Pages

Saturday, January 4, 2020

पर्सन ऑफ इन्टरेस्ट: उहापोह आणि चिंतन (भाग १)

        
 
(Image From: https://cutt.ly/drhUAXm)
  जोनाथन नोलन हा दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनचा भाऊ. ख्रिस्तोफर नोलनचा गाजलेल्या पहिल्या सिनेमाची- 'मेमेंटो'ची मूळ कथा जोनाथनची होती. नंतर 'द प्रेस्टिज', 'डार्क नाईट', 'डार्क नाईट रायझेस', आणि 'इंटरस्टेलर' अशा ख्रिस्तोफर नोलनच्या कित्येक गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथांवर त्याने काम केलंय. जोनाथनच्या या सगळ्या कामांचा उल्लेख इथे करण्याचं कारण म्हणजे या सगळ्याच्या तोडीस तोड असूनही, त्याची संकल्पना असणाऱ्या 'पर्सन ऑफ इंटरेस्ट' (POI)ला म्हणावी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. निव्वळ करमणूक सोडून बुद्धिजीवी लोकांना विचार करायला लावणारा, प्रचंड गुंतागुंत असणारा, भविष्याचा वेध घेणारा, प्रसंगी अचाट वा अशक्य गोष्टी आणि त्या गोष्टी करणाऱ्या 'लार्जर दॅन लाईफ' व्यक्तिरेखा असणारा शो म्हणून मला POI कायमच खूप आवडलाय. तो का आवडला किंवा त्यातल्या विचार करायला लावणाऱ्या गोष्टी यांच्याबद्दल लिहायचं खूप महिने मनात होतं. आज फायनली मुहूर्त सापडलाय...
            ११ सप्टेंबर २००१ ला न्यूयॉर्कच्या 'ट्विन टॉवर्स'वर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर अमेरिका हादरली आणि अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण, सुरक्षा, दळणवळण अशा सगळ्या महत्वाच्या गोष्टींवर दूरगामी परिणाम झाले. मध्य पूर्वेतली युद्धं अमेरिकेला नवीन नव्हती पण देशांतर्गत सुरक्षाप्रणालीत घोषित-अघोषित अनेक बदल झाले ते ९/११ नंतर. 'पर्सन ऑफ इंटरेस्ट' हा टीव्ही शो सुरु झाला २०११ मध्ये पण त्यात दाखवलेल्या गोष्टीची सुरुवात झाली ती २००१ मध्ये. शोच्या 'पायलट' अर्थात पहिल्या पर्वाच्या/सिझनच्या पहिल्या भागात आपण भेटतो जॉन रीसला. हा जॉन आधी सैन्यात होता, मध्यपुर्वेचे दौरे करून आला, नंतर सीआयएचा हेरसुद्धा होता- आता मात्र तो स्वतःला दारूमध्ये बुडवून, कुठलंतरी न सांगता येण्यासारखं दुःख कवटाळून बेघर भटकतोय. कुठल्याश्या लहानश्या मारामारीत त्याला पोलीस पकडतात आणि जेलमध्ये टाकतात. तेव्हा त्याची सुटका एक अनोळखी, एकलकोंडा आणि काहीसा अनाकलनीय माणूस- हॅरल्ड फिंच करतो. हॅरल्ड फिंच या माणसाची सरकारदफ्तरी कुठली नोंद नाही, त्यालासुद्धा जॉनसारखा कुणीही जवळचा नातेवाईक नाही. POIला शीर्षक गीत नाही. त्याऐवजी या हॅरल्डच्याच आवाजातलं एक निवेदन आहे जे साधारण शोची संकल्पना आपल्याला सांगतं. ते निवेदन ढोबळमानाने असं-

"तुमच्यावर पाळत ठेवली जातेय.
सरकारकडे एक गुप्त यंत्रणा, एक 'मशीन' आहे जे दर क्षणाला तुमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहे.
मला मशीनबद्दल माहितीय कारण ते मीच बनवलंय.
मी मशीन बनवलं ते दहशतवादी घातपातांच्या घटनांवर लक्ष ठेवायला,
पण मशीनचं लक्ष तर सगळ्या(जगा)वरच आहे, सगळ्या हिंसक गुन्ह्यांवर!
असे गुन्हे ज्यात तुमच्यासारखे लोक गुंतलेले असू शकतात,
असे गुन्हे ज्याला सरकार काही महत्व देत नाही,
सरकार काही करत नाही म्हणून मी (गुन्हे थांबवायला) काहीतरी करायचं ठरवलं..
पण मला या कामात एक जोडीदार हवा होता (जॉन रीस इथे पडद्यावर दिसतो), ज्याच्याकडे असे गुन्हे थांबवण्यासाठी लागणारी तंत्रं असतील...
यंत्रणा आमच्या मागावर आहेत, (म्हणून) आम्ही गुप्तपणे काम करतो..
तुम्ही आम्हाला शोधू शकणार नाही....
पण तुम्ही जर का (संभाव्य) गुन्हेगार किंवा गुन्ह्याला बळी पडणार असाल तर आम्ही तुम्हाला शोधू..."


गुन्हेविश्वावर आधारित टीव्ही शो अर्थात 'Crime Procedural' ही संकल्पना अजिबातच नवीन नाही. आजपर्यंत जगभरात शेकड्याने असे कार्यक्रम बनले असावेत ज्यात भागाच्या सुरुवातीला खून (कधीतरी चोरी) वगैरे होतो आणि वेगवेगळे स्टायलिश लोक आपापल्या पद्धतीने खुनी, चोर वगैरे शोधतात. POI चा पहिला सिझन हा एकूणच प्रत्येक भागाची स्वतंत्र कथा असणाऱ्या 'Crime Procedural' प्रकारात येत असला तरी गुन्ह्याची उकल करण्यापेक्षा 'गुन्हा थांबवणं' हा त्याची मुख्य 'थीम' आहे. त्यात 'मशीन'च्या कार्यपद्धतीमुळे नेहमी गुन्ह्याशी 'संलग्न व्यक्ती' अर्थात 'पर्सन ऑफ इंटरेस्ट' गुन्हा करणारे की गुन्ह्याला बळी पडणारे हे रीस किंवा फिंचला माहित नसतं. तेव्हा ते शोधणं हा ही एक रहस्याचा भाग! जॉन रीस फिंचच्या मदतीनं, निनावी राहून, पोलिसांपासून लपत-छपत, टिपटॉप सुटाबुटात फिरून न्यूयॉर्क शहरात घडणारे गुन्हे थांबवायला सुरुवात करतो. न्यूयॉर्कच्या पोलीस, गुन्हेगारांपासून ते पार एफबीआय, सीआयएपर्यंत 'सुटातला माणूस' अशा हास्यास्पद (पण चपखल) नावाने प्रसिद्ध होतो. सोबतच्या उपकथानकांमध्ये दोन पोलीस अधिकारी सहकारी पात्रं म्हणून दर भागात दिसतात. यातली एकजण 'जोस कार्टर' प्रामाणिक, निष्ठावंत डिटेक्टिव्ह आहे जिला 'सुटातल्या माणसाला' पकडायचंय आणि दुसऱ्या काहीश्या चांगल्या वृत्तीच्या पण भ्रष्ट्र डिटेक्टीव्ह 'लायनल फस्को'ला जॉनने त्याच्याविरुद्धचे काही पुरावे लपवून ठेवत स्वतःच्या बाजूला करून घेतलंय. न्यूयॉर्कमधल्या भ्रष्ट पोलिसांची एक संघटना जिचं नाव HR, तिथल्या गुन्हेगारी फॅमिलीज आणि त्यांच्यातला संघर्ष हेसुद्धा अगदी सहज या सिझनमध्ये येतं. मी वर लिहिलेली गुंतागुंत, भविष्याचा वेध, कृत्रिम बुद्धिमत्तेचा मनुष्याचा आयुष्यावर होऊ शकणारा परिणाम असे क्लिष्ट मुद्दे या पहिल्या सिझनमध्ये नाहीत. यातली लहान-मोठी उपकथानकं, इतर पात्रं चांगली असली तरी तोंड भरून कौतुक वगैरे करण्याजोगी नाहीत. जवळपास सगळे भाग स्वतंत्र आहेत आणि फक्त कार्यक्रमाची संकल्पना माहित असेल तर आधीचा भाग बघितलाच पाहिजे असं नाही. यातही 'जजमेंट', 'विटनेस', आणि 'बेबी ब्लु' हे माझे आवडते एपिसोड्स आहेत.

