Pages

Friday, September 28, 2012

जस्ट लाईक दॅट ११

नोंद: कथा म्हटली की ती ३-४, गेला बाजार १० भागात संपावी अशी अपेक्षा असते साधारण. इतकीच नोंद करू इच्छितो की जस्ट लाईक दॅट 'चार दिवस सासूचे'सारखी (मारुतीच्या शेपटासारखी लिहिणार होतो पण दुर्दैवाने 'चार दिवस..' जास्त योग्य वाटलं) पाणी ओतून मी लांबवत नाहीये. लोक वाचतायत याची मला कल्पना आहे आणि म्हणून त्याचा दर्जा (?) आणि फ्लो शेवटपर्यंत कायम राहील असा प्रयत्न करून योग्य ठिकाणी मी ती थांबवेन. आत्तापर्यंत कथा फॉलो करणाऱ्या सगळ्यांचे आभार! गोष्ट आवडत असेल तर प्रतिक्रिया जरूर द्या..धन्यवाद्स :)  

आत्तापर्यंत:


"तुला अजूनही हे खरं वाटतं की रमा आणि आदित्य इंडियापासून एकमेकांना अजिबात ओळखत नव्हते?" राजने गॅस* भरून रिसीट कलेक्ट करत विचारलं.
"ते असं म्हणतात..म्हणजे मान्य केलं पाहिजे..आणि त्यात तो पुण्याचा...ती मुंबईची...सो असेल..." जीत
"आज दिवसभर बघितलंस त्यांना?? त्या जपानी वेट्रेसनेसुद्धा कपल असल्यासारखी त्यांना ऑर्डर एकत्र विचारली..त्यांची दोन महिन्यांचीच ओळख आहे हे मला खरंच नाही वाटत..म्हणजे हे असलं आपल्या बाबतीत का नाही होत?" राजने असूयेने प्रश्न विचारला.
"हां...हा प्रश्न मला पण पडतो कधीकधी...असो..ते बघ आले दोघे...या मेघा आणि दर्शु किती वेळ लावणार काय माहित?" जीत गाडीचं दार उघडत म्हणाला.
"ही तुमच्या दोघांची कॉफी...राज गाडी चालवतो आहे...त्यामुळे तो जागा राहायला हवा...आणि तू त्याचा नेव्हीगेटर..सो तुला पण कॉफी..." आदित्य त्यांच्या हातात कॉफीचे कप देत म्हणाला. 
"अजून किती वेळ लागेल पोहोचायला?" रमाने विचारलं. 
"अजून दोन-अडीच तास...तुम्ही झोपून घ्या शांत...पोहोचलो की कळेलच" 
"हं..पण भारी झाली राव ट्रीप...म्हणजे गणपती दर्शन ओके होतं...त्यात काही फार गम्मत नाही आली...गणपतीच्या मखराशी गेलं ना की असा फुलं, पानं, अत्तर, अष्टगंध, कापूर असा सगळ्याचा जो एक वास येतो ना तेव्हा कळतं की गणपती बसवला आहे...इथे काय...जेमतेम दोन चार फुलं वाहिलेला, हळद-कुंकू लावलेला, डॉलरच्या नोटांमध्ये बुडलेला गणपती...पण नवीन शहर बघायला मिळालं...सकाळी आयतं इंडियन जेवण आणि रात्रीचं थाई फूड..मजा आली.."  
"आदित्य...हाच प्रॉब्लेम असतो...म्हणजे गणपती म्हटलं की तो आपल्याला आपण भारतात बघतो तसा हवा...का बरं? तर आपलीच कल्पना...जर का लहानपणापासून इथे पाहिलास तसाच गणपती पाहिला असतास तर भारतात गणपतीवरच्या ढीगभर फुलांना 'शॅबी' म्हणाला असतास!ही तुलना करणंच चूक आहे" राज रमाकडे बघत म्हणाला. तिचं अजिबात लक्ष नव्हतं. 
"चुकतोयस राज..मी तसं मुळीच म्हणणार नाही...मान्य आहे की जुन्याला सोनं म्हणून कवटाळून बसुच नये...पण म्हणून जे बुद्धीला, संस्कारांना पटत नाही त्याला ते नवीन आहे, पुरोगामी आहे म्हणून कौतुकसुद्धा करू नये...त्याच काये की आपण विशिष्ट पद्धतीमध्ये, माणसांमध्ये वाढतो...काळाच्या ओघात नवीन पद्धती समजतात, नवीन माणसं भेटतात...मग आपण कळत-नकळत जुन्या-नव्याची तुलना करायला लागतो...जस्ट लाईक दॅट! माणसाचा मुलभूत गुणधर्म आहे तो...ते त्याच्या चौकसपणाचं लक्षण आहे..." 
"वा..सॉलिड वाक्य आहेत बरं का!! कुठे ऐकतोस कुठे तू हे असलं?" 
"ते महत्वाचं नाहीये..." 
"आदित्य, ही तुलना वस्तूंच्या बाबतीत ठीके पण माणसांच्या बाबतीत करू नये असं मला वाटतं.." जीतने कॉफीची सिप घेत म्हटलं. 
"खरंय तू म्हणतोयस ते...अजून तरी तुलना करायची वेळ आलेली नाही...आली की बघून घेऊ" आदित्य हसत म्हणाला. तेवढ्यात मेघा आणि दर्शना आल्या. 
"तुमचं आटपलं आहे ना सगळं...?? आता घरी पोहोचेपर्यंत गाडी कुठेही थांबवणार नाहीये मी.." राज गाडीत बसत म्हणाला.  
"मेघा, तुम्हाला चिप्स, च्युविंग गम, पाणी, कॉफी असं काहीही घ्यायचं असेल तरीसुद्धा इथेच घ्या...जरा डिसेंट गॅस स्टेशन वाटतंय.."  
"घेतलंय सगळं..निघूया आता..." 
"गणपती बाप्पा..." राज मोठ्या आवाजात म्हणाला. 
"मोरया.." सगळे एकसुरात म्हणाले आणि गाडी परतीच्या वाटेला लागली.


"तू रॉजर्सने दिलेली असाईनमेंट कम्प्लीट केलीस का??" आदित्यने सकाळी विचारलं.
"हो..लास्ट वीक पूर्ण झालेली..ट्रीपला जाण्यापूर्वी मी काहीही काम पेंडिंग ठेवलं नव्हतं..तुझी नाही झाली का?"
"नाही गं..मी ट्रीप झाल्यावर पूर्ण करायचा प्लान केलेला...पण काल आपण खूप लेट आलो..पण ठीके..मी तुझी असाईनमेंट रिफर करू शकतो..." आदित्य हसत म्हणाला.
"आणि मी तुला ती देईन असं तुला का वाटलं?" रमाने शांतपणे विचारलं.
"कारण तू माझी मैत्रीण आहेस...मैत्रीमध्ये हेल्प करणं आलं नाही का?"
"मला नाही वाटत?"
"काय नाही वाटत? मैत्री असणं? हेल्प करणं?"
"तुला असाईनमेंट रिफर करायला देणं मला हेल्प नाही वाटत"
"म्हणजे?"
"आदि..तुला इतकं नाही कळत का? आपल्याला कोर्सची ग्रेड या रिपोर्टवर डिपेंड आहे..मी बऱ्यापैकी वेळ घालवून रिपोर्ट लिहिला..तुला मी डायरेक्ट कॉपी करायला तो का द्यावा?" रमा वैतागली.
"शांत हो...इतकं काही झालेलं नाही...पाहिली गोष्ट मी तुझ्याकडे असाईनमेंट रिफर करायला मागितली. कॉपी करायला नाही...तुला इतकाच फरक पडत असेल तर ठीके..मी मेघाला विचारतो..तिच्याकडे लास्ट यीअरच्या नोट्स असतील..त्यात सापडेल मे बी..."
"पण तू स्वतः का लिहित नाहीयेस?" रमा अजूनही चिडलेली होती.
"रमा, तुला मदत करायची नाहीये ना...मग मी मेघाला विचारल्यावर तुला काय प्रॉब्लेम आहे?" आदित्यसुद्धा वैतागला.
"मला तुझ्या डिपेंडन्स चा राग येतो..."
"डिपेंडन्स?रमा काहीही बोलतेयस...हे बघ, माझी मुळीच इच्छा नाही की मला मिळालेले मार्क्स दुसऱ्याच्या मेहनतीने मिळालेले असावेत...ते माझे असतील याची काळजी मी घेईन..मला फक्त एक सुरुवात म्हणून कुणीतरी मदत करायला हवीय..तेसुद्धा मी मूर्खपणा करून वेळेवर काम सुरु केलं नाही म्हणून...आणि माझा तो मूर्खपणा मी मान्य करतोय.."
"आदि..तू कधीकधी स्वतःच्या नेगेटिव्ह गोष्टी कौतुकाने सांगतोस तेव्हा तुला काय म्हणावं तेच मला कळत नाही..." रमा निर्विकारपणे म्हणाली.
"रमा, हा विषय पुरे...तुला उशीर होतोय...दुपारी सबमिशन आहे...तोपर्यंत मी लिहितो काहीतरी...आणि मी मेघाला न विचारता मला जमेल तेवढंच लिहीन...ओके...??" तिच्या उत्तराची वाट न बघता तो त्याच्या खोलीत निघून गेला. ती काही वेळ तिथेच बसून राहिली.

