Pages

Wednesday, August 22, 2012

जस्ट लाईक दॅट ८

आत्तापर्यंत:



आदित्य लहानपणापासून तीन-चार ठिकाणी राहिला होता. आजूबाजूला माणसं असणं आणि अचानक त्यांच्यापासून दूर जाणं ही गोष्ट त्याला नवीन नव्हती. माणसं लांब जातात म्हणून त्यांच्या जवळ जायचंच नाही असं मात्र त्याने कधी केलं नाही पण लांब असणाऱ्या माणसांबद्दल हळहळ करणं व्यर्थ असतं हे मात्र त्याला पक्कं कळलं होतं. रमा शाळा-कॉलेजच्या ट्रिप्स सोडून कधी २-३ दिवसांच्यावर तिच्या घरापासून लांब राहिली नव्हती. अमेरिकेतल्या 'नव्या नवलाईचे नऊ' दिवस संपल्यावर तिला होमसिकनेस जाणवायला लागला. 'सोशियल नेट्वर्किंग' या प्रकारचा तिला त्रास व्हायला लागला. भारतात सणांचे दिवस सुरु झाले होते. फेसबुक, मेल, चॅट सगळीकडे भेटणारे मित्र-मैत्रिणी तिला त्यांच्याकडे होत असणाऱ्या सेलिब्रेशनसबद्दल सांगत होते. आपण कितीही बरा स्वैपाक करत असलो तरी आईच्या हातच्या वरण-भाताची चवसुद्धा आठवून रडायला येत होतं. आदित्यबरोबर राहून आईला फसवत असल्याचं फिलिंग सगळ्यात वाईट होतं. मुंबईच्या गर्दीला, गोंगाटाला ती खूप मिस करत होती. गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक करायचे का म्हणून विचारायला मेघा आली आणि रमाच्या डोळ्यात पाणी आलं.
"माझ्या घरी ५ दिवसांचा गणपती असतो. माझे काका-काकू, सगळे भाऊ-बहिणी, मावशी, आत्या सगळे सगळे जमतात आमच्या घरी..मी खूप मिस करणारे या वर्षी सगळं"
"रमा, सवय करून घे आता! मला माहितीय की असं म्हणणं सोप्पं आहे..पण आम्हीसुद्धा वर्ष-दोन वर्षापूर्वी या फेसमधून गेलोय..अमेरिकेत आल्यावर तावून-सुलाखून निघणं वगैरे असतं ना हा त्यातला मेजर पार्ट असतो.."
"हं..पण...हे फेसबुक, मेसेजेस...सतत आठवण करून देतात गं त्याची..."
आदित्य गप्पा ऐकून त्याच्या खोलीतून बाहेर आला.
"कोणाची आठवण येतेय तुला??" त्याने थट्टा करायच्या स्वरात विचारलं. ती मान खाली घालून काहीच उत्तर न देता गप्प बसून पाहिली. मेघाने डोळे मोठे करून त्याला दटावलं.
"तुमचे गर्ल टॉक्स चालू आहेत का?मी आत जातो परत..किंवा जीतकडे जातो" तो उठत म्हणाला.
"आदि-त्य...बस...आम्ही जनरल बोलतो आहोत..." रमाने चटकन सावरूनसुद्धा आदि आणि त्य मध्ये आलेला पॉझ मेघाच्या लक्षात आलाच. फक्त तिला हे माहित नव्हतं की आदित्यसाठीसुद्धा ते नवीन होतं.
"ओके..काय बोलताय तुम्ही?" बेल वाजली. आदित्य दार उघडायला गेला.
"स्पीक ऑफ द डेव्हिल.." तो आत येणाऱ्या जीतला म्हणाला.
"डेव्हिल? निदान शंभर वर्षं आयुष्य असं तरी म्हणायचं.." जीत आत आला.
"तू काय घेऊन आला आहेस?" आदित्यने विचारलं.
"फ्री डोनट्स..बिझनेस बिल्डींगमध्ये वाटत होते..तब्बल ४ मिळाले..राज खाणार नाही..सो मी विचार केला की तुझं वजन वाढवावं थोडं.."
"राज डोनटस खात नाही?"
"सध्या तो सिरीअसली वजन कमी करायच्या मागे आहे..पुढच्या समरमध्ये घरी गेला तर मुली बघायचे कार्यक्रम होणारेत...आणि तो फ्री फूड खात नाही...ते म्हणे क्वालीफायर पास करून वर्षानुवर्ष पी.एचडी करत सडणाऱ्या लोकांचं लक्षण आहे"
"आवरा कुणीतरी त्याला.."
"कठीण आहे ते..त्याला जाऊ दे..प्लेट घे तू..गरम करुया ना??" त्याने विचारलं. मेघा आणि रमा या दोघांकडे काही न बोलता बघत होत्या. जीतचं त्यांच्याकडे लक्ष गेलं.
"काय पाटकर? तुम्ही इथे कुठं?" त्याने मेघाला विचारलं.
"पाटकर?" रमाला प्रश्न पडला.
"सुदैवाने किंवा दुर्दैवाने माझं नाव मेघा पालकर आहे..मेधा पाटकर नाही..पण ते याला कळत नाही.." मेघा रमाला म्हणाली. 
एकमेकांची थट्टा करत खाणं आणि चहा झाल्यावर पुन्हा भारतातले सण हा विषय चर्चेत आला.
"जीत, रमा म्हणते की तिला फेसबुक, मेसेजेस, फोटोस यांचा त्रास होतो..तुझं काय मत आहे यावर?" मेघाने अर्थपूर्ण हसत जीतकडे पाहिलं. तिला तो काय उत्तर देणार याची कल्पना होती.
"धत तेरी..त्रास कसला आलाय त्यात..रमा खूप सोप्पं आहे! ते लोक त्यांचा आनंद साजरा करतात, आपण त्यात वाईट वाटून घ्यायचं नसतं..ते काही आपल्याला जळवायला फोटोस टाकत नाहीत..आणि जे टाकतात त्यांच्यासाठी आपण टाकू की फोटो..."
"आपण कसले फोटो टाकणार?"
"आपण करू की इथे चतुर्थी!! चांगले रग्गड उकडीचे मोदक करू चतुर्थीला...विकेंडला गाडी बुक करू आणि महाराष्ट्र मंडळाच्या गणपतीला जाऊन येऊ..शेकड्याने फोटो काढू..यंदा तर ७ जण आहोत..राजची मोठ्ठी गाडी चालवायची हौस त्याला भागवता येईल..तुमचं फिरणं होईल...गाय्स..आपण अमेरिकेत आहोत..भारतातल्या लाखो लोकांना इथे यायचं असतं..आपण 'चोझन वन्स' आहोत..आणि आपण ते फुटकळ फोटोस पाहून दुःख करायचं? नाय..नो..नेव्हर..आणि दुसरं असं की आपण ते सगळं कायमसाठी सोडून आलो नाहीये ना? कधीतरी आपण परत जाऊ..कदाचित पुन्हा सेटल व्हायला नाही..पण तरी..कधीतरी गणपती, दिवाळी हे सगळं परत भारतात साजरं करूच की.."
"हं.." आदित्यने मान डोलावली.
"बाय द वे..तुला लैच वाईट वाटतंय का? तर आपण एक काम करूया..आपली मच पेंडिंग मुव्ही नाईट आज करायची का?"
"मला आणि दर्शुला चालेल...मनिला विचारते...राज असेल ना?"
"त्याचं काय? तो निशाचर माणूस आहे! त्याला सकाळी सातला मिटिंग असेल तरी तो येईल.."
"मग ठीके...चालेल..कुणाच्या घरी?"
"इथेच येता का?" आदित्यने विचारलं.
"इथे?"
"हो..मी नवीन स्पीकर्स घेतले आहेत..ते पण टेस्ट होतील..मुव्हीस घेऊन या फक्त..नाहीतर माझ्याकडे जे असेल ते पाहावं लागेल.."
रात्री एकत्र सिनेमे बघायचं ठरलं. जीत आणि मेघा निघून गेले.
"मेधा पाटकर...हा हा हा" आदित्य स्वतःशीच हसत म्हणाला. त्याचं लक्ष त्याच्याकडे बघून गालातल्या गालात हसणाऱ्या रमाकडे गेलं.
"भारी होता ना?" त्याने हसत विचारलं. रमा त्याच्या हसण्यात मोकळेपणाने सामील झाली. तो अजून मोठ्याने हसायला लागला-
"सुदैवाने किंवा दुर्दैवाने माझं नाव मेघा पालकर आहे..." तो खिदळत मेघाची नक्कल करत म्हणाला. रमाला खूप हसायला यायला लागलं.
"आदि पुरे..." तिने परत आदि म्हटलेलं ऐकून तो एकदम हसायचा थांबला. तिने प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं. त्याने उत्तरादाखल भुवया उंचावल्या.
"या नावाने हाक नको मारू का?" तिने विचारलं. खरंतर त्याची काहीच हरकत नव्हती. घरीसुद्धा त्याला त्याच नावाने हाक मारायचे. पण का कुणास ठाऊक हा विषय असा बोलून झाल्यावर त्याला बरं वाटायला लागलं.
"सुदैवाने किंवा दुर्दैवाने माझं नाव आदित्य-" तो बोलता बोलता पुन्हा हसायला लागला आणि वातावरणात निर्माण झालेला तणाव निवळला.
"तुला घरची आठवण येत नाही का रे?" तिने भावूक होत विचारलं.
"कुठल्या घरची...?" त्याचा तितकाच निर्विकार प्रश्न!
"कुठल्या म्हणजे? अशी किती घरं आहेत तुझी?"
"पुणे, मुंबई, श्रीवर्धन, सोलापूर.." 
"मी समजले नाही"
"रमा, मी हे सगळं फार लहान असल्यापासून अनुभवतो आहे...हे सगळं म्हणजे घरापासून लांब जाणं ,तिथल्या माणसांची, त्यांच्या सोबत घालवलेल्या सणांची आठवण येणं...परचुरेंकडे फिरता गणपती असतो...दरवर्षी एका भावंडाच्या घरी! आम्ही श्रीवर्धनला होतो तेव्हा आमच्या घरी होता..दीडच दिवस असतो म्हणून सगळे हमखास सुट्टी काढून येतात..सगळ्यांना कोकण खूप आवडलं..हरिहरेश्वरचा समुद्र, श्रीवर्धनमधल्या आमराया...त्यावर्षी दिवाळीसुद्धा आमच्या घरी झाली..नंतरच्या वर्षी मुंबईत आलो तेव्हा दीड-दोन वर्ष कुणी फिरकलं पण नाही...एकीकडे आपण म्हणतो की पिकनिकला कुठे गेलो ते महत्वाचं नाही पण कुणासोबत गेलो ते महत्वाचं..तरीसुद्धा चांगली कंपनी आहे म्हणून आपण चार-धामची यात्रा नाही करू शकत किंवा मुंबईच्या धावपळीत मजा नाही करू शकत...जागांना तेवढंच महत्व असतं..सोलापूरच्या घरच्या मागचं वडाचं झाड..तिसरी-चौथीत सूर-पारंब्या खेळायचो तिथे..मग श्रीवर्धनला आलो..तिथे वड नव्हता..पण समुद्राच्या प्रेमात पडलो..पोहायला शिकलो..मग मुंबई...आय जस्ट हेटेड इट इन द बिगीन्निंग...माणसं, बिल्डींग्स, एकमेकांशी हिंदीत बोलणारी माणसं..मग हळूहळू त्याची सवय झाली..ते सगळं आवडायला लागलं..त्यातली गम्मत कळायला लागली..आणि आता गेली सात-आठ वर्ष पुणे...संस्कृती, शिक्षण, सो कॉल्ड महाराष्ट्रीयन सभ्यतेचं माहेरघर...पण स्वतःला पुणेकर म्हवून घेण्यातला माज..आय मीन इट..माज...त्याची गंमत वेगळी..तुम्ही सगळी माणसं जेव्हा भारताची आठवण येते म्हणता ना तेव्हा तुम्हाला फक्त मुंबईची, पुण्याची, नाशिकची, थोडक्यात तुम्ही राहत असलेल्या ठिकाणाची आठवण येत असते..दिल्लीच्या थंडीचे, गुजरातच्या गरब्याचे फोटो बघून आपल्याला कुणाला काहीच वाईट वाटणार नाही! अ...तू मगाशी विचारलंस ना? मला घरची आठवण येत नाही का? येते..पण ते मला नवीन नाहीये..एक सांगू..सोलापुरचं वडाचं झाड आठवलं की जाणवतं..कितीही विस्तारलो, पसरलो तरी आपलं आपल्या मुळांशी असणारं नातं तुटत नाही...घट्ट जोडलेलं असतं ते! दुसरीकडे श्रीवर्धनचा समुद्र नेहमी किनाऱ्यापासून खोल आत पोहायला प्रवृत्त करणारा..सूर्यास्ताच्या वेळी दिसणारं क्षितीज..नेहमी खुणवायचं..गंमत अशी आहे की हे सगळं आठवलं की मग आठवण आल्याचं दुःख होत नाही!"
"आदि..मला माहित नव्हतं की तू या सगळ्याकडे इतक्या पोएटिकपणे बघतोस?"
"पोएटिक?" तो हसला.."रमा, तो समुद्र, ते वडाचं झाड ही माझ्या आयुष्यातली श्रद्धास्थानं आहेत..आठवली की बरं वाटतं"
"किती फ्लेक्सिबल आहेस तू.."
"कधी तुला मी फ्लेक्सिबल वाटतो तर कधी पार डळमळीत वाटतो...या फ्लेक्सिबिलीटीच्या भानगडीत माझा डिपेन्डंस वाढला असेल बहुतेक असं जाणवतं आहे मला!!"
दोघे काही न बोलता बसून राहिले..कधी एकमेकांकडे तर कधी शून्यात बघत!
"चला..स्वैपाक करायला हवा..सगळे येतील जेवून..पाटकर बाई चिडायच्या..." तो उठत म्हणाला.
तिला खरंतर उठायची इच्छा नव्हती पण पर्याय नव्हता.