दुसऱ्या पर्वात POI मालिका म्हणून हळूहळू 'सीरियलाईज्ड' व्हायला लागते. ज्याला 'आर्टिफिशियल सुपरइंटेलिजन्स' (ASI) म्हणता येईल असं मशीन अस्तित्वात असल्याची चाहूल लागलेले लोक, मशिनचं अस्तित्व जगाला कळू नये म्हणून सरकारी यंत्रणांचे चालू असणारे अथक प्रयत्न (ज्यात मुखत्वे मशीनबद्दल ठाऊक असलेल्या लोकांना जीवे मारणं  हेच त्याचं अस्त्रित्व लपवण्याचा मार्ग आहे हे मानणारे अधिकारी) ही मुख्य उपकथानकं इथे येतात. फिंचचा भूतकाळ, त्याने नेमक्या रीसलाच का जोडीदार म्हणून नेमलं, मशीन फिंचशी किंवा फिंच मशीनशी संपर्क कसे साधतात? या प्रश्नांची उत्तरं मिळतात. मशीनचा शोध लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे हेतू आहेत- कुणाला ते नष्ट करायचं आहे, कुणाला त्याच्यावर ताबा हवाय वगैरे वगैरे. या सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेक्षक 'मशीन' या यंत्रणेला एक पात्र म्हणून बघायला लागतो. दरम्यान पहिल्या पर्वात असणारी सहकारी पात्रं- कार्टर, फस्को, एलायस, रूट आता जास्त महत्वाची होतात. 'टीम मशीन' विस्तारते ज्यात आता रीस, फिंच सोडून कार्टर, फस्को, समीन शॉ सुद्धा सहभागी होतात. दुसऱ्या सिझनमध्येसुद्धा जवळपास प्रत्येक भागाला एक 'स्वतंत्र' कथानक आहे आणि काही प्रमाणात वर लिहिलेली उपकथानकं पुढे नेण्यावर भर आहे (जे पुढच्या सीझन्समध्ये अधिकाधिक होतं). एकूणच दुसरा सिझन मला आवडला असला तरी विशेष करून रीसला 'सुटातला माणूस' म्हणून एफबीआयचे लोक पकडतात तेव्हाचे २ भाग '2PiR' आणि 'प्रिसनर्स डायलेमा' मला खूपच आवडतात. सगळ्या १०३ एपिसोड्सपैकी जोनथन नोलनने दिग्दर्शित केलेला एकमेव, समीन शॉच्या पात्राची ओळख करून देणारा 'रिलेव्हन्स' नावाचा भागही जबर आहे!
२०१३ मध्ये एडवर्ड स्नोडेन हे नाव जगाला माहित झालं. स्नोडेनने अमेरिकची 'नॅशनल सिक्युरिटी एजन्सी' जगभरात लोकांवर बेकायदेशीर पाळत ठेवायचे कार्यक्रम राबवत असल्याचे उल्लेख असणारी कागदपत्रं जगजाहीर केली. स्नोडेनच्या या कामगिरीचे पडसाद अमेरिकेतच नाही तर जगभरात उमटले. त्याने जाहीर केलेल्या कागदपत्रांमध्ये कित्येक टेलिकॉम कंपन्या आणि युरोपियन देशातल्या सरकारांचादेखील उल्लेख होता. हा सगळाच विषय 'POI' च्या मध्यवर्ती संकल्पनेला इतका 'रिलेवंट' असल्याने त्यावर उहापोह होणं अपेक्षित होतं आणि तो झालासुद्धा. दुसऱ्या सीझनमध्ये आपण 'मशीन'ला पात्र म्हणून ओळखायला लागतो तेव्हा त्याच्या 'कोडिंग'मध्ये अर्थात जडणीघडणीमध्ये हॅरल्डच्या जगाकडे बघायच्या दृष्टिकोनाचा किती मोठा वाटा आहे हे लक्षात यायला लागलेलं असतं. तिसऱ्या सीझनपासून हे जास्तच अधोरेखित होतं. या सिझनमध्ये न्यूयॉर्क मधल्या भ्रष्ट पोलीस यंत्रणेला संपुष्टात आणण्यासाठी कार्टर करत असलेली धडपड, लोकांवर सरकारने बेकायदेशीर पाळत ठेवायच्या बातम्या/अफवा पसरायला लागल्यावर त्याच्या विरोधात सक्रिय झालेली सशस्त्र नागरी संघटना आणि 'मशीन'वर ताबा मिळवणं अवघड आहे याची जाणीव झाल्यावर तसंच दुसरं मशीन बनवायच्या मागे लागलेले लोक ही तीन मुख्य कथानकं आहेत. तिसऱ्या सीझनमधला 'डेविल्स शेअर' हा भाग अफलातून आहे. याच सीझनमधला ४C नावाच्या एपिसोडचं लिखाण हे मला त्यातल्या एक-दोन अचाट सीन्समुळे थोडं वीक वाटतं. पण एकूणच या सीझनपर्यंत POI ची 'मायथॉलॉजी' आणि रीस-फिंचचं 'सुपरहिरो' असणं मी प्रेक्षक म्हणून मान्य केलेलं असतं सो निदान मनोरंजनात खंड पडत नाही.

POIच्या जवळपास प्रत्येक एपिसोडसमध्ये प्रभावी कथानकं, उपकथानकं आहेत. रोचक वाटावेत असे 'पर्सन्स ऑफ इंटरेस्ट' आहेत आणि प्रत्येक मुख्य पात्राचा शोमध्ये पहिल्यांदा दिसण्यापूर्वीचा भूतकाळसुद्धा वेगवेगळ्या एपिसोड्सच्या कथानुकानुसार दाखवला गेलाय. याच अनुषंगाने आता POI च्या पात्रांबद्दल थोडं (खरंतर POI चे एकूण पाच सीझन्स आहेत पण उरलेल्या दोन सीझन्सबद्दल नंतर लिहिणारे आणि त्याचं कारणसुद्धा तेव्हाच देईन). जिम कवीझल POIच्या आधी 'पॅशन ऑफ द ख्राईस्ट' या सिनेमातल्या जिझस ख्राईस्टच्या भूमिकेमुळे लोकांना माहीत होता. त्या 'जिझस'ला सुटाबुटात मारामाऱ्या करताना, सराईतपणे बंदुका वापरताना बघणं हे काही लोकांना धक्कादायक वाटल्याचं वाचलेलं आठवतंय. एका अर्थी ही व्यक्तिरेखा एककल्ली आहे, पहिल्या एपिसोडमधली काही मिनिटं सोडल्यास आपल्याला प्रेक्षक म्हणून रीस काय करेल किंवा भूतकाळात त्याने काय केलं असेल याचा पुरेपूर अंदाज येतो. त्याला असणारं, न सांगता येणारं दुःख कोणतं आहे याचा उलगडा नंतर होतो पण याच अनुषंगाने लहान मुलं किंवा छळ होणाऱ्या बायकांशी संबंधित गुन्हा असला तर रीसचे आविर्भाव पाहण्यासारखे आहेत. कवीझलची इथली भूमिका जिझसच्या भूमिकेपेक्षा वेगळी असली तरी एखाद्या एपिसोडच्या शेवटी कुणालातरी सल्ला किंवा नैतिक बळ देणारा कवीझल पाहिला की 'पॅशन'ची थोडीशी आठवण होतेच. एकीकडे सतत लोकांमध्ये असूनही एकाकी असणारा रीस आणि दुसरीकडे निव्वळ एखाद्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपपुढे बसून रीसशी फोनवर बोलताना दिसणारा 'अक्षरशः एकाकी' फिंच. फिंचची भूमिका करणाऱ्या मायकल इमर्सनला त्याच्या 'लॉस्ट' मधल्या नकारात्मक भूमिकेसाठी एमी मिळालं होतं. लॉस्टमधली त्याची आधी खलनायकी आणि शेवटी चांगुलपणाकडे झुकलेली भूमिका त्याने जबर केलीच होती पण इथे तो मला अभिनेता म्हणून प्रचंड आवडलाय. हॅरल्ड फिंचचं पात्र हे एका अर्थी 'POI' विश्वाची आणि पर्यायाने मशीनची नैतिकता ठरवतं . तो वस्तुनिष्ठ आहे तरी आशावादीसुद्धा आहे. जीवापाड प्रेम करणारी माणसं असूनसुद्धा एकाकी आहे. आपण मशीन बनवून चूक केलं का बरोबर या चिरंतर मानसिक द्वंदात आहे. हे द्वंद चौथ्या-पाचव्या सीझनमध्ये जास्त ठळकपणे  येतं. इमर्सनला ही भूमिका करताना बऱ्याचदा नुसते कॉम्प्युटरपुढे बसून संवाद म्हणायचे असायचे, फोनवर दुसऱ्या बाजूला रीस आहे असं आपण जरी एडिटेड एपिसोडमध्ये पाहिलं तरी इमर्सनचे हे सिन्स एकट्यानेच शूट व्हायचे हे लक्षात घेतलं तर त्याच्या फोनवरच्या संभाषणामधल्या 'रिऍक्शनस' अजून आवडायला लागतात. फिंचच्या पात्राला एका अपघातामुळे आलेलं अपंगत्व दाखवायला त्याने घेतलेलं बेरिंग फ्लॅशबॅकमधले, अपघाताआधीचे सीन्स आले की जास्त अधोरेखित होतं आणि दाद मिळवून जातं. 
                                                       (Image from: https://cutt.ly/SrhUHp1)
या दोघांशिवाय सहाय्यक भूमिकांमध्ये असणारे सगळेच अभिनेते कमाल आहेत. एमी एकर अर्थात 'रूट'ची भूमिका ही सुरुवातीला केवळ एक-दोन स्वतंत्र भागांपुरती लिहिली होती पण पुढे तिची लांबी वाढून तिसऱ्या सीझनमध्ये तिला महत्व येतं. या व्यक्तिरेखेच्या परिस्थितीला रिऍक्ट व्हायच्या पद्धती अगदी शेवटपर्यंत काहीशा बेभरवशाच्या राहतात पण 'तुमच्या काम करण्याच्या पद्धतींपेक्षा काम करण्याचा हेतू किती शुद्ध आहे ते महत्वाचं' अशा साधारण तत्वांवर ती 'टीम मशीन'ची मेंबर बनते. अजून एक- एन्रिको कोलांटनीचा कार्ल एलायस- याच्या व्यक्तिरेखेचा ग्राफसुद्धा काहीसा रूटसारखा.आधी 'टीम मशीन' च्या विरोधात असणारा हा न्यूयॉर्कच्या गुन्हेगारी विश्वाचा बादशाह नंतर अज्ञातवासात राहून रीस-फिंचची मदत करतो ते काही सीन्स छान जमलेत. सरतेशेवटी उल्लेख लायनल फस्को अर्थात केविन चॅपमनचा. वाईट संगतीत राहून भ्रष्ट्र झालेला, पण वृत्तीने चांगला असणारा, सगळ्याच लार्जर दॅन लाईफ, जिनियस' पात्रांमध्ये काहीसा अर्धवट वाटणारा, 'टीम मशीन'साठी खूप सुरुवातीपासून मदत करूनही मशीनच्या अस्तित्वाबद्दल अगदी शेवटपर्यंत अनभिज्ञ असणारा फस्को हा सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधीत्व करतो असं मानायला हरकत नाही. स्वतःतले गुण आणि मुख्यत्त्वे मर्यादा त्याला पुरेपूर ठाऊक आहेत आणि त्या बोलून दाखवायला त्याला अजिबात कमीपणा वाटत नाही. मी POIचे सगळे भाग ५-६ वेळा तरी पहिले असतील, पण लक्षात राहणाऱ्या बऱ्याचश्या पंचलाईन्स फस्कोच्या वाट्याला आल्यायत. आता हे खरंच संवांदांचं क्रेडिट आहे की केविन चॅपमनच्या अभिनयाचं हे पाहणाऱ्याने ठरवायचं. याशिवाय कार्टरच्या भूमिकेत तराजी हेन्सन उत्तम पण POI नंतर तिने इतर अनेक चांगल्या भूमिका केल्यामुळे आता मला तिच्या या भूमिकेचं विशेष कौतुक वाटत नाही. सारा शाहीच्या व्यक्तिरेखेचा उल्लेख टाळत नाहीये पण मला त्यातल्या त्यात कमी आवडलेल्या व्यक्तिरेखांमध्ये ती येते एवढंच लिहीन. इथेही नमूद करण्याचा मुद्दा हा की POI च्या काही लँडमार्क एपिसोड्समध्ये (रिलेव्हन्स, इफ-देन-एल्स, ६,७४१) सारा शाहीची व्यक्तिरेखा खूप महत्वाची आहे.
        २१व्या शतकातली पहिली दोन दशकं संपली. आधीच्या २ शतकात विज्ञान-तंत्रज्ञानाची जेवढी प्रगती झाली नसेल तेवढी गेल्या दोन दशकात झाली. आज जगातले बहुतांश लोक या न त्या मार्गाने टेक्नॉलॉजीवर दैनंदिन गरजांसाठी अवलंबून आहेत. इंटरनेट आणि स्मार्टफोन्स या दोन गोष्टींनी संपूर्ण जग लिटरली आपल्या बोटांशी आणून ठेवलंय. मित्रांशी संपर्कात राहण्यासारख्या मानसिक गरजांपासून ते बँकेचे व्यवहार करण्याच्या आर्थिक गरजांपर्यंत इंटरनेटवर आपण विसंबून आहोत. 'तुमच्या आईपेक्षा गुगलला तुमच्याबद्दल जास्त माहीतीय' असा आशयाचा मेसेज आपण काहीतरी नक्कीच वाचलाय! म्हणजे खरंच- गुगलला किंवा तत्सम कुठल्या सिस्टमला अशी खरंच पाळत ठेवता येत असेल? पाळत ठेवायची म्हणजे आपल्याविषयीची ही सगळी माहिती नुसती जमा नाही करायची तर तिचा सारासार अभ्यास करून त्यातून अनुमानं काढायची, पुढे काय घडू शकेल याचे ठोकताळे बांधायचे आणि त्याप्रमाणे पुढच्या घडामोडींमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करायचा. या सिस्टमचं सर्वमान्य नाव म्हणजे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI). आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात 'कृत्रिम बुद्धिमत्ता' म्हणजे काय हे इंटरनेट वापरणाऱ्या सगळ्यांनाच साधारण माहिती असेल. आपण मित्राला 'प्रायव्हेट' चॅटवर विचारलं की नवीन 'प्लेस्टेशन'चा रिव्ह्यु काय ए? या वर्षी चांगला सेल असेल तर घ्यायचा विचार आहे' की लगेच आपल्याला गुगल, फेसबुकवर प्लेस्टेशन, एक्सबॉक्स वगैरे जाहिराती दिसायला लागतात. आपल्या लाईफमध्ये काही 'प्रायव्हसी' राहिलीच नाहीये वगैरे सात्विक संताप करण्यापलीकडे आपली मजल जात नाही. काही लोक 'टेक्नॉलॉजी कसली डेव्हलप झालीये' म्हणून कौतुकंसुद्धा करतात. नाही म्हणजे कौतुक वाटायला काही हरकत नाहीये पण हे किती 'भीतीदायक' आहे याचा सिरियसली विचार केलाय का आपण? POIचा चौथा आणि पाचवा सिझन साधारण याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा, देण्याचा प्रयत्न करतो. POI बद्दल भरभरून लिहावंसं वाटत होतं त्याला एकूणच एक चांगला टीव्ही शो बघितल्याचं कौतुक हा एक भाग होता आणि AI वर थोडं लाऊड थिंकिंग हा दुसरा हेतू होता.
काही वेळापूर्वी जाणवलं की हेच लिखाण बरंच लांबलंय म्हणून थोडा  ब्रेक घेऊन चौथ्या-पाचव्या सिझनबद्दल एक वेगळा भाग लिहितो. तूर्तास एवढंच पुरे!