संध्याकाळी आदित्य राज आणि जीतकडे गेला. गप्पा मारताना रॉजर्सच्या असाईनमेंटवरून झालेला वाद आदिने जीतला सांगितला. 
"सो तुझं आणि रमाचं भांडण झालंय.." जितने उसासा टाकत म्हटलं. इतका वेळ त्याच्या खोलीत झोपलेला राज बाहेर आला.
"भांडण...क्या बात है...फायनली...वाजलं आहे तर..." तो टाळ्या वाजवत म्हणाला.
"तुला मस्करी सुचतेय?"
"मस्करी नाहीरे...उलट सिरीअसली..तुम्ही आता नवरा-बायको व्हायला परफेक्ट आहात...म्हणजे तुमचं भांडण झालंय आणि काल अख्ख्या ट्रीपमध्ये आम्हाला जाणवलं पण नाही...उलट तू चिकन न खाता तिच्याबरोबर काहीतरी वेज भाजी शेअर केलीस...गाडीत काही न बोलता पण बाजू-बाजूला बसून राहिलात...कमाल आहे राव..."
"ओ पंडित...पहिली गोष्ट आमचं काही भांडण झालं नाहीये...थोडा वाद झालाय...दुसरी गोष्ट..तो आज सकाळी झालाय..तुम्ही अर्धवट झोपेतून उठुन या..मग काहीतरी अर्धवट ऐका आणि काहीतरी बोला...म्हणून म्हणतो..वेळेवर झोपावं!"
"वा..साहेब..काल दिवसभर गाडी कुणी चालवली?? हा हरामखोरपण झोपून गेलेला....मी शेवटचे २० मैल झोपेत पोहोचवलं आहे तुम्हाला...त्यात आज त्या चिंकी प्रोफेसरचा क्लास सकाळ सकाळ..."
"सॉरी साहेब..चूक झाली.."
"ठीके रे..ते जाऊ दे...तुझं का भांडण झालंय?" राजने उत्सुकतेने विचारलं. आदिने त्याला सगळं थोडक्यात सांगितलं.
"...मला राग आलेला की एका असाईनमेंटला मदत करायला इतके आढेवेढे...बरं एवढं सगळं होऊन त्या सबमिशनला डेडलाईन एक आठवडा एक्स्टेंड केली त्या रॉजर्सने..." 
"तो लास्ट पार्ट आवडला मला....चहा घेणारेस?" राज हसत जागचा उठत म्हणाला.
"आत्ता चहा? नको...तू घे..तुझा दिवस सुरु झालाय" 
"सौ बात की एक बात आदित्य...लाईफ पार्टनर, रूम पार्टनर कधीही आपल्या प्रोफेशनमधला निवडू नये...म्हणजे हे असाईनमेंट निमित्त झालं रे...पण इन जनरल...असं गृहीत धर की तुझी कामाच्या ठिकाणी तुझ्या रूम पार्टनरशी किंवा गल्फ्रेंडशी तुलना होतेय..आपल्या पुरुषी अहंकाराला ते नाही सहन होत..घोळ असा असतो की आपली इमोशनल बांधिलकी प्रोफेशनल बांधिलकीपेक्षा जास्त महत्वाची आहे हेसुद्धा कळत असतं...पण प्रोफेशनल फ्रंटवर इभ्रतीचा प्रश्न असतो...त्यामुळे तोसुद्धा टाळता येत नाही..."
"जीत..तू हे असलं काहीतरी बोलत असतोस...हे अनुभव आहेत की माझे असतात तसे इनफॉर्मड ओपिनियन्स?"  
"या बाबतीत तरी अनुभव...." राज किचनमधून डोकावत म्हणाला. आदित्यने प्रश्नार्थक चेहऱ्याने जीतकडे पाहिलं.
"प्रांजली मोहिते...माझ्याबरोबर होती..एकाच वेळी जॉईन झालो..एकत्र काम केलं दोन वर्ष..मग एका प्रमोशनसाठी दोघेही एलिजिबल होतो..ते तिला मिळालं..ऑन-साईट जॉब म्हणून ती युकेला दोन वर्षासाठी गेली..मी ती आणि प्रमोशन दोन्ही गेल्याच्या निराशेत जॉब सोडला..वर्षभराने इकडे आलो. म्हणजे आमचं काही अफेअर वगैरे नव्हतं...एकत्र काम करत होतो, एकमेकांशी पटतं होतं, एकमेकांची कंपनी आवडत होती एवढंच...पण आदित्य, ते प्रमोशन मला मिळालं असतं तरी मीसुद्धा तिचा विचार न करता गेलो असतो...तिचं कदाचित लग्न झालं असतं एव्हाना..आता वाटतं की बरं झालं तिला जायला मिळालं...नाहीतर मी इथे कधीच आलो नसतो...पण त्या क्षणापुरता का होईना..माझा पुरुषी अहंकार आड आला हे खरं!" आदित्यने ऐकून सुस्कारा सोडला. तो हसला.
"ही गोष्ट इतकी कॉमेडी होती की तू हसतो आहेस?" 
"कॉमेडी नाही रे...भारतात एक समज आहे..अमेरिकेला दर वर्षी लाखांच्या संख्येने येणारे लोक फक्त पैसा कमवायला येतात...पैसा हे कारण महत्वाच नसतं अशातला भाग नाही पण तरी जर का नीट आजूबाजूला पाहिलं की जाणवतं की पैसा केवळ निमित्त होतं...डिप डाऊन काहीतरी वेगळीच कारणं सापडतील.." तेवढ्यात त्याचा फोन वाजला.
"नवरा वेळेवर घरी आला नाही की बायको त्रास द्यायला लागते..." राज किचनमधून ओरडला.
"ए गप रे..." त्याने फोन उचलला. "बोल"
"घरी येतोयस ना?"
"आलो थोड्या वेळात..काही अर्जंट काम आहे का?"
"नाही जनरल..संध्याकाळी जेवायला काय करायचं विचार करत होते आणि मी चहा पण घेतला नाहीये संध्याकाळी...आत्ता करणार होते...तू घेणारेस?"
"चहा? अ..ठीके...जास्त नको..एकदम थोडा...आलो पाच मिनिटात" त्याने फोन ठेवला.
"आम्ही चहा म्हणून गोमुत्र प्राशन करत नाही..." राजने टोमणा मारलाच. आदित्यने नकारार्थी मान डोलवत जीतकडे पाहिलं. जितने प्रश्नार्थक भुवया उंचावल्या.
"इमोशनल बांधिलकी प्रोफेशनल बांधिलकीपेक्षा जास्त महत्वाची असते असं कुणीतरी म्हणून ठेवलंय" तो हसत म्हणाला.
"जाता जाता हे ऐकून जा...तुझ्या या सगळ्या इनफॉर्मड ओपिनियन्सना आम्ही परचुरीझम्स असं नाव ठेवलंय...फक्त परचुरीझम्स कुठे पब्लिश नाही करता येणार कारण कॉपीराईटचे लई घोळ होतील"
"ही कॉम्प्लिमेंट समजतो मी...बाय" आदित्य तिथून बाहेर पडला.

तो घरी आला. दोघांनी समोरासमोर बसून चहा प्यायला. पहिलं कुणी बोलायचं हा प्रश्न होता. कारण आदित्यच्या दृष्टीने त्याचं आणि रमाच्या दृष्टीने तिचं काही चुकलंच नव्हतं. बोलायला सुरुवात करणाऱ्याची चूक त्याला उमगलेली असते म्हणून तो बोलायला येतो हा अशा भांडणांच्या वेळी सर्वसाधारण समज असतो. मग आदित्यला आठवलं की मगाशी रमाने त्याला फोन केलाय. तिने ऑलरेडी बोलायला सुरुवात केलीय. म्हणजे आता जर का तो बोलला तर चालणारे!
"जेवायला करायचंय ना?" 
"हं..काय करायचं तेच विचारायला फोन केलेला मी..."
"कालच आपण लई भारी जेवलोय..आज काहीतरी सिम्पलच करू..मला काम पण आहे रात्री बरंच...हेवी जेवलो तर झोप येईल.."
"ओके" जेवण होईपर्यंत दोघे नॉर्मल झाले होते. दुसऱ्या दिवशीचे प्लान्स एकमेकांशी डिस्कस करून दोघे झोपायला गेले तेव्हा सकाळी त्यांचं भांडण झालं होतं हा इतिहास झाला होता.

"तू विचारलं नाहीस मला..मी आजतरी रॉजर्सची असाईनमेंट नीट पूर्ण केलीय का?" आदित्यने क्लासला जाताना विचारलं.
"मला विचारणं महत्वाचं नाही वाटलं..मी असं अझ्युम केलं की आठवडाभराने तरी तू ती पूर्ण केली असशील..." रमाने उत्तर दिलं.
"वेल, मी ती लास्ट वीक पूर्ण करून सबमिट पण केलेली...रॉजर्सने मला ऑलरेडी 'ए' ग्रेडपण दिलीय..."
"मी याच्यावर काय प्रतिक्रिया देणं अपेक्षित आहे?" रमाने चेहऱ्यावरचं आश्चर्य लपवायचा प्रयत्न करत विचारलं. 
"कन्फ्युस आणि अनप्रिपेअर्ड असणं हे माझं काम आहे नाही का?"
"खरंय...पण तू बदलतो आहेस...फॉर गुड..मला तुझी मैत्रीण आणि रूम पार्टनर म्हणून या गोष्टीचं कौतुक आहे"
"नुसतं कौतुक करू नको...काहीतरी चांगलं खायला करून घाल..."
"बरं...तसंही या विकेंडला आपण काहीतरी गोड करूच..."
"का काही विशेष आहे का??"
"हं.."
"काये? तुझा वाढदिवस वगैरे आहे का?"
"सांगेन नंतर..तुला कळेलच तसंही"
"तारीख काये या विकेंडला?
"६ ऑक्टोबरला शनिवार आहे"
आदित्य ऐकून एकदम गप्प झाला. ६ ऑक्टोबर! अमृताचा वाढदिवस..तिला फोन करायचा का? ती फोन उचलेल का? काय बोलायचं तिच्याशी? त्याने बाजूला चालणाऱ्या रमाकडे पाहिलं. हिचाही वाढदिवस ६ ऑक्टोबरला असतो की काय? त्याने आठवायचा प्रयत्न केला. तो तिच्याशी कधी या विषयावर बोललाच नव्हता. 'रमाचाही वाढदिवस शनिवारीच असेल तर? आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट प्लान केल्याप्रमाणे घडते खरी...पण बहुतेक प्लानचा चांगला पार्ट संपलाय...आणि वाईट पार्ट सुरु झालाय' त्याने स्वतःशीच विचार करत खांदे झटकले आणि रमाच्या पाठोपाठ क्लासमध्ये शिरला.


क्रमशः 

*गॅस: अमरिकेत पेट्रोलला गॅस म्हणतात. 