एका घरात दिवसातला जवळपास वेळ एकत्र घालवायला लागला की आपुलकी, माया, प्रेम, बंधन सगळं येतंच...जस्ट लाईक दॅट! मग राहणाऱ्यांची इच्छा असो किंवा नसो! रमा आणि आदित्यचं छान नातं तयार झालं होतं. त्या नात्याला कोणतंही नाव द्यायला ते दोघेही तयार नव्हते. आपण किती वस्तुनिष्ठ आहोत हेच ते एकमेकांना आणि पर्यायाने स्वतःला सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न चालला होता. एकीकडे मागे अर्धवट सोडलेली नाती होती आणि दुसरीकडे नवीन बनणारी नाती! अर्थात असं होण्याला जबाबदारसुद्धा ते दोघेच होते. श्री गेले कित्येक महिने रमाच्या उत्तराची वाट बघत होता. तिने त्याला अडवून धरलं नव्हतं पण तो रमाला सोडायला तयार नव्हता. अमृताने आदित्यशी गेल्या दीड महिन्यात काही संपर्क केला नव्हता. बहुतेक तिने काही पर्याय शोधला होता. अमृताला त्याने एक-दोन मेल्स केल्या होत्या. तिने रिप्लाय केला नव्हता. एकमेकांना बाकी सगळं सांगता येणं शक्य होतं पण हा विषय बोलायचा नाही असं ठरवल्यामुळे गोची होती. 

