Pages

Thursday, October 23, 2014

"भाई, एक 'यो यो' हो जाये!"

                                                                                       **
गेल्या महिन्यात आमच्या युनिवर्सिटीतल्या १०-१५ जणांना घेऊन आम्ही सहलीला गेलो होतो. साधारण तास-दीड तासाचा प्रवास! संध्याकाळी परत येताना साहजिकच 'अंताक्षरी'चा कार्यक्रम झालाच. किती वर्ष लोटली असतील अंताक्षरी खेळून…पण भसाड्या आवाजात गाणारे (??) आम्ही सगळेच ९०च्या दशकात मोठे झालेलो आहोत आणि मेंटली आम्ही अजूनही ९०च्याच दशकात अडकलोय (निदान अंताक्षरी खेळण्याच्या बाबतीत तरी) हे आमचं आम्हालाच जाणवलं-- 'मैने प्यार तुम्ही से किया है', 'रात के बारा बाजे दिन निकलता है' अशी एकूणच दुय्यम आणि कालबाह्य गाणीच आम्हाला आठवत होती. ९०च्या गाण्यांचा कोटा संपल्यावर सगळे ढेपाळले. मग काही चांगली गाणी म्हणून झालीच नाहीत असा विचार करून आम्ही राजेश खन्नाची गाणी म्हणायला लागलो.
अचानक एक जण म्हणाला--"जरा छान गाणी म्हणूया की…"
"अजून छान गाणी?म्हणजे कुठली बाबा?" मी विचारलं. 'कहीं दूर जब दिन ढल जाये' नुकतंच म्हणून झालं होतं.   
"भाई, एक 'यो यो' हो जाये" त्याचं उत्तर! मग मी बंद पडलो…डोकं बधीर झालं होतं!! बाकी सगळ्यांनी त्याला हो म्हणून 'बिभत्स' रसातलं कुठलंसं गाणं म्हणून होईपर्यंत मी बंदच होतो. त्याच्या त्या एका वाक्याचा गेले महिनाभर विचार करूनही 'क्लोजर' मिळू शकलेलं नाही म्हणून मी शेवटी ते इथे वैश्विक चव्हाट्यावर मांडायचं ठरवलं---

'भाई, एक यो यो हो जाये?'….आय मीन सिरीयसली? तर--यो यो म्हणजे 'हनी सिंग अर्थात यो यो हणी सिंग' नावाचा स्वतःला गायक-संगीतकार म्हणवणारा एक इसम! हनी सिंग काय मोहम्मद रफी किंवा किशोर कुमार वगैरे आहे का की त्याच्या गाण्याची 'फर्माईश' व्हावी? जगातले सगळे गायक, संगीतकार संपलेत का? गेला बाजार तो 'एक अन्नू मलिक किंवा बाबा सेहगल हो जाये' असं म्हणाला असता तरी चाललं असतं असं मला वाटायला लागलं. मग मला अन्नू मलिक 'बरा' पर्याय वाटावा हे जाणवून स्वतःचाच राग आला! मग पुन्हा शांतपणे विचार केला-- मला हनी सिंगची गाणी का आवडू नयेत? का? का? ज्या अमेझिंग माणसाच्या तुफान गाण्यांनी लाखो लोकांना वेड लावलंय त्या तानसेनाच्या आधुनिक अवताराचं संगीत मला का आवडू नये? ज्या काही गोष्टी सुचल्या त्या शक्य तितक्या सुटसुटीतपणे मांडायचा प्रयत्न करतोय!
१. गाणं किंवा एकूणच संगीतावर अधिकाराने टिप्पणी करायला मी तानसेन तर नाहीच पण चांगला 'कान'सेन तरी आहे का माहित नाही---पण मला हणी सिंगची कुठलीही गाणी आवडत नाहीत. माझ्यामते एखादं गाणं आवडण्याची मुख्य कारणं असतात गाण्याची चाल आणि त्याचे शब्द!! 'चार बोतल वोडका काम मेरा रोज का' किंवा 'लुंगी डान्स' वगैरे शब्दात आवडण्यासारखं काय असू शकतं हे मला अजूनही कळलेलं नाही! राहता राहिला गाण्यांच्या चालींचा प्रश्न-- तर सार्वजनिक गणपतीला जमलेले शेकडो लोक जास्त सुरात, चालीत आरत्या म्हणतात हे माझं मत आहे. मॉरल ऑफ द स्टोरी- यो यो हणी सिंगच्या गाण्यांशी मी इमोशनली कनेक्ट होऊच शकत नाही!
२. मला असं जाणवलं की त्या १०-१५ लोकांच्या घोळक्यात हनी सिंगची गाणी न आवडणारा किंवा त्याचं हिंग्लिश गाणं माहित नसणारा मी एकटाच होतो. मला हनी सिंगची बिभत्स रसातली गाणी आवडत नाहीत म्हणजे मी कालबाह्य झालोय का असा प्रश्न मला पडला. उडत्या चालीची, फार मतितार्थ नसलेली किंवा यमक जुळवण्यासाठी वाटेल ते शब्द वापरलेली कुठलीच गाणी मला आवडत नाहीत का? या प्रश्नाचं उत्तरसुद्धा नकारार्थी आहे! 'मुन्नी बदनाम हुई', 'अनारकली डिस्को चली', 'बिडी जलाइले', 'प्यार की पुंगी' अशी कित्येक गाणी मी ऐकतो. काही आवडीने तर काही निव्वळ सवयीने! मग मला हनी सिंगच का आवडू नये? त्याच्या गाण्याच्या चाली आरती म्हणण्यापेक्षा सोप्प्या आहेत, मतितार्थाचं म्हणायचं तर 'छोटे ड्रेस में बॉम्ब लगदी मेनू' यासारख्या गाण्यात खोल दडलेला अर्थ वगैरे शोधण्याची गरजही नाहीये पण तरी मला ती गाणी आवडत नाहीत!

३. लहानपणापासून घरातले संस्कार होते म्हणा, पुढे मित्रसुद्धा तसेच भेटले म्हणून असेल पण माझा 'ऐकीव' गाण्यांच्या आवाका बऱ्यापैकी होता म्हणायला हरकत नाही. म्हणजे फार नाही पण मराठीत पंडित अभिषेकी बुवा ते स्वप्नील बांदोडकर, हृदयनाथ मंगेशकर ते अवधूत गुप्ते, हिंदीत किशोर कुमार ते अलीकडे शफकत अमानत अली, किंवा एस.डी. बर्मन ते अमित त्रिवेदी अशा अशा सगळ्या सगळ्या लोकांची गाणी ऐकत मी मोठा झालो, अजूनही ऐकतो. कळायला लागल्यावर आपल्याला गाणं किंवा एखादं वाद्य वाजवायला शिकत आलं नाही याची खंतसुद्धा वाटली कधी कधी. प्रभाकर जोगांची व्हायोलीन ऐकताना मिळणारं समाधान किंवा फ्युझोनचं शफकत अमानत अलीने गायलेलं 'मोरा सैय्या' ऐकताना जाणवणारा आर्त स्वर म्हणजे संगीत, गाणं अशी माझी साधारण कल्पना होती, आहे! पण हनी सिंगचं गाणं ऐकताना मला समाधानसुद्धा मिळत नाही आणि कुठलीही चांगली भावना जाणवत नाही.…दुर्दैवाने त्यातला नकारात्मक स्वर किंवा हपापलेला भाव म्हणजे संगीत अशी मी स्वतःची समजूत करून घेऊच शकत नाही! सॉरी पण मला हनी सिंगची गाणी आवडत नाहीत.

४. पंडित भीमसेन जोशींना भारतरत्न मिळालं, रेहमानला ऑस्कर मिळालं--इतरही अनेकांना कित्येक राष्ट्रीय किंवा आंतर-राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.…पण 'मी यातला अमुक पुरस्कार मिळवणारच आहे' हे आजपर्यंत कुणीच जाहीर मुलाखतीत छातीठोकपणे सांगितलेलं मला माहीत नाही! याउलट 'यो यो मधाळ सिंग'ने मात्र 'मी ग्रॅमी अवोर्ड मिळवणार आहे' हे जाहीरपणे सांगितलं आहे! 'पार्टी ऑल नाईट', 'चार बोतल वोडका' आणि 'अल्कोहोलिक' अशी गाणी लिहून ग्रॅमी मिळवण्याची वल्गना करणाऱ्या या महापुरुषाबद्दल मला अत्यादर वाटायला हवा, त्याची गाणी आवडायला हवीत पण मला हनी सिंगची गाणी आवडत नाहीत!