Friday, September 21, 2012

तू खपवून घेतोस!

         लहानपणी मी झोपलो नाही की आजी 'चिंतामणीचा चित्तपंगती' असं काहीतरी गाणं म्हणून मला झोपवायची. गणपती बाप्पाशी झालेली ओळख तेव्हापासूनची! मला खात्री आहे की आपल्यातल्या प्रत्येकाची गणपतीशी ओळख अशीच कळायला लागायच्या आधीच झाली असेल..'मोरया मोरया मी बाळ तान्हे' आजपर्यंत किती वेळा मनात, परवच्यात, प्रार्थनेत म्हटलं असेल याचा काउंट नाही! यंदा मी फेसबुक गणेशोत्सव साजरा करतोय...प्रत्येकाने टाकलेले गणपतीचे फोटोस आनंदाने आणि असूयेने पाहतोय! आता सण साजरे करायला न मिळणं हे काही नवीन राहिलेलं नाही...पण यंदा लोक बहुतेक जास्त उत्साहात आहेत आणि गेले कित्येक दिवस फालतू राजकीय सटायर फोटोसनी भरलेलं, रटाळ झालेलं फेसबुक कलरफुल, ग्रेसफुल झालंय. गेल्या शंभर वर्षात तंत्रज्ञानाने केलेली प्रगती अचाट, अफाट आहे पण या सगळ्यात श्रद्धा, भक्ती या गोष्टी आजही टिकाव धरून आहेत. त्यांचं स्वरूप बदललेलं असलं तरी सुद्धा! मला एका अमेरिकनने एकदा विचारलं होतं..'भारत कसा देश आहे थोडक्यात सांगशील का?' मी म्हटलं की 'थोडक्यात सांगणं खूप कठीण होईल पण एवढं नक्की सांगू शकतो की वि लव अवर फेस्टिवल्स...वी लव सेलेब्रेशन्स' हो, दिवाळी, दसरा ते नागपंचमी, बैलपोळ्यापर्यंत भारतात सगळं दणक्यात साजरं होतं. गणेशोत्सव हा तर सार्वजनिक सेलिब्रेशनचा कळस..सार्वजनिक गणेशोत्सव सुरु होऊन शंभरेक वर्षं उलटून गेली,! स्पर्धा आल्या, करमणूक आली, सजावट आली...या सगळ्याचं स्वरूपसुद्धा कितीतरी बदललं (सॉरी लोकमान्य..मला माहितीय की तुम्हाला हे असलं काही चाललं नसतं)   पण या सगळ्यामुळे गणपती निव्वळ देव राहिला नाहीये तर तो आस्तिक-नास्तिक, राजा-रंक प्रत्येक आणि प्रत्येक भारतीयाच्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनलाय. म्हणूनच 'जग कितीही पुढारलं तरी गणपतीला पर्याय असूच शकणार नाही' हे विधान मला मुळीच अंडरस्टेटमेंट वाटत नाही!

        गणपती आपल्या नसानसांमध्ये इतका भिनलाय की दगडात, झाडाच्या खोडात, ढगात कुठेही आपल्याला जरा सोंडेचा आकार दिसला की आपल्याला गणपतीचा भास होतो..हत्तीचा नाही! गणपतीचं एकही चित्र कधीच काढलं नाही असा एकही जण माझ्या माहितीत नाही...लांब सोंड, 'U' आकाराचं गंध, सुळे, पोट, चार हात त्यातही एका हातात ऑलमोस्ट त्रिकोणी आकाराचा मोदक आणि त्याच आकाराचा मोठा मुकुट आणि पायाशी काढलेला चार पायांचा उंदीर! पाय चार म्हणून उंदीर समजायचा नाहीतर बाकी त्यात उंदीर वाटण्यासारखं काहीच नाही असं चित्र प्रत्येकाने काढलेलं असतं आणि ते भारीच असतं..मला 'सर्वोकृष्ट गणेश मूर्ती किंवा गणेश चित्र' स्पर्धा ही संकल्पनासुद्धा मंद वाटते. गणपती कसाही असो..तो भारीच असतो...त्याची कसली स्पर्धा घ्यायची आणि घेतलीच तर विनर ठरवायचा हक्क कुणाला? ऑन अ सेकंड थॉट, दसऱ्याला ती 'कॉम्प्लीकेटेड सरस्वती' काढण्याऐवजी असा सोप्पा गणपती काढला तर काय हरकते? शेवटी अभ्यासाची सुरुवात 'श्री गणेशाय नमः' म्हणून तर करायची असते. गणपतीची ही पण एक गम्मतच आहे राव...म्हणजे एकीकडे कुणी म्हणजे कुणीही माझ्यासारखा सोम्या-गोम्या सुद्धा गणपतीची चित्रं काढतो तर काही फार महान चित्रकार स्पेसिफिकली गणपतीची वेगवेगळ्या रूपातली, शैलीतली चित्रं काढतात. कन्क्लूजन- गणपती बाप्पाचा शोध अविरत सुरु आहे..!!

         आपलं आयुष्य आज गणपतीवर किती अवलंबून आहे याची थोडीशी उदाहरणं...गणपती आजघडीला कित्येक लोकांच्या पोटापाण्याचा एकमेव सोर्स आहे..ते भाग्य आपण इतर देवांना लाभू दिलेलं नाही...(बंगालमध्ये ते डिपार्टमेंट देवी दुर्गेने घेतलंय पण आय गेस तेवढा एकच अपवाद)...ओकेजनल सत्यनारायण आणि वास्तुशांती सोडल्या तर गणपती हा कित्येक भटा-बामणांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करतो. बाय फार, गणेशोत्सव सर्वाधिक रेवेन्यु जनरेटिंग फेस्टिवल आहे. होतकरू गायक, कलाकार, नकलाकार, लावणीवती सॉरी 'लावण्यवती' नृत्यांगना यांना हक्काचं व्यासपीठ गणपती उपलब्ध करून देतोय. देशातील सगळ्यात जास्त देवस्थानं बाप्पाची आहेत (पुरावा: महाराष्ट्र टाईम्स मला आठवतंय तेव्हापासून 'आजचा गणपती' टाकतायत..) समर्थ रामदासांपासून ते जावेद अख्तरपर्यंत सगळ्यांनी गणपतीवर 'गेय' (गाणं, आरती, कविता) लिहायची कामगिरी पार पाडलीय..तर अजय-अतुल ते शंकर-एहसान-लॉयपर्यंत सगळ्यांनी गणपतीवर गाणं करायची हौस पुरवून घेतलीय..महागुरुनी पिळगावकरांनी (क्या बाथ वाले महागुरू वेगळे) ऑलरेडी गणपतीच्या जीवावर दोन सिनेमे बनवले आहेत. सिद्धिविनायक ट्रस्टने मुंबईतला एक महत्वाचा रस्ता ऑलमोस्ट टेकओव्हर केलाय आणि या घडीला ते देशातल्या सगळ्यात श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे. अष्टविनायक यात्रा, अष्ट-गणेश यात्रा या सारख्या यात्रानी अनेक लोकांना धंदा सुरु करायचं एक नवं क्षेत्र खुलं करून दिलंय...सारी सारी त्या गजाननाची कृपा! पण सगळ्यात महत्वाचं- गणपतीने आपल्याला आधार दिलाय, आनंद दिलाय..वर्षभराच्या राम-रगाड्यात थोडीशी उसंत घेऊन त्याच्या नावावर सुट्टी घेण्याची, त्याला आणताना- विसर्जन करताना नाचण्याची, ढोल ताशे वाजवायची, आरडाओरडा करण्याची ते पार रडण्याची मुक्त सोय करून दिलीय...आणि हेच आम्हाला हवंय...आम्ही पुढारलेपणाचा कितीही आव आणला, गणपतीच्या नावावर होणाऱ्या श्रद्धेच्या बाजाराला कितीही नावं ठेवली तरी आम्ही मखरात बसवलेला, पानाफुलांनी मढवलेला, नटवलेला, सुखकर्ता, दुखहर्ता आमची भावनिक गरज आहे. 

            गणपतीला काही प्रार्थना करायची तर इतकंच म्हणेन की 'तू खपवून घेतोस! येस...वर्षानुवर्षं चालत आलेल्या प्रथा-परंपरा, धिंगाणे-तमाशे पाहिले की जाणवतं ते हेच की तू खपवून घेतोस! आम्ही 'अन्याय माझे कोट्यानुकोटी' म्हणतो आणि तुझं ते भलं  मोठ्ठ पोट आमची पापं भरून घ्यायला अजून समर्थ आहे...आणि हेच दुःख आहे बाप्पा..वी नीड अ पंच इन द फेस. तुला वाटत असेल की मी माझ्या देशाची, जगाची वाताहत चाललीय आणि तू शांत पाहतो आहेस म्हणून काहीतरी म्हणेन...पण नाही ते आमचं नशीब झालं..पण तुझा प्रश्न येतो तेव्हासुद्धा तू शांतच असतोस..आम्ही तुला विनाकारण दुध पाजलं आणि तू खपवून घेतलंस, दिवेआगरमधला तुझा सुरेख सोन्याचा मुखवटा कुठल्यातरी कर्मदळीद्री लोकांनी चोरला आणि चार पैशांसाठी वितळवला??आणि तू तेसुद्धा खपवून घेतलंस...देव, देश, धर्म या तीन गोष्टींची नेमकी ऑर्डर टू फोलो काये तेही मला तुला विचारायचं आहे..सांगशील? म्हणजे असं बघ की आम्ही मखर सजवतो, मग आरास करतो...कुणी शिवाजीने औरंगजेबाला मारल्याचा देखावा करतं तेव्हा जातीय दंगे उसळतात...आणि तू तेसुद्धा खपवून घेतोस! तुझ्या विसर्जनाला पोलीस सिक्युरिटी...म्हणजे दहा दिवस आम्ही तुला आम्हाला सुखी ठेव आणि आमचं रक्षण कर म्हणायचं आणि बाराव्या दिवशी तुला संरक्षणाला पोलीस...तू देव..तुला खरंतर कुणी डिफेंड करायची गरज नाही, तुला आम्ही आणतो तेसुद्धा मी वर लिहिलं तसं आमच्या मानसिक समाधानासाठी...मग हे सगळं तू कसं काय खपवून घेतोस? मी हिंदी सिनेमे बघत मोठा झालोय...आमच्या बऱ्याचशा सिनेमात एन्डला हीरोला मोरल साक्षात्कार वगैरे होतात...तसे तुझ्या बाबतीतले साक्षात्कार आम्हाला कधी होणारेत? तुझा शोध अविरत चाललाय खरा पण आम्ही रिसर्चमध्ये म्हणतो तसं- एखादा मेजर ब्रेकथ्रू तरी हवा ना? मिळेल का तो?'