रात्री मुव्ही नाईट प्रकाराला सगळे जमले. कोकच्या बाटल्या, वेफर्स, उशा-पांघरुणं अशी सगळी जय्यत तयारी होऊन मग काय बघायचं ठरवण्यात अर्धा तास गेला. शेवटी आदित्य आणि दर्शुने सोडून कुणीच टॉय स्टोरी पाहिले नसल्यामुळे ते बघायचं ठरलं. दुसरा भाग अर्धवट बघून झाला आणि मनीषाला घरून फोन आला म्हणून ती निघून गेली. दुसरा भाग जेमतेम बघितला तोपर्यंत जवळपास सगळे ढेपाळले होते. 
"चला..शेवटचा कधीतरी नंतर बघू.." मेघा
"अरे काय..तुम्ही सगळे वेळ होता म्हणून आलेलात ना? आणि दोन पाहिले तर तिसरा..दर्शु सांग यांना" -आदित्य
"हो रे..तिसरा खूपच गोड आहे"
"आम्ही नाही कुठे म्हणतोय..परत बघू कधीतरी..."
"ए..तुम्ही ठरवा..मी जाते झोपायला..." रमा जांभई देत म्हणाली.
"घ्या..हे यजमान चालले आणि आपण काय सिनेमा बघणार?"
"अरे हा आहे ना..मी जाते रे..मी रोज या वेळी झोपलेले असते.." ती पेंगुळली होती.

रमाला जाग आली तेव्हा बाहेर चालू असणारा स्पीकर्सचा आवाज बंद झाला होता. ती पाणी प्यायला उठली तेव्हा तिने नजर टाकली तर एकटा आदित्य कानात हेडफोन्स टाकून सिनेमा पाहत होता. त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्याने गुडघ्यावर बसून दिवा लावला. 
"तू का उठलीस?"
"पाणी प्यायला..सगळे गेले?"
"हं..राज थांबला होता..आत्ताच दहा मिनिटापूर्वी गेला.."
"हं..किती वाजले..??"
"तू झोपायला जाऊन एकच तास झालाय..."
"ओके..आणि तू बघितला आहेस ना मुव्ही?"
"हो..पण री-रन..ते पण एका रात्रीत तिन्ही..लई भारी..मी पूर्ण बघूनच झोपेन"
"तुला खरंच मुव्हीसचं इतकं वेड आहे की.."
"वेड आहेच..पण टॉय स्टोरीस भारी आहेत अगं..तू पाहिलेस की दोन.."
"दुसरा थोडासा झोपेतच पहिला मी" ती पाण्याचा ग्लास विसळत म्हणाली. तो काहीसा खट्टू होऊन तिच्याकडे पाहत होता. 
"अजून किती वेळ आहे संपायला?"
"विसेक मिनिटं.."
"ठीके..मी पण बघते..माझी झोप गेलीय.."
"अशी काही झोप जात-बित नाही..तू झोप गुपचूप...मला एकटा मुव्ही बघण्याचं अजिबात वाईट वाटलेलं नाहीये..आणि नंतर सावकाश पहिल्यापासून बघ.."
"मला नंतर बघायचा उत्साह तेवढाच आहे..आत्ता बसले तर चालणार नाहीये का?"
"ओके..बस..मी काय मनाई करणार?आपण दोघेही अर्धं-अर्धं रेंट भरतो"
"गुड.."

सिनेमा संपला तेव्हा अर्धवट लवंडलेल्या रमाचा डोळा लागला होता. मुव्हीच्या मानसिक कौतुकातून बाहेर आल्यावर आदित्यचं तिच्याकडे लक्ष गेलं. तो थबकला. तिला उठवायची आणि तिथून उठायची त्याला इच्छा नव्हती पण पर्याय नव्हता. त्याने त्याच्या खोलीतून एक शाल आणली आणि हलकेच तिला पांघरली. 
'झोपून द्यावं का तिला इथेच?' त्याचा निर्णय होईना. तिची झोप त्याला जराशी डिस्टर्ब झाल्यासारखी वाटली आणि त्याने निर्णय घेतला.
"रमा" त्याने हळू आवाजात हाक मारली. रमा दचकून जागी झाली. 
"संपला??" तिने झोपेत विचारलं.
"नाही..तुला झोप लागली म्हणून मीच बंद केला..नंतर पहिल्यापासून बघू.." आदित्य स्वतःशीच हसत म्हणाला.
रमाचं तिच्या अंगावर आलेल्या शालीकडे लक्ष गेलं. आदित्यने लगबगीने पुढे होत ती शाल ताब्यात घेतली.
एकमेकांना 'गुड नाईट' म्हणून खोलीत आल्यावर रमाची झोप पुन्हा एकदा उडाली होती. तिला वाटत होतं तेवढं सोपं नव्हतं काहीच! यापुढे आयुष्यात प्लान न केलेली कुठलीच गोष्ट करायची नाही. तिने हा विषय श्रीकडे बोलायचं ठरवलं. 
'बोलायला तर हवंच..नंतर राहून गेलं असं वाटायला नको' असा विचार करत आदित्य झोप यायची वाट बघायला लागला.

क्रमशः 

भाग  इथे वाचा

Tuesday, August 14, 2012

दोन बायका असणारा नवरा

इसापनीती, हितोपदेश, पंचतंत्र मधल्या गोष्टी लहानपणी वाचून, ऐकून त्यांचा मोठेपणी व्यवहारात काही फायदा होतो का? या प्रश्नाचं उत्तर मला अजून मिळालेलं नाही. उलट, गेल्या काही वर्षात आलेले अनुभव, भेटलेली माणसं लक्षात घेता पंचतंत्र, इसापनीतीमधले धडे न घेता त्यात लिहिल्याच्या उलट किंवा अजूनच काहीतरी भलतं जगात घडतं या मताचा मी झालोय.. म्हणून या वर्षी एक नवीन प्रयोग सुरु केला. वर्षानुवर्ष ऐकलेल्या इसापाच्या गोष्टी नवीन स्वरूपात! आवडतायत का ते नक्की सांगा आणि आपल्या भल्या-बुऱ्या प्रतिक्रिया द्या. या गोष्टींचं तात्पर्य ठरवायची जबाबदारी मी वाचणाऱ्या लोकांवर सोपवतो आहे! या प्रयोगातली  ही तिसरी गोष्ट. 
याआधी: ईशान्यनीती १ईशान्यनीती 
                                                                                **                                                                   
दोन बायका असणारा नवरा (ईशान्यनिती ३)

