरच या पक्षांच महत्व वाढत गेलं. आज सत्तेच्या बाजारात हेच पक्ष किंगमेकर होउन बसले.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. देशभरातून हजारो लोक मुंबईकड़े कामाच्या निमित्ताने येणं साहजिक होतं. पण उत्तर प्रदेश्ह आणि बिहार सारख्या राज्यातून लोंढ़ेच्या लोंढे मुंबईच्या दिशेने आले. त्यानी इथल्या स्थानिक लोकांच्या जागा बळकवायला सुरुवात केली. पाहता पाहता पुणे नाशिक सारखी अस्सल मराठी संस्कृती जपणारी शहरे या लोकानी गाठली. आणि मग एरवी सहनशील म्हणवणारा मराठी माणुस खडबडून जागा झाला. " मुंबई आमची, महाराष्ट्र आमचा" या आंदोलनान्नी आणि चळवळीनी देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे वेधलं. विचार करता प्रश्न असा पडतो की संविधानाने केली भाषावार  प्रांतरचना! मग परराज्यातून आलेल्या लोंढ्याना विरोध केला तर आमचं चुकलं कुठे हो?

भारतातल्या लोकांचा एक जिव्हाळ्याचा विषय म्हणजे चित्रपट! या विषयाचा आपण चित्रपटांच्या अनुषंगाने आढावा घेऊ. उदाहरण म्हणून आपण एक गुणी "मराठी" दिग्दर्शकाचे ३ चित्रपट विचारात घेऊ!आशुतोष गोवारीकरचा चित्रपट "लगान"!चार साडेचार तास इतका लांबलेला सिनेमा असून "क्रिकेट" सारखा राष्ट्रीय एकात्मतेचा विषय होता म्हणून बहुदा चित्रपट चालला, हिट झाला. "जोधा अकबर" च्या निमित्ताने दिग्दर्शकाने एक नितांत सुन्दर प्रेमकथा पडद्यावर दाखवली. दोन धर्मात अनेक शतकांपूर्वी समझोता होउन एकत्र आलेल्या एका राजा आणि राजकन्येची गोष्ट सध्याच्या परिस्थितीत समाज प्रबोधन म्हणूनही  उपयोगी ठरली असती पण कुठल्याश्या लोकानी स्वतःला जोधा बाईचे वंशज म्हणवून घेत चित्रपटाबद्दल वाद निर्माण केला, त्यांची शेकडो वर्ष अनुपस्थित प्रादेशिक अस्मिता कुठुनशी जागी झाली आणि त्यानी चित्रपटाचे खेळ बंद पाडले. याच प्रेक्षकांनी राष्ट्रीयत्व या विषयावर निर्माण झालेला "स्वदेस" नावाचा सुन्दर चित्रपट मात्र सपशेल नाकारला. निर्मिती मूल्य, तगड़ी स्टारकास्ट, संगीत अशा सर्व बाबतीत हे चित्रपट तोडीस तोड़ होते, पण निव्वल कथावस्तुचा विचार करता इतर दोन चित्रपटांपेक्षा काकणभर सरस्च असणारा "स्वदेस" मात्र प्रेक्षक नाकारतो तेव्हा राष्ट्रीयत्व खरं की प्रादेशिक अस्मिता हा प्रश्न पडल्याशिवाय राहवत नाही!

मी फक्त प्रश्न उपस्थित करण्यासाठी ही पोस्ट लिहित नाहीये! उद्याचा विचार करता या प्रश्नाचा खरच विचार करण्याची वेळ येउन ठेपलेली आहे असं मला वाटतं. पाकव्याप्त काश्मीर, चिनव्याप्त अरुणाचल असे मुद्दे समोर असताना स्वतंत्र विदर्भ, तेलंगण असे मुद्दे निकालात निघायला हवेत! महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सुटायला हवा आणि या सगळ्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेउन प्रसंगी हस्तक्षेप करून निर्णय घेतले पाहिजेत. देशभरातल्या शिक्षण संस्थामधून विविध राज्यातल्या संस्कृतीची, उत्सवांची माहिती विद्यार्थ्याना मिळाली पाहिजे आणि त्याना या गोष्टीचा अभिमान वाटेल अशी शिकवण मिळायला हवी. सरते शेवटी जगाच्या पाठीवर असलेल्या भारत किंवा इंडिया नावाच्या भूभागावर आपला जन्म झाला आणि आपण "भारतीय" आहोत ही भावना मनात असणं महत्वाचं!गुलामीची किंवा पारतन्त्राची चव चाखायला न लागता हे शहाणपण आलं म्हणजे मिळवल.तुम्हाला काय वाटतं??????