ता.क.: 'राधेय' मध्ये पुस्तकाच्या सुरुवातीला एक सुरेख वाक्य आहे..'प्रत्येकाच्या मनामनात एक कर्ण असतो..हा माझ्या मनातला...' तसाच प्रत्येकाच्या मनामनात दरघडीला, दरवर्षी उलगडत जाणारा, घुटमळत राहणारा, मार्ग दाखवणारा एक गणपतीसुद्धा असतो..हा या क्षणाला माझ्या मनात असणारा गणपती बाप्पा!

चैतन्य  

ता. फो. गेल्या वर्षी आम्ही अमेरिकेत गणेश चतुर्थी साजरी केली होती..पार उकडीचे मोदक..मोठमोठ्याने आरत्या वगैरे करून. तेव्हाचा एक फोटो. छायाचित्र सौजन्य: हर्षवर्धन देशमुख

Monday, September 17, 2012

जस्ट लाईक दॅट १०


आत्तापर्यंत: 

रमा अस्वस्थपणे जवळ पडलेल्या एका एन्वलपवर पेनाने रेघोट्या ओढत होती. 
"दहा-पंधरा मिनिटात सांगून होईल ना?" श्रीने विचारलं.
"डिपेंडस..तुला कुठे जायचंय का?"
"हो एका इंटरव्युला जायचंय..तुला सांगायला विसरलो..आणि आज तू जागी कशी अजून?"
"असंच..झोप येत नव्हती...एक रिपोर्टपण लिहिते आहे"
"बरं..हां, एक आठवलं..मी तुझ्या घरी चक्कर मारेन या एक-दोन विकस मध्ये..आईला सांगून ठेव.."
"काही विशेष?"
"अ..हो..माझ्या आईने तुझी पत्रिका मागितली होती.."
"पत्रिका? कशाला? तू घरी लग्नाचा विषय काढलास का?"
"रमा, देवाशप्पथ मी काहीही विषय काढलेला नाही...हे पत्रिकेचं गेले महिनाभर सुरु झालंय..मी ते टाळायचा प्रयत्न करतोय.."
"माझी पत्रिका नाहीये असं सांग.."
"असं कसं सांगू? आई पत्रिका बनवून घ्यायला लावेल तुझी..किंवा माझं नाव कुठल्यातरी संस्थेत नोंदवेल ती.. तिने तुला फोन करून ऑकवर्ड सिचुएशनमध्ये टाकण्यापेक्षा हे बरं नाहीये का?"
"तुला योग्य वाटेल ते कर श्री"
"रमा..प्लीज..मी कुठलीही गोष्ट लादत नाहीये तुझ्यावर..."
"हं..."
"तू काहीतरी महत्वाचं बोलणार होतीस"
"अ हो..."
"मग बोल ना..मला जायचं पण आहे"
"श्री, तुझा इंटरव्यू झाला की फोन कर मला...मग बोलू"
"त्याला अजून दोन तास लागतील..तू झोपशील तोवर नक्की..."
"नाही मी जागी आहे...मला रिपोर्ट पूर्ण करायचाय..सो मी जागी असेन" 
"ओके..करतो..."

वयाच्या पंचविशीच्या आसपास जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात एक 'पॅच' येतो.मुलींच्या आयुष्यात पंचीविशीच्या थोडं अलीकडे तर मुलांच्या बाबतीत पलीकडे. होतं असं की अचानक जवळच्या मित्र-मैत्रिणींची, समवयस्क भावंडांची लग्नं ठरायला सुरुवात होते. जस्ट लाईक दॅट!  लहानपणी ज्या ताई-दादांबरोबर खेळून मोठे होतो त्यांना मुलं झालेली असतात. नवीन मित्र किंवा मैत्रिणी बनण्यापेक्षा काका-मामा किंवा मावशी-आत्या हाका मारणारी कंपनी आयुष्यात येते. अजिबात तयारी नसताना आपण त्यात ओढले जातो. डोक्यात अजिबात काही नसताना लग्न, संसार, मुलं वगैरेचा विचार करायला लागतो. 'सिरीअसली?' रमाने स्वतःला प्रश्न विचारला. आजच मनीषाच्या लगीनघाईची गोष्ट ऐकून ती भांबावली होती. आपल्या घरून अजून लग्नाला कुणी प्रेशराईज करत नाहीये म्हणून तिला हायसं वाटलं होतं. आदित्यबरोबर राहण्याचा निर्णय बाबांनी मान्य केला होता पण त्या निर्णयाने इतर मानसिक, सामाजिक परिणाम काय होतील याची कल्पना तिला तेव्हा आली नव्हती. जेव्हा या गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या तेव्हा तिने सगळं कबूल करायचा मार्ग निवडला होता. पण श्रीने पत्रिकेचा विषय काढला आणि ती चक्रावली. 'आधी पत्रिका जुळवणं होणार..मग लग्नाचा विषय..लग्न तर करायलाच लागेल..पण श्रीबरोबर लग्न?..लग्न,सहजीवन या संकल्पना कायेत नक्की? एकत्र राहण्यापुरता प्रश्न असला तर मी आदिबरोबर राहतेय..आम्ही तर तडजोड म्हणून राहतोय एकत्र..पण ही तडजोड स्वतःच्याही नकळत चांगली वाटायला लागलीय..आणि हे चूक आहे!' हे तिच्याबाबतीत खूप लहानपणापासून घडत आलं होतं. तिचं हुशारीचं, वेगळेपणाचं तिला दडपण यायचं. श्रीचा पुन्हा फोन आला की त्याला सगळं खरं खरं सांगायचं आणि मोकळं व्हायचं असं तिने ठरवलं. तिला कोणताही रिपोर्ट लिहायचा नव्हता. ती ऑनलाईन टाईमपास करत बसली. 
"तू जागी आहेस?" तिला आदिने मेसेज केला.
"हो आणि तू बाजूच्या खोलीतून माझ्याशी चॅट करतो आहेस?"
"हो.मला तू ऑनलाईन दिसलीस..नक्की तूच आहेस की तुझं अकाउंट हॅक झालंय ते चेक केलं.."
"बरं.."
"झोपली नाहीस?"
"घरून फोन येणारे..वाट बघतेय..."
"ओके.."
पाचेक मिनिटं गेली.
"तू का झोपला नाहीयेस?"
"मी कधी एवढ्या लौकर झोपतो?"
"हं.."
पुन्हा काही वेळ गेला.
"बाहेर येतेयस?"
"कुठे?" 
"न्यूयॉर्कला ट्रीपला जाऊन येऊ..कसला बावळट प्रश्न आहे!! बाहेरच्या खोलीत!"
"ओह आलेच"

"बोल..काही विशेष?" रमाने बाहेर येत विचारलं.
"तू चक्क नीट जागी आहेस असं जाणवलं म्हणून बोलावलं..चला निघूया का?"
"कुठे?"
"कॉफी पिऊन येऊ.."
"आत्ता?"
"हो..ते राज आणि जीत नेहमी जातात...मेघा आणि दर्शु सकाळी सकाळी फिरायला जातात..आपण रूम पार्टनर्स म्हणून काहीच केलं नाहीये कधी!"
"ओह...ते सगळं ठीके..पण मी अशी येणार नाहीये.." रमाने कानावरून पुढे आलेली बट मागे करत म्हटलं.
"अशी म्हणजे कशी? अगं खरंच न्यूयॉर्कला कॉफी प्यायला नाही जाते आपण..इथे जवळच जायचंय"
"ठीके..पण मी निदान तोंडावर पाणी मारून येते.."
"ओके..मी थांबलोय"
रमा आवरून आली तेव्हा आदित्य कपडे बदलून तयार होता.
"हे काय? तू तर रेडी झालास?"
"हो, आपण हे फार वेळा करणार नाहीये..सो विचार केला की जरा मेमोरेबल होऊ दे...हा माझा फेवरेट टी आहे"
रमाने खांदे उडवले.

एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्यापासून दररोज, दर क्षणाला दोघेही काहीतरी नवीन अनुभवत होते. रात्री ते राहतात त्या कॉम्पलेक्सच्या पार्किंगमध्ये एवढ्या गाड्या असतात हे रमाला पहिल्यांदाच लक्षात आलं. रमा मुंबईत असतानासुद्धा फार कमी वेळा रात्री बाहेर पडायची. तिचं फ्रेंड सर्कल खूप छोटं होतं. दोन-तीन जवळच्या म्हणता येणाऱ्या मैत्रिणीसुद्धा तिच्या सोसायटीमध्ये राहायच्या. त्यांची शाळा-कॉलेजेस तिच्यापेक्षा वेगळी होती आणि त्यांची शैक्षणिक किंवा बौद्धिक तुलना रमाशी कधीच झाली नव्हती म्हणून कदाचित त्यांची मैत्री इतकी वर्षं टिकली. मग हे रात्री बाहेर फिरणं, नाईट आउट्स वगैरे करायला कधी संधीच मिळाली नाही. म्हणायला गेलं तर श्रीच तेवढा काय तो जवळचा मित्र. तो तिला भेटल्या दिवसापासून आजपर्यंत बरोबर होता आणि यापुढे असेल की नाही हे रात्री फोन झाल्यावर ठरणार होतं. 
"आपण नुसते चालणार आहोत की काही बोलणार आहोत?" आदिने विचारलं.
"माहित नाही..."
"म्हणजे?"
"म्हणजे रात्री या वेळी कॉफी प्यायला मी पहिल्यांदाच बाहेर पडलीय..सो तूच सांग काय करायचं असतं?"
"साधारणपणे मित्र-मैत्रिणी असे रात्री बाहेर पडले की शिळोप्याच्या गप्पा मारतात..आपण ते ट्राय करू शकतो" आदित्य हसत म्हणाला. दोघे अचानक गप्प झाले. आदित्यने गमतीत का होईना पण एकमेकांचा मित्र-मैत्रीण म्हणून उल्लेख केला होता. दोन महिन्यात 'तडजोड करून राहणारे रूम पार्टनर्स' सोडून नात्याला दिलेलं हे नाव ओळखीचं असलं तरी नवीन वाटत होतं. 
ऑकम'स रेझर नावाचा एक अर्थशास्त्र, मानसशास्त्रात वापरला जाणारा प्रसिद्ध नियम आहे. या नियमाप्रमाणे 'एखाद्या प्रश्नाचं, समस्येचं गुंतागुंतीच्या उत्तरांपेक्षा सगळ्यात सोप्पं उत्तर योग्य ठरतं.' रमाला आजच एका लेक्चरला झालेली चर्चा आठवली. 
'आम्ही एकमेकांचे फ्रेंड्स आहोत..ग्रेट! एकत्र राहतो..एकत्र चहा पितो..एकत्र जेवतो..एकत्र कॉलेजला जातो...आणि एकत्र एका घरात राहतो...' ऐकायला सोप्पं होतं. लोकांना सांगायला बेष्ट होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंतर्मनाचे वाद थांबवायला उत्तर होतं. 
"आदि, कॉफीचे पैसे मी देते..."
"का बरं? आपलं नेहमीचं टी टी एम एम बरं आहे की.."
"तू मागे एकदा म्हणाला होतास आठवतंय..आपण एक दिवस बसुया, एकमेकांशी एकमेकांबद्दल बोलूया. आपण तडजोड म्हणून एकत्र राहतोय..पण आपली धड ओळखसुद्धा नाही...आपण एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण पण नाही वगैरे वगैरे"
"हं.."
"ती चर्चा कधी झालीच नाही. पण त्या दिवसापासून आज रात्री शिळोप्याच्या गप्पा मारत कॉफी प्यायला बाहेर पडेपर्यंत आपण एकत्र आहोत..एकमेकांबद्दल आपल्याला बऱ्यापैकी कळलंय..निदान एकत्र राहून एकमेकांना बेअर करण्यापर्यंत..सो आपल्या मैत्रीच्या पहिल्या नाईट आउटिंगला तुला आहे तसं काहीतरी मेमोरेबल माझ्यासाठी पण" 
"तुला अशा मेमरीज हव्या असतील तर माझं पुढच्या महिन्याचं रेंटपण भरलंस तरी चालेल..." तो हसत म्हणाला.
"एवढी हेवी मेमरी सहन नाही होणार मला. त्यात अजून या महिन्याचा पे-चेक बँकेत टाकायचा राहिलाय..पुढच्या आठवड्यात माईक रेंट घ्यायला हजर होईलच"
"हं..पण रमा, मला खरंच वाटत नाहीये की आपल्याकडे आठवायला आठवणी आहेत...आय मीन...दोन महिने उलटून गेलेसुद्धा?"
"हो ना.."
शांत, निर्मनुष्य रस्ता होता. एरवी तुरळकच दिसणारी रहदारी आत्ता अजिबात नव्हती. अशा वेळी शांततासुद्धा ऐकू येते. दोघे येताना विशेष काही न बोलताच घरी आले. आदित्यला आज नक्की शांत झोप लागणार होती. रमाची मनःस्थिती थोडी बेटर झाली असली तरी तिला अजून श्रीचा फोन यायचा होता. त्यावर बरंच काही अवलंबून होतं.

"...म्हणजे मी या सगळ्यातून काय अर्थ काढायचा रमा? मी आज तुला पत्रिकेचं विचारलं तर तू मला हे सगळं सांगते आहेस?" श्री चिडला होता.
"श्री शांत हो..पत्रिकेच्या विषयाचा संबंध नाहीये इथे..मी तुला हे सांगणारच होते.."
"रमा, मी कसा विश्वास ठेवू? जी मुलगी शक्य असेल तर २० वर्षांचं प्लानिंग करायला रेडी असते ती अचानक असा निर्णय घेते? कुठल्यातरी अनोळखी मुलाबरोबर राहायचा?"
"मला माहितीय श्री की मी अशी नाहीये...पण मला त्या निर्णयाचा पश्चाताप होत नाहीये..तसं असतं तर मी तुला आजसुद्धा काही सांगितलं नसतं..."
"म्हणजे तुला म्हणायचंय की तुझं छान चाललंय?"
"छान म्हणजे? हे बघ मी इतर कुठल्याही मुलीबरोबर राहिले असते तरी तिची आणि माझी रूम वेगळी असली असती...आम्ही एकत्र जेवलो असतो, कॉलेजला गेलो असतो...यापेक्षा वेगळं तर आत्ता काही होत नाहीये.."
"त्याच्या गल्फ्रेंड किंवा होणाऱ्या बायकोला माहितीय का हे सगळं?"
"त्याला असं कुणी आहे का तेसुद्धा मला माहित नाही.."
"म्हणजे?"
"आमचे हेतू स्वच्छ आहेत श्री..आम्ही एकमेकांच्या रिलेशनशिप आणि त्यातले क्रायसिस डिस्कस करत नाही.."
"असा कोण मुलगा आहे हा? मला बोलायचंय त्याच्याशी.."
"काय म्हणून?"
"जनरल..तुझा होणारा-"
"श्री--"
"ओके ओके..तुझा मित्र म्हणून!! निदान ही अपेक्षा तरी मी ठेवू शकतो ना?"
"बघू..हे बघ श्री..तो एक चांगला मुलगा आहे..मी माझ्या स्वभावाविरुद्ध जाऊन एक निर्णय घेतला..जे मी माझ्या आईलासुद्धा अजून सांगितलं नाहीये ते मला तुला सांगणं महत्वाचं वाटलं..सो मी सांगितलं..याउपर तुझी जी काही प्रतिक्रिया असेल ती तुला मला शांत विचार करून दे..मी झोपते आता..उद्या क्लास आहे मला!"
"ओके.."
"आणि इंटरव्युचं काय झालं कळव मला.."
"कळवेन ना.दोनेक महिन्यांनी..." तो हेटाळणीच्या सुरात म्हणाला.
"बाय श्री..गुड डे.." म्हणत रमाने फोन ठेवला. तिला खूप मोकळं वाटत होतं. श्रीला तिने सगळं सांगून एक मोठ्ठ ओझं डोक्यावरून बाजूला केलं होतं. तिचा रूम-पार्टनर, 'मित्र' आदित्य बाजूच्या खोलीत शांत झोपला होता. तिने स्वतःशीच हसत दिवा बंद केला आणि पांघरूण अंगावर ओढून घेतलं.

ऑकम इतकंच म्हणून गेला की 'एखाद्या प्रश्नाचं, समस्येचं गुंतागुंतीच्या उत्तरांपेक्षा सगळ्यात सोप्पं उत्तर योग्य ठरतं'..पण प्रश्न बदलला तर? दुसरं सोप्पं उत्तर शोधायला लागतं. आपण एकमेकांचे मित्र आहोत हे उत्तर आत्तापुरतं ठीक होतं पण लौकरच मैत्री अपुरी पडणार होती. अपेक्षा बदलणार होत्या. रमा आणि आदित्यची गोष्ट इतकी सोप्पी संपणार नव्हती. 

क्रमशः

भाग ११ इथे वाचा 

Friday, September 7, 2012

जस्ट लाईक दॅट ९


आत्तापर्यंत:

दुसऱ्या दिवशी सकाळी रमाला नेहमीच्या वेळी जाग आली. ती खोलीबाहेर आली तर आदल्या रात्रीची पसरलेली अंथरुणं, उश्या तशाच होत्या. आदित्य उठलाच नव्हता आणि उठायची शक्यता नव्हती. असं होतं साधारण..आदल्या रात्री काही विशेष घडलेलं असलं की दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्याउठल्या त्याची आठवण नसते. दिवस सुरु होतो तसं तसं सगळं आठवायला लागतं. रमाचं तेच झालं. तिला काल घडलेलं सगळं 'नीट' आठवलं आणि ती जागी झाली. तिने सगळं आवरलं. नंतर विशेष काही काम नव्हतं त्यामुळे ती न आवरता लॅपटॉप उघडून मेल्स चेक करत बसली.
'चहा करावा की आदित्य उठायची वाट बघत थांबावं?' तिचा निर्णय होत नव्हता. त्याला जाऊन हाक मारावी असंही वाटलं तिला एक दोनदा! 
तिच्या मनात गोंधळ सुरु झाला-
'तू फार अल्लडपणे वागते आहेस..त्याच्यासाठी चहा करायला वाट कशाला बघितली पाहिजे? हा काय बावळटपणा चाललाय? जरा सेन्सिबल वाग...'
'चहासाठी थांबलेय यात बावळटपणा कुठाय? आम्ही एका घरात राहतो..कित्येक वेळा एकत्र चहा पितो..सो आजपण मी थांबलेय..'
'तो त्याचा चहा करून घेऊ शकत नाही का?' 
हे असले भावनिक आवेग आणि अंतर्मनाचे वाद वगैरे आपलं काम नाही हे तिला जाणवलं आणि तिने उठुन निमूट चहा करायला घेतला. एक प्लान न केलेला निर्णय घेतल्यामुळे सगळं बिघडलं होतं. 
चहा होईपर्यंत वेळ मिळेल तेव्हा श्रीला फोन करायचा तिचा निर्णय पुन्हा एकदा पक्का झाला. श्रीशी ती काय बोलणार होती हे मात्र तिला कळत नव्हतं.
तिने चहाचा कप तोंडाला लावला तेव्हा चहा सपशेल 'भलताच' झाल्याचं तिला जाणवलं. ती स्वतःवर अजूनच वैतागली.
तेवढ्यात त्याच्या खोलीचं दार उघडून आदित्य बाहेर आला.
"किती वाजले?" त्याने आळस देत विचारलं.
"साडेनऊ...तुला कुठे जायचंय का?"
"नाही..तसं जायचं नाहीये..अभ्यास करणार होतो..."
"बरं.." ती हसत म्हणाली.
"तू चहा केलास?" तो तिने तिथे घडी करून ठेवलेलं अंथरूण उचलून अंगाभोवती लपेटून घेत जांभई देत म्हणाला.  
"हो..मी थांबले होते बराच वेळ तू उठशील म्हणून..शेवटी आत्ता केला.."
"ओह..म्हणजे थोडा थंड झाला असेल...मी गरम करून घेतो..." तो जागचा उठत म्हणाला. 
"सॉरी..मी तुझ्यासाठी नाही केलाय.." रमा हळू आवाजात म्हणाली.
"हं" म्हणून तो पुन्हा तिथेच बसला.
"मला वाटलं की तू आज अकरापर्यंत उठणार नाहीस..तू म्हणाला होतास मला मागे एकदा की मुव्ही बघून उशिरा झोपलास की लौकर उठत नाहीस म्हणून.."
"हं.."
त्याचे हुंकार ऐकून तिला अजूनच गिल्टी वाटत होतं. 
'एवढं कसं सुचलं नाही आपल्याला..चहासाठी थांबलो त्यापेक्षा चहा करून ठेवला असता तर..आदि काही चार तासाने उठणार नव्हता त्या चहाची चव जायला..'  
दोनेक मिनिटं गेली. तो उठला.
"मी जरा फ्रेश होऊन येतो...मग चहा करतो...तू घेशील ना थोडा परत?" 
ती काही न बोलता त्याच्याकडे पाहत राहिली. तो उठुन गेला. अंतर्मनाचा वाद पुन्हा सुरु व्हायची चिन्हं होती.