५. मी हनी सिंगला पर्सनली ओळखत नाही. त्याच्याबद्दल माझा काही पूर्वग्रहसुद्धा नाही! मागे दिल्ली दुर्घटनेच्या वेळी कुणातरी लोकांना अचानक साक्षात्कार झाला की हनी सिंगच्या 'मै बलात्कारी' अशा काहीतरी गाण्याने हिंसक प्रवृत्ती बळावते म्हणून त्याला अटक व्हावी. तेव्हा त्या लोकांची खिल्ली उडवून मी हनी सिंगच्या बाजूने माझ्या ब्लॉगमध्ये लिहिलंसुद्धा होतं. वैयक्तिक आयुष्यात तो माणूस म्हणून कसा आहे याची मला अजिबात कल्पना नाही. एकूणच त्याच्या गाण्यांचा मी व्यक्तीसापेक्ष विचार केलेला नाही! पण कितीही प्रयत्न करून मला हनी सिंगची गाणी आवडत नाहीत!

६. हनी सिंगने खरंतर सध्याच्या पिढीतल्या पालकांचं काम सोप्पं केलं आहे. त्यांच्या मुलांना अगदी लहान वयातच विविध प्रकारची मद्यं, मद्यपानाशी संबंधित गैरसमज, पार्ट्या, मुलींचे कपडे अशा कित्येक कित्येक गोष्टींबद्दल कोणतीही माहिती त्यांना पुरवावी लागणार नाहीये….अ-पंजाबी (अ-मराठी सारखं) मुलांना त्यांची मातृभाषा सोडून पंजाबी भाषा, मोडकी-तोडकी इंग्लिश, हिंग्लिश अशा तीन भाषा शिकायला मिळणार आहेत. त्यांची मुलं उद्या जगात 'कुह्हल' (KEWL) म्हणवली जाणार आहेत. त्याच्या गाण्यांचे समाजावर एवढे उपकार असूनही मला त्याची गाणी आवडत नाहीत.

या सगळ्या गोष्टींमध्ये वरकरणी निव्वळ खवचटपणा दिसत असला तरी त्यातली माझी कळकळ खरंच प्रामाणिक आहे!! अजून किती कारणं देऊ? किती गोष्टींचा विचार करू? हनी सिंगची गाणी न आवडायला जर का एवढ्या गोष्टी पुरेश्या असल्या तर मग मला पडलेले पुढचे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत.

१. संगीत, गायन या जगातल्या सर्वोत्तम कला आहेत. त्यात कलाकाराला मुक्तपणे व्यक्त व्हायला अभिव्यक्ती स्वातंत्र आवश्यक आहे. पण मग नकारात्मक स्वराची किंवा हपापलेला भाव असलेली गाणी लिहिणाऱ्या कलाकाराचं कौतुक होणं बरोबर का चुकीचं? ज्या अर्थी हजारो लोकांना ही गाणी आवडतायत त्या अर्थी ती बनवणारा हनी सिंग १००% चुकीचा असूच शकत नाही. मग माणूस म्हणून, समाज म्हणून, रसिक म्हणून लोकांचा प्रवाह ज्या दिशेने चाललाय त्या दिशेने सगळ्यांनी जाणं बरोबर आहे का? ती दिशा चुकीची असली तरी??

२. माझ्या पिढीने निदान कळत-नकळत का होईना पण 'चाहुंगा मै तुझे सांज सवेरे' किंवा 'एक धागा सुखाचा' वगैरे गाणी ऐकली. सांगीतिक संस्कार, सांस्कृतिक जडणघडण अशा गोष्टी व्यक्तिमत्व विकासाला किती आवश्यक असतात हे मी अधिकाराने सांगू शकत नाही पण लहानपणी 'पार्टी ऑल नाईट' ऐकून येत्या पिढीवर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करायची गरज आहे. नुसतं वाईट वाटून उपयोग नाही कारण खरंतर आपलीच जबाबदारी वाढतेय. विचार करा--काही वर्षांनी एखादा मुलगा आपल्या आजोबांना विचारेल--" ग्रॅन्डपा, व्हू इस थिस पंचम गाय? हिज म्युसिक साउन्डस सो आउटडेटेड…वॉझ ही फेमस ऑर समथिंग विथ दॅट काइन्डा म्युसिक?". या संवादातला भयाणपणा जाणवतोय?

सो इथे एकदा नमूद करू इच्छितो की हा ब्लॉग निव्वळ एक हनी सिंगच्या गाण्यांवर टीका करायची या हेतूने लिहिलेलाच नाही! त्यामुळे त्याच्या कोणत्याही पंख्यांनी जर का धीर करून हा ब्लॉग इथपर्यंत वाचला असेल तर अजून त्रागा करून घेऊ नये! हनी सिंगच्या गाण्यांमध्ये ज्यांना गेय, अर्थ, संगीत दिसतं त्यांनी ते जरूर ऐकावं. माझ्या बाबतीत दुर्दैवाने  "एक यो यो हो जाये" हे एक वाक्य ट्रिगर ठरलं आणि मला एवढा मोठा उहापोह करावासा वाटला. हे लिखाण निव्वळ वैतागातून आलं असल्याने ते एकांगी, बायस्ड वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तसं असल्यास तसं वाटणाऱ्या मंडळींनी दुसरी बाजू जरूर मांडावी…मी अतिशय फ़्लेक्सिबलपणे विचार करायला, ओपन एन्ड चर्चा करायला तयार आहे!    

वाचणाऱ्या सर्व लोकांना दिवाळी आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! येणाऱ्या वर्षात सर्वावर हनी सिंगची किंवा त्याच्या गाण्यांशी चाल-भाव-शब्द अशा सगळ्या बाबतीत साधर्म्य असणारी कमीत कमी गाणी ऐकायला मिळोत ही परमेश्वर चरणी प्रार्थना!!