क्रमशः

Friday, December 25, 2015

लागी करेजवा कटार!

मी अकरावी-बारावीत असताना कधीतरी 'झी मराठी' ही तशी नवखीच असणारी वाहिनी एक अप्रतिम प्रयोग करायची- त्याचं नाव 'नक्षत्रांचे देणे'. आरती प्रभू, पुल, विंदा करंदीकर, श्रीनिवास खळे, पं. जितेंद्र अभिषेकी अशा कित्येक थोर थोर लोकांच्या समग्र कारकीर्दीची काही तासाची सफर! 'नक्षत्रांचे देणे'मुळे आमच्या पिढीच्या कित्येकांची नाट्यसंगीताशी, शास्त्रीय संगीताशी नव्याने ओळख झाली. मग जाणवलं- शास्त्रीय संगीत लहान असताना वाटायचं तेवढं काही बोरिंग नाहीये! पुढे काही वर्ष मराठी सारेगमप बघताना जुनी मराठी गाणी, नाट्यपदं पुन्हा पुन्हा ऐकायला मिळायला लागली आणि मग त्यात मजा यायला लागली! मग एखादा राहुल सक्सेनासारखा सुरेख आवाज असणारा अमराठी माणूस जेव्हा 'दाटून कंठ येतो' किंवा 'सुरत पिया की' गायचा तेव्हा आजी म्हणायची- "अरे वसंतरावांची सर कशी येईल त्याला?" मग घरातल्या मोठ्या पिढीकडून संगीत नाटकं, त्याचे तासनतास चालणारे प्रयोग, मंत्रमुग्ध करणारी गाणी वगैरे सगळं ऐकायला मिळायचं! तेव्हा कधीतरी प्रश्न पडला होता- की आपल्याला यातलं काही कधीच बघायला मिळणार नाही का? आणि मिळालं तर ते त्या तोडीचं, ताकदीचं असेल का? आज चित्रपट 'कट्यार काळजात घुसली'च्या निमित्ताने त्या प्रश्नाला उत्तर मिळालंय! आणि उत्तर साधसुधं नाही- चांगलंच दमदार आहे!

वसंतराव नाही पण 'क्लोसेस्ट पॉसिबल'* चंद्रकांत लिमयेंच्या खांसाहेबांच्या 'कट्यार काळजात घुसली' नाटकाचा व्हिडीओ 'प्रिझम' कंपनीमुळे 'युट्युबवर' मोफत उपलब्ध आहे! त्यातली गाणी ऐकायला नाटक मागे कधीतरी पाहिलं होतं. संगीताच्या बाबतीत तर कधी वाद नव्हताच पण तेव्हा नाटकाच्या कथेत काही मी विशेष रस घेतला नव्हता. नाटकातल्या सदाशिव या पात्राच्या शब्दबंबाळ लाडिकपणामुळे नाटकाची गोष्ट भिडली वगैरे नाहीच कधी! सिनेमा कट्यार आला-- डल्लास-फोर्टवर्थच्या महाराष्ट्र मंडळाच्या पुढाकाराने अमेरिकेत पहायलाही मिळाला! गाणी त्याआधी महिनाभर 'युट्युब' कृपेने घरात वाजत होतीच! सिनेमा बघून झाल्यावर पुन्हा एकदा घरी येउन नाटक पाहिलं-- यावेळी निव्वळ कथेसाठी! मग कळत-नकळत मनात दोन्हीची तुलना झाली- नाटक त्याच्याजागी कितीही श्रेष्ठ असलं तरी सिनेमा जास्त का आवडला, किंवा नाटकात काय जास्त चांगलं होतं  हे लक्षात आलं. सो डोक्यातलं सगळं काढून वैश्विक पटलावर मांडायला हा खटाटोप!