एक आटपाट मेट्रो होतं. तिथल्या एका मोठ्या कंपनीच्या अलिशान ऑफिसमध्ये 'तो' काम करायचा. गेले काही दिवस तो बराच तणावात असल्याचं त्याच्या सहकाऱ्यांना जाणवत होतं. चांगला तरुण मुलगा! जॉईन झाल्यावर पहिल्याच वर्षात तगडं प्रमोशन. मेहनती होता. आजूबाजूच्यांना मदतसुद्धा करायचा. त्यामुळे कॉर्पोरेट कल्चरमध्ये फारशी न दिसणारी आपुलकी बरोबरच्यांना त्याच्याबद्दल होती. एक दिवस न राहवून त्याच्या बाजूच्या क्युबिकलमध्ये बसणाऱ्या चाळीशीच्या सहकाऱ्याने त्याला विचारलं-
"तू एवढा तरुण, उत्साही..अलीकडे इतका उदास का असतोस?"
त्याने आधी खुलून बोलायला आढेवेढे घेतले पण आग्रह केल्यावर, इतर कुणाला न सांगायचं प्रोमीस केल्यावर बोलायला सुरुवात केली.  
"माझ्या घरचे माझ्या लग्नाच्या मागे लागलेत.."
"अरे मग बरोबरच आहे की..आता इथे चांगला रुळला आहेस तू...आता सेटल होणार नाहीस तर कधी होणार?"
"माझी लग्न करायला हरकत नाहीये..पण मला ठरवून लग्न नाही करायचं..."
"अच्छा..आत्ता समजलं मला..तुला प्रेम-विवाह करायचा आहे..मग..कुणी भेटली नाही कधी? की भेटलीय तिला तू सांगितलं नाहीस अजून?"
"अ घोळ असा आहे की..अ..माझ्या आयुष्यात खरंतर दोन मुली आहेत.."
सहकाऱ्याने आ वासला आणि पाय जमिनीवरून वर उचलले. त्याची चाकं असणारी खुर्ची घरंगळत मागे गेली.
"काय सांगतोस काय लेका?शिंच्या यात उदास होण्यासारखं काय आहे?"
मग त्याने सगळं सविस्तर सांगितलं. दोन्ही मुली त्याच्या गेली कित्येक वर्षं चांगल्या मैत्रिणी होत्या. ब्रेन आणि ब्युटी कधीच एकत्र नसतात असं म्हणतात म्हणे. त्या दोघींच्या बाबतीत ते तंतोतंत खरं होतं. एक दिसायला फारशी बरी नव्हती पण खूप हुशार होती. चांगल्या कंपनीत, चांगल्या पगाराची तिला नोकरी होती. दुसरी दिसायला खूप सुंदर पण बुद्धीला बेताची. तिच्या रुपामुळे तिला एकवेळ नोकरी मिळाली असती पण आपल्या बायकोला तिच्या सुंदर दिसण्याने नोकरी मिळालीय हे कोण पुरुष सहन करेल? तिलासुद्धा नोकरी करण्यात वगैरे फारसा रस नव्हताच पण घरी राहून संसार बरा असता केला तिने. दोघीही त्याच्याशी लग्न करायला तयार होत्या. त्याने शांत डोक्याने निर्णय घेतलाही असता पण अलीकडे झालेल्या एका घटनेने तो बराच उदास झाला होता. झालं असं की पंचविशी उलटल्यावर अनुवंशिक कारणांनी त्याचे केस गळायला लागले. अलीकडे केस जाणाऱ्या माणसांसाठी खूप नवीन पद्धती आणि औषधं निघाली आहेत. त्याने त्या उपायांची चौकशी केल्याचं त्या दोघींना सांगितलं. पहिलीने त्याला अशी कोणतीही शस्त्रक्रिया करून घेण्यास किंवा औषधं घेण्यास विरोध केला. त्याने जे नैसर्गिक आहे ते मान्य करावं असं तिचं मत होतं. तर दुसरीने त्याला पूर्ण टक्कल पडण्याआधी तत्काळ उपाय करून घ्यायला सांगितलं. देवाने दिलेला सुंदर चेहरा केस गेल्याने काहीसा विद्रूप होऊ नये असं तिचं म्हणणं होतं. आपला जोडीदार आपल्या रुपाला साजेसा असावा अशी दोघींच्या मनात असणारी इच्छा त्याने ओळखली होती आणि त्यानेच तो उदास झाला होता.
सहकाऱ्याने त्याचं सगळं ऐकून घेतलं आणि खो-खो हसायला लागला.
"अहो, मी खरंच गंभीरपणे या गोष्टीचा विचार करतोय आणि तुम्ही हसताय?"
"अरे हसू नाही तर काय..आजच सकाळी माझ्या ८ वर्षाच्या मुलाला माझी आई एक इसापनीतीतली गोष्ट सांगत होती. दोन बायका असणाऱ्या नवऱ्याची. एक बायको म्हातारी, दुसरी तरुण. माणसाचे केस पांढरे व्हायला लागले तर आपल्या रुपाला तो शोभावा म्हणून तरुण बायको त्याचे पांढरे केस उपटायला लागली आणि म्हातारी काळे! बिचारा टकला झाला शेवटी!!" सहकारी अजून खोखो हसतच होता.   
"काहीतरीच काय? अशी गोष्ट इसापनीतीत आहे?" 
"अलबत.."
"इसाप काय नितीमुल्य शिकवतो या गोष्टीतून?"
"तो कसला डोंबलाची मूल्य शिकवतोय? त्याचं एक पण लग्न झालं नव्हतं...उगाच नितीमुल्य शिकवायला दोन बायका असणारा पुरुष म्हणे..त्याला या गोष्टीतून म्हणे हे सांगायचं होतं की सगळ्यांना सुखी ठेवण्याच्या प्रयत्नात कुणालाच सुखी ठेवता येत नाही"
"खरं आहे की मग ते.."
"कसलं खरं..? हे बघ, प्रश्न टक्कल पडण्याचा असेल तर तुला एकही लग्न न करता पडलंय आणि मला समवयस्क बायको असूनही टक्कल पडलंय..मुळात सध्या 'एका माणसाच्या दोन बायका' काही अपवाद* सोडल्यास पाहायला मिळत नाहीत कारण तसे सेन्सिबल नियम केलेले आहेत. पण लहान मुलांना गोष्ट म्हणून सांगायलासुद्धा मला ही संकल्पना युसलेस वाटते..तुला माहितीय गोष्ट ऐकल्यावर माझा मुलगा काय म्हणे? 'मी तर तरुण असतानाच दोन लग्न करेन..माझ्या दोन्ही बायका माझ्याच वयाच्या असतील..दोघीपण खुश राहतील"..सांग, आता काय बोलायचं याच्यावर? आपल्याला तर गोष्टच नाही पटली बुवा..एकीकडे आपण मुलांना रात्री झोपताना प्रार्थना करायला लावायची की देवाला सांगा सगळ्यांना सुखात, आनंदात ठेव..आणि दुसरीकडे तुम्ही सगळ्यांना सुखात ठेवू शकत नाही हे शिकवायचं?..बरं त्यातही पुढे जाऊन बायकोला सुखी ठेवायचा विषय-" सहकारी गप्प झाला.
"त्याचं काय?" त्याने सहकाऱ्याला तंद्रीतून बाहेर काढलं. 
"अरे..काही आधुनिक तत्वज्ञ तर या गोष्टीचे वेगळेच निष्कर्ष काढतात..त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बायका पुरुषांकडून कायम काहीतरी काढून घ्यायचा प्रयत्न करतात..दुसऱ्या एका व्हर्जनमध्ये तो माणूस कंटाळून दोघींना सोडून निघून जातो कारण त्या त्याच्या कलाने घेण्याऐवजी त्याला स्वतःच्या मनासारखं वागायला लावतात!"
"मग यातला बरोबर निष्कर्ष कुठला?"
"म्हटलं तर सगळेच नाहीतर कुठलाच नाही!"
"आता तुम्ही मला कन्फ्युस करताय..."
"ठीके..तू आत्ता योगायोगाने मेटाफोरिकली त्या माणसाच्या जागेवर आहेस! तू जो निर्णय घेशील तो कशाच्या आधारावर घेशील...?"
"कदाचित माझ्या स्वतःच्या आनंदाचा विचार करून..."
"करेक्ट...देअर यु आर...सगळ्यांना सुखी ठेवण्याआधी स्वतःचं सुख महत्वाचं...आत्मनस्तु कामाय सर्वं प्रिय भवति| हा श्लोक इसापनीतीत नाही पण कदाचित त्याहून जुना आहे. दुसरं..माझ्या एका तपाच्या लग्नाच्या अनुभवावरून सांगतो की बायका कॉम्प्लेक्स असतात पण दरवेळी त्या पुरुषांकडून काहीतरी काढूनच घेण्याचा प्रयत्न करतात हे मला एखाद्या मूर्ख पुरुषाने किंवा बाई असण्याची लाज वाटणाऱ्या बाईने केलेलं विधान वाटतं...आणि शेवटी लग्न, सहचर्य म्हणजे काय रे..एकमेकांना आनंदात ठेवणं, एकमेकांच्या गरजा भागवणं..बरोबर..?आणि तिसरं...तुझं दोघींशी पटत नाही, तू दोघींनाही आनंदी ठेवू शकत नाहीस म्हणून तू पळून जातोस..हा पलायनवाद झाला...ज्या दोन मुलींचा गेली काही वर्षं तू पोटेंशियल आयुष्याचा जोडीदार म्हणून विचार करतो आहेस त्या दोघींनाही तू सोडून देशील..??"
"कळले मला तुमचे मुद्दे..पण तुमचा नेमका राग गोष्टीवर आहे की त्याच्या वेगवेगळ्या निष्कर्षांवर?"
"कदाचित दोन्हीवर..इसापनीती म्हणजे मानवी आयुष्याच्या जवळ जाणाऱ्या नीतिकथा असं आपण नेहमी कौतुक ऐकतो..पण मला कायम त्या एककल्ली वाटतात! मानवी आयुष्यात इतकी टोकाची माणसं नसतात..माझं इतकंच मत आहे की काळाच्या ओघात गोष्टी बदलायला हव्यात, त्यातून मिळणारी नितीमुल्य बदलायला हवीत..आता याच गोष्टीचं म्हणालास तर 'बहुभार्या पद्धत चुकीची होती' हे कन्क्लूजन योग्य..बाकी ते सगळ्यांना सुखी ठेवता येत नाही हे शिकवायला इसापनीतीची गरजच नाहीये खरंतर..काय?!"
"हं..." त्याने मान डोलावली.
"मग जर का मी सांगितला तो निष्कर्ष पटला असेल तर टक्कल पाडून घेण्याचा किंवा न घेण्याचा निर्णय लौकरात लौकर घे...काय?" सहकारी स्वतःच्या टकलावरून हात फिरवत हसत म्हणाला.
"हो..नक्की!" त्याने हसत उत्तर दिलं आणि दोघे कामाला लागले.