Tuesday, October 14, 2014

नाईटमेअर भाग ३

भाग १, भाग २ वरून पुढे--

"असं झालं काय श्रीकांत राव की तुमच्यावर पार आत्महत्या करण्याची पाळी यावी?" अनुपमने श्रीकांतला बोलतं करायला पुन्हा प्रश्न विचारला.
फायनली श्रीकांत बोलायला लागला-- "आता काय सांगणार आणि किती सांगणार? ते म्हणतात ना की ती सटवाई पाचवी पुजल्यावर काहीतरी लिहून जाते आपल्या नशिबात…माझ्या वेळी नशीब लिहायला ती पेन-पेन्सिल आणण्याऐवजी काळ्या रंगात बुडवलेला बोळा घेऊन आली होती बहुतेक…कारण जन्माला आल्यापासून माझ्याबाबतीत काही चांगलं घडलेलं मला आठवतच नाही! कायम स्ट्रगल…गरिबी…निराशा…आरोप"
"स्ट्रगल प्रत्येकाच्याच नशिबात असतो हो…तो कुणाला चुकलाय?" श्रीकांतने सुरुवातच अशा डिप्रेसिव्ह टोनमध्ये केल्यावर अनुपमने त्याला सावरायचा प्रयत्न केला.
"माफ करा कामत पण मी सहमत नाही! आयुष्य अवघड असलं तर ठीके पण खडतर असायला नको असं मला वाटतं"
"हम्म…" अनुपमने मान डोलावली.
"मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगायचं टाळतोय असं समजू नका पण मला खरंच माझी कर्मकहाणी उगाळायची नाहीये! आपण तुमच्याबद्दल बोलू!!" आपण आत्महत्येचा प्रयत्न केला हे दारूच्या नशेत सांगून बसलो खरं पण आता जास्त डीटेल्स द्यायला नको असा विचार करून श्रीकांतने विषय बदलायचा प्रयत्न केला.
"हातिच्च्या…तुम्ही तर झकास जुन्या हिंदी पिच्चरसारखी सुरुवात केली होती राव…हिरोची गरिबी, स्ट्रगल, प्रेमभंग, आरोप वगैरे! मी रिअल लाईफ मनमोहन देसाई ऐकायला रेडी झालो होतो--"
"थट्टा सुचतेय तुम्हाला…घ्या करून थट्टा…आता तुमचं मीठ नाही खाल्लं पण दारू प्यायली म्हणजे ऐकून घ्यायलाच हवं…पण…माझ्या स्टोरीत प्रेमभंग असल्याचं मी तुम्हाला कधी बोललो?" श्रीकांतने विचारलं.
"अहो तुम्ही स्ट्रगल, गरिबी, निराशा म्हणाला होतात त्यामुळे मी ते स्ट्रगल, गरिबी, प्रेमभंग असं समजून घेतलं-- आणि हो मला अचानक आठवलं-- मगाशी मी पहिल्यांदा तुम्हांला उठवायला आलो ना तेव्हा तुम्ही सायली-सायली म्हणून झोपेत हाक मारलेली मी ऐकली होती" 
श्रीकांत चपापला. त्याला सायलीचा उल्लेख अनपेक्षित होता. 'आपण झोपेत तिचं नाव घेत होतो आणि या कामतने ते ऐकलं? शक्यच नाही! पण हा खोटं बोलतोय असं वाटत तर नाहीये!! माझ्यापेक्षा जास्त प्यायलाय…इतकी दारू पिउन माणूस खोटं तर बोलत नाही…'
"ओ भाऊ…किधर हरवलात? मनातल्या मनात नका बोलु…मोठ्याने बोला राव"
"तुम्ही मला खरंच सायलीचं नाव घेताना ऐकलंत?"
"हो"
"म्हणजे नाहीतर तुम्हाला सायली माहित असण्याचं काहीच कारण नाही…बरोबर?"
"मुळीच नाही…हां पण तुम्ही आता इतक्यांदा विचारताय म्हणून जाणून घ्यायची इच्छा आहे हे नक्की" अनुपम घोट घेत म्हणाला.
श्रीकांतने हातातला उरलेला पेग एक घोटात संपवला. तोंडाची कडवट चव सहन करत तो बोलायला लागला--
"मी म्हटलं ना सांगण्यासारखं विशेष काहीच नाही! टिपिकल फेल्ड लव्ह स्टोरी! मुलगा-मुलगी भेटले, प्रेमात पडले…पण मुलाकडे स्वतःचं घर नाही, पैसा नाही…सायली पण फार श्रीमंत होती अशातला भाग नाही. आयुष्यात काही कमी पडलं नाही याचा आनंद नव्हता तिला पण हौसमौज करायला मिळाली नाही याची खंत जरूर होती…आणि लग्नानंतर तरी तसं असावं अशी तिची अपेक्षा! कसं आहे ना कामत…तिने केलं तेव्हा माझ्यावर उत्कट प्रेम केलं…मानसिक, आर्थिक अगदी शारीरिकसुद्धा! पण जेव्हा तिला चांगल्या स्थळाकडून मागणी आली तेव्हा तिने माझी फार वाट न बघता होकार कळवून टाकला त्यांना!! आजकाल साला पोरी खूप हिशोबी असतात बघा!"
"मग? सगळं भारीच झालं की! माशी शिंकली कुठे?"
"भारी? तुम्हाला नशेत कळलं नाहीये कदाचित मी काय बोललो ते---सायलीने दुसऱ्या एका माणसाशी लग्न केलं…माझा विचार न करता….कळतंय का?"
"अहो कळलं की…पहिल्यांदा सांगितलंत तेव्हाच कळलं…तुम्हीच म्हणालात की तिने तुमच्यावर केलं तेव्हा उत्कट मानसिक, आर्थिक, शारीरिक प्रेम केलं! तुमची तेव्हाची गरज भागली की! आता ती तिच्या वाटेने गेली तुम्हाला कुठलाही मोडता न घालता!! जियो मेरे लाल…जगात सगळेच लोक इतके समजूतदारपणे वागायला लागले तर भारीच होईल" अनुपम दारूच्या नशेत होता पण त्याच्यामधला तत्ववेत्ता रंगात आला होता.
"वा म्हणजे माझ्या भावनांना, प्रेमाला काहीच किंमत नाही?"
"अहो नाही कोण म्हणतंय? पण एक लक्षात घ्या…प्रेम-वैर, आनंद-दुःख, आशा-निराशा, राग-लोभ अशा सगळ्याच मानवी भावना फार थोड्या क्षणांसाठी उत्कट, पराकोटीच्या वगैरे असतात. मग त्या अनुभवताना मिळणारं समाधान असो किंवा होणारा त्रास असो-- दोन्ही हे त्या त्या क्षणापुरतं आहे हे समजून घ्यायला हवं! श्रीकांत राव, आपल्याला काही गोष्टी मान्य कराव्या लागतात…माझं विचाराल तर मी नुसता इमोशन्सचाच नाही तर एकूणच आयुष्याचा क्षणभंगुरपणा त्याच्या बऱ्या-वाईट बाजुंसकट मान्य केला आहे….मोर ओव्हर मी तो अप्रीशियेट करायला शिकलो आहे"
"कामत---तुम्ही हे नेहमी असंच बोलता की हा जॉनी वॉकर बोलतोय? नाही कारण तोच बोलत असेल तर हरकत नाही पण नाहीतर तुम्ही बोलताय ते सगळं एकूण युजलेसच आहे"
"आता तुम्हाला तसं वाटतंय तसं…पण हां…तशी तुमच्या गोष्टीत काही ट्रजेडी नाही पण कॉमेडी नक्की आहे" अनुपम हसत म्हणाला.
श्रीकांतला आता त्याचा थोडा राग यायला लागला होता. 'मी याला माझी शोकांतिका सांगतोय तर याला त्यात हसरा शेवट दिसतोय??'
"म्हणूनच मी माझ्याबद्दल तुम्हाला काही सांगत नव्हतो…माझ्या कर्मकहाणीत नाविन्य नाही हे मलाही ठाऊक आहे पण म्हणून त्याची थट्टा होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती" तो काहीसा चिडून म्हणाला.
"चुकलं सरकार…मी मुद्दामहून थट्टा नाही केली खरंच! मी तुम्हाला चिअर अप करण्याचा प्रयत्न करत होतो" अनुपम नवीन पेग बनवत म्हणाला.
"हा असा? अहो जरा वेळ, काळ बघून तरी ठरवत चला…या भिकारचोट पावसानेसुद्धा काय काळ-वेळ निवडलीय कुणास ठाऊक? जगातल्या एक-दोन समुद्रांच्या पाण्याची एकदम वाफ झाली बहुतेक…नाहीतर ढगात इतकं पाणी येणारे कुठून?" श्रीकांतने ग्लास उचलून ओठाला लावला तेव्हा त्याचं लक्ष व्हिस्कीच्या बाटलीकडे गेलं. "हे काय अर्धी संपली?" त्याने चाचरत विचारलं.
"संपली कसली? आपण संपवली!!गेले दोन पेग 'निट' प्यायलोय आपण!" अनुपम घोट घेत थाटात म्हणाला.
"च्यामायला…तरीच माझा घसा जळतोय…थोडं पाणी घेतो घालुन…" श्रीकांत उठून शेडच्या कडेला आला आणि त्याने कप बाहेरच्या पावसात धरला. तो मागे वळला तसं अनुपमने त्याला विचारलं--
"…. म्हणजे तुम्ही केलेला आत्महत्येचा प्रयत्न सायलीमुळे की---?"
"छे छे…तुमचा तो भावनांचा क्षणभंगुरपणा मान्य करण्याचा मोठेपणा माझ्याकडे नसला तरी त्यांना कवटाळून जीव देण्याचा करंटेपणा करण्याइतका मूर्खसुद्धा मी नाही"
"क्या बात है…जियो मेरे लाल…जबरी वाक्य होतं…पण हा जॉनी वॉकर होता की तुम्ही स्वतः?"
"आपलं चिल्लर तत्वज्ञान!! दारू प्यायल्यावर सुचतं---कुणीतरी म्हणून ठेवलंय-समाधान-असमाधानाच्या परमोच्च क्षणांना सर्वोत्तम तत्वज्ञान जन्माला येतं"
"वाह! पण मग ते आत्मह---"
"आयला तुम्ही त्याला चिकटूनच बसलात राव"
"सॉरी सॉरी सॉरी…मला कळतंय की तुम्हाला तो विषय नकोय…पण मी पहिल्यांदाच असा आत्महत्या करायला ट्राय केलेल्या माणसाला भेटलोय ना.…स्वतःचाच जीव घेण्याची हिम्मत अशी कुणात कशी काय असू शकते हा मला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे"
"च्यामायला हे अजब आहे…आयुष्याचा काय बरं---हां--क्षणभंगुरपणा अप्रिशियेट करणाऱ्या माणसाला आत्महत्येचं कुतूहल?"
"आत्महत्येचं कुतूहल नाही हो…कौतुक वाटलं मला…आय मीन आपल्याला बुवा काही वाटेल ते झालं तरी असलं काही करायची हिम्मत होणार नाही…."
"काहीवेळी अशा काही घटना घडतात की आपल्याला आपल्या असण्याचीच लाज वाटायला लागते--मग भीती वाटो, निराशा वाटो किंवा अजून काही पण जीव देणं फार सोप्पं वाटायला लागतं--" श्रीकांत भकासपणे समोरच्या पावसाकडे बघत म्हणाला. काहीतरी आठवत तो हरवून गेला होता.
अनुपम चक्क गप्प झाला. काही वेळाने अनुपम काही बोलत नाहीये हे बघून श्रीकांत भानावर आला.
"गेल्या महिन्यात पुण्यात झालेल्या पीएमटीच्या अपघाताबद्दल ऐकलयंत का?" त्याने अनुपमला विचारलं.
"हे कुठून मधूनच?" अनुपमची तंद्री भंगली. त्याला थोडी झोप यायला लागली आहे असं श्रीकांतच्या लक्षात आलं.
"मध्येच नाही हो…ऐकलंय का ते सांगा आधी!"
"हो ऐकलं की…एक शाळकरी मुलगा गाडीखाली आला…तो ड्रायव्हर पिउन बस चालवत होता म्हणे"
"नुसता शाळकरी मुलगाच नाही तर एक म्हातारापण दगावला…सकाळी आठ-साडेआठ वाजले होते. रस्त्याला नेहमीसारखी खूप-खूप रहदारी होती. कुणीतरी सकाळ-सकाळ वैकुंठाकडे रिक्षातून एका तिरडीसाठी सामान नेत होता-- त्या तिरडीचे बांबू वाकडे-तिकडे बाहेर आले होते. आत बसलेला त्याचं कुणीतरी गेल्याच्या दुःखात असेल- पण शाळेच्या उशीर झालेल्या मुलाच्या सायकलच्या वाटेत ते बांबू येत होते म्हणून त्याने वाट बदलून सिग्नल चुकवून एका ठिकाणी चौकात कट मारला. तो मुलगा वळणावरून येणाऱ्या बसच्या समोर येतोय हे बघून कडेला सकाळी बाजारहाट करायला निघालेला म्हातारा त्याला अडवायला मध्ये आला…बस ताब्यात घेतानाचं पेपरवर्क करताना उशीर झाला म्हणून ड्रायव्हर घाईत--त्याला बारापर्यंत चार रिटर्न खेपा घालायच्या होत्या" श्रीकांत न थांबता बोलत होता--
"त-त-तुम्हाला एवढे डीटेल्स कसे माहिती? मला पेपरमध्ये काही वाचल्याचं आठवत नाही"
"कारण त्या बसचा ड्रायव्हर मी होतो" श्रीकांत पावसाकडे बघत म्हणाला. त्याने कपातला शेवटचा घोट संपवून तो कप जमिनीवर फेकला. शेडच्या कडेच्या खांबाला जाउन तो ओक्साबोक्शी रडायला लागला.
अनुपम कामत सुन्न होऊन बसला होता. त्याला काय बोलायचं सुचतच नव्हतं--