सर्वप्रथम मराठी चित्रपटाचा एवढा भव्य-दिव्य अवतार बघून कौतुक वाटलं- छायाचित्रण, पेहराव, ब्रिटीशपूर्व भारताचं चित्रण (इन्क्लुडिंग शाही दरबारातला इंग्रज अधिकारी), पात्रांच्या वेशभूषा, केशभूषा** सर्वच काही अप्रतिम! पात्रं आणि लोकेशन्सच नव्हे तर नाटकात कुठल्याही बाजूने पाहिली तरी 'शाही' न वाटणारी कट्यार सिनेमात मात्र सुरेख सादर केलीय- तिला शाही म्हणावसं वाटतं! नाटकाच्या कथेत खांसाहेब सर्वेसर्वा आहेत तर चित्रपटात पंडितजींनाही जवळपास बरोबरीचा रोल मिळालाय. मगाशी लिहिलं तसं- नाटकातला सदाशिव त्याच्या निरागसपणामुळे डोक्यात जातो- तर सिनेमातला काहीसा आक्रमक सदाशिव 'हिरो' म्हणून आवडून जातो! नाटकाची संपूर्ण कथा जरी दोन घराण्यांच्या द्वंदाबद्दल असली तरी त्यात संगीत 'जुगलबंदी' प्रकार फारसा वापरलेला नाही-- त्यामुळे दोन्ही गायकीतला फरक ठळकपणे अधोरेखित व्हायला माझ्यासारख्या शास्त्रीय संगीतात निरक्षर असणाऱ्या माणसाला जड जातं- उलट चित्रपटात दोन प्रत्यक्ष आणि एक अप्रत्यक्ष जुगलबंदी झकास झालीय. संगीत शैलीतला फरक, कव्वालीतल्या शब्दांमुळे सहज स्पष्ट होणारा दोन्ही व्यक्ती-प्रवृत्तीमधला फरक हे छानच अधोरेखित झालंय! 'आफताब हुसेन बरेलीवाले' नाटकात छान मराठी मराठी बोलतात- 'या भवनातील गीत पुराणे', 'तेजोनिधी लोहगोल' वगैरे अस्खलित मराठी गाणी गातात हेच न पटण्याजोगं आहे! याउलट सिनेमात खांसाहेब एकही वाक्य मराठीत बोलत नाहीत, 'घेई छंद'चा अपवाद सोडल्यास मराठी गाणंही गात नाहीत-- हे रेट्रोस्पेक्टीव्ह तुलना करताना जास्त आवडून जातं. मोजक्या ठिकाणी खांसाहेबांचा अपवाद सोडला तर नाटकातली सगळीच पात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत एककल्ली-एकमितीय वाटतात- सिनेमात मात्र पंडितजी, सदाशिव आणि खांसाहेबांचे भावनिक चढ-उतार कमी-अधिक प्रमाणात ठळकपणे येतात. शाही मैफिली असोत किंवा पंडितजींच्या गाणं न म्हणता निघून जाण्यातलं गूढ असो- यांनी सिनेमा मनोरंजक करण्यात, त्यातल्या नाट्यमयतेत भरच पडलीय! दरबारातल्या इंग्रजाचा, आपल्याकडे कुप्रसिद्ध ब्रिटीश नीतीचा झकास वापर सिनेमात झालाय- त्यासाठी पटकथाकारांचं विशेष अभिनंदन. सिनेमाची कथा पाहता त्यात खांसाहेबांच्या बेगमचं पात्र आवश्यक होतं- आणि त्या पात्राला स्क्रीनटाईम मिळाल्यामुळे निदान आपल्याला त्याचा 'पॉइन्ट ऑफ व्यू' कळतो (चुकीचा वाटला तरीही). सदाशिवाने खांसाहेबांकडे 'गडी' म्हणून काम करत गाणं 'शिकणं' हा धागा जरी सिनेमा आणि नाटकात सारखा असला तरी कथेला त्या वळणापर्यंत आणणाऱ्या घटना वेगळ्या आहेत आणि पुन्हा एकदा चित्रपटातलं स्पष्टीकरण- कथेच्या आणि पात्रांच्या दृष्टीकोनातून योग्य वाटतं- उलट नाटकातला सदाशिवाला गळ्याच्या वर कुठला अवयव आहे की नाही असा प्रश्न पडावा असा त्याचा वावर आहे. नाटक आणि सिनेमाच्या शेवटाचा भावार्थ जरी सारखा असला तरी नाटकात ना खांसाहेबांबद्दल सहानभूती वाटते ना सदाशिवबद्दल- उलट सिनेमात कडूगोड शेवट आहेच पण खांसाहेबांना पण माफ करून टाकायची इच्छा होते.

निव्वळ सिनेमातल्या अभिनयाबद्दल बोलायचं तर सगळ्यांची कामं चोख--पण विशेष आणि पहिला उल्लेख सचिन पिळगावकरांचा-- गेल्या ५-६ वर्षात त्यांची आत्मकेंद्री, अहंकारी 'महागुरू' म्हणून जेवढी थट्टा झाली असेल तेवढंच या अहंकारी, आत्मकेंद्री भूमिकेसाठी त्यांचं भरभरून कौतुक करायला हवं- सचिन यांच्या उर्दू अभ्यासाचा एखाद्या भूमिकेसाठी एवढा योग्य वापर याआधी कधीच झाला नसेल- सो कास्टिंग टीमचं विशेष कौतुक! शंकर महादेवन यांचा अभिनय त्या ताकदीचा वगैरे नसला तरी या सिनेमापुरता उत्तम आहे. बाकी सुबोध भावे, मृण्मयी देशपांडे यांना अभिनय जमतोच! अमृता खानविलकर मला एरवीही आवडतेच-- सो वेगळं बोलायला नकोच! सुबोध भावेंचं दिग्दर्शकीय पदार्पण जबरदस्त- त्यांना एक पूर्ण लांबीची भूमिका असल्याने असेल किंवा मी चित्रपटाच्या प्रमोशन्सबद्दल खूप वाचलं, पाहिलं आहे म्हणून असेल पण त्यांचा दिग्दर्शक म्हणून 'वावर' चित्रपट पाहताना जाणवतो. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट- संगीत!! सगळंच लिहायचं, बोलायचं झालं तर गीतं आणि संगीत यावर एक स्वतंत्र पोस्ट लिहावी लागेल- पण थोडक्यात उल्लेख करायचा झाला तर जुनी गाणी अप्रतिम आणि नवीन गाणी त्यात चपखल बसतात- शंकर-एहसान-लॉयची गाणी पं. जितेंद्र अभिषेकींच्या गाण्यांबरोबर बेमालूम मिसळून एका चित्रपटात किंवा अल्बममध्ये एकसंध वाटू शकतात हे मला काही वर्षांपूर्वी सांगितलं असतं तर माझा अजिबात विश्वास बसला नसता-पण 'मन मंदिरा', 'दिल की तपिश', कव्वाली ही गाणी अफाट आहेत! 'या भवनातील गीत पुराणे' ऐवजी त्याच इमोशनचं 'सूरसंगिनी' सुंदरच! शेवटचा उल्लेख शंकर महादेवन, राहुल देशपांडे आणि महेश काळे यांचा--हे तिघं जर गायला नसते तर 'कट्यार-' आहे त्या उंचीचा सिनेमा झाला नसता. महेश काळेच्या आवाजातलं शेवटचं गाणं, त्याचे शब्द, संगीत यांनी केलेला शेवट जबर! मराठी शास्त्रीय संगीतातलं पहिलं 'RAP' गाणं म्हणून या गाण्याचा यापुढे उल्लेख करायला हरकत नाही!

अर्थात सिनेमात सगळंच भारी होतं असंही नाही! सिनेमातल्या खांसाहेबांना आवाज वसंतरावांचा डायरेक्ट वारसा असणाऱ्या राहुल देशपांडेंचा- पण नाटकाच्या तुलनेत त्यांच्या पात्राला गाणी कमी! राहुल देशपांडेंचा चाहता म्हणून त्यांच्या आवाजात अजून एखाद गाणं आवडलं असतं- अर्थात इथेही लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा 'दिल की तपीश', 'सूरसंगिनी' अशी दोन नवीन गाणी त्यांनी सुपर्ब गायली आहेत तर नाटकातली जवळपास सगळी जुनी गाणी शंकर महादेवन (पंडितजी) गातात! सिनेमात स्त्री पात्रांना व्यवस्थित भूमिका जरी असल्या तरी कुठलीही गाणी त्यांच्या वाट्याला आलेली नाहीत- उलट फातिमा नाचताना दिल की तापिश गुणगुणते तेव्हाचं 'लीप सिंक' अजिबात जमलेलं नाही! इतर आलाप आणि ताना असलेल्या सगळ्या गाण्यांना इतकं व्यवस्थित 'लीप सिंक' असल्याचं कौतुक वाटत असतानाच अशी चूक खटकते आणि लक्षात राहते! सदाशिवचं एकूण पात्र जरी इथे जास्त पटणारं असलं तरी त्याची पार्श्वभूमी चित्रपटात फारशी नाही- तो मधली वर्षं कुठे होता वगैरेचा उल्लेख नाही! नाटकातले चांद-उस्मान निदान साथ द्यायला का होईना पण गातात, सिनेमातले चांद-उस्मान खुनशी, बिनडोक वाटतात- ते कधीच गाताना दिसत नाहीत. उमा, सदाशिव, झरिना पात्रांमधला व्यक्त-अव्यक्त प्रेम त्रिकोण थोडा अनावश्यक वाटतो. युट्युबवर वारंवार गाण्याचे व्हिडिओ पाहताना कळलेली आणि मग कायम खटकलेली गोष्ट- हे अगदीच बारीक आहे पण-- 'सूर निरागस हो' मधील गणपतीचं जानवं 'अपसव्य' आहे आणि I have seen it so I can't 'unsee' it!

अजून बरंच काही आठवतंय, लिहावसं वाटतंय पण तूर्तास एवढं पुरे! या चित्रपटाची खूप प्रशंसा, समीक्षा आधीच झालीय आणि पुढेही होत राहील तेव्हा त्यात माझ्या इतक्याच पोस्टची भर पुरे! नाटक, सिनेमा हा रंगभूमीच्या किंवा कॅमेराच्या चौकटीत बसवायचा असतो आणि मग लेखक-दिग्दर्शक म्हणून व्यक्त होण्यावर बंधनं असतात. नाटकाला ही बंधनं सर्वाधिक लागू होतात. एखादी कथा-कल्पना नाटकातून लोकांपुढे मांडताना त्याला असणारी रंगभूमीच्या लांबी-रुंदीची बंधनं, नाटक किती प्रेक्षकांकडे पोहोचू शकतं याची बंधनं, दीर्घकाळ प्रयोग करायला नट-नट्यांच्या उपलब्धतेवर बंधनं, लांबवर खेड्यापाड्यात जाऊन नाटक करायचं तर दळणवळणाच्या साधनांची बंधनं! कपडेपट, नेपथ्य यांची मेंटेनन्स-- एक ना दोन शेकडो प्रश्न! नाटकाचं यशापयश हे या सगळ्या-सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं--कधी नाटकाचे विषय कालबाह्य होतात कधी कलाकार-- आणि मग पुढच्या पिढीला सांगायला फक्त आठवणी असतात! चित्रपट हा त्या मानाने दीर्घायुषी प्रकार आहे- एकदाच काय ते काम करायचं पण ते अशा दर्जाचं हवं की अजून काही दशकांनी तो चित्रपट तेव्हाच्या पिढ्यांना तेवढ्याच ताकदीचा वाटायला हवा! 'कट्यार काळजात घुसली' सारख्या कलाकृतीचा चित्रपट होण्याचा मला सगळ्यात मोठा हाच फायदा वाटतो. ही कलाकृती बनवल्याबद्दल सुबोध भावे, झी मराठी आणि टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार!
सुबोध भावे, तुम्ही बालगंधर्व, लोकमान्य टिळक मध्ये अभिनयाने आणि कटयारच्या दिग्दर्शनाने स्वतःकडून खूप अपेक्षा वाढवून घेतल्या आहेत! सो पुढील प्रवासासाठी शुभेच्छा! 


