Pages

Thursday, October 23, 2014

"भाई, एक 'यो यो' हो जाये!"

                                                                                       **
गेल्या महिन्यात आमच्या युनिवर्सिटीतल्या १०-१५ जणांना घेऊन आम्ही सहलीला गेलो होतो. साधारण तास-दीड तासाचा प्रवास! संध्याकाळी परत येताना साहजिकच 'अंताक्षरी'चा कार्यक्रम झालाच. किती वर्ष लोटली असतील अंताक्षरी खेळून…पण भसाड्या आवाजात गाणारे (??) आम्ही सगळेच ९०च्या दशकात मोठे झालेलो आहोत आणि मेंटली आम्ही अजूनही ९०च्याच दशकात अडकलोय (निदान अंताक्षरी खेळण्याच्या बाबतीत तरी) हे आमचं आम्हालाच जाणवलं-- 'मैने प्यार तुम्ही से किया है', 'रात के बारा बाजे दिन निकलता है' अशी एकूणच दुय्यम आणि कालबाह्य गाणीच आम्हाला आठवत होती. ९०च्या गाण्यांचा कोटा संपल्यावर सगळे ढेपाळले. मग काही चांगली गाणी म्हणून झालीच नाहीत असा विचार करून आम्ही राजेश खन्नाची गाणी म्हणायला लागलो.
अचानक एक जण म्हणाला--"जरा छान गाणी म्हणूया की…"
"अजून छान गाणी?म्हणजे कुठली बाबा?" मी विचारलं. 'कहीं दूर जब दिन ढल जाये' नुकतंच म्हणून झालं होतं.   
"भाई, एक 'यो यो' हो जाये" त्याचं उत्तर! मग मी बंद पडलो…डोकं बधीर झालं होतं!! बाकी सगळ्यांनी त्याला हो म्हणून 'बिभत्स' रसातलं कुठलंसं गाणं म्हणून होईपर्यंत मी बंदच होतो. त्याच्या त्या एका वाक्याचा गेले महिनाभर विचार करूनही 'क्लोजर' मिळू शकलेलं नाही म्हणून मी शेवटी ते इथे वैश्विक चव्हाट्यावर मांडायचं ठरवलं---

'भाई, एक यो यो हो जाये?'….आय मीन सिरीयसली? तर--यो यो म्हणजे 'हनी सिंग अर्थात यो यो हणी सिंग' नावाचा स्वतःला गायक-संगीतकार म्हणवणारा एक इसम! हनी सिंग काय मोहम्मद रफी किंवा किशोर कुमार वगैरे आहे का की त्याच्या गाण्याची 'फर्माईश' व्हावी? जगातले सगळे गायक, संगीतकार संपलेत का? गेला बाजार तो 'एक अन्नू मलिक किंवा बाबा सेहगल हो जाये' असं म्हणाला असता तरी चाललं असतं असं मला वाटायला लागलं. मग मला अन्नू मलिक 'बरा' पर्याय वाटावा हे जाणवून स्वतःचाच राग आला! मग पुन्हा शांतपणे विचार केला-- मला हनी सिंगची गाणी का आवडू नयेत? का? का? ज्या अमेझिंग माणसाच्या तुफान गाण्यांनी लाखो लोकांना वेड लावलंय त्या तानसेनाच्या आधुनिक अवताराचं संगीत मला का आवडू नये? ज्या काही गोष्टी सुचल्या त्या शक्य तितक्या सुटसुटीतपणे मांडायचा प्रयत्न करतोय!
१. गाणं किंवा एकूणच संगीतावर अधिकाराने टिप्पणी करायला मी तानसेन तर नाहीच पण चांगला 'कान'सेन तरी आहे का माहित नाही---पण मला हणी सिंगची कुठलीही गाणी आवडत नाहीत. माझ्यामते एखादं गाणं आवडण्याची मुख्य कारणं असतात गाण्याची चाल आणि त्याचे शब्द!! 'चार बोतल वोडका काम मेरा रोज का' किंवा 'लुंगी डान्स' वगैरे शब्दात आवडण्यासारखं काय असू शकतं हे मला अजूनही कळलेलं नाही! राहता राहिला गाण्यांच्या चालींचा प्रश्न-- तर सार्वजनिक गणपतीला जमलेले शेकडो लोक जास्त सुरात, चालीत आरत्या म्हणतात हे माझं मत आहे. मॉरल ऑफ द स्टोरी- यो यो हणी सिंगच्या गाण्यांशी मी इमोशनली कनेक्ट होऊच शकत नाही!
२. मला असं जाणवलं की त्या १०-१५ लोकांच्या घोळक्यात हनी सिंगची गाणी न आवडणारा किंवा त्याचं हिंग्लिश गाणं माहित नसणारा मी एकटाच होतो. मला हनी सिंगची बिभत्स रसातली गाणी आवडत नाहीत म्हणजे मी कालबाह्य झालोय का असा प्रश्न मला पडला. उडत्या चालीची, फार मतितार्थ नसलेली किंवा यमक जुळवण्यासाठी वाटेल ते शब्द वापरलेली कुठलीच गाणी मला आवडत नाहीत का? या प्रश्नाचं उत्तरसुद्धा नकारार्थी आहे! 'मुन्नी बदनाम हुई', 'अनारकली डिस्को चली', 'बिडी जलाइले', 'प्यार की पुंगी' अशी कित्येक गाणी मी ऐकतो. काही आवडीने तर काही निव्वळ सवयीने! मग मला हनी सिंगच का आवडू नये? त्याच्या गाण्याच्या चाली आरती म्हणण्यापेक्षा सोप्प्या आहेत, मतितार्थाचं म्हणायचं तर 'छोटे ड्रेस में बॉम्ब लगदी मेनू' यासारख्या गाण्यात खोल दडलेला अर्थ वगैरे शोधण्याची गरजही नाहीये पण तरी मला ती गाणी आवडत नाहीत!