"इस थिस मिस्टर अनुपम कामत?"
"स्पिकिंग…व्हू इस दिस?"
"सर…सॉरी टू से पण तुम्हाला एक वाईट बातमी द्यायची होती"
"वाईट? काय झालं??"
"सर, तुमचे वडील-- आज--- अ-- आज तुमचे वडील आज सकाळी एका अपघातात गेले…रिअली सॉरी सर…माय कंडोलन्सेस"

क्रमश:

Wednesday, June 11, 2014

नाईटमेअर भाग २

भाग १ वरून पुढे-

श्रीकांत एकटक त्याच्याकडे बघत होता. अनुपम दचकला.
"अहो श्रीकांत सर….घाबरलो ना मी…कधी जागे झालात तुम्ही?" त्याने क्षणात स्वतःला सावरलं.
"झोपलो नव्हतोच मी…झोप कसली येणारे? हा भिकारचोट पाऊस थांबतोय कुठे? आणि त्यात या वीजा…." श्रीकांतचा सूर अजूनही वैतागलेलाच होता.
"पाऊस नाही हो… आपण भिकारचोट…माझं नशीबच भिकारचोट जे अडकलो या पावसात…कुठला मुहूर्त शोधून मी बाहेर पडलो होतो कुणास ठाऊक?" अनुपमने एक घोट घेत म्हटलं.
'चांगल्या घरचा दिसतोय….असल्या भयाण काळोखाची, एकटेपणाची सवय नसेल त्याला' श्रीकांत मनात म्हणाला. 'आता ही ब्याद पाऊस थांबेपर्यंत आपल्याला चिकटली आहेच तर आपणही थोडं सैल व्हायला काय हरकते…?? नाहीतर एरव्ही आपल्याशी बोलायला कुणाला रस असतो?' असा विचार त्याने केला.
"मुहूर्त योग्यच होता की…अमावास्या आहे आज…." श्रीकांत मंद हसत बोलला.
"क्काय?ककक्कशावरून?…." अनुपमने आवाज शक्य तितका नॉर्मल ठेवत विचारलं. त्याला क्षणात अमावस्या, भुतं, प्रेतात्मे, हडळी अशा सगळ्या गोष्टी आठवल्या. श्रीकांतला त्याच्या आवाजातला बदल जाणवला…
"म्हणजे काय? नाहीतर आज मी इथे या भयाण शेडखाली तुम्हाला का भेटलो असतो! आजचाच दिवस तर असतो माझ्यासारख्या भूताखेतांना मोकळं हिंडायला…झपाटायला एखादं झाड शोधायला…" श्रीकांत हसत म्हणाला.
अनुपमला घाम फुटला. त्याच्या हातातला ग्लास खाली पडला.
"त…तत…तु…तुम्ही खरंच भूत आहात?" त्याने भेदरलेल्या आवाजात विचारलं.
श्रीकांतने अनुपमला झटक्यात घाबरलेलं पाहिलं आणि त्याला हसू फुटलं-
"अहो कामत, एवढे बिचकू नका…मी नाहीये भूत-बित…मी गंमत करत होतो" श्रीकांत हसत म्हणाला. त्याचा एकूण अवतार आणि त्याचं खदाखदा हसणं यांच्या एकत्रित परिणामाने अनुपम शांत व्हायच्या ऐवजी अजूनच अस्वस्थ झाला. गेले एक-दीड तास त्याच्याबरोबर शेडमध्ये असणारा माणूस आणि गेल्या अर्ध्या मिनिटातला माणूस यांच्यात खूप जास्त फरक होता. असा फरक सध्या माणसात नाही होऊ शकत…'हा म्हणतो तसा खरंच मुंज्या किंवा अतृप्त प्रेतात्मा स्पिरीट वगैरे काहीतरी असला पाहिजे'
"अ..अ.…आधी थट्टा करत होतात क….की आत्ता थ…थट्टा करताय?" त्याने घाबरून विचारलं.
"कामत अहो…मी खरंच थट्टा करत होतो…"
"म…म…मग आज अमावस्या आहे हे तुम्हाला कसं ठाऊक?"
"अहो त्यात काय अवघड आहे? जरा आकाशाकडे बघा…दिसतोय का कुठे चंद्र किंवा चंद्राच्या आकाराचं काही??" श्रीकांतने विचारलं.
अनुपमने मागे वळून वाकून मान वर करत शेडच्यावर आकाशात पाहिलं. चंद्र काही दिसला नाही पण आपण नेमके कोणत्या दिशेला पाहतोय हेही त्याला माहित नव्हतं. त्याने त्या सुसाट पावसात आकाशात चंद्र शोधण्याचा निर्णय रद्द केला.
"हट…चंद्र कसला बघू??…इतक्या पावसात चंद्र दिसतो का?" अनुपमची भीती थोडी कमी झाल्यासारखी वाटली.
"बरं मग माझ्यावर विश्वास ठेवा….आज आहे अमावास्या…पण मी भूत नाहीये…घाबरू नका एवढे…" श्रीकांतने पुढे होत त्याच्या खांद्यावर हात ठेवायला जवळ जायचा प्रयत्न केला. अनुपम दचकुन मागे सरकला.
"कामत…अहो माझ्या हातात काही नाहीये!"
"हातात काही असायची गरजच काये? तुम्ही ते झपाटायला झाड वगैरे शोधत असता ना?"
अनुपमच्या शंकांनी श्रीकांतला अजूनच हसायला येत होतंच पण हळूहळू त्याला अनुपमच्या भेकडपणाचा रागही यायला लागला होता…'समजा आलंच एखाद्याच्या समोर भूत…तर काय एवढं आचरटासारखं वागायचं असतं का? आणि ही अनुपमसारखी उच्चभ्रू व्हाईट कॉलर मंडळी म्हणे देश बदलणार आहेत!'
"अहो… असं काही नसतं हो…मी क्षणापुरती थट्टा केली तर तुम्ही आता इतके बिचकताय की मला माझ्याच थट्टेचा राग येतोय…चुकलंच माझं!"