तळटीपा:
*राहुल देशपांडेंनी साकारलेले (भावेंनीच दिग्दर्शित केलेले) खांसाहेबसुद्धा 'एज क्लोस एज इट गेट्स'-- पण तो प्रयोग पाहण्याचा योग अजून आलेला नाही!
**पुष्कर श्रोत्रींच्या काविराजाच्या केशभुषेवर मात्र कमीत कमीत वेळ आणि पैसा खर्च झालाय असं वाटलं एवढाच एक न-सन्माननीय अपवाद!

Tuesday, June 2, 2015

नाईटमेअर भाग ४ (अंतिम)

सूचना: कथेचा या आधीचा भाग लिहून बराच काळ उलटून गेलाय. मधल्या काळात लिहायला अनेक कारणांनी वेळ झाला नाही. उरलेली कथा आणखी दोन भागात लिहून पूर्ण करायची असा मुळात विचार होता. परंतु एकूणच झालेला उशीर पाहता मी एकच भाग लिहिलाय-- आणि अर्थात तो बराच मोठा झालाय! एखादी कथा ब्लॉगवरून अनेक भागांत लिहिताना कथेचा दर्जा आणि वाचकांचा इंटरेस्ट कायम ठेवणं  थोडं अवघड असतं याची मला कल्पना आहे. मी शेवटच्या भागात सर्व कथा एकसंध राहील हा प्रयत्न केलाय. तो यशस्वी झालाय की नाही हे वाचकांनी ठरवायचं आहे. आधीचे भाग वाचलेले लोक शेवटचा भाग वाचतीलच परंतु नवीन वाचकसुद्धा पूर्ण कथा वाचून प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा आहे. चुभूद्याघ्या!