*हा ब्लॉग लिहिताना गुगलिंग करताना ही बातमी सापडली आणि आत्ता लिहिला तो निष्कर्ष लिहिला. बातमी वाचून हसायला आलं थोडं पण माझ्या निष्कर्षाला वास्तवाची जोड मिळाली. हा हा हा! 

Saturday, August 11, 2012

जस्ट लाईक दॅट ७


आत्तापर्यंत:

जवळपास महिना उलटून गेला. आदित्य आणि रमाचा घरात आणि कॉलेजमध्ये बऱ्यापैकी जम बसला होता. शिक्षणात आणि एकूणच आयुष्यात असणारी फ्लेक्झीबिलीटी रमाला खूप आवडली होती. अमेरिकेत पाउल टाकण्यापूर्वी रमाचं विषय कुठले घ्यायचे इथपासून ते कुठल्या प्रोफेसरकडे काम करायचं सगळं नक्की होतं आणि आदित्यबरोबर राहणं ही एकमेव प्लान न करता केलेली गोष्ट सोडून ती सगळं ठरवल्याप्रमाणे करतसुद्धा होती. आदित्यचा नेमका उलटा प्रॉब्लेम झाला होता. त्याने आजपर्यंत कुठलेही निर्णय स्वतःचे स्वतः न घेतल्याने त्याला सेमेस्टरला विषय निवडण्यापासून फोन घेईपर्यंत सगळ्या गोष्टींसाठी जीत-राज-रमा आणि बाकी सगळ्यांवर विसंबून राहावं लागत होतं.   
"आदित्य, तू त्या डॉक्टर मरेला भेटणार होतास ना?" रमाने सकाळी चहा घेताना विचारलं.
"हो..मी मेल केली आहे..येईल त्यांचा रिप्लाय..मग बघू"
"मग बघू काय? तुला त्यांचं काम आवडलं म्हणालास ना? मग पुढच्या रोटेशनला त्यांच्याकडे काम कर" 
"तसं मला डेव्हिसनचं कामसुद्धा आवडलं आहे.."
"मग त्यांना भेट..आणि ठरव लौकर"
"रमा, मला असं पटकन नाही जमत...खरंतर हा पटकनवाला प्रश्न नाहीये..मला जनरलच डिसीजनस नाही घेता येत.."
"यात कौतुकाने सांगण्यासारखं काही नाहीये..."
"कौतुक नाही करते मी.." आदित्य थोडसं चिडून म्हणाला. रमा गप्प बसली.
"तू चिडलीस का?" तिने काहीच उत्तर दिलं नाही.
"रमा, सॉरी..पण-"
"पण काय आदित्य?? हे बघ, मला अर्थार्थी तुला काही बोलायचा अधिकार नाही..आपण एक घर शेअर करतो..सो म्हणून मी तुला सहज प्रश्न विचारला..तुला नाही जमत डिसिजन घ्यायला..ओके...मी त्यात बदल नाही करू शकत.."
"बदल नको करू..पण मला मदत कर ना..तुला काय वाटतं? मरे की डेव्हिसन?"
"काम मला करायचं आहे की तुला?हे बघ, यु आर अ पी.एचडी स्टुडंट..बिहेव लाईक वन...तुला तुझे निर्णय घेता आले पाहिजेत..त्या निर्णयाच्या परिणामाची जबाबदारी घेता आली पाहिजे..." एवढं बोलून ती उठुन गेली. आदित्यला अमृताशी झालेली शेवटची भेट आठवायला लागली.  
"दुपारी बाहेरच खाऊ काहीतरी..मी फोन करते तुला..ठरव कुठे खायचं ते" रमा घरातून बाहेर पडताना म्हणाली. तो तसाच बसून राहिला होता.
"अ..चालेल..तूच ठरव कुठे जायचं ते..किंवा दुपारी ठरवू तेव्हाचं तेव्हा" तो फोनशी चाळा करत म्हणाला.
"आदित्य..यु आर इम्पोसिबल" ती थोडीशी चिडूनच बाहेर पडली.
'आता ही का चिडली?' तो विचार करायला लागला.

वेटर प्लेट्स उचलायला आला. त्याने टेबलवरच्या दोघांकडे नजर टाकली. दोघांचही एकमेकांकडे लक्ष नव्हतं. तो बील ठेवून निघून गेला. 
"तू इतका उतावीळ का झाला आहेस?" तिने पर्स उचलत विचारलं. तो टीप म्हणून सुट्टे पैसे टाकत तिच्या मागे बाहेर आला.
"रमा मी गेली ३ वर्षं वाटच बघतोय..आणि आता तू अमेरिकेला निघाली आहेस..आणि आत्ताही तुला मी उतावीळ झालोय असंच का वाटतंय?"
"श्री, मी रिलेशनमध्ये पडणं ही गोष्ट कधीही कंसीडर केली नव्हती आणि आता तू मला एकदम विचारल्यावर मी काय उत्तर देऊ?"
"एकदम? रमा..आपण एकमेकांना जवळपास गेली ६ वर्षं ओळखतो...तू माझ्या घरी येऊन गेली आहेस..मी तुझ्या घरी नेहमी येतो..माझे आई-वडील तुला त्यांची होणारी सून म्हणून गृहीत धरतात..कॉलेजमध्ये सगळ्यांना असंच वाटतं की पीजी झालं की आपण लग्न करू...माझं मास्टर्स संपेल सहा महिन्यात..मग मुंबईत चांगला जॉब मिळाला की तुला लग्नाचं विचारायचं ठरवलं होतं मी..पण तू हा अमेरिका विषय काढलास म्हणून मला आज अचानक तुला लग्नाचं विचारावं लागलं"
"मला मान्य आहे की तू हे सगळं गृहीत धरलंस त्यात माझी चूक आहे..मला कल्पना असताना मी तुला अडवलं नाही..पण आता नाबर सर मागे लागले आहेत..यु.एसला अप्लाय कर म्हणून..श्री..मला ही संधी मिळते का ते पहायचं आहे...मी अमेरिकेला जाऊ शकले नाही तर अर्थात मला माझं प्लानिंग बदलावं लागेल आणि तेव्हा मी नक्की लग्न, अफेअर या गोष्टींचा विचार करेन.."
"अच्छा..म्हणजे तुझ्या तूर्तास असणाऱ्या अंदाजपत्रकात माझा नंबर नाही?" श्रीने चिडून विचारलं.
"मला माहित होतं..की तू हे वाक्य बोलणार श्री...पण हेच विधान तुझ्या 'अंदाजपत्रकाला' लागू होत नाही का? तू पीजी होणार, मग तू मुंबईत नोकरी मिळवणार आणि मग तुला माझ्याशी लग्न करायचंय..श्री, तुझ्या या प्लानिंगमध्ये तरी मी कुठेय? तुला हे सगळं करायचं आहे...आणि तू माझा विचार केलास असं विधान करू नकोस..मी करीअरीस्टिक मुलगी आहे याची तुला कल्पना आहे"
"अच्छा, म्हणजे जे चुकलंय ते माझंच चुकलंय..."
"असं नाही म्हटलं मी..पण श्री, आपण आपलं नातं सोशियली डिफाईन केलंसुद्धा नाही आणि एकमेकांना गृहीत धरायला सुरुवात केली..आपण दोघेही चुकतोय बहुतेक..."
"मग सध्या तुझा प्लान काय?"
"आत्ता वर्षभरात एम.एस्सी संपवणं..मग यु.एसला चार वर्ष पी.एचडी..मग नोकरी आणि मग लग्न वगैरे.."
"बरं..म्हणजे जवळपास ६-७ वर्षांचं प्लानिंग तयार आहे"
"हो..मला शक्य असतं ना..तर मी २० वर्षांचं प्लानिंग करून ठेवलं असतं..." रमा घड्याळ बघत म्हणाली.
"दोन गोष्टी लक्षात ठेव रमा- पहिली गोष्ट मला अनुभवाने शिकवली आणि दुसरी इतिहासाने!" त्याने पॉझ घेतला. ती आपल्याकडे बघते आहे याची खात्री झाल्यावर तो पुन्हा बोलायला लागला.  
"पहिली गोष्ट- फार लांबचं प्लानिंग करू नये..कारण ते आपण आपल्या दृष्टीकोनातून करतो..आपले दृष्टीकोण बदलतात..आजूबाजूची माणसं, परिस्थिती सगळंच बदलतं आणि मग नकळत प्लानिंग बदलतं..."
"टोमणा कळला मला..इतिहासाने तुला काय शिकवलं?" तिनेसुद्धा टोमणा मारायच्या स्वरात विचारलं.
"दूरदृष्टीने रचलेले सामाजिक कल्याणाचे मनसुबे पूर्ण होतात..पण 'वैयक्तिक' कल्याणाचे होत नाहीत.." 
"लक्षात ठेवेन मी!"