३. लहानपणापासून घरातले संस्कार होते म्हणा, पुढे मित्रसुद्धा तसेच भेटले म्हणून असेल पण माझा 'ऐकीव' गाण्यांच्या आवाका बऱ्यापैकी होता म्हणायला हरकत नाही. म्हणजे फार नाही पण मराठीत पंडित अभिषेकी बुवा ते स्वप्नील बांदोडकर, हृदयनाथ मंगेशकर ते अवधूत गुप्ते, हिंदीत किशोर कुमार ते अलीकडे शफकत अमानत अली, किंवा एस.डी. बर्मन ते अमित त्रिवेदी अशा अशा सगळ्या सगळ्या लोकांची गाणी ऐकत मी मोठा झालो, अजूनही ऐकतो. कळायला लागल्यावर आपल्याला गाणं किंवा एखादं वाद्य वाजवायला शिकत आलं नाही याची खंतसुद्धा वाटली कधी कधी. प्रभाकर जोगांची व्हायोलीन ऐकताना मिळणारं समाधान किंवा फ्युझोनचं शफकत अमानत अलीने गायलेलं 'मोरा सैय्या' ऐकताना जाणवणारा आर्त स्वर म्हणजे संगीत, गाणं अशी माझी साधारण कल्पना होती, आहे! पण हनी सिंगचं गाणं ऐकताना मला समाधानसुद्धा मिळत नाही आणि कुठलीही चांगली भावना जाणवत नाही.…दुर्दैवाने त्यातला नकारात्मक स्वर किंवा हपापलेला भाव म्हणजे संगीत अशी मी स्वतःची समजूत करून घेऊच शकत नाही! सॉरी पण मला हनी सिंगची गाणी आवडत नाहीत.

४. पंडित भीमसेन जोशींना भारतरत्न मिळालं, रेहमानला ऑस्कर मिळालं--इतरही अनेकांना कित्येक राष्ट्रीय किंवा आंतर-राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.…पण 'मी यातला अमुक पुरस्कार मिळवणारच आहे' हे आजपर्यंत कुणीच जाहीर मुलाखतीत छातीठोकपणे सांगितलेलं मला माहीत नाही! याउलट 'यो यो मधाळ सिंग'ने मात्र 'मी ग्रॅमी अवोर्ड मिळवणार आहे' हे जाहीरपणे सांगितलं आहे! 'पार्टी ऑल नाईट', 'चार बोतल वोडका' आणि 'अल्कोहोलिक' अशी गाणी लिहून ग्रॅमी मिळवण्याची वल्गना करणाऱ्या या महापुरुषाबद्दल मला अत्यादर वाटायला हवा, त्याची गाणी आवडायला हवीत पण मला हनी सिंगची गाणी आवडत नाहीत!