भाग १, भाग २, भाग ३
                                                                           **
"श्रीकांत…मित्रा…रडू नकोस असा!" श्रीकांत खूप वेळ रडायचं थांबत नाहीये हे जाणवल्यावर अनुपम पुढे होत म्हणाला. त्याने पहिल्यांदाच श्रीकांतचा एकेरीत उल्लेख केला होता. श्रीकांतसुद्धा क्षणभर चपापला. 'आपल्याला ब्लू लेबल पाजून अनुपमने आपला एकेरी उल्लेख करण्याचा अधिकार प्राप्त केला आहे' अशी त्याने मनाची परस्पर समजूतसुद्धा घातली.
"ते तुम्हाला म्हणणं सोप्पं आहे हो…'ज्याचं जळतं त्यालाच कळतं' असं उगाच नाही म्हणत!"
"बरोबरे…पण मला पूर्ण गोष्ट ऐकायची आहे…गेल्या महिन्यातल्या अपघातापासून ते आज तुम्ही इथे कसे पोहोचलात पर्यंत!"
त्याचा प्रश्न ऐकून श्रीकांत मागे वळला. त्याने डोळे पुसले. दारूचा बऱ्यापैकी अंमल त्याला स्वतःच्या चालण्यात-बोलण्यात जाणवत होता. अनुपमने केलेली चौकशीसुद्धा बरी वाटत होती. 'नाहीतरी आपल्या दीड दमडीच्या आयुष्याची कथा आणि चिल्लर तत्वज्ञान एरव्ही कोण ऐकून घेतो??' त्याने पुढे सांगायला सुरुवात केली.
"अपघात झाला तेव्हा मोठा गदारोळ झाला…कंडक्टर माझा दोस्त…जमावाने मला शोधून मारण्याआधी त्याने मला तिथून पळ काढायचा सल्ला दिला. त्याची पण फाटली होती म्हणा…पण मला नंतर कळलं की मी पळून गेलोय सांगून त्याने स्वतःचा मार वाचवला आणि मला अजून खड्ड्यात पाडलं. मला कामावरून सक्तीची सुट्टी दिली गेली…पोलिसांनी माझ्या नावाचं वोरंट काढलं. पेपरवाल्यांनी माझ्या नावाने बोंबाबोंब सुरु केली. बसवाल्यांनी आधी माझं नाव लीक केलं नव्हतं. पण शेवटी प्रेशरमध्ये येऊन त्यांनी माझं आडनाव मिश्रा असल्याचं प्रेसला सांगितलं…मराठी माणसाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना मोकळं रानच मिळालं…कुठल्यातरी चौकात माझ्या नावाचा चिंध्यांचा पुतळापण जाळला म्हणे कुठल्यातरी कार्यकर्त्यांनी!"
"बापरे…मला मुंबईत राहून एवढे डीटेल्स माहित नव्हते"
"अजून संपलं नाही इथे…मला महिनाभराची कोठडी मिळाली…केस हिअरिंगला जायला वेळ लागणार होता…उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे खूप केसेस पेण्डिंग असतात म्हणे! म्हणून मी कोठडीत…आता तुम्हाला हे सगळं सांगताना एक गोष्ट जाणवली…कोठडीत असताना मी ३-४ दिवस नुसते झोपून काढले…खूप दिवसांनी दगदग नव्हती, कामाचा रगाडा नव्हता, खायला काय मिळेल याची चिंता नव्हती. दिवस-रात्र झोपत होतो…अनेक वर्षांनी शांत झोप लागत होती मला. पण शेवटी झोपेला पण लिमिट असते…आयुष्यभर निव्वळ अंगमेहनत केलेल्या शरीराला विश्रांतीचा कंटाळा आला…त्याला चलनवलन हवं होतं. मग मेंदूही जागा झाला…वास्तवात आलो. आपल्या हातून काय घडलंय याची खरी जाणीव मला तेव्हा झाली. तुम्हाला कुणाचा जीव घेण्याचा काही अनुभव आहे का हो कामत?" श्रीकांतने एकदम प्रश्न टाकला.
"अ…काय? असं का विचारतोयस?" अनुपमने चाचरत प्रतिप्रश्न केला.
"एवढ्यासाठी विचारलं की मी तुम्हाला जे काही सांगणारे ते तुम्हाला खरंच झेपेल, पटेल की नाही याची मला अजिबात खात्री नाहीये म्हणून…"
'आई-बाप मुलाचं वागणं बघून हाय खाऊन गेले…तर मुलाने त्यांचा जीव घेतला असं म्हणता येईल का? तसं असेल तर मग मला आहे अनुभव' अनुपम मनात म्हणाला.
"तू बोल…मी तुला समजून घ्यायचा पुरेपूर प्रयत्न करेन" अनुपमने अंधारातच श्रीकांतने फेकलेला कप उचलून त्यात थोडी ब्लू लेबल ओतली आणि त्याच्या हातात पुन्हा कप दिला. पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. आजूबाजूने रातकिड्यांचा अस्पष्ट आवाज अधूनमधून यायला लागला होता.
"मला असं जाणवलं की कळत-नकळत एखाद्याचा जीव घेणं ही खरंच जगातली सगळ्यात भयंकर गोष्ट आहे…पेपरात दहशतवादाच्या बातम्या वाचून, सिनेमात पाहिलेला रक्तपात बघून आपल्या जाणीवा अलीकडे इतक्या बधिर झालेल्या असतात की डोळ्यादेखत एखादा जीव गेलाय आणि तो आपण घेतलाय हे कळायलासुद्धा वेळ जातो…पण एकदा ते जाणवलं की आयुष्य अवघड होतं- डोळे मिटायचा प्रयत्न केला तरी तीच तीच दृश्य डोळ्यापुढे येत राहतात--एरव्ही आपल्या डोक्यात चांगल्या आठवणींची सुरेख दृश्य असतात पण आता आपला तोच मेंदू त्या भीषण घटनेची अधिकाधिक बिभत्स, भीतीदायक चित्रं निर्माण करून दाखवत राहतो--"
"म्हणजे तो आत्महत्येचा प्रयत्न त्या दृश्यांमुळे?"
"छे छे. तुम्ही कुणाचा जीव घेतलात की त्या कृत्याबद्दल तुम्हाला कितीही बरं-वाईट वाटत असेल तरी स्वतःच्या जीवाची किंमत जास्त जाणवायला लागते. आपला सर्व्हायवल इन्स्टीक्ट तेव्हा सर्वात जास्त तीव्र असतो"
"मी असा विचार कधीच केला नव्हता" अनुपम भांबावून म्हणाला.
"तुम्ही कधी कुणाचा जीवसुद्धा घेतला नव्हता!!" श्रीकांतने शांतपणे उत्तर दिलं. ब्लू लेबलच्या 'चालू' पेगने तो बराच शांत झाला होता.
"मग पुढे? तुमच्या सर्व्हायवल इन्स्टीक्टचा तीव्रपणा इतका कमी झाला की तुम्ही आयुष्यातून व्होलेंटरी रिटायरमेंट घेतलीत?" अनुपमने प्रश्न विचारणं थांबवलं नव्हतं.
"त्या मुलाचे वडील मला भेटायला आले. त्यांच्या वकिलाने त्यांना तसं करण्यास सक्त नकार दिला होता तरी ते आले. त्यांची गोष्ट माझ्यापेक्षा जास्त दारुण होती. त्यांचा मुलगा सहा महिन्यांपूर्वीच एका मोठ्या आजारातून बरा झाला होता. त्यांनी त्याच्या वाचण्याची आशा जवळपास सोडली होती. 'मुलगा नसला तर आयुष्य कसं काढायचं याचे प्लान्सपण आम्ही बनवले होते' असं त्यांनी मला सांगितलं. माझ्याहातून घडलेला अपघात उद्दामपणे झाला, निष्काळजीपणाने झाला की निव्वळ दुर्दैवाने झाला हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. 'आजारात तो गेला असता तर आम्ही उपचाराला कमी पडलो या विचाराने आमचं आयुष्य खंत करण्यात गेलं असतं, आता निदान ते ओझं घेऊन तरी आम्हांला जगावं लागणार नाही. तुम्ही आमच्या मुलाला उद्दामपणे किंवा निष्काळजीपणे मारलं नाहीत एवढंच तुमच्या तोंडून ऐकायचं आहे- आमच्या जीवाला शांतता मिळण्यासाठी. माझ्या समाधानासाठी तुम्ही खोटं बोललात तरी चालेल, तुमच्या केसचा निकाल काय लागतोय याच्याशी मला अजिबात देण-घेणं नाही' असं त्यांनी मला सांगितलं. त्यांच्या आवाजात, वर्तनात एक प्रकारचा थंडपणा होता. माझ्या अंगावर काटा आला. त्या क्षणाला मला माझ्या आयुष्याचा तुच्छपणा जाणवला. जीवाची किंमत जेव्हा सगळ्यात जास्त जाणवते तोपर्यंतच सर्व्हायवल इन्स्टीक्ट खरं, पण एकदा त्यातला फोलपणा, तुच्छ्पणा कुणी असा अनपेक्षितपणे उलगडून दाखवला की कोलमडायला होतं. आणि मग निराशेच्या परमोच्च क्षणांना माणूस तत्ववेत्ता होतो किंवा प्रवासी संन्यासी होतो किंवा आत्महत्या करतो. माझ्याकडे पहिले दोन पर्याय उपलब्ध नव्हते. सो मी तिसरा पर्याय निवडला"
अनुपमने हातातला पेग संपवला. तो बोलायचं टाळत होता. बाजूला ठेवलेली बाटली उचलून त्याने अंधारात डोळ्यापुढे धरली. आतमध्ये किती दारू उरलीय याचा अंदाज घेत थोडी पुन्हा कपात ओतली आणि पुन्हा प्यायला लागला.
"काय कामत? तुम्ही चक्क गप्प? संपले तुमचे प्रश्न?" अनुपम गप्प बसलेला पाहून श्रीकांतने हातातला कप पुढे करत त्याला विचारलं.
"खरं सांगू का?--तुम्हाला राग येईल कदाचित- पण मला आत्महत्या करण्यात खूप शौर्य असतं असं वाटायचं. पण तुमची गोष्ट ऐकल्यावर आत्महत्या करणं म्हणजे मला भेकडपणाचं लक्षण वाटायला लागलं आहे" अनुपमने शांतपणे उत्तर दिलं.
"सहाजिक आहे म्हणा ना- आयुष्याच्या क्षणभंगुरपणाचं कौतुक असणाऱ्या तुमच्यासारख्या माणसाला आत्महत्या म्हणजे भेकडपणाच वाटणार. पण आयुष्याचा, त्यातल्या माणसांचा, घटनांचा क्षणभंगुरपणा मान्य करण्याचं मोठेपण माझ्याकडे नाही. तसं असतं तर कदाचित मला माझ्याहातून कुणी मेलंय याचंही काही वाटलं नसतं. मी प्रेसेंटइतकाच पास्टमध्ये जगतो, एवढं खडतर आयुष्य काढल्याने असेल पण कुठलीशी लहान-मोठी गोष्ट मिळाली की ती मिळाल्याचा आनंद साजरा करायच्या आधी ती गोष्ट मिळायची माझी लायकी होती का याचा विचार करतो. मेहनतीने जपलेली, कमावलेली गोष्ट गमावली की सुतक असल्यासारखा निराश होतो. म्हणूनच आयुष्यापुढे जेव्हा माझ्या अस्तित्वाचं खुजेपण मला जाणवलं तेव्हा मला ते नष्ट करणं जास्त श्रेयस्कर वाटलं"
"मी मगाशी म्हटलं तसं- तुमची कथा शोकांतिका नसून विनोदी आहे" अनुपम काहीसं छदमी हसला. श्रीकांतच्या डोक्यात संतापाची तिडीक गेली पण तो गप्प बसून राहिला.
पाऊस बराच कमी झाला होता. पण अजूनही अधूनमधून ढग गडगडण्याचा आवाज येतच होता.
"किती वाजलेत?" श्रीकांतने विचारलं.
"पावणे तीन-- मला अजून एक प्रश्न पडलाय खरा-- एकीकडे तुम्हाला आयुष्यासमोर स्वतःच्या अस्तित्वाचं खुजेपण मान्य आहे पण तरी मगाशी 'आयुष्य खडतर असू नये' असं तुम्ही मगाशी म्हणालात- हा विरोधाभास का? तुम्ही आयुष्य जसं आहे तसं कबुल का नाही करू शकत?"
"कारण स्वतःच्या अस्तित्वाची आयुष्याच्या अथांगपणाशी तुलना करताना मी माझ्याशी नकळत जोडलेल्या इतर लोकांचं अस्तित्व नाकारून, झिडकारून टाकू शकत नाही म्हणून! म्हणजे बघा- माणूस लैंगिक संबंधांमधून जन्माला न येता स्वयंभू प्रकट झाला असता तर नातेसंबंध, भाव-भावना वगैरे प्रकार निर्माण झालेच नसते. तुम्ही म्हणता तसं सगळंच क्षणभंगुर असलं असतं. पण दुर्दैवाने तसं नाही. माणूस जन्माला येतो तेव्हा फिसिकली, मेंटली तो आईशी जोडलेला असतो. जेनेटिक्समुळे बापाशी, नातलगांशी जोडलेला असतो. मग प्रेम-वैर, आनंद-दुःख, आशा-निराशा, राग-लोभ अशा सगळ्या भावना ज्या थोड्या क्षणांसाठी उत्कट, पराकोटीच्या असतात तेव्हा तो आणखी माणसांशी जोडला जातो- मेंटली, फिसिकली! मग त्याच्या काडीमोल अस्तित्वाला किंमत येते- मग वाटतं- आपल्याला सुखी, समाधानी जगता यावं. पण ही इच्छा झाली, अट्टाहास नव्हे! म्हणून  तुम्ही म्हणताय तो विरोधाभास मला मान्य नाही"
"आणि मग हीच इच्छा, अट्टाहास संपून माणूस अचानक आत्महत्या करतो किंवा करायचं ठरवतो तेव्हा त्या माणसांचं काय?" अनुपमने पुढे प्रश्न टाकलाच!
"माझ्या बाबतीत विचाराल तर हा मुद्दा निकालात लागला होता- बाप माझ्या लहानपणीच गेला, आई दोन वर्षांपूर्वी कावीळ होऊन गेली. राहता राहिली साय--" त्याने वाक्य अर्धवट सोडलं.
"साला--मुल्लाकी दौड मस्जिदतक…उगाच मला आयुष्याचा अथांगपणा वगैरे सांगितलात. मी काही क्षण विचारात पडलोसुद्धा होतो. एक साधा बाष्कळ प्रेमभंग आणि त्याचं किती कौतुक करायचं? तुम्हाला आई-बापाच्या जाण्याचं जेवढं दुःख नाही तेवढं प्रेमभंगाचं झालंय असं मला लक्षात आलंय…हाहाहा" अनुपम मोठ्याने हसला. श्रीकांतला प्रचंड राग आला.
"कामत, तुम्ही मला दारू पाजलीत, माझं बोलणं ऐकून घेतलंत म्हणजे मी तुम्हाला माझी थट्टा करण्याचा हक्क दिला असं होत नाही. मी कुणाची मस्करी करत नाही आणि कुणी माझी केलेली मला सहन होत नाही! त्यात माझ्या आई-वडलांसारख्या खाजगी विषयात तर नाहीच नाही" श्रीकांत चिडून म्हणाला.
"तुम्हाला इतका राग येत असेल तर सॉरी. पण मला अजूनही वाटतं की हा तुमचा राग येणारा, थट्टा सहन न होणारा स्वभाव खरा- कारण मी जे बोलत होतो ती मस्करी नव्हती ते सत्य होतं. पण तुम्हाला त्यापासून पळण्याची सवय आहे. म्हणूनच तुम्ही केलेली आत्महत्यासुद्धा मला निव्वळ पळपुटेपणाचा हास्यापद प्रकार वाटतो" अनुपमने बेफिकीरपणे उत्तर दिलं. तो पूर्णपणे दारूच्या नशेत असल्याचं जाणवत होतं. श्रीकांतने रागाने मुठ आवळली. त्याच्या मनगटात कळ उठली. त्याने खालचा ओठ आधी त्वेषाने आणि कळ आल्यावर वेदनेने वरच्या दाताखाली दाबून धरला. तो जागचा उठत पुन्हा शेडच्या कडेला जाऊन उभा राहिला.