श्रीकांत पुन्हा बाकावर जाउन बसला. अनुपम अस्वस्थपणे विचार करत तिथेच उभा राहिला. पुन्हा काही वेळ असाच गेला. श्रीकांत पुन्हा पेंगायला लागल्याचं बघून अनुपमला थोडं हायसं वाटलं.
"ओ श्रीकांत सर….पुन्हा झोपलात का?" अनुपमने कंटाळून त्याला हाक मारली.
"झोपलो नाहीये हो मी….किती वेळा सांगितलं….काही हवंय का तुम्हाला?"
"नाही हो…ते आपलं एकटं बसून कंटाळा आला म्हणून--"
"हो पण मी भूत आहे नाही का? मग भूताशी बोलायला तुम्हाला भीती नाही वाटते? मी तुम्हाला झपाटलं तर-" श्रीकांत वैतागल्या सुरात म्हणाला.
"सॉरी बरं का…पण रात्रीच्या अंधारात निरर्थकपणे बसून राहिलं की स्वतः 'भूत' असल्यासारखं वाटतं…त्या एकटेपणापेक्षा एखाद्या खऱ्या भुताची कंपनी काय वाईट?" अनुपमने पावसाकडे बघत उत्तर दिलं.
"आयला…म्हंजे मी भूत आहे हे तुम्ही पक्कं केलेलं दिसतंय…आणि तसं असेल तर तुम्ही हा तुमचा भूतासारखा एकांत कवटाळून बसा….माझ्या वाटेला येऊ नका" --श्रीकांत.
"अहो सॉरी…मला तसं नव्हतं म्हणायचं…तुम्ही भूत-बित कुणी नाही आहात याची खात्री पटलीय माझी"
"अरे वा तुमचं हार्दिक अभिनंदन" श्रीकांतच्या आवाजातला खोचकपणा पुन्हा बाहेर आला पण यावेळी तो चेहऱ्यावरून बऱ्यापैकी निवळल्यासारखा वाटत होता.
"आता तुम्ही अभिनंदन करताच आहात तर माझा गाढवपणा सेलिब्रेट करूयात….घेणार का थोडी थोडी?" अनुपमने हसत विचारलं.
"छान…कुणाचातरी गाढवपणा सेलिब्रेट करायला पहिल्यांदा पिणारे मी…चालेल थोडीशी" श्रीकांतने उत्तर दिलं.
अनुपमने बाटली बाहेर काढली. श्रीकांतसाठी अजून एक ग्लास काढला. दोघांचे पेग भरले आणि शेडच्या कडेला उभं राहून त्यात पावसाचं पाणी पडू दिलं.
"घ्या….चीअर्स" त्याने श्रीकांतला ग्लास पुढे केला.
"ब्लू लेबल….? तुम्ही खूपच शौकीन दिसताय…" श्रीकांतने बाटलीवरचं नाव बघून ग्लास घेत प्रश्न विचारला.
"असं शौक वगैरे काही मी मानत नाही हो…असं काही नसतंच…चांगल्या प्रतीच्या वस्तू वापरायच्या म्हणजे त्यांची जास्त किंमत द्यावी लागते…आता याला लोक 'शौक' वगैरे शब्द जोडून समोरच्याला चंगळवादी डिक्लेअर करून टाकतात हा भाग वेगळा…आता मला साधं सांगा…तुम्हाला सिनेमा पहायचा आहे…सुंदर, नेत्रसुखद सिनेनट्या असणारा 'जवानी दिवानी' अशा काहीतरी नावाचा सिनेमा जवळच्या मल्टीप्लेक्समध्ये लागलाय आणि बाजूच्या जुन्या टॉकीजमध्ये 'वैनीचं मंगळसूत्र'वाली रडारड सुरु आहे…तुम्हाला करमणूक हवी आहे…तुम्ही एक वेळ दोन पैसे जास्त खर्चून मल्टीप्लेक्समध्ये जाल किंवा सिनेमा पहायला जाणारच नाही… जर का तुम्ही मल्टीप्लेक्समध्ये गेलात ते चंगळ करायच्या हेतूने गेलात का? नाही! तुम्ही सिनेमाचे दर्दी 'शौकीन' आहात म्हणून गेलात का? नाही!  निखळ करमणूक करून घेणं हा तुमचा हेतू होता जो तुम्ही साध्य केलात…चांगल्या करमणुकीला चांगली किंमत…हे ब्लू लेबलचं म्हणाल तर तसंच आहे…असो…आपण सेलिब्रेशन डिले नको करायला…चीअर्स" अनुपम बाकाच्या एका कडेला बसत म्हणाला.
श्रीकांतला त्याचा क्षणभर हेवा वाटला- 'करमणूक करून घ्यायची इच्छा असो वा नसो…आमच्या नशिबात कायम 'वैनीच्या मंगळसूत्रा'ची रडारडच' त्याच्या मनात विचार आला.
त्याने ब्लू लेबलचा कप तोंडाला लावला. दारूचा गरम स्पर्श त्याच्या जिभेला जाणवला. एकीकडे दारूचा घोट घसा आणि अन्ननलिका जाळत पोटात गेला आणि लगोलग एक शिरशिरी मेंदूपर्यंत पोहोचली. डोळ्यांची बुब्बुळं मोठी झाली, खांद्याचे स्नायू ताठरले आणि त्याने घट्ट डोळे मिटून मान जोरात हलवली.
"काय आवडली का?" अनुपमने श्रीकांतचे हावभाव बघत प्रश्न विचारला.
"झकास…मझा आ गया…तुमचं ते 'जवानी दिवानी'चं उदाहरण खरं आहे राव….आम्ही साला भिकारचोट क्वालिटीचंच कायम पीत आलो…कर्मदळिद्र म्हणायचं दुसरं काय!" श्रीकांतच्या डोक्यातली शिरशिरी अजून कमी झाली नव्हती.
"एक गंमत सांगतो- ही ब्लू लेबल म्हणजे जॉनी वॉकरचा ब्रांड! हा जॉनी खरंतर एक किराणा माल विक्रेता होता…पण सुरेख दारू बनवायचा…त्याने बनवलेली दारू पंचक्रोशीत प्रसिद्ध होती…तो मेल्यावर त्याच्या पुढच्या पिढ्यांनी दारूचा धंदा वाढवला, जगप्रसिद्ध केला. पण ज्याच्या नावाने आज ही मंडळी धंद्याचं दुकान चालवतायत त्या जॉनी वॉकरने कधीच दारू प्यायली नाही! बोला- आता कर्मदळीद्री कोण?तुम्ही का तो?"
"यडा म्हणायचा का खुळा?? ज्याला आयुष्यात आपण काय घडवलं ते साधं चाखून पाहता आलं नाही तो खरा कमनशिबी…जॉनी वॉकर" श्रीकांतने एक मोठ्ठा घोट घेऊन पेग संपवला. अनुपम हळूहळू घुटके घेत होता. त्याचा पेग संपून त्याने पुन्हा 'पेग भरू का?' विचारेपर्यंत त्याचं तोंड बघत बसणं भाग होतं.
"हां…तर या एवढ्या पावसात निघाला कुठे होतात तुम्ही?" अनुपमने पुन्हा नको तो प्रश्न विचारला.
अलीकडच्या काळात एकवेळ खाल्या मिठाला माणूस जागला नाही तर चालतं पण प्यायला दारूला तो जागलाच पाहिजे!
'काय सांगायचं याला? खरं सांगायचं…? पण याला खरंच आपल्या शोधात कुणी पाठवलं असेल तर?? ही दारू पाजणं वगैरे सगळा बहाणा तर नाहीये ना आपल्याला अडकावायचा? छे छे…याला कुणी पाठवला असेल असं नाही वाटत…नाहीतर मगाशी मी भूत आहे असं सांगितल्यावर ढुंगणाला पाय लावून पाळायची तयारी केली नसती त्याने. आणि याला सगळं सांगितलंच तरी काय फरक पडणारे? कुणीतरी म्हटलंच आहे…अनोळखी माणसाला आपले प्रॉब्लेम्स सांगण्यासारखं बेस्ट काही नाही… आपल्या आयुष्यातल्या इतर कुणालाच तो ओळखत नसल्याने तो आपल्या गोष्टीकडे आपण सांगू त्याच दृष्टीकोनातून पाहतो…त्याला आपलं दुःख कळू शकतं…आपल्यालासुद्धा हलकं वाटतं…सांगूयात….फार खोलात जाउन विचारायला लागला तर मग संशयी वाटेल थोडं…हट साला…मगाशी बोबडी वळली होती तेव्हाच पळवून लावलं असतं तर- काय करावं सुचत नाहीये हेच खरं"
"तुमचा काही सांगायचा मूड दिसत नाही! जाउद्यात…आपण अजून एक पेग घेऊया…" श्रीकांत तंद्रीत असताना अनुपमने पुन्हा ग्लास भरले होते  आणि तो उठून पुन्हा पाणी भरायला शेडच्या कडेला जायला निघाला.
"तसं नाही हो…सांगितलं तर तुम्हाला खरं नाही वाटायचं…आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे मला सांगायला लाज वाटतेय…" श्रीकांतने शरमिंदा होत ग्लास हातात घेतला.
"तुम्ही फार विचार करता हो…लाज वाटणं, अपराधी वाटणं या फार सापेक्ष भावना आहेत…जगाचा, आजूबाजूच्या लोकांचा फार विचार करत राहिलं की हे असं होतं.…इथे त्याची काही गरज नाही…माझ्यासमोर कसली लाज? त्यात तुम्ही दोन पेग डाऊन आणि मी तीन!! अशा वेळी जगजेत्ता असल्याचं माजोराडं वाटणारं फिलिंग आलं पाहिजे! दारू प्यायची कशाला…अशाच सापेक्ष क्षणांना विसरायला…जगाचा अजिबात विचार न करता मनात येईल ते बोलायला लावते दारू! बरोबर की नाही??" अनुपम जगज्जेता नाही पण तत्ववेत्ता नक्की झाला होता. म्हणजे तो नेहमीच असा असतो की हा दारूचा परिणाम आहे हे मात्र त्याला खात्रीने ठाऊक नव्हतं. शिरवळकरांच्या दुनियादारीत एक वाक्य होतं- 'दारू प्यायल्याच्या पहिल्या स्टेजला माणूस जगज्जेता असतो, दुसऱ्या स्टेजला महान तत्वज्ञ आणि तिसऱ्या स्टेजला स्वतःचं हगलं-मुतलं न कळणारं लहान मुल असतो'. म्हणजे अनुपम हा पेग संपता संपता ओकायला लागणार का काय? आणि त्याचं जाऊ दे पण आपल्याला ते 'फील्स लाइक्स दी किंग्स ऑफ दी वर्ल्डस' असं फिलिंग येतंय खरं! सांगूनच टाकू याला! काय फरक पडणारे….
"काय सांगू कामत साहेब तुम्हाला? मलाच ठाऊक नाही मी कुठे चल्लो---चाललोय….आठवतंय तेव्हापासून पळतोच आहे…कुठून निघालो धड आठवत नाही! कुठे जायचंय माहित नाही!"
"एवढा गोंधळ करू नका श्रीकांत राव…सोप्पं बोलू…मी तुम्हाला आठवायला मदत करतो-मगाशी तुम्ही बोल्लात की तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात--तुअम्च्य मनगटावर ही पट्टी…हे कसं काय बुवा?"
"हे?" श्रीकांत खिन्न हसला."साला….जगाची पण गंमत आहे नाही…जगणं नकोसं करून टाकतात आणि आपण आत्महत्येचा प्रयत्न केला की वाचवतात आणि पुन्हा कायद्याने शिक्षा करतात"
"म्हणजे?? ही पट्टी?" अनुपमने आश्चर्याने विचारलं.
"करेक्ट…मी जीव द्यायचा प्रयत्न केला होता…आत्महत्या…खुद की ख़ुशी के लिये खुद्खुशी….सुसाईड…."
"पण का??"
"खूप मोठ्ठी स्टोरी आहे"
"मग चालेल की…आपल्याकडे वेळ पण आहे आणि ब्लू लेबलपण" अनुपमने हातात बाटली नाचवत पावसाकडे बोट दाखवत म्हटलं.