दुपारी आदित्य भेटला. ती सकाळी त्याच्यावर चिडून बाहेर पडली होती. एकीकडे तिला गृहीत न धरता आयुष्याचे प्लान करणारा श्री आणि दुसरीकडे 'खायला कुठे जायचं' हेसुद्धा ठरवायला तयार नसणारा आदित्य. आदित्य सकाळी ती गेल्यापासून मनातल्या मनात तिची आणि अमृताची तुलना करत होता. तसं तर तो हे रमाला भेटल्या दिवसापासून करत होता म्हणा पण सकाळच्या संभाषणानंतर जरा जास्तच..'आजकाल सगळ्या मुली सारख्याच असतात बहुतेक..निर्णय घ्या..जबाबदाऱ्या घ्या..असं थोडीच असतं? माझ्या घरात कित्येक निर्णय आई घेते..बाबांचे कपडे आणण्यापासून ते बटाट्याची रस्साभाजी करायची की सुक्की भाजी करायची ते ठरवेपर्यंत सगळे..वरून म्हणतेसुद्धा..'तुझे बाबा सरकारी नोकर..त्यांना कुणीतरी दुसऱ्याने सांगितल्यावर कामं करायची सवय आहे'.. बाबांनी कधी आक्षेप घेतल्याचं आठवत नाही..पण आता बघितलं तर अमृता..रमा..त्यांना निर्णय घेणारी मुलं पाहिजेत..अवघड आहे!'
"हाय.." 
"हाय..तू काही बोलायच्या आत सांगतो की मी मरेला भेटून आलो..तो मला त्याच्याकडे काम करायला देणार आहे! आपण कुठे जायचं ते मी ठरवलं आहे..तिथे मी काय खाणारे ते पण मी आत्ताच ठरवलं आहे..नाहीतर तिथे गेल्यावर मी मेनू पाहत बसलो तर तू संतापशील...तू काय खायचं ते मात्र मी ठरवलेलं नाही...मी तुला सजेस्ट करू शकतो...पण तुझ्यावर मी काही लादत नाहीये..कारण ते माझ्या स्वभावातच नाही..आणि तसं लादण्याचा मला अर्थार्थी अधिकारपण नाही" 
"हो..हो..ठीके...सॉरी..मी थोडी चिडचीड केली..पण आदित्य..तुम्ही मुलं खूप टोकाची असता..सकाळी तू कुठलाच निर्णय घ्यायला तयार नव्हतास..आणि आत्ता तू सगळं ठरवलं आहेस..आर यु शुअर?"
"रमा, मी शांत विचार केला..मला जाणवलं की आयुष्यातले बरेचसे प्रश्न ओब्जेक्टीव टाईप असतात...तुमच्याकडे उत्तर निवडायला बरोबर वाटणारे एकापेक्षा जास्त पर्याय असतात आणि त्यातला योग्य पर्याय निवडायचा..तोच पर्याय का निवडला याची स्पष्टीकरणं द्यायला लागली की गडबड होते...उत्तर बरोबर असेल तर कुणी स्पष्टीकरण वाचतही नाही पण चुकलं तर हमखास वाचतात.."
"वा..कोणतं पुस्तक?" रमाने हसत विचारलं.
"छे..छे..हे पुस्तकातलं नाही..हे सेल्फ क्वोटेड आहे" त्याने उत्तर दिलं.
"बरं..आदित्य आत्ता जेवायला जायचं ठीके..पण मरे की डेव्हिसन हा निर्णय खरंच नीट विचार करून घे"
"तुम्ही मुली अशा का असता?? म्हणजे निर्णय नाही घेत म्हणून आरडा-ओरडा आणि आता घेतला तर नीट विचार कर..आय जस्ट डोंट गेट इट..मला स्वतःला काही ठरवायची सवय नाहीये तेच बरं आहे..निदान असं तरी होत नाही.."
"तुम्ही मुली?असा किती मुलींचा अनुभव आहे तुला?" आयुष्यात पहिल्यांदा तिची इतर मुलींशी समान पातळीवर तुलना झाली होती. जेव्हा ते व्हायला हवं होतं तेव्हा ती कायम गर्दीतून उठुन दिसायची आणि आदित्यने इतर मुलींशी तिची तुलना केल्यावर तिला अजिबात आवडलं नव्हतं. 
"हा प्रश्न मी तुला विचारू शकतो..तू पण 'तुम्ही मुलं' असं म्हणालीस मगाशी बोलताना..पण आपण हा विषय बोलायचा नाही म्हणून हा प्रश्न मी टाळला.तसंच तुही टाळावा असं मला वाटतं.."
"माझा प्रश्न फ्रेस करताना चुकलंय...माझा आक्षेप तू माझी तुलना इतर मुलींशी केल्याबद्दल होता..तू माझी कुणाशी तुलना केलीस हे मला अजिबात विचारायचं नाहीये.."
"बरं...सॉरी अबाउट इट" बोलून आदित्य पुढे चालायला लागला.
तिच्या डोक्यात खरंतर काहीच नव्हतं पण आदित्यने उल्लेख केल्यावर तिला मनोमन उत्सुकता वाटायला लागली.
'आदित्यला पास्ट आहे? विचारावं का त्याला? तो एक वेळ सांगेल..मग मलाही सांगायला लागेल..मग तो श्रीची बाजू घेईल..नकोच..हा विषय टाळलेला बरा..' तिने विचार झटकला.