"बाय द वे, मगाशी तुम्ही म्हणालात की त्या बसखाली एक म्हातारापण गेला. त्याच्याबद्दल काही वाचायला मिळालं नाही पेपरात" अनुपमने पुन्हा श्रीकांतला बोलतं करायला प्रश्न विचारला.
"कुणास ठाऊक…अपघात झाला तेव्हा तो गाडीपुढे येउन जखमी झाल्याचं मला माहिती होतं. नंतर मी कोठडीत असेपर्यंत त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. त्याला व्हेन्टीलेटरवर टाकलाय असं मला वकिलाने सांगितलं होतं. मग मीच काही दिवस हॉस्पिटलला होतो-- पोलिसांच्या देखरेखीत! आणि मग दोन दिवसांपूर्वी पळालो. त्या म्हाताऱ्याचं काय झालं कुणास ठाऊक!"
"अस्सं- जर तो मेला असं आपण गृहीत धरलं तर तुला कुणाला मारण्याचं--" श्रीकांतने मागे चपापून पाहिलं-- "आय मीन तुमच्या हातून अपघात होऊन गेल्याचं जास्त दुःख आहे? एक लहान मुलगा की एक म्हातारा?"
"ओ कामत, तुम्ही काय मुलाखती घेण्याच्या व्यवसायात आहात का? म्हणजे मगाचपासून तुमचे अखंड प्रश्न सुरूच आहेत! आत्महत्या का? प्रेमभंग कसा? आपको कैसा लग राहा है? वगैरे वगैरे. त्यापेक्षा आता मी प्रश्न विचारतो- तुम्ही उत्तर द्या- तुम्ही कुठे निघाला होतात? काय व्यवसाय करता?"
"अरेच्या आधी प्रश्न मी विचारलाय- मला आधी उत्तर द्या मग मी देईन तुमच्या प्रश्नांची उत्तरं….तसंही मगाशी तुम्ही माझा आयडी बघून चौकशी करून झाली होती आणि माझी स्टोरी इतकी भारी नाहीचे मुळी"
"हो…पण आता माझी गोष्ट ऐकल्यावर माझा सावधपणा रास्त होता हे तुमच्या लक्षात आलं असेलच आणि तुमचा विचित्र प्रश्न. मला उत्तर माहित नाही! कदाचित मी आत्तापर्यंत त्याचा विचारच केला नव्हता म्हणून असेल"
"मग आता करा"
"अहो काय जबरदस्ती आहे का?"
"नाही तसं नाही पण तुम्ही इतक्या रात्री, या पावसात, अर्धी ब्लू लेबल पिउन रिकामटेकडे बसला आहात. विचार करायला यापेक्षा सोयीची वेळ असूच शकत नाही"
श्रीकांतला आता वैताग यायला लागला होत. दारू रक्तात भिनली होती. झोप, अशक्तपणा, भुकेने ग्लानी यायला लागली होती. पण अनुपम काही त्याला स्वस्थ झोपून देणार नव्हता.
"अ…खरंतर कुणाच्या जीवाची किंमत किंवा तुलना करू नये पण अगदीच तसा विचार करायचा झाला तर तो मुलगा गेल्याचं जास्त वाईट वाटलं मला. त्याचा बाप मला भेटला म्हणून असेल. त्याचं वय कमी होतं म्हणून असेल, किंवा तो म्हातारा जिवंत आहे आणि माझ्या हातून दोन जीव गेले नाहीयेत अशी अगदी अंधुकशी आशा मनात आहे म्हणून असेल"
"मी हा प्रश्न विचारला कारण एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या दोन मुलांमध्ये तिचा एकावर जास्त जीव असतो असं लोक म्हणतात पण आई तसं मानत नाही-- तसंच दोन लोकांना तुम्ही मारलं तर त्यातल्या एखाद्याला मारण्याचं तुम्हाला जास्त वाईट वाटतं की आई जन्म दिलेल्या जीवात भेदभाव करत नाही तसा मारणारादेखील करत नाही हे मला जाणून घ्यायचं होतं"
"तुम्ही उदाहरणं छान देता हां…शिक्षक व्हा नसाल तर" श्रीकांतने मिळालेली थट्टेची संधी साधून घेतली.
"ते जाऊ द्या हो--- म्हणजे बघा हं-- मला तुमच्या उत्तराच नवल नाही वाटलं- कुठल्या सामान्य माणसाला हा प्रश्न विचारला असता तरी त्याने कदाचित हेच उत्तर दिलं असतं. अपघात होऊन गेलेला एक म्हातारा आणि एक शाळकरी मुलगा- एकाच्या मागे त्याचा मोठा परिवार असेल, त्याने उभारलेलं घर असेल, तो असा अचानक गेला तर त्याचा आत्मा अतृप्त राहील की एका शाळकरी मुलाचा?? ज्याला अजून आयुष्यात काय करायचं आहे हेसुद्धा नीट उमगलं नसेल? पण आपण मात्र म्हातारा सगळं भोगून गेला अशी कॉमेंट करून मोकळे होतो-- आणि ज्याला भोग-उपभोग याची अक्कलसुद्धा नव्हती त्या कोवळ्या जीवाच्या जाण्याबद्दल हळहळ व्यक्त करतो. हासुद्धा तुम्ही रीप्रेसेंट करत असलेल्या, आयुष्याचा क्षणभंगुरपणा मान्य न करणाऱ्या लोकांच्या विचारसरणीमधला मोठा विरोधाभासच झाला की"
"मी रीप्रेसेंट करत असलेले लोक? म्हणजे तुम्ही काय चंद्रावर असता वाटतं? की कुठल्या अजून ग्रहावर?"
"मी असतो इथेच…स्वतःला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत! पण नाही जमत- तुम्हाला मगाशी बोललो तसं- मला एकूणच हास्यापद वाटते ही विचारसरणी"
"तुम्ही पुन्हा थट्टा करण्याच्या मनःस्थितीत गेलात वाटतं??"
"छे छे…मी तुमची काय थट्टा करणार? ज्याला तुम्ही अथांग, अनंत समजता--त्या आयुष्यानेच तुमची इतकी मोठी मस्करी केलीय की मला अजून काही करायची गरजच नाहीये मुळी…साला, तुम्ही तर या जॉनी वॉकरपेक्षापण कमनशिबी…निदान त्याने घडवलं ते पुढच्या पिढ्यांनी चाखलं, मिरवलं पण तुम्ही आयुष्यापुढे स्वतःला कमी लेखण्यात एवढे मश्गुल होतात की आत्महत्येचा एक हास्यास्पद प्रयत्न सोडून तुमच्याकडे सांगण्यासारखं, मिरवण्यासारखं काहीच नाही" अनुपमच्या स्वरात पुन्हा आधीचा बेफिकिरी बेदरकारपणा आला होता.
"कामत, तुम्ही फार बोलताय…आपण नाही बोललो तर बरं होईल कदाचित…आणि हो-- मी फक्त स्वतःचा जीव घेण्याचा हास्यास्पद असफल प्रयत्न केलेला नाही--तर अपघाताने का होइना पण दोन इतर लोकांचे जीव घेतले आहेत हे विसरू नका--" श्रीकांतने वरच्या आवाजात उत्तर दिलं.
"बाप रे! ही मी धमकी समजायची की काय?" अनुपमने भुवया उंचावत हसत विचारलं.
"धमकी समजायची असेल तर खुशाल समजा…मी निव्वळ सूचना देतोय"
"ओ श्रीकांत राव…कशाच्या जीवावर धमक्या देताय? तुमच्या पोटात अर्धी बाटली दारू सोडून काही नाहीये…तुमच्या शरीरात रक्त कमी आहे-- गेले दोनेक दिवस पोलिसांपासून पळून तुमच्या अंगात हात उगारण्याचा जोर नाहीये--आणि जरी असता तरी तुम्ही काय काहीही करू शकला नसतात याची खात्री आहे मला…बसा शांत--नेमकी ही ब्लू लेबलपण आत्ताच संपायची होती?" अनुपम पूर्ण नशेत होता.
श्रीकांतला भयंकर राग आला होता.
"कामत, तुमचा हा माज स्वतःजवळ ठेवा. मला विनाकारण चिथावण्याचा प्रयत्न करू नका~"
"काही चिथावत नाहीये हो मी तुम्हाला-- साला मला वाटलं होतं की तुमच्याशी बोलताना मला काही उत्तरं सापडतील--लोक जीव का देतात? त्यांना मरताना मागे उरलेल्या लोकांचं काहीच वाटत नसेल का? पण नाही-- सगळेच साले एकजात भेकड पळपुटे लोक तुम्ही---"
"तुम्हाला कशाला पाहिजे होती ही उत्तरं?? तुम्हालापण जीव द्यायचा होता का?" श्रीकांतने विचारलं.
"कारण माझ्या बापाने जीव का दिला हे समजून घ्यायचा मी प्रयत्न करतोय--" अनुपमने निर्विकारपणे उत्तर दिलं.
"काय?" श्रीकांत अनपेक्षित उत्तराने चपापला.
"यस…माझ्या बापाने गाडीखाली उडी मारून जीव दिला-- लहान असताना कधीतरी माणसं गेली की त्यांचा आकाशात 'स्टार' होतो असं मला बाबाने सांगितलं होतं. त्या एका घटनेमुळे असेल कदाचित पण 'मृत्यू' या प्रकाराचं मला विलक्षण आकर्षण वाटलं होतं-- आपल्याला पण स्टार होता आलं पाहिजे वगैरे! नंतर कधीतरी मी 'मेल्यानंतर माणसाचं काय होत असेल?' यावर एक सहज निबंध लिहिला तेव्हा त्याच बाबाने 'किती भयंकर लिहितोस' म्हणून काळजी व्यक्त केली होती. त्याच माझ्या बाबाने शेवटी गाडीखाली उडी मारून जीव दिला."
आता गप्प होण्याची पाळी पुन्हा श्रीकांतची होती. त्याला अचानक काहीतरी सुचलं--
"म्हणजे माझ्या बसखाली आलेला म्हातारा म्हणजे तुमचे वडील---"
"छे छे…असले टुकार योगायोग असायला आपलं आयुष्य काही हिंदी सिनेमासारखं नाहीये…बाबाला जाऊन झाली चारेक वर्षं…" अनुपमने त्याचं वाक्य अर्धवट तोडलं आणि क्षणभर श्रीकांतच्या पोटात उठलेला मोठा गोळा नाहीसा झाला.
"योगायोग म्हणायचा तर तो एवढाच की गावी त्याचा एक विधी करायलाच निघालो होतो आणि वाटेत तुम्ही भेटलात" अनुपम खिन्न हसत म्हणाला. 'हा पुन्हा नॉर्मलला आला बहुतेक' श्रीकांतने मनात विचार केला.
"तुमचे वडील…त्यांनी का केलं असं?"
"शॉर्ट व्हर्जन-- मी जुगारात त्यांचा धंदा बुडवला- त्यांनी हाय खाउन जीव दिला"
श्रीकांत शांत बसून राहिला. बराच वेळ कुणीच काही बोलत नव्हतं.
"तुम्हाला काहीच प्रश्न पडले नाहीयेत?" शेवटी अनुपमनेच त्याला विचारलं.
"नाही…एकीकडे अपघाताने माझ्या हातून जीव एक जीव गेला म्हणून मी जीव द्यायचा प्रयत्न केला आणि दुसरीकडे तुम्ही- तुम्ही अप्रत्यक्षपणे वडिलांच्या मृत्यूला जबाबदार आणि तुम्हाला आत्महत्या पळपुटेपणा वाटतो…एका अत्यंत विचित्र लॉजिकने विचार केला तर आपण एकाच नाण्याच्या भिन्न बाजू आहोत" श्रीकांतने खिन्न आवाजात उत्तर दिलं.
"गेल्या कित्येक तासात तुम्ही बोललेली ही पहिली गोष्ट आहे जी मला पटलीय" अनुपम खजील होत म्हणाला.
"अरे वा--- म्हणजे मला आता मेडलच मिळालं पाहिजे" श्रीकांत मान डोलवत बोलला.
"पावसाने शेवटी विश्रांती घ्यायची ठरवली आहे बहुतेक--" अनुपमने शेडच्या कडेला येउन पावसाचा अंदाज घेतला.
"हं…कामत, बाकी तुमचं इतर तत्वज्ञान मला माहित असूनही विचारतोय-- वडिलांच्या जाण्याचा तुम्हाला कधीच त्रास झाला नाही?? "
"झाला ना…त्याने अशी हार का मानली हा विचार करून त्रास झाला मला- अजूनही होतो. हां म्हणजे तुमच्यासारखी दृश्य-बिश्य नाही यायची माझ्या डोळ्यापुढे-- बाबा दिसायचा मला- अजूनही दिसतो- घरात, त्याच्या खोलीत त्याचं अस्तित्व जाणवत राहतं- त्याच्या पिंडाला कावळा शिवला नव्हताच. त्याचा आत्मा माझ्याच आसपास भटकत असतो असं वाटतं मला. पण माझ्या स्वभावामुळे मी त्याचं 'असं' असणं मान्य करून टाकलंय केव्हाच--"
"पण मग त्याच्या आत्म्याला शांतता मिळावी म्हणून तुम्हाला काही करावसं वाटलं नाही?"
"तुम्हाला काय वाटतं मी काय केलं पाहिजे त्यासाठी? त्याचा धंदा मी पुन्हा जवळपास उभा केलाय-- पैसे लावून जुगार खेळणं बंद केलंय-- मी दारू, सिगारेट पिऊ नये ही त्याची इच्छा होती पण ती पूर्ण करण्याइतका मी लहान राहिलेलो नाही-- त्याचे श्राद्ध-वार मी नेमाने करतो--तरी याचा आत्मा अडकलेलाच--मेल्यानंतर पण माणसाला मोह सुटत नसेल तर अवघड आहे"
"तुमचा इतका बेफिकीर स्वभाव त्याला कारण आहे असं मला वाटतं"
"ते कसं काय?"
"कामत, इतर प्राण्यांना असतात तशा सगळ्या शारीरिक, मानसिक, लैंगिक गरजा माणसाला आहेत.…पण इतर सगळ्या प्राण्यांपेक्षा त्याच्या भावनिक गरजा जास्त आहेत. तो समुहात राहतो, स्वतःचं विश्व वसवतो. एक अज्ञात दैवी शक्ती जग चालवते यावर विश्वास ठेवतो, अशा वेळी तुमच्यासारखा माणूस या कुठल्याही गोष्टी मान्य करत नाही म्हणजे 'आपला मुलगा सोशिओपाथ तर नाही ना?' या शंकेने तुमच्या बापाचा आत्मा तळमळत असणार"
"ओह…सो एक क्षणात आयुष्य संपवण्याचा आत्मघातकी निर्णय घेतलेली माणसं नंतर भूत बनून अतृप्तपणे हिंडण्यात धन्यता मानतात? ती मुक्त का होऊ नयेत?"
"विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा-- मला उत्तर सुचलं तर नक्की सांगेन…तुर्तास तुम्हाला एवढंच सांगू शकतो--जमलंच तर मनापासून वडिलांची माफी मागा, ते गेले याचं तुम्हाला खरंच वाईट वाटलंय हे त्यांना जाणवू देत-"
"असं केल्याने तो जाईल??"
"कदाचित जातीलसुद्धा. तुम्हीच म्हणता ना की जगातल्या सगळ्याच भावना फार थोड्या क्षणांसाठी उत्कट असतात. असं समजा की निराशेचं टोक गाठल्यावर काही लोक जीव देतात-तीच माणसं कदाचित  त्यांना टोकाचं समाधान मिळाल्यावर मुक्तसुद्धा होतील--तुमच्यासारखी" श्रीकांत समजावण्याच्या स्वरात बोलला. 
"खरंय तुम्ही म्हणताय ते- कदाचित म्हणून तर त्या मुलाच्या वडिलांना तुमच्या तोंडून कबुली हवी होती-- तुम्ही जाणूनबुजून त्यांच्या मुलाला मारलं नाहीये याची--पण त्यांना टोकाचं समाधान मिळवून देताना तुम्ही निराशेत बुडून जीव द्यायचा प्रयत्न केलात"
दोघेही एकमेकांकडे बघून खिन्न हसले.