५. मी हनी सिंगला पर्सनली ओळखत नाही. त्याच्याबद्दल माझा काही पूर्वग्रहसुद्धा नाही! मागे दिल्ली दुर्घटनेच्या वेळी कुणातरी लोकांना अचानक साक्षात्कार झाला की हनी सिंगच्या 'मै बलात्कारी' अशा काहीतरी गाण्याने हिंसक प्रवृत्ती बळावते म्हणून त्याला अटक व्हावी. तेव्हा त्या लोकांची खिल्ली उडवून मी हनी सिंगच्या बाजूने माझ्या ब्लॉगमध्ये लिहिलंसुद्धा होतं. वैयक्तिक आयुष्यात तो माणूस म्हणून कसा आहे याची मला अजिबात कल्पना नाही. एकूणच त्याच्या गाण्यांचा मी व्यक्तीसापेक्ष विचार केलेला नाही! पण कितीही प्रयत्न करून मला हनी सिंगची गाणी आवडत नाहीत!

६. हनी सिंगने खरंतर सध्याच्या पिढीतल्या पालकांचं काम सोप्पं केलं आहे. त्यांच्या मुलांना अगदी लहान वयातच विविध प्रकारची मद्यं, मद्यपानाशी संबंधित गैरसमज, पार्ट्या, मुलींचे कपडे अशा कित्येक कित्येक गोष्टींबद्दल कोणतीही माहिती त्यांना पुरवावी लागणार नाहीये….अ-पंजाबी (अ-मराठी सारखं) मुलांना त्यांची मातृभाषा सोडून पंजाबी भाषा, मोडकी-तोडकी इंग्लिश, हिंग्लिश अशा तीन भाषा शिकायला मिळणार आहेत. त्यांची मुलं उद्या जगात 'कुह्हल' (KEWL) म्हणवली जाणार आहेत. त्याच्या गाण्यांचे समाजावर एवढे उपकार असूनही मला त्याची गाणी आवडत नाहीत.

या सगळ्या गोष्टींमध्ये वरकरणी निव्वळ खवचटपणा दिसत असला तरी त्यातली माझी कळकळ खरंच प्रामाणिक आहे!! अजून किती कारणं देऊ? किती गोष्टींचा विचार करू? हनी सिंगची गाणी न आवडायला जर का एवढ्या गोष्टी पुरेश्या असल्या तर मग मला पडलेले पुढचे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत.

१. संगीत, गायन या जगातल्या सर्वोत्तम कला आहेत. त्यात कलाकाराला मुक्तपणे व्यक्त व्हायला अभिव्यक्ती स्वातंत्र आवश्यक आहे. पण मग नकारात्मक स्वराची किंवा हपापलेला भाव असलेली गाणी लिहिणाऱ्या कलाकाराचं कौतुक होणं बरोबर का चुकीचं? ज्या अर्थी हजारो लोकांना ही गाणी आवडतायत त्या अर्थी ती बनवणारा हनी सिंग १००% चुकीचा असूच शकत नाही. मग माणूस म्हणून, समाज म्हणून, रसिक म्हणून लोकांचा प्रवाह ज्या दिशेने चाललाय त्या दिशेने सगळ्यांनी जाणं बरोबर आहे का? ती दिशा चुकीची असली तरी??

२. माझ्या पिढीने निदान कळत-नकळत का होईना पण 'चाहुंगा मै तुझे सांज सवेरे' किंवा 'एक धागा सुखाचा' वगैरे गाणी ऐकली. सांगीतिक संस्कार, सांस्कृतिक जडणघडण अशा गोष्टी व्यक्तिमत्व विकासाला किती आवश्यक असतात हे मी अधिकाराने सांगू शकत नाही पण लहानपणी 'पार्टी ऑल नाईट' ऐकून येत्या पिढीवर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करायची गरज आहे. नुसतं वाईट वाटून उपयोग नाही कारण खरंतर आपलीच जबाबदारी वाढतेय. विचार करा--काही वर्षांनी एखादा मुलगा आपल्या आजोबांना विचारेल--" ग्रॅन्डपा, व्हू इस थिस पंचम गाय? हिज म्युसिक साउन्डस सो आउटडेटेड…वॉझ ही फेमस ऑर समथिंग विथ दॅट काइन्डा म्युसिक?". या संवादातला भयाणपणा जाणवतोय?