वाटेत राज आणि मनीषा भेटले.
"अरे..काय दोघे कुठे भटकताय?"
"लंचला जातोय..तुम्ही येताय?" आदित्यने विचारलं.
"कुठे?"
"बर्गर खायला.." आदित्यने उत्तर दिलं.
"अगं, आम्ही पिझ्झा खायला जातोय..तुम्ही जॉईन होता का?" मनीषाने रमाला विचारलं. तिने आदित्यकडे पाहिलं. तो खाली बघत जागच्या जागी बूट आपटत रमा प्रतिक्रिया द्यायची वाट बघत होता. तिला पिझ्झा आवडतो हे त्याला माहित होतं. रमाने चांगलाच पॉझ घेतला. राजला वातावरणातला तणाव जाणवला.
"अरे जाऊ देत..तुम्ही जा बर्गर खायला...आपण जाऊ परत कधीतरी.." तो खाली पाहणाऱ्या आदित्यकडे पाहत म्हणाला. आदित्यने वर पाहिलं. रमाला थोडं हायसं वाटलं.
"अरे नाहीरे..तुमची हरकत नसेल तर आम्ही येतो तुमच्याबरोबर..हिला पिझ्झा आवडतो.." तो हसत म्हणाला.
"ओके..मग चला..." मनीषा रमाला पुढे घेऊन चालायला लागली. रमाने हळूच मागे वळून आदित्यकडे बघितलं. दोघांची नजरानजर झाली. त्याने हलकं हसत मान डोलावली.  
रमा स्वतःशीच हसत पुढे चालायला लागली.

क्रमशः

भाग ८ इथे वाचा

Wednesday, August 8, 2012

जस्ट लाईक दॅट ६


आत्तापर्यंत:

"काका, तुम्ही काळजी करू नका..तशी इथे आम्हाला खूप कंपनी आहे! आमचं थोडसं टायमिंग चुकलं यायचं आणि आम्हाला एकत्र राहावं लागलं!"
"ठीके रे! तुम्ही दोघे तिथे आणि आम्ही इथे! तिथले प्रॉब्लेम्स, अडचणी तुम्हाला बेटर माहिती..सो तुम्ही असा निर्णय घेतलात! आणि तुम्ही दोघे लहान नाही, त्यामुळे जे निर्णय घेताय ते शांत डोक्याने घ्या, भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका एवढंच.."
"हो सर आय मीन काका...नक्की.."
आदित्यने फोन ठेवला आणि सुस्कारा सोडला. रमा त्याच्याकडे डोळे वटारून पाहत होती.
"ओह सॉरी..तुला बोलायचं होतं का?" त्याने तिच्याकडे पाहत विचारलं. तिने मानेनेच नकार दिला.
"मग डोळे मोठे करून का बघते आहेस?" त्याने फोनची स्क्रीन पुसत विचारलं. ती सावध झाली.
"नाही..तू एवढा मोठा सुस्कारा सोडलास म्हणून..." ती म्हणाली.
"त्याचं काये..मी अमेरिकेला पहिल्यांदाच येऊन दोनेक आठवडे झालेत...आल्यानंतरच्या चार दिवसात मी एका मुलीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला..जवळपास १० दिवस एकत्र राहिल्यावर आत्ता मी 'ओळख ना पाळख माझं नाव टिळक' च्या अविर्भावात सुरुवात करून तिच्या वडलांशी गेली १० मिनिटं बोलत होतो. मी अजून काय करणं अपेक्षित आहे फोन झाल्यावर?" तो फोन तिच्या हातात देत म्हणाला.
"काय म्हणाले बाबा?"
"तू मला त्यांनी तुला जे काही सांगितलं म्हणून म्हणालीस ते सगळं"
"मला वाटलंच होतं. बाबा तसे फॉरवर्ड आहेत..पण चार-दोन उपदेशाचे शब्द ऐकवायला त्यांना भयंकर आवडतं"
"गुड..आणि आईला काय सांगितलं आहेस?"
"मी एका अदिती नावाच्या मुलीबरोबर राहते"
"शी..शी..अदिती?धत तेरी..जरा छान नाव तरी सांगायचं"
"आदित्य ते अदिती..आय लाईक टू कीप इट सिम्पल.. आणि हो..रमाकांतपेक्षा बेटर आहे..."
"माझा रूममेट साउथचा आहे..त्यामुळे ते नाव सूट होतं..त्याला हिंदीसुद्धा नीट येत नाही असं मी घरी बोललोय..मला काहीच ऑप्शन नव्हता म्हणून मी त्याच्याबरोबर राहतो आहे असं सांगितल्यामुळे मातोश्री तो कसा दिसतो हे सुद्धा विचारायच्या फंदात पडल्या नाहीत.." आदित्य चहाचं आधण ठेवत हसत म्हणाला.
"वा..वा..छान"
"तुझ्या बाबांनी तुझं लग्न ठरवलं आहे काय गं?" आदित्यने विचारलं. रमाने चमकून त्याच्याकडे पाहिलं. 
"अ..का रे? एकदम अ..असं का विचारलंस?" 
"तुझ्या बाबांचे प्रश्न एकदम स्पेसिफिक होते...मी एखाद्या प्रश्नाला काहीतरी थातुरमातुर उत्तर दिलं तरी त्यांचं लक्ष विचलित न होता ते मला ठरवल्यासारखे प्रश्न विचारत होते..माझ्या एका भावाच्या सासऱ्याला पहिल्यांदा भेटायला तो गेला तेव्हा मी बरोबर होतो, माझा दादा काहीही भंपक उत्तरं द्यायला लागला की ते त्याचा फोकस रिसेट करायचे..मगाशी त्याची आठवण झाली.."
"ओह..ओके ओके.."
"आणि जर का त्यांनी तुझं लग्न ठरवलं असेल तर आधीच सांग नाहीतर नंतर मला तुझ्या होणाऱ्या नवऱ्याशी बोलायला लावशील तू.." 
फोन वाजला आणि संभाषण थांबलं. दोन मिनिटात फोन ठेवून रमा म्हणाली- "चहा वाढव...मेघा येतेय...त्या ५००४ कोर्सच्या नोट्स घेऊन"
"मग तर तिला चहाबरोबर गोडच दिलं पाहिजे.." आदित्यने मान डोलवत उत्तर दिलं.
"हं..."
"पण प्रश्न तसाच राहिला..तुझं लग्न ठरलंय का?"
"ठरलं असलं तर काय होणारे?आणि आज अचानक हा प्रश्न? या प्रश्नाच्या उत्तराने काही फरक पडला असता तर तू मला १० दिवस आधीच विचारलं असतंस"
"तू मला नाही विचारलंस म्हणून मी तुला नाही विचारलं" आदित्य दुधाचा कॅन फ्रीजमध्ये ठेवत म्हणाला. रमाचं गेल्या आठ दिवसात फोनवर काढलेले फोटो पाहण्यातलं लक्ष त्याच्या बोलण्याकडे गेलं.
"काय?म्हणजे तुझं लग्न ठरलंय?" तिने चमकून विचारलं.
"नाही नाही...ठरता ठरता राहिलं.." 
"डीटेल्स? द्यायला हरकत नसेल तर-" रमा स्वर शक्य तितका नॉर्मल ठेवत म्हणाली.
"अगं..गम्मत करतोय..तू पण..काही खरं वाटतं तुला" तिने खांदे उडवत काहीच न वाटल्यासारखं दाखवत पुन्हा फोनमध्ये डोकं घातलं.
"पण रमा, आपण एक विकेंड निवांत बसुया..एकमेकांशी एकमेकांबद्दल बोलूया..आपण एकत्र राहतो आहोत..एकत्र राहायचा निर्णय जरी निव्वळ तडजोड म्हणून घेतला असला तरी त्याचे भले-बुरे परिणाम आपण 'भोगतोय'...लोकांनी काहीही निष्कर्ष काढले तरी म्हणायला आपण चांगले मित्र-मैत्रीण वगैरेपण नाही..म्हणून मी असा विचार केला की रूममेट्स म्हणून तरी आपल्याला एकमेकांबद्दल थोडी माहिती असायला हवी..जसं की आपले आई-वडील, शाळा, छंद, घराबद्दलच्या कल्पना-घरातल्या लोकांबद्दलच्या कल्पना..थोडक्यात एकत्र राहताना एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षा, तुझ्या जीवश्च-कंठश्च मैत्रिणी आणि माझे जीवश्च-कंठश्च मित्र, तू तुझ्या घरी माझ्याबद्दल आय मीन अदितीबद्दल काय सांगितलं आहेस? मी रमाकांतबद्दल काय बोललोय?आणि हो.. आपण निव्वळ रूम-मेट्स म्हणून एकत्र राहायचं ठरवलं आहे त्यामुळे लग्न, एक्स-बॉयफ्रेंड, गल्फ्रेंड असे विषय टाळलेले बरे..असं मला वाटतं..आपले हेतू स्पष्ट आणि स्वच्छ आहेत म्हणून मी हे बोलू शकतोय..कारण एकमेकांबद्दल सहवासाने जाणून घ्यायला आपण काही इतका काळ एकत्र राहणार नाही आणि विचार करायलासुद्धा मला ते मला लग्न झालेल्या जोडप्यासारखं वाटतं..म्हणून हे गप्पा मारण्याचं प्रयोजन..चालेल??" तो चहाचा कप घेऊन तिच्या समोर येऊन बसला.
"तू एवढं डिटेलिंग केल्यावर मी नाही म्हणणारे का?" ती बोलत असतानाच बेल वाजली आणि रमा उठुन गेली. 