"सो आता काय करणारात, कुठे जाणारात?" अनुपमने थांबलेला पाऊस बघून श्रीकांतला विचारलं.
"अ माहित नाही…तुम्हाला भेटल्यावर आता मी फार विचार करणं सोडून द्यायचं ठरवलं आहे"
"तुमचा पुन्हा पोलिसांकडे जायचा विचार तर नाही ना? किंवा जीव देण्याचा?"
"आत्महत्येचा विचार मुळीच नाहीये. पण किती दिवस पळत राहणार? कायम मागच्या रस्त्यावर डोळा ठेवून? पोलिसांकडे परत जायचा विचार करतोय मी"
"हं" अनुपमने मान डोलावली.
"तुमचं काय?"
"गावी जातो- विधी आटपतो. तुम्ही म्हणता तसा बाबा असेलच घुटमळत, तर त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन" आपलं बोलणं अनुपमने मान्य केलंय हे जाणवून श्रीकांतचा अभिमान सुखावला.
सकाळी श्रीकांतला जाग आली तेव्हा आजूबाजूला उजाडलं होतं. आकाश निरभ्र होतं. दूरवर तांबडं फुटत होतं. त्याला हळूहळू रात्री काय घडलं ते आठवायला लागलं. अनुपम आठवला तसं त्याने एकदम आजूबाजूला पाहिलं. अनुपमचा कुठेही पत्ता नव्हता. आपल्याला स्वप्न पडलं होतं की खरंच काल रात्रीच्या सगळ्या घटना खऱ्या होत्या हे समजून घेण्याचा तो प्रयत्न करत होता. रात्रीच्या अंधारात अजिबात न दिसलेला परिसर आता स्वच्छ दिसत होता. पावसाने धुवून निघालेलं आजूबाजूचं जंगल हिरवंगार झालं होतं. स्वतःच्या श्वासाला असलेला दारूचा वास त्याला जाणवला. पण रात्री त्याने अनुपम कामत नावाच्या माणसाबरोबर बसून दारू पिऊन गप्पा मारल्या होत्या याची बाकी कुठलीही खुण आजूबाजूला नव्हती. अनुपम हा खरंच जिवंत माणूस होता का आपल्याला कुठलातरी प्रेतात्मा, मुंज्या भेटून गेला याचा विचार तो पुढची काही मिनिटं करत राहिला. आजूबाजूला इतर कुठल्याही मनुष्य वावराच्या खुणा जाणवत नाहीयेत हे लक्षात आल्यावर मोठ्या कष्टाने तो जागचा उठला आणि रात्री झालेल्या गप्पा आठवत हात-पाय ओढत वस्तीच्या दिशेने चालायला लागला.


'बोल अनु काय म्हणतोस?'
'काय बोलू बाबा? मला मनापासून वाईट वाटलंय, तू बरोबर नसल्याचं दुःख झालंय असं मी तुला सांगितलं तर तू जाशील म्हणे इथून??'
'बोलून बघ अनु, कदाचित मी तुझ्या बोलण्यासाठी थांबलो असेन, तुझ्यासाठी थांबलो असेन…'
'ठीके बाबा, तसं असेल तर मी करतो कबुल!अगदी मनापासून-- तू गेलास मला खूप खूप वाईट वाटलं-- खूप रागही आला-- जमेल ते  सगळे प्रयत्न करून तू असं का केलंस ते समजून घ्यायचा मी प्रयत्न केला. पण मी खरंच नाही समजून घेऊ शकलो तुला! कदाचित इथे येऊन हा असा कबुलीजवाब दिल्यावर तूच सांगशील मला'
'सांगतो की…नक्की सांगतो!! तू हे विचारायची, माझ्याशी बोलायचीच मी वाट बघत होतो' 

समाप्त
                                                                          ***