सो इथे एकदा नमूद करू इच्छितो की हा ब्लॉग निव्वळ एक हनी सिंगच्या गाण्यांवर टीका करायची या हेतूने लिहिलेलाच नाही! त्यामुळे त्याच्या कोणत्याही पंख्यांनी जर का धीर करून हा ब्लॉग इथपर्यंत वाचला असेल तर अजून त्रागा करून घेऊ नये! हनी सिंगच्या गाण्यांमध्ये ज्यांना गेय, अर्थ, संगीत दिसतं त्यांनी ते जरूर ऐकावं. माझ्या बाबतीत दुर्दैवाने  "एक यो यो हो जाये" हे एक वाक्य ट्रिगर ठरलं आणि मला एवढा मोठा उहापोह करावासा वाटला. हे लिखाण निव्वळ वैतागातून आलं असल्याने ते एकांगी, बायस्ड वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तसं असल्यास तसं वाटणाऱ्या मंडळींनी दुसरी बाजू जरूर मांडावी…मी अतिशय फ़्लेक्सिबलपणे विचार करायला, ओपन एन्ड चर्चा करायला तयार आहे!    

वाचणाऱ्या सर्व लोकांना दिवाळी आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! येणाऱ्या वर्षात सर्वावर हनी सिंगची किंवा त्याच्या गाण्यांशी चाल-भाव-शब्द अशा सगळ्या बाबतीत साधर्म्य असणारी कमीत कमी गाणी ऐकायला मिळोत ही परमेश्वर चरणी प्रार्थना!!