''हे काय लिहिलं आहेस तू अनु?'' अनुपमची डायरी हातात धरून बाबाने विचारलं होतं-
'
आयुष्य. जीवन. जिंदगी. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास! माणूस अकाली गेला की लोक म्हणतात- 'मरण कुणाला चुकलंय बाबा?' पण माणूस जास्त जगला की 'जगणं कुणाला चुकलंय' असं कुणी का म्हणत नाही? उलट 'म्हातारा मस्त जगतोय…मेला की सोनं होईल त्याचं' वगैरे म्हणून कौतुकच जास्त होतं! असं का? कशासाठी? जगण्याचा एवढा अट्टाहास का? मेल्यावर काय होतं पाहिलंय कुणी? Seriously......Who has seen the other side? कदाचित खूप प्लेझंट असेल ती बाजू आणि त्या बाजूचे लोक कदाचित आपण करतो त्याच्या एकदम विरुद्ध विचार करत असतील!'
''हे असलं काहीतरी लिहितोस तू? मला तुझी फार काळजी वाटते बुवा''
म्हातारा गेला. काळजी करत करत गेला एकदाचा!!

'हा श्रीकांत काय गोष्ट सांगणारे कुणास ठाऊक?' पुढचा घोट घेताना अनुपमच्या मनात विचार आला.


क्रमशः

Tuesday, April 8, 2014

नाईटमेअर भाग १

                                                                            ***
जुलै महिन्यातली अमावस्येची रात्र होती. तिन्हीसांजा उलटून कित्येक तास झाले होते. संध्याकाळी कधीतरी पावसाची रिपरिप सुरु झाली आणि अंधार पडल्यावर त्याला चेव आल्यासारखा तो जोरात कोसळायला लागला. एरव्ही अमावस्येला चंद्रप्रकाश नसला तरी चांदण्यांचा प्रकाश असतो- पण मुसळधार पावसामुळे त्या प्रकाशाचासुद्धा फारसा उपयोग नव्हता. आधीच अमावस्या आणि त्यात पडणाऱ्या धो-धो पावसामुळे हायवेवरची वाहतूक गेल्या तासाभरात अगदीच कमी झाली होती. अशा अंधारात आडवाटेला कुठेतरी आडोसा घेऊन थांबायचं म्हणजे खरं तर भीती वाटायला हवी- एखाद्या जनावराची….हायवेवर अपघात होऊन गेलेल्या भटक्या अतृप्त मृतात्म्यांची….अज्ञाताची…! पण त्या अक्राळ-विक्राळ वरुणदेवाने या क्षणाला बहुतेक अशा सगळ्यांनाच पळवून लावलेलं होतं. उलट तो अंधार, तो पाऊस यांच्यात एक विचित्र सिक्युरिटी जाणवत होती. ढगांचा कडकडाट सुरूच होता. अचानक वीज कडाडली आणि सगळा परिसर 'उजळून' गेला. त्याने त्या वीजेच्या प्रकाशात आजूबाजूला पाहिलं. ती एक सिमेंटचा पत्रा टाकलेली शेड होती. तो उभा होता त्याच्या मागेच एक बाकसुद्धा होता. शेडच्या एका कोपऱ्यात पाण्याचा एक उघडा मोठा हंडा होता- जो एव्हाना दुधडी भरून वाहत होता. अंधारात पुन्हा अंदाज घेत तो त्या बाकावर बसला. पावसाच्या सरींनी शेडमधला बाक भिजवला आहे हे त्याला बसल्यावर कळलं. पाण्याचा थंडपणा मेंदूपर्यंत पोहोचला आणि तो 'भानावर' आला. कुठे आहोत आपण? इथे कसे पोहोचलो?

'आपण तर वाट फुटेल तिथे पळत सुटलो होतो, कुणी आपला पाठलाग केला असेल का? आपण निघून गेल्याचं कुणाच्याच लक्षात आलं असेल? नसेल आलं तरी काही विशेष नाही त्यात- ज्यांना आपली किंमत वाटायला पाहिजे त्यांना वाटत नाही तर मग 'ह्यांना' तरी कशाला वाटायला हवी? काय करावं समजत नाही- जे विसरायचं आहे ते साला प्रयत्न करून विसरता येत नाही…ज्याचं भान असायला हवं ते वास्तव हातातून निसटून गेलंय…काय करायचं अशा वेळी? सगळं संपवून टाकलं असतं पण तिथेसुद्धा नशीब आड आलं-' त्याचं लक्ष मनगटावरच्या पट्टीकडे गेलं. तो पुन्हा हताश झाला. अंगातली शक्ती खूप कमी झाली होती.

पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हं दिसत नव्हती. तास-दोन तास उलटून गेले असतील.त्याचा ग्लानी येउन डोळा लागला होता.-

तो आणि सायली सीफेसला बसले होते-सायलीचं डोकं त्याच्या खांद्यावर होतं. 'आपण कायम असेच एकत्र असू ना रे? तू मला सोडून नाही ना जाणार?' सायलीने त्याला विचारलं. 'सायली, तुला दरवेळी असा प्रश्न का बरं पडतो? तुला खात्री वाटत नाही का माझी? तुला मी इतका बेभरवशाचा वाटतो का?'. 'बरं बाबा, सॉरी पुन्हा नाही विचारणार…आपण सनसेट बघणार होतो ना? ते बघ… तो सुर्य किती भारी दिसतोय?'