आदित्यला त्याच्या येण्याआधी काही दिवसांमध्ये अमृताशी झालेल्या भेटीगाठी आठवत होत्या. 'आपलं लग्न खरंच ठरता ठरता राहिलं' त्याने मनात विचार केला.
"हे बघ आदि, आधीच आपण एकत्र असणं यात प्रॉब्लेम्स कमी नाहीयेत..माझ्या घरी, तुझ्या घरी हे कधीच मान्य होणार नाहीये..त्यात तू उठुन अमेरिकेला चालला आहेस! मग हे लाँग डिस्टंस रिलेशन आपण कशाला वाढवायचं आहे?"
"अमु, आपलं काहीतरी नातं आहे हे तू कबूल केलंस याचा आनंद व्यक्त करू की तू ते संपवते आहेस म्हणून दुःख व्यक्त करू तेच कळत नाहीये मला!' तो हताश होऊन म्हणाला.
"तू पण कमाल करतोस..मला मान्य आहे की आपल्यातलं नातं मी कधीच बोलून दाखवलं नाही..पण म्हणून ते मी कधी अमान्य केलंच नव्हतं. माझा घोळ हा होता की तू ते कधी सिरीअसली घेतलं नाहीस..आदि, तू आयुष्याला कधी सिरीअसली घेणारेस? तुला कुणीतरी अमेरिकेला जा सुचवलं आणि तू निघालास..उद्या तिथे कुणीतरी सांगेल, आता परत ये..तू परत येशील..तुला स्वतःचं काही आहे की नाही?"
"तुझी तक्रार कशाबद्दल आहे? माझ्या अमेरिकेला जाण्याबद्दल? की मी आयुष्य सिरीअसली घेत नाही त्याबद्दल?"
"सगळ्याबद्दलच...आदि, उद्या आपण बरोबर असू-नसू..मला नाही माहित..पण एक गोष्ट लक्षात घे..मुलींना असा मुलगा पार्टनर म्हणून हवा असतो जो निर्णय घेऊ शकतो, जबाबदारी घेऊ शकतो..कुणी एकमेकांवर कितीही प्रेम-बिम केलं ना..तरी आत्ताच्या मुली इतक्या भावनेच्या आहारी जाणाऱ्या वगैरे मुळीच नसतात..भावनेला व्यवहाराची जोड असतेच..आणि ती हवीच! मला एक सांग..आज जर का तुझं अमेरिकेला जाणं हा विषय सोडून बाकी सगळं सुरळीत असतं तर तू मला तुझ्या घरी घेऊन गेला असतास का..?"
"हो..ते तर मी आत्ताही नेऊ शकतो!"
"वेड्यासारखं बोलू नकोस..तुला कळत नाही म्हणतेय मी ते हेच...आपल्या घरातली कल्चर्स वेगळी, परंपरा वेगळ्या, चाली-रिती वेगळ्या...माझं आडनाव ऐकून तुझ्या घरी माझ्याबद्दलच एक मत बनून जाईल.."
"तू माझ्या घरच्यांना न भेटता हे कसं ठरवलंस अमु?"
"तुझ्याकडे पाहून.."
"ग्रेट..म्हणजे यालासुद्धा मीच जबाबदार??"
"आदि, कधीतरी कबूल कर आणि जबाबदारी घे" 
"बरं..घेतो जबाबदारी..आता बोल..येतेस घरी?"
"पुन्हा तेच..आदि..तुला कळत नाहीये का?लाँग डिस्टंस रिलेशनशिप्स नेवर वर्क..मी ताईच्या वेळी हे जवळून पाहिलं आहे. आणि मी तो त्रास नाही सहन करू शकत!"
"तुझी तक्रार आहे ना अमृता..मी नेहमी दुसऱ्याचं ऐकून माझ्या आयुष्यातले निर्णय घेतो..खरं आहे ते..पण मग ताईच्या अनुभवावरून तू स्वतःला एखादी गोष्ट जमेल की नाही हे ठरवते आहेस तेव्हा तू वेगळं काय करतेयस?"
"...."
"हे बघ अमु, मी तुझ्यावर काहीही लादत नाहीये...ते माझ्या स्वभावातच नाही. हं, मात्र महत्वाचं..तुझा निर्णय ऐकून मी माझा निर्णय बदलतसुद्धा नाहीये...मी इतकंच म्हणतोय...लेट अस वेट..आपण थांबूया हवं तर थोडे दिवस..पुन्हा विचार करू..फ्रेश..चालेल..??"
तिने मान डोलावली आणि दोघे एकमेकांना बाय म्हणून निघून आले. त्यानंतर आठ दिवसांनी आदित्य अमेरिकेला आला. दोनेक आठवड्यात तो रमाबरोबर एका घरात राहायला लागला होता. ही गोष्ट त्याने अमृताला कळवली नव्हती. तिचाही इ-मेल किंवा कुठलाही मेसेज आला नव्हता.  गेल्या पंधरवड्यात येण्याच्या गडबडीत आणि इथे सेटल व्हायच्या धडपडीत त्याला विचार करायलासुद्धा वेळ नव्हता. रमाला पहिल्यांदा तो भेटला, तिच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर अमृताचा चेहरा क्षणिक येऊन गेला तेवढंच! गेली पाच वर्ष असणारी मैत्री किंवा मैत्रीपेक्षा थोडसं जास्त गहिरं असणारं नातं कुणी इतक्या चटकन कसं विसरू शकतं..'जस्ट लाईक दॅट??
पण ते अमृताला जमलं होतं. आदित्यसुद्धा तेच जमवण्याचा मनोमन प्रयत्न करत होता.

"परचुरे..कुठे हरवलात?चहा गार झाला" मेघाने त्याला हलवलं. 
"नामस्मरण करत होतो.." तो हसत म्हणाला.
"..काहीपण"
"अगं खरंच! इंडियामध्ये एक नवीन बाबा फेमस झालेत..त्यांच्या नावाचा जप केला की पी.एचडी लौकर होते म्हणे.." तो गंभीर स्वरात म्हणाला.
"काहीही..असं असतं तर आम्ही हा जप कधीच केला असता" मेघा
"तू कुठे त्याच्याकडे लक्ष देतेस.." रमाने तिला चहा देत म्हटलं.
"अगं, हं या किंवा पुढच्या विकेंडला मुव्ही नाईट प्लान करतोय..आमच्या अपार्टमेंटवर..एनी मुव्ही सजेशन्स ??"
"अबाउट अ बॉय..." आदित्यने खिडकीतून बाहेर बघत उत्तर दिलं.
मेघा आणि रमाने मान डोलावली.

क्रमशः