Tuesday, October 14, 2014

नाईटमेअर भाग ३

भाग १, भाग २ वरून पुढे--

"असं झालं काय श्रीकांत राव की तुमच्यावर पार आत्महत्या करण्याची पाळी यावी?" अनुपमने श्रीकांतला बोलतं करायला पुन्हा प्रश्न विचारला.
फायनली श्रीकांत बोलायला लागला-- "आता काय सांगणार आणि किती सांगणार? ते म्हणतात ना की ती सटवाई पाचवी पुजल्यावर काहीतरी लिहून जाते आपल्या नशिबात…माझ्या वेळी नशीब लिहायला ती पेन-पेन्सिल आणण्याऐवजी काळ्या रंगात बुडवलेला बोळा घेऊन आली होती बहुतेक…कारण जन्माला आल्यापासून माझ्याबाबतीत काही चांगलं घडलेलं मला आठवतच नाही! कायम स्ट्रगल…गरिबी…निराशा…आरोप"
"स्ट्रगल प्रत्येकाच्याच नशिबात असतो हो…तो कुणाला चुकलाय?" श्रीकांतने सुरुवातच अशा डिप्रेसिव्ह टोनमध्ये केल्यावर अनुपमने त्याला सावरायचा प्रयत्न केला.
"माफ करा कामत पण मी सहमत नाही! आयुष्य अवघड असलं तर ठीके पण खडतर असायला नको असं मला वाटतं"
"हम्म…" अनुपमने मान डोलावली.
"मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगायचं टाळतोय असं समजू नका पण मला खरंच माझी कर्मकहाणी उगाळायची नाहीये! आपण तुमच्याबद्दल बोलू!!" आपण आत्महत्येचा प्रयत्न केला हे दारूच्या नशेत सांगून बसलो खरं पण आता जास्त डीटेल्स द्यायला नको असा विचार करून श्रीकांतने विषय बदलायचा प्रयत्न केला.
"हातिच्च्या…तुम्ही तर झकास जुन्या हिंदी पिच्चरसारखी सुरुवात केली होती राव…हिरोची गरिबी, स्ट्रगल, प्रेमभंग, आरोप वगैरे! मी रिअल लाईफ मनमोहन देसाई ऐकायला रेडी झालो होतो--"
"थट्टा सुचतेय तुम्हाला…घ्या करून थट्टा…आता तुमचं मीठ नाही खाल्लं पण दारू प्यायली म्हणजे ऐकून घ्यायलाच हवं…पण…माझ्या स्टोरीत प्रेमभंग असल्याचं मी तुम्हाला कधी बोललो?" श्रीकांतने विचारलं.
"अहो तुम्ही स्ट्रगल, गरिबी, निराशा म्हणाला होतात त्यामुळे मी ते स्ट्रगल, गरिबी, प्रेमभंग असं समजून घेतलं-- आणि हो मला अचानक आठवलं-- मगाशी मी पहिल्यांदा तुम्हांला उठवायला आलो ना तेव्हा तुम्ही सायली-सायली म्हणून झोपेत हाक मारलेली मी ऐकली होती" 
श्रीकांत चपापला. त्याला सायलीचा उल्लेख अनपेक्षित होता. 'आपण झोपेत तिचं नाव घेत होतो आणि या कामतने ते ऐकलं? शक्यच नाही! पण हा खोटं बोलतोय असं वाटत तर नाहीये!! माझ्यापेक्षा जास्त प्यायलाय…इतकी दारू पिउन माणूस खोटं तर बोलत नाही…'
"ओ भाऊ…किधर हरवलात? मनातल्या मनात नका बोलु…मोठ्याने बोला राव"
"तुम्ही मला खरंच सायलीचं नाव घेताना ऐकलंत?"
"हो"
"म्हणजे नाहीतर तुम्हाला सायली माहित असण्याचं काहीच कारण नाही…बरोबर?"
"मुळीच नाही…हां पण तुम्ही आता इतक्यांदा विचारताय म्हणून जाणून घ्यायची इच्छा आहे हे नक्की" अनुपम घोट घेत म्हणाला.
श्रीकांतने हातातला उरलेला पेग एक घोटात संपवला. तोंडाची कडवट चव सहन करत तो बोलायला लागला--
"मी म्हटलं ना सांगण्यासारखं विशेष काहीच नाही! टिपिकल फेल्ड लव्ह स्टोरी! मुलगा-मुलगी भेटले, प्रेमात पडले…पण मुलाकडे स्वतःचं घर नाही, पैसा नाही…सायली पण फार श्रीमंत होती अशातला भाग नाही. आयुष्यात काही कमी पडलं नाही याचा आनंद नव्हता तिला पण हौसमौज करायला मिळाली नाही याची खंत जरूर होती…आणि लग्नानंतर तरी तसं असावं अशी तिची अपेक्षा! कसं आहे ना कामत…तिने केलं तेव्हा माझ्यावर उत्कट प्रेम केलं…मानसिक, आर्थिक अगदी शारीरिकसुद्धा! पण जेव्हा तिला चांगल्या स्थळाकडून मागणी आली तेव्हा तिने माझी फार वाट न बघता होकार कळवून टाकला त्यांना!! आजकाल साला पोरी खूप हिशोबी असतात बघा!"