त्याच्या डोळ्यासमोर काहीतरी लकाकलं. 'आपण खरंच सायलीबरोबर सूर्यास्त बघत नाहीये ना?' …छे छे…आपण तर कुठल्याशा निर्मनुष्य ठिकाणी पावसापासून वाचायला थांबलोय….पुन्हा वीज कडाडली असेल' म्हणून त्याने झोपेच्या ग्लानीतच त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण तो उजेड काही डोळ्यापुढून जात नव्हता- त्याने डोळे किलकिले करत समोर पाहिलं. तो वीजेचा प्रकाश नव्हता- टॉर्चचा होता. कुणीतरी त्याच्याकडे रोखून पाहत उभं होतं. तो ताडकन उठला. उठल्याक्षणी 'अंगाला चिकटलेले' ओलेते कपडे 'सुटले' आणि पुन्हा एक शिरशिरी डोक्यापर्यंत पोहोचली.

"क…क….कोण?"

समोर उभी असणारी व्यक्ती त्याला त्या अंधारात नीट दिसत नव्हती आणि टॉर्चच्या प्रकाशात त्याचे मळलेले-चुरगळलेले कपडे, दाढीचे खुंट वाढलेला, अर्धवट भिजून पिंजारलेल्या केसांचा अवतार मात्र समोरच्या व्यक्तीला स्पष्ट दिसत असणारे हे त्याला समजलं.

"तुम्ही इथे जवळपास राहणारे आहात का?' समोरच्या व्यक्तीने विचारलं.
"क-क-का? तुम्ही का चौकशी करताय?' त्याच्या घशाला कोरड पडली.
"नाही..इथे जवळपास एखादा पेट्रोलपंप किंवा कुठलं कार रिपेअर दुकान आहे का हे विचारायचं होतं?" समोरच्या माणसाने विचारलं.
"अ….माहित नाही…मी या भागात राहत नाही…पावसापाण्याचा आडोसा घ्यायला थांबलोय…"
"अच्छा…" असं म्हणून तो माणूस तिथेच उभा राहिला. टॉर्चचा प्रकाश अजूनही 'त्याच्या' तोंडावर मारलेला होता.
'आपल्याला शोधायला पोलिसांनी यालाच तर पाठवला नसेल ना?' त्याच्या मनात विचार आला. समोरच्या माणसाचा चेहरासुद्धा त्याला स्पष्ट दिसला नव्हता. आता जरा चौकशी करणं जरुरीचं होतं- हा चुकून पोलिस असलाच तर या क्षणाला अंगात ताकद आहे की नाही, पावसाचा जोर कमी आहे की जास्त याचा विचार न करता पळत सुटायचं असं त्याने मनाशी ठरवलं.
"तुम्ही कोण आहात? तुम्हाला कुणी पाठवलं आहे इथे? आणि त्या टॉर्चने आंधळा कराल मला" त्याने मोठ्या आवाजात सुनवलं. समोरच्या माणसाला त्याच्या आवाजातला फरक चटकन जाणवला. त्याने लगबगीने टॉर्चचा झोत स्वतःकडे घेतला.
"ओह…रिअली सॉरी…मी माझ्याच विचारात होतो आणि हा टॉर्च बाजूला करायचा राहिला….आणि हां…तुमची झोपमोड केली म्हणून पण सॉरी बरं का! मला खरंतर या अंधारात, मुसळधार पावसात कुणी भेटेल याचीच खात्री नव्हती- तुम्ही असे इथे झोपलेले बघून कुणीतरी माणूस दिसल्याचा आनंद व्हायच्या आधी मला भीतीच वाटली. जवळपास १० मिनिटं तुमच्या जवळ येउन तुम्हाला उठवावं की नाही हा विचार करण्यात गेलाय"
"ते सगळं ठीके हो…पण तुम्ही आहात कोण? आणि इथे काय करताय?"
"मी हायवेवरून जात असताना माझी गाडी बंद पडली…सो मी रिपेअर शॉप शोधायला या पावसात निघालो…."
"खरंच??काय नाव काय तुमचं? तुमच्याकडे काही आयडेंटीटी कार्ड वगैरे आहे का?"
"अ….आहे ना? दाखवतो की….पण अहो माझी गाडी बंद पडलीय ते बघायला मला मदत कराल का प्लीज?" त्याने तो टॉर्च काखेत धरून मागच्या खिशातून पाकीट काढलं आणि त्यातलं ड्रायविंग लायसन्स दाखवत तो म्हणाला- "मी अनुपम…अनुपम कामत!" त्याने टॉर्च त्या लायसन्सवर मारला आणि मग स्वतःच्या चेहऱ्याकडे फिरवला.

अनुपम कामत. अंगावरच्या फॉर्मल कपड्यांवरून कुठल्याश्या कॉर्पोरेट फर्ममधला माणूस वाटत होता- मोठ्या हुद्द्यावरचा! गळ्यात लूज केलेला टाय होता. पावसात कपडे भिजूनही अंगाला कलोनचा वास येत होता. गुळगुळीत दाढी केलेली होती. फक्त चेहरा आणि डोळे थकलेले वाटत होते. दिवसभराच्या दगदगीने असेल किंवा एकूणच कामाच्या रहाटगाडग्याने असेल- तो त्रासलेला, दमलेला वाटत होता!
"पटली ना खात्री तुमची? मी जेन्युइन माणूस आहे आणि मला आत्ता खरच मदत हवीय…कराल प्लीज" अनुपमने विचारलं.
"तुमच्याकडे गाडी आहे ना? मग तुम्ही ही बॅग बरोबर घेऊन का हिंडताय?" त्याने संशयाने त्याच्या हातातल्या बॅगेकडे पाहत विचारलं.
"गाडी बंद पडल्याचं लक्षात आल्यावर मी मदत मिळतेय का ते शोधायला निघालो…पण या भयंकर पावसात मदत मिळायची खात्री नव्हतीच…मग कुठे आडोसा, आसरा मिळाला तर निदान जुजबी सामान असावं बरोबर म्हणून घेतली मी बॅग बरोबर" 
"हे सगळं ठीके हो! पण मी तुमची काय मदत करणार? मलासुद्धा हा भाग नवखा आहे आणि त्यात हा अंधार आणि हा धो-धो पाउस"
"अहो इथून १० मिनिटं चाललात ना माझ्याबरोबर तर आपण गाडीजवळ पोहोचू! मग तुम्ही जरा धक्का वगैरे द्यायला मदत केलीत तर कदाचित गाडी सुरुदेखील होइल...."
"पण या अघोरी पावसाचं काय करायचं? तुम्ही पूर्ण भिजला आहात....आपल्याकडे छत्री नाही! त्यात मला बरं वाटत नाहीये....सकाळपासून मी धड काही खाल्लेलं नाही...आणि तुम्ही माझी मदत मागताय? नाही...नकोच हे सगळं..माफ करा पण मी आपल्याला काहीच मदत करू शकत नाही"
"मला माहितीय की मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करणं चूक आहे..पण गरजवंताला अक्कल नसते म्हणतात हेच खरं. मी...मी तुम्हांला खायला-प्यायला देतो की! माझ्याकडे बॅगेत आहे थोडंसं...आणि तुम्हांला हवं असेल तर गाडीने सोडेन जवळच्या बसडेपोला…तिथे जाण्यापूर्वी आपण वाटेत अजून खाऊ हवं तर"
"तुम्ही म्हणताय ते सगळं मान्य आहे मला…पण खरंच शक्य होईल असं वाटत नाही! आजच मी हॉस्पिटलमधून बाहेर पडलोय. हे पहा…" त्याने हातावरची हॉस्पिटलची पट्टी अनुपमला दाखवली. अनुपमने निराश होऊन नकारार्थी मान डोलावली.
"अरेरे….सॉरी माझ्या लक्षात आलं नव्हतं…" अनुपम अस्वस्थपणे तिथेच उभा राहिला. काही वेळ असाच गेला. 'आपण एवढं निर्धाराने नाही म्हटल्यावर अनुपम लगेच निघून जाईल' ही त्याची अपेक्षा होती पण तसं व्हायची काही चिन्हं दिसेनात!
"हा पाउससुद्धा थांबेल असं वाटत नाहीये…या निर्मनुष्य ठिकाणी, अमावास्येच्या रात्री बहुतेक आपण इथे अडकून पडणारोत" अनुपम मागच्या बाकावर जाउन बसत म्हणाला. त्याने हातातला टॉर्च बंद केला.
"आपण? म्हणजे तुम्हीसुद्धा इथेच थांबताय?" त्याने आवाजातली नाराजी शक्य तितकी लपवत विचारलं.
"अ….हो…मला एकट्याला गाडीला धक्का देणं, ती सुरु करायचा प्रयत्न करणं शक्य नाही…गाडी बंद पडलीय तिथपासून इथपर्यंत येतानाच्या दहा मिनिटांच्या अंतरात मला किर्र काळोख आणि दाट झाडी सोडून काही दिसलेलं नाही. त्यापेक्षा तुमची सोबत तरी असेल इथे! आय मीन तुम्हाला झोपायचं असेल तर झोप बिनधास्त या बाकावर…बरं नाहीये ना तुम्हाला? मी इथे बाजूला थांबेन…"
अनुपम जरा अधिकाराने म्हणाला. ती शेड ना त्याच्या बापाची होती ना अनुपमच्या…तो काय म्हणणार? तो बाकाच्या एका कडेला निमूट बसून राहिला.
अनुपम सांगतोय ते खरंय की त्याला कुणीतरी आपल्या मागावर पाठवलं आहे याचा त्याला अंदाज येत नव्हता.
"तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात ना? काही सिरिअस?" पाचेक मिनिटांनी अनुपमने विचारलं.
"नाही काही विशेष नाही" त्याने तुटकपणे उत्तर दिलं.
"ओह…आपलं नाव माझ्या लक्षात आलं नाही" अनुपमने पुन्हा प्रश्न विचारला.
"कारण मी नाव सांगितलंच नाही" पुन्हा तुटक उत्तर!
"अ…सॉरी…तुम्हाला माझ्या प्रश्न विचारण्याचा खूपच त्रास होतोय का?" अनुपमच्या आवाजातही थोडा ताठरपणा आला.
तो चपापला. "नाही हो…तसं काही नाही"
"मग…तुम्ही मला पार माझं आयडेन्टीटी कार्ड दाखवायला लावलं आणि आता तुम्ही मला तुमचं नावपण सांगायला तयार नाहीये…."
पुन्हा शांतता! तो अनुपमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं टाळून दुसरीकडे बघत राहिला. अनुपमने वैतागून दुसरीकडे पाहायला सुरुवात केलीय का हे बघायला त्याने दोनेक मिनिटांनी अनुपमकडे पाहिलं तर अनुपम त्याच्याकडेच बघत होता.
"श्रीकांत मिश्रा" त्याने फायनली नाव सांगितलं.
"……मिश्रा?…अरे वा…मग मराठी चांगलं बोलता की तुम्ही"
"का मराठी खूप अवघड भाषा आहे का बोलायला? की मिश्रा, शर्मा, यादव अशा आडनावाच्या माणसांनी शुद्ध मराठी बोलायचंच नाही असा नियम आहे?" श्रीकांतने खवचटपणे विचारलं.
"अ…माफ करा…मला असं म्हणायचं नव्हतं! पण एखादा सरदार जर का तमिळ बोलताना दिसला की थोडं कन्फ्युस व्हायला होईल ना….तसं झालं…खुळचटपणा आहे खरा……पण आपली सांस्कृतिक जडणघडणच अशी खुळचट आहे त्याला कोण काय करणार?"
श्रीकांतला हसायला आलं.