बेसिनवरच्या आरशात बघून दात घासताना आदित्य जागा झाला. त्यालासुद्धा काल रात्रीचं सगळं आठवलं आणि त्याच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरु झालं.
'आपण रमाशी जे वाटतं ते बोलायचं ठरवून झोपलो होतो...आत्ता तितकं काही वाटत नाहीये! ही रात्रीची वेळच अवघड असते..रमा सुखी आहे..तिला असं काही वाटत नाही...केवढी कंपोस्ड आणि ऑर्गनाईझड असते ती..नाहीतर मी..मला काहीही कळत नाही!! अमृता म्हणायची तेच खरं...मला कुठल्या सिचुएशनमध्ये कसं वागायचं ते अजिबात कळत नाही! मी माझ्या व्यूमधून सगळं बघत असतो..' 
'रमा चहासाठी पण थांबली नाही..पण तिने का थांबावं..किंवा तिने का चहा करावा? आपण तडजोड करून निव्वळ रूममेट्स म्हणून एकत्र राहतो आहोत..ध्यानात आहे ना? त्यामध्ये हे असे बेनिफिट्स येत नाहीत..'
'आदि, तू नेहमीसारखा फाफलू नकोस..तुला काय करायचं ते कळायला हवं..डिसिजन्स घेता यायला हवेत' असं स्वतःला म्हणत तो बाहेर आलारमा कपात चहा गाळत होती. 
'डिसिजन्स..चहा झाल्यावर' त्याने विचार क्षणात बदलला.

"रमा, तुझ्या इटालियन स्वैपाककौशल्याचं माहित नाही पण चहा मात्र एकच नंबर...करेक्ट साखर पडलीय" आदित्य चहाचा घोट घेत म्हणाला. 
"नेहमी होत नाही काही असा चांगला चहा..आत्ता झालाय हे खरं.." वाक्य जरी तिने आदित्यला म्हटलं असलं तरी ते खरंतर स्वतःलाच उद्देशून होतं. 
"मग..झोप नीट झाली ना?" आदित्यने विचारलं.
"अ..हो..तुझी नाही झाली का?"
"छे छे..सुखाने झोपलो मी..स्वप्नात वूडी आणि बझ* आलेले माझ्या"
"काहीही.."
"काहीही नाही...असं असतं..आय मीन माझ्या बाबतीत होतं असं"
"झोपताना कुठले मुव्हीस बघतोस नेहमी ते एकदा तपासलं पाहिजे.." रमा हसत म्हणाली.
"ते महत्वाचं नाहीये...मला प्रश्न आहे की कुणी टॉय स्टोरी बघताना झोपू कसं शकतं?"
"कोण झोपलं?" रमा त्याच्याकडे न बघता उठून किचनकडे वळली.
पाठमोऱ्या रमाकडे बघत आदित्य मंद हसला. त्याने विषय न वाढवता स्वतःशीच नकारार्थी मान डोलावली.

दुपारी रमा मेघा आणि दर्शुकडे गेली होती.
"रमा, एक सही न्युज आहे.."
"बोल ना"
"अगं..मनीचं लग्न ठरतंय..." -मेघा 
"भारी..कसं..कुठे?काय?"
"अगं..काल तिला रात्री घरून फोन आलेला आठवतंय??तो तेवढ्यासाठीच होता.."
"हो..पण कोण मुलगा? काय?"
"अगं ती मुंबईत ज्याच्याबरोबर राहायची ना तोच!! गेली दोन-अडीच वर्षं संपर्कात होते दोघे जण..गेल्या वर्षी तो ऑफिसच्या कामासाठी अमेरिकेत आलेला ३ महिने..तर हिला भेटायला बोलावलं..तिकीट पाठवलं वगैरे..मनीषा गेली होती ७-८ दिवस" -दर्शु
"छान..मग कधी लग्न??"
"ती या डिसेंबरमध्ये जाईल घरी..बहुतेक तेव्हा लग्न करूनच येईल.."
"इतक्या लगेच??"
"हो..घरचे मागे लागलेलेच असतात आपल्या..आता मुलगा पण रेडी तर थांबतील कशाला?त्यात तो परत अमेरिकेला यायचाय म्हणे पुढच्या वर्षी..कदाचित दोन-तीन वर्षांसाठी..मग मनिषाचं पी.एचडी होईस्तोवर असेल तो पण इथे...मग दोघे जातील परत"
"हं.."
"आणि त्यात हे एकत्र राहिलेले वगैरे मनीच्या आईला माहितीय...आता लग्न ठरलंय म्हणजे ती लग्न लावल्याखेरीज ऐकणारच नाही असं मनीषा म्हणतेय.."
रमाने याच्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
"तू काय विचार करते आहेस?" मेघाने विचारलं.
"अ..काही नाही.."
दर्शु आणि मेघाने एकमेकींकडे पाहिलं. अचानक दर्शनाच्या लक्षात आलं. तिने मेघाकडे भुवया उंचावून पाहिलं.
"रमा..." तिने रमाला हाक मारली.
"बोल ना..ऐकतेय.." रमा खिडकीबाहेर बघत होती. 
"इकडे बघ...हे मनीषाच्या लग्नाचं तुला जनरल सांगितलं..म्हणजे तू काही गैरसमज नाही करून घेतेस ना?" दर्शनाने विचारलं. रमाने तिच्याकडे पाहिलं.
"गैरसमज...??कशाबद्दल?"
"म्हणजे मनीषाचं लग्न ती ज्या मुलाबरोबर राहायची त्याच्याशी होतंय..सो तुझ्याबाबतीत-"
"एक मिनिट...मला तुम्ही दोघी बोलताय त्यामुळे कोणताही गैरसमज नाही होते..मी आईला आदित्यबरोबर राहते आहे ते बोलले नाहीये...ते आठवलं एवढंच"
"मग ठीके ना..असंही एक-दीड महिना होऊन गेलाय..अजून चारेक महिने राहिलेत..पुढच्या सेमला कुणी नवीन मुलगी आली, नितीन परत आला की झालं..मग खोटं बोलायला नको.."
चार महिन्यांनी सगळं 'नीट' होणार होतं. जे चालू आहे असं अजून महिनाभर जरी चालू राहिलं तर नंतर कधीच काही 'नीट' होणार नाही अशी क्षणभर रमाला भीती वाटली.
"हो तेही खरंच..." तिने कसंनुसं हसत उत्तर दिलं.
"आदित्यने घरी सांगितलं आहे काय गं?" मेघाने विचारलं.
"तो रमाकांत नावाच्या तमिळ मुलाबरोबर राहतो..ज्याला हिंदीपण येत नाही...त्याच्या कुकिंग टर्नला तो नारळाएवढा भात आणि पातेलंभर सांबार करतो..तो भातात हाताची सगळी बोटं बुडवून जेवतो म्हणून आदित्य त्याच्याबरोबर जेवायला बसत नाही...पण रमाकांत खूप हुशार आहे...त्याच्या नावावर एक पेटंट आहे..." रमा सांगायला लागली आणि तिघींची हसून पुरेवाट झाली.
"आदित्यला गोष्टी लिहायला सांगितलं पाहिजे..कसलं डिटेलिंग आहे...कुणाला त्या रमाकांताला बघायची पण इच्छा होणार नाही..."
"तेच तर व्हायला हवंय..आणि गोष्टी लिहायचं नको बोलू बाई..आधीच काहीबाही वाचून काहीतरी बोजड बोलत असतो...त्याने काही लिहायला नको.."
"आदित्यला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तो असा असेल असं वाटलं नव्हतं..." दर्शु 
"असा म्हणजे?" रमा
"हेच...साहित्य, वाचन वगैरे...तो गेमिंग, सिनेमे अशा कॅटेगरीतला वाटलेला...."
"ते सगळं आहेच की...काल तुम्ही गेल्यावर पण त्याने तिसरा पार्ट अख्खा पाहिला"
"तुला कसं गं माहित? आम्ही गेल्यावर तू उठली होतीस की काय?" मेघाने शंका काढली. 
काही वेळा अजिबात संबध नसणारा एखादा माणूस आपण लपवायचा प्रयत्न करत असलेली किंवा कुणालाही न सांगायचं ठरवलेली एखादी कृती किंवा बोललेलं एखादं वाक्य अचानक ओळखतो...जस्ट लाईक दॅट! त्या क्षणाला मनातून खजील व्हायला झालेलं असतं..पण कबूल कोण करणार? 'याला किंवा हिला कसं कळलं?' असा विचार करत आपण स्वतःला डिफेंड करायचा प्रयत्न करतो. 
"मी कसली उठतेय??तोच सकाळी खूप उशिरा उठला..विचारलं तेव्हा कळलं की तुम्ही सगळे लौकर गेलात...राज थांबला होता बराच वेळ..मग तो पण गेला म्हणे..तरी आदित्यने सिनेमा पूर्ण संपवला मग झोपला तो"
"छंदिष्टच आहे" मेघाने कमेंट केली.
"अगं..मुलींनो तिसरा पार्ट खरंच खूप भारी आहे" दर्शुने पुन्हा मुव्हीचं कौतुक सुरु केलं.
"हिच्या आणि आदित्यच्या आवडी-निवडी कसल्या जुळतात ना...ही म्हणाली पण होती ना गं..? तो आवडला हिला म्हणून.." मेघाने थट्टा केली. रमा तोंडदेखलं हसली.
"एका सिनेमाच्या आवडी-निवडीवरून जोड्या जुळायला लागल्या तर एखादा सिनेमा बघून हजारोनी लग्न झाली असती..." दर्शुने उत्तर दिलं.
"पण खरंच..हॉबीज, आवडी-निवडी सारख्या असाव्यात...नाहीतर असा विचार कर की एखाद्या सिनेमे खूप आवडणाऱ्या व्यक्तीला सिनेमात अजिबात रस नसणारा पार्टनर मिळाला तर? तू अंधारात डोळे फाडून सिनेमा बघते आहेस आणि तुझा पार्टनर बाजूला डाराडुर झोपलाय..कसं वाटेल..??" मेघाने विचारलं.
रमा त्या दोघींचं संभाषण काही न बोलता ऐकत होती.
"मेघा पाटकर..तुम्ही योग्य बोलताय..पण आवडी-निवडीपेक्षा अंडस्टॅंडिंग महत्वाचं असं मला वाटतं..म्हणजे मला सिनेमाची आवड आहे म्हणून माझ्या पार्टनरने मला आडकाठी केली नाही म्हणजे झालं..म्हणजे असं बघ..की आवडी-निवडी, करिअर्स, आयुष्याकडे बघायचा दृष्टीकोण सगळं सेम असणारी माणसं बरोबर असली तर..आधी त्यांना गम्मत वाटेल..आनंदही होईल...पण नंतर कंटाळा येईल एकमेकांच्या सारखं असण्याचं..या उलट पार्टनर्स विरुद्ध टोकाचे असावेत असं म्हणतात तेच याचं कारणाने! काय रमा, बरोबर ना?"
"ऐकतेय मी..मला काही फारसा अनुभव नाही या कशाचा.पण पटतंय मला तू म्हणते आहेस ते!"

रमा घरी परत आली तेव्हा आदित्य गेम खेळत बसला होता.
"तू बिझी आहेस का?"
"नाही..का गं?? काही काम आहे का?"
"नाही...तो तिसरा पार्ट बघायचा राहिला आहे ना..बघायचा??"
आदित्यने अविश्वासाने तिच्याकडे पाहिलं. 
"खरंच?"
"तुला खोटं का वाटतंय?" विचित्र नजरा आणि शांततेत काही क्षण गेले.
"रमा..आपण नंतर कधीतरी बघू तो तिसरा पार्ट...मला एक सांग हे तिरामिसु काय असतं??" आदित्यने विचारलं.
"तिरामिसु..इटालियन स्वीट आहे ते..हे कुठे अचानक?"
"मला बेस्ट तीरामिसुची रेसिपी मिळाली आहे..आणि तिरामिसु चांगलं झालंय की नाही हे कसं ठरवायचं हे पण मी वाचलंय...फक्त खायला मिळायची वाट बघतोय.." तो खट्याळ हसत म्हणाला.
"ओके..सामान आणून दे..करूयात..."
"आजच आणून देतो...नंतर कधी वेळ मिळणार? विकेंडला गणपती दर्शनाला जायचंय"
"होच की...विसरलेच होते मी..."
ती चेंज करायला तिच्या खोलीत गेली.

'आवडी-निवडीपेक्षा अंडस्टॅंडिंग महत्वाचं असं मला वाटतं..पार्टनर्स विरुद्ध टोकाचे असावेत असं म्हणतात' तिला दिवसभर दर्शनाची वाक्य आठवत होती. रमाला वैचारिक ताण असण्याची सवय नव्हती. मनीषाच्या लग्नाच्या बातमीने तो ताण विनाकारण वाढला होता. 'मी आदिबरोबर राहतेय ते बाबांना माहितीय..त्यांनी कुठलाही आक्षेप घेतलेला नाही...आईची प्रतिक्रिया काय असेल त्याची कल्पनासुद्धा नाही येते...श्री त्यांना जावई म्हणून चालेल असं बाबा मागे म्हणाले होते..श्रीला तेच हवंय...मी त्याला यातलं काहीच न सांगून काही फार मोठी चूक तर करत नाहीये ना..??'
तिने श्रीला फोन लावायचं ठरवलं आणि अजून वेळ न घालवता त्याचा नंबर लावला. बराच वेळ रिंग वाजल्यावर त्याने फोन उचलला.
"श्री, रमा बोलतेय...तुला वेळ आहे का?? थोडं बोलायचं आहे!"

क्रमशः 

*वूडी आणि बझ ही टॉय स्टोरी या सिनेमालिकेतली  पात्रं आहेत .


भाग १० इथे वाचा

Tuesday, September 4, 2012

लेहानच्या कथांचे शिणेमे

               आपल्याकडे 'हार्डकोर' इंग्लिश नोव्हेल्स वाचणारे लोक तसे कमी आहेत पण त्या मानाने हॉलीवूडचे शिणेमे 'भयंकर' आवडीने पाहणारे असंख्य आहेत..अस्मादिक अशाच लोकांपैकी एक! (हे सांगण्यात मला कोणताही अभिमान किंवा वैषम्यही वाटत नाही). प्रसिद्ध पुस्तकांवरून शिणेमा बनवणं हा प्रकार नवीन नाही. बऱ्याच वेळा 'पुस्तकच भारी आहे रे..मुव्ही ओके' अशा कमेंट्ससुद्धा आपण सर्रास ऐकतो. मराठमोळ्या 'शाळा'पासून 'दा विन्ची कोड' पर्यंत सगळीकडे हाच प्रकार. पुस्तक वाचताना आपल्या मनाचा पडदा असतो आणि वाचणारा त्याला वाटेल तसं कथानकाचं काल्पनिक चित्र मनात उभं करत असतो. लेखकांच्या दृष्टीकोनातून बोलायचं तर प्रदीप दळवींनी एका कादंबरीच्या प्रस्तावनेत लिहिलं होतं- 'नाटक, सिनेमा या माध्यमांना बरीच बंधनं असतात..सगळ्या कल्पना चित्रित करणं, सादर करणं शक्य नसतं..म्हणून कादंबरी हे माध्यम मला आवडतं..त्यात मनसोक्तपणे हवं ते लिहिता येतं'. निव्वळ याचं कारणाने आपली कल्पना पूर्ण ताकदीने पडद्यावर मांडता यायला तेवढं आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नाही हे लक्षात आल्यावर जेम्स कॅमेरोन 'अवतार' बनवायला काही वर्षं थांबला होता. मग पुस्तकांवरून चांगले सिनेमे बनतच नाहीत का? असं मुळीच नाहीये! नाहीतर 'लॉर्ड ऑफ द रिंग्स' मालिकेतले ३ आणि 'हॅरी पॉटर' मालिकेतले ८ सिनेमे बनले नसते, त्यांचा उदोउदो झाला नसता! डेनिस लेहान हा 'नवीन जगा'तला प्रसिद्ध 'बेस्टसेलर' लेखकु. त्याची बोस्टन शहराच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली जवळपास डझनभर पुस्तकं खूप प्रसिद्ध आहेत. दुर्दैवाने ती वाचायचा योग कधी आला नाही पण त्याच्या तीन पुस्तकांवरून बनलेले सिनेमे मात्र मी आवडीने पहिले आणि पुस्तकांवरून नक्कीच चांगले सिनेमे बनू शकतात हे जाणवलं. मिस्टिक रिव्हर, गॉन बेबी गॉन आणि शटर आयलंड हे ते तीन सिनेमे. तिन्ही वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी बनवलेले! कथावस्तू वेगळ्या! कलाकार वेगळे. मुळात हॉलीवूडचा 'शिणेमा' पाहत असताना त्याचा लेखकू कोणे याचा फार कुणी विचार करतो का हेसुद्धा मला माहित नाही. केलाच तर त्या लेखकुचं एकही पुस्तक न वाचता त्याच्या पुस्तकांवर आणि त्यांच्यावर बनलेल्या 'शिणेमां'वर असा ब्लॉग लिहावा की नाही तेसुद्धा माहित नाही! पण तरी मी लिहितोय. 


'गॉन बेबी गॉन' हे लेहानने पॅट्रिक किंझी आणि  ऍन्जलो जेनेरो या गुप्तहेर द्वयींवर लिहिलेलं चौथं पुस्तक (टोटल अर्धा डझन आहेत). अमेंडा नावाच्या चार वर्षाच्या मुलीचं अपहरण होतं. मुलीची मामी परिस्थितीचं गांभीर्य वाढवून पोलीस तपास करत असतानासुद्धा ही केस पॅट्रिक आणि  ऍन्जलोला देते आणि पोलिसांना या दोघांना सहकार्य करणं भाग पडतं. मुलीची आई 'सिंगल मॉम', ड्रग्स घेणारी, सिगरेट-दारू पिणारी थोडक्यात मुलीबद्दल फारशी आपुलकी नसणारी बाई आहे. मामा आणि मामीने आईच्या गैरहजेरीत अमेंडाची पोटच्या पोरीसारखी काळजी घेतलीय. दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी या केसमध्ये तपास करतायत. पॅट्रिक आणि ऍन्जीने केसवर काम करायला सुरुवात केल्यावर बोस्टनच्या ड्रग सर्कलमधले काही व्यवहार आणि त्यातली अमेंडाच्या आईची गुंतवणूक असे मुद्दे प्रकाशझोतात येतात. वरकरणी अमेंडाचा तपाससुद्धा लागतो परंतु तिला ताब्यात घेण्याच्या वेळी अनपेक्षित घटना घडतात आणि छोट्या अमेंडाला एका कड्यावरून संशयास्पद रीतीने फेकून देण्यात येतं. या घटनेला वरिष्ठ पोलीस अधिकारी साक्षीला असतात. कड्याखालच्या पाणवठ्यात अमेंडाचा मृतदेह मिळत नाही पण तिला मृत घोषित करतात. लहानग्या मुलीच्या झालेल्या अपहरण आणि मृत्यूमुळे गुंतलेले सगळेच पोलीस अधिकारी, पॅट्रिक, ऍन्जी सगळेच अस्वस्थ होतात. काही काळ जातो आणि अजून एका लहान मुलाचं अपहरण होतं. त्याचाही तपास लागतो. पण तो तरी जिवंत परत येतो का? हे सगळं पहायचं असेल तर शिणेमा पाहायला हवा! मी कथानक फारच ढोबळ लिहिलं आहे, मुख्य चित्रपट (कथा) मी लिहिलंय त्याच्या नंतर येते..पण तो भाग सस्पेन्स ओपन करेल म्हणून लिहिला नाही. गांभीर्याने विचार केला तर व्यक्तिरेखा एककल्ली आहेत असं लक्षात येतं आणि कदाचित म्हणून कथानकाचा शेवट पटला नाही तरी योग्य वाटतो. बेन अफ्लेक मला अभिनेता म्हणून कधीच थोर वाटला नव्हता..पण इथे त्याने दिग्दर्शक म्हणून चांगलं काम केलंय असं म्हणायला हरकत नाही!  बाकी अभिनयाचं म्हणायचं तर फ्रीमन आजोबा, एड हॅरीस ही बाप मंडळी आहेत..त्यांचं वेगळं काय कौतुक करणार? एमी रायनला हेलीनच्या (अमेंडाची आई) भूमिकेसाठी ऑस्कर मिळालं म्हणून तिचा विशेष उल्लेख! 


'गॉन बेबी गॉन'च्या चारेक वर्ष आधी अजून एक 'लीजंड' क्लिंट इस्टवूड आजोबांनी लेहानच्या एका बेस्टसेलर पुस्तकावर, 'मिस्टिक रिव्हर' वर, त्याच नावाचा शिणेमा बनवला. बऱ्याच ऑस्कर्ससाठी नामांकन मिळालेल्या या चित्रपटासाठी अभिनेता आणि सहाय्यक अभिनेता हे दोन पुरस्कार अनुक्रमे शॉन पेन आणि टीम रॉबिन्स यांना मिळाले. गोष्ट तीन मित्रांची! लहानपणी गल्लीत खेळत असताना त्यातल्या एकाला दोन विकृत लोक धरून नेतात आणि त्याचं लैंगिक शोषण करतात. तो तिथून कसाबसा पळून जातो पण त्या घटनेने अर्थातच त्याचं आयुष्य बदलून जातं. गोष्ट २५ वर्षं पुढे जाते. आता त्यातला एकजण पोलीस ऑफिसर आहे, दुसरा काही लहानसहान गुन्ह्यांसाठी शिक्षा होऊन जेलची हवा खाऊन आलाय आणि एक दुकान चालवतो. तिसरा (हो..तोच..लहानपणी....) आपल्या बायको आणि एका मुलाबरोबर राहतोय..त्याचा व्यवसाय नीटसा कळला नाही. दुकान चालवणाऱ्या मित्राच्या १९ वर्षाच्या मुलीचा खून होतो. त्याचा तपास पोलीस मित्र करत असतो. खून झालेल्या रात्री तिसरा मित्र रक्तबंबाळ होऊन घरी येतो. बायकोने विचारल्यावर एका पाकीटमाराने हल्ला केला आणि आपणही विरोध म्हणून त्याला मारून आलो म्हणून सांगतो..पण त्याची उत्तरं त्याच्या बायकोला विश्वासार्ह वाटत नाहीत. एव्हाना अंदाज आलाच असेल की गोष्ट पुढे कशी सरकणारे? बट लेम्मी टेल यु ऑल..हे सगळं दिसतं तितकं सोप्पं नाही..असतं तर ते लेहानने लिहिलं नसतं आणि इस्टवूडने  त्याच्यावर शिणेमा बनवला नसता! चित्रपट/कथा अर्थात मर्डर मिस्ट्री आहे पण त्याहीपेक्षा तिघांची भिन्न जीवनशैली, एकमेकांशी इतक्या वर्षांनी बदललेले संबंध, लहानपणी  घडलेली ती घटना आणि याशिवाय इतरही अनेक उप-कथानकं कथेत येतात आणि उत्तरार्धात ती महत्वाची होत जातात. गोष्ट संघर्षाबद्दल आहे..मित्राशी मित्राच्या, बायकोशी नवऱ्याच्या, बाप-लेकीच्या, आणि सगळ्यात महत्वाचं..स्वतःशी स्वतःच्या! लेहानच्या मिस्टिक कथानकाला आपला सलाम बुवा!


शटर आयलंड हा लेहानच्या पुस्तकावरून बनलेला लेटेस्ट (२०१०) सिनेमा. मिस्टिक रिव्हर लिहून झाल्यावर लेहानला जाणवलं की आपण बोस्टनच्या पार्श्वभूमीवर एखादी खून, अपहरण अशी गोष्ट लिहिणार हे बहुतेक वाचकांना अपेक्षित असावं. म्हणून त्याने भिन्न स्थळ, काळ, हॉरर आणि रोमान्स कम्बाईन करणारं 'गॉथिक' जॉनर अशी सगळी भट्टी जमवून शटर आयलंड लिहिल्याचं म्हटलं आहे. तो पुढे म्हणतो की 'या कथानकाचं वेगळेपण म्हणजे मी ही संपूर्ण कथा एका रात्रीतच कशी पूर्ण करायची हे लिहायला सुरुवात केल्यावर लगेच ठरवलं होतं जे मी आधी कधीच केलं नव्हतं.' गोष्ट अशी की १९५४ साली टेडी हा यु.एस. मार्शल ऑफिसचा अधिकारी त्याच्या नवीन साथीदारासह, 'चक' सह, बोस्टनजवळ एका बेटावर असणाऱ्या मनोरुग्णालयात येतो. तिथली रेचल नावाची रुग्ण हरवल्यासंदर्भात चालू असणाऱ्या चौकशीसाठी दोघे आलेले असतात. दोघे तिथल्या डॉक्टर कॉलीला भेटतात. त्यांच्याकडून किंवा इतर कुणाकडूनच त्या दोघांना तपासकार्यात कुठल्याही प्रकारचं सहकार्य मिळत नाही. वादळ येऊन गेल्याने वातावरण खराब झालेलं असतं म्हणून त्या दोघांना बेट सोडून परतसुद्धा जाता येत नसतं. या दरम्यान टेडीला विचित्र स्वप्नं पडायला लागतात. स्वप्नात त्याला त्याची बायको दिसते जी लेडीस नावाच्या माणसाने लावलेल्या आगीत जाळून मेलीय, ती स्वप्नात त्याला लेडीस त्याच रुग्णालयात असल्याचं सांगते. त्याला डोकेदुखीचा त्रास व्हायला लागतो. अचानक रेचलच्या सापडण्याने वातावरण निवळायच्या ऐवजी अजून गूढ होत जातं. टेडीला रुग्णालयात चालणाऱ्या चित्र-विचित्र प्रयोगांबद्दल समजतं, आपण खरी रेचल आहोत सांगणारी बाई भेटते, चक गायब होतो. या सगळ्यामुळे आपण कुठल्यातरी मोठ्या गुप्त कटाचा बळी ठरतो आहोत हे त्याला जाणवतं. मग खरं काय असतं? ते कळायला हवं तर पुस्तक वाचा किंवा शिणेमा बघा! पुन्हा एकदा मी ढोबळ कथाच सांगितलीय. दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसीचा लिओनार्डो कॅप्रीओ बरोबरचा अजून एक चित्रपट. बरोबर मार्क रफेलो, सर बेन किंग्सले अशी तगडी स्टारकास्ट..स्वतः लेहान चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्यांपैकी एक! शिणेमा वाईट असेलच कसा...?? 


तीन चांगले चित्रपट काही न ठरवता थोड्या कालावधीत पाहिले गेले. आवडले म्हणून गुगलिंग केलं तर लेहान हा त्यातला समान धागा सापडला. इथे चित्रपटांचं किंवा पुस्तकांचं समीक्षण करण्याचा माझा हेतू नाहीये पण लेहानचे (त्याच्या पुस्तकांवर बनलेले) सगळे चित्रपट पाहिल्यावर त्यांच्या कथानकात बोस्टन हा समान धागा सोडला तर विशेष सारखं काही नाही. सारांश म्हणून विचार केला तेव्हा लेहानच्या कथांबद्दल लक्षात आलं ते हे की 'बरेचदा एखादी गोष्ट चूक का बरोबर ते परिस्थिती ठरवते..मग परिस्थिती चूक का बरोबर ते नितीमुल्य ठरवतात..नितीमुल्य चूक का बरोबर ते माणूस ठरवतो..आणि माणूस चूक की बरोबर हे पुन्हा परिस्थिती ठरवते. न संपणारं चक्र आहे! आयुष्यातले शेवट कधीच काळे-पांढरे असे टोकांचे नसतात..त्याला नेहमीच ग्रे (राखाडी) छटा असते हे खरं.' मागे एकदा झालेल्या चर्चेत असा मुद्दा डिस्कस झालेला की कथेतून लेखक दिसला पाहिजे, कथेतल्या पात्रांपेक्षा तो मोठा वाटला पाहिजे! लेहानचे चित्रपट पाहून तरी मी त्यातल्या लेखकाच्या प्रेमात आहे. देव करो आणि त्याची पुस्तकं लौकर वाचायला मिळोत ही अपेक्षा! 


~सारी चित्रे विकीवरून साभार .