"मग? सगळं भारीच झालं की! माशी शिंकली कुठे?"
"भारी? तुम्हाला नशेत कळलं नाहीये कदाचित मी काय बोललो ते---सायलीने दुसऱ्या एका माणसाशी लग्न केलं…माझा विचार न करता….कळतंय का?"
"अहो कळलं की…पहिल्यांदा सांगितलंत तेव्हाच कळलं…तुम्हीच म्हणालात की तिने तुमच्यावर केलं तेव्हा उत्कट मानसिक, आर्थिक, शारीरिक प्रेम केलं! तुमची तेव्हाची गरज भागली की! आता ती तिच्या वाटेने गेली तुम्हाला कुठलाही मोडता न घालता!! जियो मेरे लाल…जगात सगळेच लोक इतके समजूतदारपणे वागायला लागले तर भारीच होईल" अनुपम दारूच्या नशेत होता पण त्याच्यामधला तत्ववेत्ता रंगात आला होता.
"वा म्हणजे माझ्या भावनांना, प्रेमाला काहीच किंमत नाही?"
"अहो नाही कोण म्हणतंय? पण एक लक्षात घ्या…प्रेम-वैर, आनंद-दुःख, आशा-निराशा, राग-लोभ अशा सगळ्याच मानवी भावना फार थोड्या क्षणांसाठी उत्कट, पराकोटीच्या वगैरे असतात. मग त्या अनुभवताना मिळणारं समाधान असो किंवा होणारा त्रास असो-- दोन्ही हे त्या त्या क्षणापुरतं आहे हे समजून घ्यायला हवं! श्रीकांत राव, आपल्याला काही गोष्टी मान्य कराव्या लागतात…माझं विचाराल तर मी नुसता इमोशन्सचाच नाही तर एकूणच आयुष्याचा क्षणभंगुरपणा त्याच्या बऱ्या-वाईट बाजुंसकट मान्य केला आहे….मोर ओव्हर मी तो अप्रीशियेट करायला शिकलो आहे"
"कामत---तुम्ही हे नेहमी असंच बोलता की हा जॉनी वॉकर बोलतोय? नाही कारण तोच बोलत असेल तर हरकत नाही पण नाहीतर तुम्ही बोलताय ते सगळं एकूण युजलेसच आहे"
"आता तुम्हाला तसं वाटतंय तसं…पण हां…तशी तुमच्या गोष्टीत काही ट्रजेडी नाही पण कॉमेडी नक्की आहे" अनुपम हसत म्हणाला.
श्रीकांतला आता त्याचा थोडा राग यायला लागला होता. 'मी याला माझी शोकांतिका सांगतोय तर याला त्यात हसरा शेवट दिसतोय??'
"म्हणूनच मी माझ्याबद्दल तुम्हाला काही सांगत नव्हतो…माझ्या कर्मकहाणीत नाविन्य नाही हे मलाही ठाऊक आहे पण म्हणून त्याची थट्टा होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती" तो काहीसा चिडून म्हणाला.
"चुकलं सरकार…मी मुद्दामहून थट्टा नाही केली खरंच! मी तुम्हाला चिअर अप करण्याचा प्रयत्न करत होतो" अनुपम नवीन पेग बनवत म्हणाला.
"हा असा? अहो जरा वेळ, काळ बघून तरी ठरवत चला…या भिकारचोट पावसानेसुद्धा काय काळ-वेळ निवडलीय कुणास ठाऊक? जगातल्या एक-दोन समुद्रांच्या पाण्याची एकदम वाफ झाली बहुतेक…नाहीतर ढगात इतकं पाणी येणारे कुठून?" श्रीकांतने ग्लास उचलून ओठाला लावला तेव्हा त्याचं लक्ष व्हिस्कीच्या बाटलीकडे गेलं. "हे काय अर्धी संपली?" त्याने चाचरत विचारलं.
"संपली कसली? आपण संपवली!!गेले दोन पेग 'निट' प्यायलोय आपण!" अनुपम घोट घेत थाटात म्हणाला.
"च्यामायला…तरीच माझा घसा जळतोय…थोडं पाणी घेतो घालुन…" श्रीकांत उठून शेडच्या कडेला आला आणि त्याने कप बाहेरच्या पावसात धरला. तो मागे वळला तसं अनुपमने त्याला विचारलं--
"…. म्हणजे तुम्ही केलेला आत्महत्येचा प्रयत्न सायलीमुळे की---?"
"छे छे…तुमचा तो भावनांचा क्षणभंगुरपणा मान्य करण्याचा मोठेपणा माझ्याकडे नसला तरी त्यांना कवटाळून जीव देण्याचा करंटेपणा करण्याइतका मूर्खसुद्धा मी नाही"