"अ….किती वाजलेत सांगू शकाल का?" पहिल्यांदाच श्रीकांतने अनुपमला प्रश्न विचारला.
"बारा दहा" अनुपमने हातातला टॉर्च सुरु करून त्याचा झोत मनगटावरच्या घड्याळावर मारत उत्तर दिलं.
श्रीकांत निराश होत उठला. शेडच्या कडेला उभं राहून डोकं वर बघत बाहेर काढून तो 'पाउस' पिण्याचा प्रयत्न करायला लागला. आधी अनुपमचं लक्ष नव्हतं. त्याच्या लक्षात आल्यावर त्याने श्रीकांतला हाक मारली.
"अहो मिश्रा भैय्या, तुम्हाला पाणी हवं असेल तर आहे माझ्याकडे! तुम्हाला ताप आहे म्हणालात ना…तिकडे कडेला उभे राहून भिजू नका" श्रीकांतने वैतागून त्याच्याकडे पाहिलं.
"काय हो, मिश्रा म्हटलं की पुढे भैय्या म्हटलंच पाहिजे का? त्यापेक्षा श्रीकांत म्हणा मला…श्रीकांत भैय्या म्हणू नका फक्त…श्रीकांत साहेब, श्रीकांत राव….नुसतं श्रीकांत म्हणा हवं तर"
"सॉरी श्रीकांत सर…हे पाणी घ्या…" अनुपमने श्रीकांतला पाण्याची बाटली दिली.
 
"तुम्ही काय या शेडमध्ये राहायच्या तयारीत आला होतात की काय?" पाणी पिउन झाल्यावर श्रीकांतने विचारलं-
"असं का विचारताय?"
"नाही म्हणजे…अशा भर पावसात गाडी चालू करायला मदत शोधायला निघालात…बरोबर ती बॅग आणि बॅगेत 'पाण्याची' बॉटल?"
"छे छे… बॅगेत खरंतर 'ही' बाटली होती…दुकानदाराने त्याच्याबरोबर पाण्याची बॉटल फ्री दिली म्हणून राहिली चुकून" अनुपमने व्हिस्कीची बाटली हातात धरून त्याच्यावर टॉर्चचा झोत मारला. 
"ओके….आता तुमच्याकडे ही एवढी 'बॅग' का आहे हा प्रश्न मला पुन्हा नाही पडणार" श्रीकांत मंद हसत म्हणाला.

अनुपमने घड्याळ पाहिलं. एक वाजला होता. विजा कडाडणं बंद झालं असलं तरी पावसाचा जोर अजून तसाच होता. श्रीकांत बाकाच्या दुसऱ्या कडेला बसून पेंगत होता. अनुपमने कितीही आव आणला तरी त्याला श्रीकांतच्या अवताराची थोडी भीती वाटली होती. दाढीचे खुंट, पिंजारलेले केस, मळकट कपडे, मनगटावरची मलमपट्टी…कोण आहे हा माणूस? हा इथे कसा? हे जे सगळं घडतंय ते खरं आहे की मी स्वप्न पाहतोय? हा श्रीकांत जिवंत माणूस आहे ना? की हा माणूस नसून-
अचानक वीज कडाडली आणि अनुपम दचकला. त्याने श्रीकांतकडे पाहिलं तर त्याला त्या आवाजाने आणि प्रकाशाने काहीच फरक पडला नव्हता. तो मान खांद्यावर टाकून झोपला होता.

मनावरचा ताण घालवायचं रामबाण औषध अनुपमच्या बॅगेत होतं. त्याने एकदाची व्हिस्कीची बाटली बाहेर काढली. थोडीशी व्हिस्की एका प्लास्टिकच्या छोट्या कपात ओतली आणि एका घोटात कप रिकामा केला. व्हिस्की त्याचा घसा आणि अन्ननलिका जाळत पोटापर्यंत पोहोचली.…मेंदूला झिणझिण्या आल्या आणि सबंध शरीर थरारलं. कडवट तोंडाने त्याने पुन्हा थोडी व्हिस्की कपात ओतली. पुन्हा एका दमात घोट घेण्यासाठी कप तोंडापाशी नेला. पहिल्या घोटामुळे झालेली घशाची जळजळ अजून कमी झाली नव्हती. तो जागचा उठला. शेडच्या कडेला येउन त्याने व्हिस्कीचा कप पावसात धरला.


"अनु, तुला कळत नाहीये की तुला समजून घ्यायचं नाहीये? मला ठाऊके की तू तुझ्या त्या छछोर मित्रांबरोबर जाऊन सिगारेटी ओढतोस….काही दिवसांनी दारू पिशील…पुढे अजून काय दिवे लावणारेस कुणास ठाऊक? हे सगळं बघायला मी नसलो म्हणजे झालं" बाबा वैतागून बोलला होता. आपण नाहीच ऐकलं त्याचं! तसाच त्रागा करत गेला. त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही…कसा शिवणार? माझ्यात जीव अडकला होता ना त्याचा! 

पाण्याने व्हिस्कीचा कप पूर्ण भरला तेव्हा अनुपम भानावर आला. 'छ्या…खूप जास्त पाणी झालं' त्याने मनाशी म्हटलं. त्याने मागे वळून पाहिलं तर-

क्रमशः