"क्या बात है…जियो मेरे लाल…जबरी वाक्य होतं…पण हा जॉनी वॉकर होता की तुम्ही स्वतः?"
"आपलं चिल्लर तत्वज्ञान!! दारू प्यायल्यावर सुचतं---कुणीतरी म्हणून ठेवलंय-समाधान-असमाधानाच्या परमोच्च क्षणांना सर्वोत्तम तत्वज्ञान जन्माला येतं"
"वाह! पण मग ते आत्मह---"
"आयला तुम्ही त्याला चिकटूनच बसलात राव"
"सॉरी सॉरी सॉरी…मला कळतंय की तुम्हाला तो विषय नकोय…पण मी पहिल्यांदाच असा आत्महत्या करायला ट्राय केलेल्या माणसाला भेटलोय ना.…स्वतःचाच जीव घेण्याची हिम्मत अशी कुणात कशी काय असू शकते हा मला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे"
"च्यामायला हे अजब आहे…आयुष्याचा काय बरं---हां--क्षणभंगुरपणा अप्रिशियेट करणाऱ्या माणसाला आत्महत्येचं कुतूहल?"
"आत्महत्येचं कुतूहल नाही हो…कौतुक वाटलं मला…आय मीन आपल्याला बुवा काही वाटेल ते झालं तरी असलं काही करायची हिम्मत होणार नाही…."
"काहीवेळी अशा काही घटना घडतात की आपल्याला आपल्या असण्याचीच लाज वाटायला लागते--मग भीती वाटो, निराशा वाटो किंवा अजून काही पण जीव देणं फार सोप्पं वाटायला लागतं--" श्रीकांत भकासपणे समोरच्या पावसाकडे बघत म्हणाला. काहीतरी आठवत तो हरवून गेला होता.
अनुपम चक्क गप्प झाला. काही वेळाने अनुपम काही बोलत नाहीये हे बघून श्रीकांत भानावर आला.
"गेल्या महिन्यात पुण्यात झालेल्या पीएमटीच्या अपघाताबद्दल ऐकलयंत का?" त्याने अनुपमला विचारलं.
"हे कुठून मधूनच?" अनुपमची तंद्री भंगली. त्याला थोडी झोप यायला लागली आहे असं श्रीकांतच्या लक्षात आलं.
"मध्येच नाही हो…ऐकलंय का ते सांगा आधी!"
"हो ऐकलं की…एक शाळकरी मुलगा गाडीखाली आला…तो ड्रायव्हर पिउन बस चालवत होता म्हणे"
"नुसता शाळकरी मुलगाच नाही तर एक म्हातारापण दगावला…सकाळी आठ-साडेआठ वाजले होते. रस्त्याला नेहमीसारखी खूप-खूप रहदारी होती. कुणीतरी सकाळ-सकाळ वैकुंठाकडे रिक्षातून एका तिरडीसाठी सामान नेत होता-- त्या तिरडीचे बांबू वाकडे-तिकडे बाहेर आले होते. आत बसलेला त्याचं कुणीतरी गेल्याच्या दुःखात असेल- पण शाळेच्या उशीर झालेल्या मुलाच्या सायकलच्या वाटेत ते बांबू येत होते म्हणून त्याने वाट बदलून सिग्नल चुकवून एका ठिकाणी चौकात कट मारला. तो मुलगा वळणावरून येणाऱ्या बसच्या समोर येतोय हे बघून कडेला सकाळी बाजारहाट करायला निघालेला म्हातारा त्याला अडवायला मध्ये आला…बस ताब्यात घेतानाचं पेपरवर्क करताना उशीर झाला म्हणून ड्रायव्हर घाईत--त्याला बारापर्यंत चार रिटर्न खेपा घालायच्या होत्या" श्रीकांत न थांबता बोलत होता--
"त-त-तुम्हाला एवढे डीटेल्स कसे माहिती? मला पेपरमध्ये काही वाचल्याचं आठवत नाही"
"कारण त्या बसचा ड्रायव्हर मी होतो" श्रीकांत पावसाकडे बघत म्हणाला. त्याने कपातला शेवटचा घोट संपवून तो कप जमिनीवर फेकला. शेडच्या कडेच्या खांबाला जाउन तो ओक्साबोक्शी रडायला लागला.
अनुपम कामत सुन्न होऊन बसला होता. त्याला काय बोलायचं सुचतच नव्हतं--

"इस थिस मिस्टर अनुपम कामत?"
"स्पिकिंग…व्हू इस दिस?"
"सर…सॉरी टू से पण तुम्हाला एक वाईट बातमी द्यायची होती"
"वाईट? काय झालं??"
"सर, तुमचे वडील-- आज--- अ-- आज तुमचे वडील आज सकाळी एका अपघातात गेले…रिअली सॉरी सर…माय कंडोलन्सेस"

क्रमश: