Pages

Thursday, December 5, 2013

'अटी, अपेक्षा': आफ्टर मॅट्रीमनी

**प्लीज नोट: हा जरी स्वतंत्र ब्लॉग असला तरी या आधीचा एक ब्लॉग वाचला असेल तर हा वाचायला जास्त मजा येईल असं मला वाटतं.

ती: पप्पांचा फोन येउन गेला दुपारी!
तो: हं! काय म्हणतायत ते?
ती: सहज फोन केला म्हणाले! पण मला माहितीय कशासाठी केला होता फोन.

(३० सेकंदानंतर!)
तो: तुला माहितीय मला अर्धवट वाक्य आवडत नाहीत! एकतर तू मला बातम्या बंद करायला लावून तुझ्याशी बोलायला म्हणून बसवलं आहेस!
ती: (चिडून) हो आणि टीव्हीवर बघता येत नाहीत म्हणून तू माझ्याशी बोलायच्या नावाखाली पेपर हातात घेऊन बातम्या वाचतो आहेस! उपयोग काय झाला टीव्ही बंद करायचा?
तो: (हसत) बाई गं, माझं सगळं लक्ष तुझ्या बोलण्याकडेच आहे! तू एक अर्धवट वाक्य बोलून थांबली आहेस. तुला पप्पांचा फोन आला होता! सहजच केला असं ते म्हणाले पण तुला माहितीय की त्यांनी का फोन केलेला…तर आता मला प्लीज सांगतेस का? मी पेपर बाजूला ठेवून तुझ्याशी बोलतो आहे!
ती: (हसून) अच्छा! म्हणजे लक्ष होतं तुझं!
तो: हो बाईसाहेब…आता बोल प्लीज!
ती: बाबांनी बोलण्याच्या ओघात शेजारच्या सलीलची बायको प्रेग्नंट आहे ही बातमी पुरवली मला!
तो: ओके…
ती: सहाच महिने झाले त्यांच्या लग्नाला…पण त्यांनी किती पटकन चान्स घेतला वगैरे वगैरे!
तो: ओके…मग?
ती: तुला कळत नाहीये का? गेल्या आठवड्यात मम्मीने कुणाच्यातरी डोहाळजेवणाचं सांगितलं होतं. माझा स्वभाव कसा आहे हे त्यांना माहितीय म्हणून मला डायरेक्ट काही बोलत नाहीयेत पण त्यांनी मागे लागायला सुरुवात केलीय!
तो: मग तुझं काय म्हणणं आहे या सगळ्यावर?
ती: फक्त माझं म्हणणं इंपॉटंट आहे का? तुला काहीच बोलायचं नाहीये? आपल्या लग्नाला दीड वर्ष झालंय. तुला यंदा प्रमोशन मिळालंय..थोडसं लांब का असेना पण आपलं स्वतःचं घर आहे! आता नातवंड कधी होणार म्हणून मम्मी-पप्पा मागे लागणं सहाजिक नाहीये का? शेवटी त्यांनाही लोक प्रश्न विचारत असतीलच की!
तो: सगळं तूच बोलतेयस! मी काय ठरवायचं आहे यात? आपण रेडी आहोत असं वाटतंय का तुला?
ती: मला काही प्रश्न आहेत! माझं चान्स घ्यायला रेडी असणं तुझ्या उत्तरांवर अवलंबून असणारे!
तो: फर्स्ट थिंग्स फर्स्ट- 'चान्स घेणे' हा फालतू वाक्प्रचार वापरणं मला अजिबात मान्य नाहीये…त्या प्रोसेसला एकदम क्षुल्लक केल्यासारखं वाटतं ते! आणि तुला कुठल्या प्रश्नाचं उत्तर हवंय?
ती: उत्तर नाही! उत्तरं म्हटलं मी! अनेकवचन!
तो: देजा वु…आपण लग्न करायचं ठरवलं तेव्हा तू सेम वाक्य वापरलं होतंस….आठवतंय? म्हणजे आता आपल्याला मुल व्हायला तू रेडी आहेस की नाही हे ठरवायला पण मी एक क्विझ आन्सर करायची आहे?
ती: (हसत) येस! माझ्याशी लग्न करताना या गोष्टीची कल्पना आली होतीच की तुला! सो…करूयात सुरुवात?
तो: (खांदे उडवत) ओके!
ती: मी बाळंत असताना माहेरी जाणार नाहीये! माझी मम्मी आणि तुझी आई दोघीही आपल्याबरोबर येउन राहतील!
तो: काय?
ती: हो, तुला बहिण नाही…त्यामुळे तुझ्या आईला माझं बाळंतपण करण्याची इच्छा असणारे! आणि मला बहिण असली तरी माझ्या आईचा तो हक्क मी नाकारू शकत नाही! सो मला दोघीही हव्या आहेत! तुला चालणारे का?
तो:यस…तू इतका विचार करतेयस याचं मला कौतुक वाटतंय!
ती: इतक्यात कौतुक नको! अजून प्रश्न राहिलेत! दुसरा प्रश्न- आपल्याला होणाऱ्या मुलाच किंवा मुलीचं नाव तू आणि मी ठरवायचं! पत्रिका बघून अक्षर ओळखा, मग नाव शोधा हा खेळ नको!
तो: (हसत) तरी मला प्रश्न पडलाच होता की तू अजून नावाबद्दल कसं काही बोलली नाहीस? माझी काहीच हरकत नाहीये याला! फक्त आपल्या बाळाच्या पूर्ण नावात माझं नाव असेल ना?
ती: हो असेल!
तो: मग हरकत नाही…पण माझ्यामते हा खूप नंतरचा प्रश्न आहे. आपण आत्ता काय करायचं आहे किंवा नाही ते ठरवत होतो!
ती: नाही…काही गोष्टी नंतरच्या आहेत पण त्या आत्ता बोलणं महत्वाचं आहे.
तो: कुठल्या शाळेत घालायचं हे पण ठरवून टाकूया का?
ती: चेष्टा करू नकोस. माझा महत्वाचा प्रश्न राहिलाय.
तो: विचारून टाक. माझं उत्तर होच असणारे नेहमीसारखं
ती: आपल्याला बाळ झालं की तीन-चार महिन्यांनी तू सहा महिने-वर्षभर सुट्टी घ्यायचीस!
तो: क्काय? ते कशाला?
ती: बाळाकडे लक्ष द्यायला!
तो: आणि मग तू काय करणारेस?
ती: मी जॉबवर रिझ्युम होणार! मलाही माझं करिअर आहे ना??
तो: आणि मी का घरी बसायचंय?
ती: आपल्याला बाळ झालं की माझ्या एकटीचं नसणारे ना ते? बाळ होईपर्यंत तू काहीच करू शकणार नाहीयेस…मग बाळ झाल्यावर तर तू काहीतरी करू शकतोस की!
तो: काहीतरी करणं म्हणजे नोकरी सोडून घरी बसणं? मला तुझा मुद्दा कदाचित नीट समजलाच नाहीये!
ती: सुट्टी घे म्हणाले मी! नोकरी सोड असं नाही म्हणते! 'वर्क फ्रॉम होम' कर! पार्ट टाईम ऑफिसला जा! आपण आत्तापासून विचार केला तर नक्की सोल्युशन निघू शकतं…पण आपलं बाळ जेवढं माझं असेल तेवढं तुझही असेल ना? मग त्याची काळजी घेणं, त्याला मोठं करणं या जबाबदाऱ्या फक्त मी का घ्यायच्या?
तो: कारण तू त्याची किंवा तिची आई असशील! आईच करते सगळं मुलांचं.…आणि हो, तो जॉब ऑफ चॉइस असतो,जॉब बाय फोर्स नव्हे! 
ती: म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की पुरुषांसाठी त्यांनी जन्माला घातलेल्या मुलांना मोठं करणं हा जॉब ऑफ चॉइस नसतो?
तो: असं कुठे म्हणतोय मी?
ती: तू मला मागे विचारलं होतंस आठवतंय-आज विमेन डॉमिनन्सचा काळ येऊनही पुरुषांना आर्थिक, सामाजिक गरजांसाठी का जबाबदार धरतात? हे कधी बदलणार? वेल,मला असं वाटतं की तुझ्या प्रश्नाचं उत्तर इथेच आहे! मी तुला म्हणतेय की फक्त आर्थिक, सामाजिक जबाबदारी घ्यायच्या ऐवजी घरगुती जबाबदारी घे! मी तुला गृहविष्णू व्हायला सांगतेय!
तो: गृहविष्णू? अगं पण मला जमणारे का ते? मी हे कधीच केलेलं नाहीये…आणि आधी कुणाला करताना पाहिलं नाहीये!
ती: मग आता कर. शिक. आपल्याकडे पुष्कळ वेळ आहे! …हे बघ- गेल्या काही वर्षात जग इतकं फास्ट बदललं आहे की 'फास्ट' हा शब्द पण स्लो वाटावा. आपल्या राहण्याच्या पद्धती बदलल्या, मेडिकल सायन्स डेव्हलप झालं, जग जवळ आलं..पण जे बदललं नाहीये ते म्हणजे शिक्षण, नोकरी-करिअर, लग्न आणि शेवटी कुटुंब हा क्रम. आणि तो कधीच बदलणार नाही. पण मग या क्रमात लग्न आणि कुटुंब आलं की नेहमी बायकांनाच मागे पडावं लागतं असं नाही वाटत तुला?
तो: मुलांची काळजी घेणं, त्यांना मोठं करणं म्हणजे मागे पडणं वाटतं तुला?
ती: करिअरच्या दृष्टीने म्हणालास तर 'हो'…तसं वाटतं मला! आणि तुला हा विचार स्वार्थी वाटेल पण जेव्हा मी तुला म्हणतेय की तूसुद्धा आपल्या बाळाच्या मोठं होण्यात जास्त चांगला हातभार लावू शकतोस तेव्हा तुला ते पटत नाहीये?
तो: मी कबुल करतो की तू मला कन्फ्युस केलं आहेस!
ती: ठीके! मग थोडा वेळ घे! सावकाश विचार कर! मला खात्री आहे की तुला माझं बोलणं पटेल…आणि आपण काहीतरी चांगला सुवर्णमध्य काढू शकू.
तो: हं…करतो विचार!
ती: ठीके! मी तुला गरमागरम चहा करून देते…आलं घालून! फ्रेश होशील.


चहाचं आधण ठेवून तिने हॉलमध्ये हळूच डोकावून पाहिलं. तो चक्क पेपर न वाचता, टीव्ही न पाहता शांतपणे विचार करत बसला होता! ती स्वतःशीच हसली!
'नक्की पटेल त्याला…आम्ही नक्की चांगले आई-बाप होऊ'

Saturday, May 25, 2013

'अटी, अपेक्षा' मॅट्रीमनी

तो: आज आपण भेटलोय खरे...पण गेल्या चार भेटीत मला तुला विचारायचं सगळं विचारून झालंय!! मी 'हो' म्हणायचा निर्णय घेतलाय! अनलेस तुला काही प्रॉब्लेम असेल तर बोलू आपण! तुला मला अजून काही विचारायचं आहे का?
ती: एकदम भेटल्या-भेटल्या विचारू का? तुला घाई आहे का? नाहीतर आधी जरा कुठेतरी जाऊन बसुयात का?
(अनपेक्षित उत्तर मिळाल्यामुळे हिरमुसलेला 'तो' काहीच न बोलता तिच्याबरोबर चालायला लागतो)
ती: मी फोन केला होता लंचटाईममध्ये! फोन डेस्कवर विसरून गेलेलास का?
तो: नाही! सॉरी पण खूप बिझी होतो! क्लाएंटची अर्जंट रिक्वेस्ट आलेली! मी लंच केलाच नाहीये! नंतर सावेने खालच्या टपरीवरून वडा-सांबार मागवलं!
(ऑफिसजवळच्या टपरीवरचा तेलकट वडा आणि पांचट सांबार त्याला आवडत नाही हे गेल्या चार भेटीत गप्पांच्या ओघात तिला माहीत झालंय…ती चालायचं थांबून रिक्षाला हात करते)
तो (भांबावून): कुठे?
ती: तू काही खाल्लं नाहीयेस ना नीट? काहीतरी खाऊ…तिथेच बसून बोलू!
(दोघे रिक्षात बसतात. आपण या मुलीला होकार देऊन काहीच चूक करत नाहीये याची त्याला स्वतःच्याच मनाशी पुन्हा खात्री पटते. हिला मला अजून काय विचारायचं आहे या विचारात त्याचा रिक्षा प्रवास संपतो)

तो: तुला लेट होतोय ना माझ्यामुळे घरी पोहोचायला? हॉटेलमध्ये पण खूप वेळ गेला!
ती: घरी माहितीय की मी तुला भेटणारे! मम्मी-पप्पा पण माझ्या 'हो' म्हणण्याची वाट बघतायत. सो त्यांना हवं ते उत्तर मिळणार असेल तर उशीर झाल्याचं चालेल त्यांना!
तो: मग तू काय उत्तर द्यायचं ठरवलं आहेस?
ती: ते तुझ्या उत्तरांवर अवलंबून आहे!
तो: माझं उत्तर सांगितलं मी तुला!
ती: उत्तर नाही! 'उत्तरं' म्हटलं मी…'अनेकवचन'
तो गोंधळून बघत राहतो. मग काहीतरी कळल्यासारखं म्हणतो-
तो: ठीके! तुझ्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत? पार्टनर म्हणून? नवरा म्हणून? काहीही न संकोच करता विचार! मी जमेल तेवढ्या प्रामाणिकपणे 'उत्तरं' देईन….'अनेकवचन'
ती: अपेक्षा…अ...तसंही म्हणायला हरकत नाही! एक सांगते… माझ्या अपेक्षा फार माफक आहेत असं मला वाटतं आणि म्हणून मी त्यांच्याबद्दल रिजीड आहे!
तो: ओके! ते मीसुद्धा ठरवू का प्लीज?
ती: नक्कीच! पहिला प्रश्न किंवा अपेक्षा- आपण लग्न करायचं ठरवल्यावर आणि केल्यावरसुद्धा- बाहेर जेवायला गेलो, लग्नाला गेलो, फंक्शनला गेलो तर मला कुठेही ऑकवर्ड 'पब्लिक डिसप्लेज ऑफ अफेक्शन' चालणार नाहीत! तुझं काय मत आहे याच्यावर?
तो: अ….लग्न होईपर्यंत ठीके म्हणजे मला १००% मान्य पण आहे पण लग्न झाल्यावरसुद्धा?
ती: हो! नातं आपल्या दोघांचं असणारे! ती जगाला दाखवणं मला मान्य नाही! चालणारे का तुला?
तो: मला आधी बाकीचे प्रश्न ऐकायचेत!
ती: म्हणजे तुझं आधीच्या प्रश्नाला नकारार्थी उत्तर आहे?
तो: मुळात 'पब्लिक डिसप्लेज ऑफ अफेक्शन' म्हणजे तुला नेमकं काय अभिप्रेत आहे हेच मला समजून घ्यायचंय! पण मग विषय पर्सनल मोरओव्हर 'प्रायव्हेट' होतो…म्हणून त्याच्यावर शेवटी चर्चा करू…कारण आपण एकमेकांशी लग्न करायचंय की नाही हे त्या एका उत्तरावर डिपेंड असेल तर तशी चर्चा करता येईल!
(तिला थोडं कौतुक वाटलं! त्याने दिलेलं उत्तर ठोस नसलं तरी उडवून लावण्यासारखं पण नव्हतं)
ती: हरकत नाही! पुढचा मुद्दा- माझ्या मागे माझी लग्नाची बहिण आहे! अजून चार-दोन वर्षात तिचं लग्न होईल! तेव्हा तिच्या लग्नात मला आर्थिक हातभार लावायचाय!
तो: सो?
ती: म्हणजे? तुझी या गोष्टीला काहीच हरकत नसेल?
तो: का असावी? तुझी बहिण! तुम्ही दोघी एकत्र मोठ्या झालात! तिच्या लग्नात, तिची हौस-मौज करून द्यायची तुझी इच्छा असू शकते….
ती: तुझ्या घरच्यांचं काय?
तो: वेल…पप्पांना काही घेणं-देणं नाही! आई काही म्हणाली तर बघता येईल!
ती: तिने विरोध केला तर? तुझा सपोर्ट असेल मला?
तो: हे बघ! आपल्या घरचे आपलं लग्न ठरवतायत त्याचा अर्थ आपल्या आयुष्यातले निर्णयसुद्धा तेच घेणारेत असा नाही! तुझ्याशी लग्न 'मी' करतोय!
ती: गुड! पुढचा प्रश्न-
तो: एक मिनिट! जेव्हा मी म्हटलं की तुझ्या निर्णयांना माझा सपोर्ट असेल तेव्हा मला वाटलं होतं की तुझे प्रश्न संपले असतील…
ती: अजून एक महत्वाचा प्रश्न उरलाय! तुला डिवचायला नाही सांगत पण आपण भेटण्याआधी मी ज्या मुलाला भेटले त्याने निव्वळ या प्रश्नामुळे नकार दिला!
तो: व्हॉट डू यु मीन?
ती: सांगते- लग्नानंतर मी कागदोपत्री माझं नाव बदलणार नाही! चालेल तुला?
तो: नाव बदलणार नाही? म्हणजे?
ती: म्हणजे नाव बदलणार नाही!
तो: असं करता येतं?
ती: अर्थात! लग्नाविषयीचे कुठलेच कायदे मुलीला नाव बदलायला सांगत नाहीत!
तो: आणि मग लग्नात नाव बदलायला सांगतात ते?
ती: ते शास्त्र झालं! आणि माझ्या माहितीप्रमाणे ते बंधनकारक पण नाहीये!
(तो काही न बोलता विचारात पडला)
ती: नाही पटलं नां?
तो: वेल…मीसुद्धा तुला भेटण्याआधी तीन मुली पाहिल्या! कुणाला जेवण करता येत असणारा नवरा हवा होता, कुणाला मी राहत असलेलं घर माझ्या नावावर झालेलं पाहिजे होतं, एकीला तर माझ्याकडे बघून तिच्या एका बॉयफ्रेंडची आठवण यायची आणि ती ते मला सारखं ऐकवत होती, मी ते ऐकून घ्यावं अशी तिचीही 'माफक' अपेक्षा होती! बट, आय मस्ट से….'हे' मी अजिबात एक्स्पेक्ट केलं नव्हतं आणि आता तू हा विषय काढला आहेस आणि त्यातला सिरीयसनेस जाणवून मला एकूणच लग्नसंस्थेची गम्मत वाटायला लागलीय!
ती: ती का?
तो: लग्न संस्थेने, ती बनवणाऱ्या लोकांनी कधी 'मुलीचं नाव' या विषयाचा गांभीर्याने विचार केलाच नसेल का? तुला असं एकदम हे 'लग्नानंतरचं नाव' हा विषय कधी जाणवला?
ती: नक्की नाही माहीत…पण एक इंसिडंस आठवतोय! माझ्या एका शाळेतल्या मैत्रीणीने मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली! खूप वर्षं आमची काहीच भेट नव्हती! तिचं लग्न झालेलं मला माहित नव्हतं आणि लग्न तिला बरंच मानवलं होतं त्यामुळे मी तिला फोटोतून ओळखलं नाही! अशा वेळी ती माझी बाल मैत्रीण आहे हे मला कळायचा एकच सोर्स होता…तिचं नाव! पण मानसी कुलकर्णी नावाने मला माहित असलेली माझी शाळेतली मैत्रीण मला तिचं नाव अश्विनी देशमुख सांगायला लागली तर मी ओळखणार कसं तिला?
तो: (कपाळावर हात मारत) सोशल नेटवर्क! कुणाचं काय? नी कुणाचं काय?
ती: का? तुला पटलं नाही?
तो: पटलं की! पण मला तुझा दृष्टीकोण ऐकायचाय!
ती: एक उदाहरण पुरे नव्हतं का? अरे सिम्पल- तुला नाही वाटत का की मी माझं नाव बदलून माझी आयडेन्टीटी बदलतेय! तू मला लग्नात ठेवलेलं नाव! तुझं आडनाव! मानसी कुलकर्णी ते अश्विनी देशमुख! तू जिच्याशी लग्न करायला कधीचाच होकार दिला आहेस ती मुलगी मी राहणारच नाही!
तो: हा निव्वळ तुझा विचार झाला! नाव बदललं तरी तुझा स्वभाव नाही ना बदलणार? तू आहेस तशीच राहशील….तुझी आयडेन्टीटी बदलेल अशी भीती का वाटतेय तुला?
ती: मला वाटतेय…पण मला नाव बदलायचं नाही हे ऐकल्यावर तू का कावरा-बावरा झालायस? लग्नानंतर तुझी बायको तुझं नाव तिच्या नावापुढे लावणार नाही याने तुझ्या 'आयडेन्टीटी' मध्ये काही फरक पडतोय का?
तो: फरक पडत नाहीये! पण-
ती: पण काय?
तो: तुला असं नाही वाटत की तुला वयाच्या पंचविशीनंतर एक नवीन आयडेन्टीटी निर्माण करायचा चान्स मिळतोय! कित्येकदा होतं की आपल्याला आपल्या नावाशी जोडली गेलेली एखादी गोष्ट, घटना, व्यक्ती नको असते पण निव्वळ आपल्या नावामुळे ती आपल्याला चिकटून गेलेली असते! मग ते नावच राहिलं नाही तर? तू या सगळ्याकडे या बाजूने का नाही बघू शकत?
ती: म्हणजे नावाशी माणसाची पर्सनलिटी, आयडेन्टीटी जोडलेली असते हे तू मान्य करतो आहेस?
तो: आपण फक्त एकमेकांना प्रश्न विचारतोय! त्यापेक्षा मी उत्तर देतो!! येस, मी तुझा मुद्दा मान्य करतो! नावाशी पर्सनलिटी जोडलेली असते! पण लग्नानंतर खूप काही बदलतं मुलींच्या आयुष्यात! आता फक्त मुलींच्याच का? हा प्रश्न तुला पडणार असेल तर आपल्या गेल्या चार भेटी व्यर्थ होत्या! असो! तर लग्नानंतर मुलींच्या आयुष्यात खूप काही बदलतं हे तू मान्य केलंस तर नाव बदलणं खूप क्षुल्लक वाटायला लागेल- पूर्वी बायका नाव बदलायच्या की! आपलं माहेरचं नाव त्यांनी कधी टाकलं नव्हतं पण नवीन घर, नवीन नाव, नवीन संसार या सगळ्यात तितक्याच रमायच्या!! आपल्या आई-आजीने हेच केलं…पूर्वी कशाला लग्न मानवल्यामुळे तुला ओळखता न आलेली बाई अश्विनी देशपांडेच होती…कुलकर्णी नाही!
ती: अश्विनी देशमुख…देशमुख… देशपांडे नाही!
तो: करेक्ट! मला माहित होतं की तू मी चुकीचं घेतलेलं आडनाव मला बरोबर करून सांगणारेस! तुझ्याही ती आता तशीच लक्षात राहिली ना? आता ती खऱ्या अर्थाने 'देशमुख' झाली असं म्हणायला हरकत नाही!
ती: (खजील होत) ओह सो यु ट्रिक्ड मी?
तो: डीड आय?
ती: यु नो यु डीड!! पूर्वी लग्न लौकर व्हायची! मुली फारशा घराबाहेर पडत नव्हत्या! शिकत नव्हत्या! त्यामुळे त्यांना ते ट्रान्झिशन खूप सोप्पं वाटत असेल! आता परिस्थिती तशी नाही! आता मी शिकले, घराबाहेर पडले, नोकरी करायला लागले, मला माझं स्वतंत्र विश्व आहे! त्यात माझी स्वतःची एक ओळख आहे! या पोझिशनला मला माझ्या आई-वडिलांनी शिकवून, मला मोठं करून पोहोचवलं- त्यांचं नाव मी एकदम बदलून टाकायचं?? का?
तो: तू आई-वडिलांचं म्हणू नकोस…फक्त वडिलांचं म्हण! आणि मग तसं तरी का? कशाला? आय मीन आपण त्या श्रीलंकन नावांसारखी आपल्या चाळीस पिढ्यांची नावंच जोडू मागे!
ती: तू विषय बदलतो आहेस!! माझा मुद्दा खूप सोप्पा आहे! लग्नानंतर मला फक्त माझ्या नावाने ओळखलं जावं अशी माझी अपेक्षा आहे! माझं नाव म्हणजे जे नाव घेऊन मी गेली २५-२६ वर्षं वावरते आहे ते! बँकेपासून ड्रायव्हिंग लायसन्सवर सगळीकडे नावं बदलत मी नाही हिंडणार! तुला पटत नसेल तर सॉरी!
तो: पण मला तुझा मुद्दा मान्य आहे!
ती: काय?
तो: हो… मला तुझा मुद्दा मान्य आहे! तुझ्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये! लग्नानंतरचं तुझा नाव काहीही असो त्याने तू माझी बायको असशील हे बदलणार तर नाहीये! की तुझं आणि माझं आडनाव वेगळं आहे म्हणून आपलं नातं तुला अमान्य असणारे? आणि राहता राहिला तुझ्या आयडेन्टीटीचा मुद्दा- तुला आत्ता ओळखणारे लोक लग्नानंतर तुला एकदम वेगळ्या नावाने हाक मारणारच नाहीत! त्यांच्यासाठी तुझं नाव जे आत्ता आहे तेच राहील…अर्थात तुला लग्न मानवणार नसेल तर! बाकी- लग्नानंतर माझी बायको म्हणून लोकांना काय नाव सांगायचं याची लिबर्टी मी तुला आत्ताच देतो! आर वि ओके नाऊ??
ती: तुझी मतं नंतर बदलणार नाहीत ना?
तो: माझी मतं आहेत ती! इंडियन क्रिकेट टीमचा फॉर्म नाही!!
ती: क्रिकेटवरून आठवलं-
तो: आता तुला क्रिकेट आवडत नसेल तर मग मीच नकार देईन तुला!
ती: नाहीरे! उलट दर वर्षी आपण एकदातरी स्टेडीयममधेच मॅच बघायला जायचं असं म्हणणार होते मी!
तो: मलाही तुला एक प्रश्न विचारायचाय!! आणि तुला उत्तर देणं अजिबात कंपल्सरी नाहीये! फक्त विचार कर आणि सांग कधीतरी! मे बी लग्नानंतर!!
ती: काय प्रश्न?
तोः प्रश्न म्हणजे गम्मतच आहे खरं तर! आपली पुरुषप्रधान संस्कृती…आजच्या ग्लोबलाइझ्ड जगात त्याला आपण 'मेल चाऊनिस्ट कल्चर' म्हणायला लागलो…मग विमेन राईट्स आले, रिझर्वेशन्स आली, विमेन इक्वालिटी झाली आणि आता विमेन डॉमिनंसचा काळ आला! तू मगाशी मला म्हणालीस की विवाह कायद्यात मुलीने नाव बदलायची सक्ती नाही! पण तोच विवाह कायदा आजच्या विमेन डॉमिनंसच्या जमान्यात नवऱ्याला आर्थिक, सामाजिक गरजांसाठी जबाबदार मानतो!! हो ना? मग हेसुद्धा बदलायला नको? 
त्याच्या अचानक अशा प्रश्न विचारण्याने ती थोडी सैरभैर होऊन विचारात पडली! त्याने तिच्या डोळ्यापुढे हात फिरवून तिचं त्याच्याकडे लक्ष आहे याची खात्री केली आणि 'आत्ता विचार नको करूस' अशा अर्थाने नकारार्थी मान डोलावली. त्याने हसून तिच्याकडे पाहिल्यावर तीसुद्धा हसली!
तो: आणि हां, तुझा तो मगाचचा प्रश्न अर्धवट राहिलाय नाही का? बाकी सगळ्या उत्तरांवर आपलं एकमत आहे हे गृहीत धरून बोलायचं का त्यावर आता?

घराच्या बिल्डींगच्या पायऱ्या चढताना तिला धाकधूक वाटत होती. घरी आनंदाला पारावर उरणार नव्हता. त्याने तिच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली होती! पण त्याने विचारलेल्या प्रश्नाचं काहीतरी समाधानकारक उत्तर शोधायला हवं असा विचार करतच तिने घराची बेल वाजवली! 
 

Sunday, April 7, 2013

खिडक्या, यंत्रमानव, सफरचंद आणि काळबेरं!

दहा-एक वर्षांपूर्वी बिल्डींगमध्ये कुणी नवीन टीव्ही, मशीन, फ्रीझ असं काही घेतलं की त्याची चर्चा सुरु व्हायची! 'पहिल्या मजल्यावरच्या शिंदेंकडे आलेल्या नव्या टीव्हीला १०० चॅनेल्स आहेत' किंवा 'बाजूच्या नाडकर्णीनीपण आपल्यासारखंच सिंगल टब ऑटोमॅटिक मशीन घेतलंय' हे साधारण गप्पांचे विषय! (या सगळ्या वाक्यांमध्ये कौतुकाचा भाग कमी आणि असूया किंवा अपेक्षा जास्त हे आलंच!) मग 'काळ बदलतो' का काय म्हणतात ते झालं आणि फ्रीझ, मशीन अशा गृहोपयोगी वस्तू एकूणच कॉमन आणि अशा चर्चांसाठी दुय्यम झाल्या..असूया, अपेक्षा तशाच होत्या पण गप्पांचे विषय, वस्तू मात्र चंगळवादी झाले. 'मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा बघणं', 'परफ्युम्स आणि गॉगल्स' किंवा 'मोबाइल फोन्स' हे मिरवायचे, खिजवायचे विषय झाले. यापैकी मोबाईल फोनचा उल्लेख चंगळवादी वस्तूंमध्ये करायचा की नाही हा वादाचा मुद्दा असू शकतो पण मोबाईल फोन हा लोकांच्या चर्चेचा, लाईफस्टाईलचा अविभाज्य घटक झालाय हे खरंय..बाय द वे फोन मीन्स 'स्मार्टफोन' बरं का!! माणसं स्मार्ट असोत वा नसोत, फोन स्मार्ट असणं आवश्यक झालंय.

'खिडक्या,यंत्रमानव….' असं वरकरणी अर्थहीन वाटणारं शीर्षक वाचून स्मार्ट लोकांना लिखाणाचा विषय लक्षात आलाच असेल. पण जे स्मार्ट नाहीयेत (नथिंग पर्सनल बरं का!) त्यांच्यासाठी थोडं स्पष्टीकरण- स्मार्ट फोनची दिवसेंदिवस वाढणारी बाजारपेठ सध्या चार मुख्य प्रकारच्या फोन्सनी व्यापली आहे! खिडक्या अर्थात 'विंडोस' फोन, यंत्रमानव म्हणजे ऍन्ड्रोइड फोन्स, सफरचंद म्हणजे ऍपलचा iफोन (न्यूटनचं सफरचंद नाही स्टीव्ह जॉब्सचं) आणि काळबेरं हा मी ब्लॅकबेरी फोनसाठी वापरलेला प्रतिशब्द आहे (या फळासाठीचा मराठी प्रतिशब्द कुणाला माहित असल्यास सांगावा). सहा-सात वर्षांपूर्वी भारतात फार थोड्या लोकांकडे नोकियाचा ९३०० अर्थात कम्युनिकेटर असायचा (आत्मस्तुती: माझ्याकडे पण होता). आपल्याकडे वापरला गेलेला तो पहिला स्मार्टफोन…पण तो स्मार्टफोन कमी आणि 'शोफोन' जास्त होता कारण त्याचा वापर दिखाव्यासाठीच जास्त व्हायचा. या फोनचे व्यावहारिक,तांत्रिक फायदे कुणी घेतलेले मी ऐकले नाहीयेत किंवा त्याच्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानसुद्धा तेव्हा उपलब्ध नव्हतं (इंटरनेट, थ्रीजी, वाय-फाय वगैरे). मग साधारण २००८ च्या आसपास स्मार्टफोनचा iगवगवा सुरु झाला. मोबाइल फोन ही गोष्ट एव्हाना कॉमन झाली होती पण iफोन प्रकार नवीन होता. स्टीव्ह जॉब्सने "मोबाइल फोन निव्वळ बोलण्यासाठी नसतो आणि त्याचा वापर इतर गोष्टींसाठी व्हायला हवा! फोन जीवनशैलीचा भाग व्हायला हवा" असं विधान iफोनसंदर्भात केल्याचं वाचलेलं आठवतंय! मला जेव्हा पहिल्यांदा iफोनच्या तंत्रज्ञानाबद्दल कळलं तेव्हा मला त्याचं अजिबात कौतुक वाटलं नव्हतं..कारणं पुन्हा एकदा- फोन वापरायला आवश्यक तंत्रज्ञानाचा अभाव आणि अवाजवी किंमत! माझ्या दृष्टीने तेव्हा नोकियाचे चांगले कॅमेरे असणारे किंवा सोनीचे गाणी ऐकायला बनवलेले फोन्स ही मोबाइल विषयक अपेक्षांची लिमिट होती! मग शिक्षणानिमित्त अमेरिकेला आलो आणि स्मार्टफोन लोकांच्या जीवनशैलीचा भाग होताना पाहिलं. सगळ्यांनी घेतला म्हणून, स्वस्तात मिळतोय म्हणून, गरज आहे म्हणून अशी वेगवेगळी कारणं स्वतःलाच देत शेवटी स्मार्टफोन घेतला आणि स्टीव्ह जॉब्सला मनातल्या मनात नमस्कार केला. 

सर्वप्रथम काळबेरं फोन आणि खिडक्या फोन याविषयी- आकडे काहीही सांगोत, मी तरी यंत्रमानव आणि सफरचंद फोन्सच्या तुलनेत बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांनी हे दोन प्रकारचे फोन वापरणारे लोक पाहिले आहेत! काळ्याबेऱ्या फोन्सचं वैशिष्ट्य म्हणजे कॉम्प्युटरला असतो तसा अख्खा 'की-बोर्ड' या फोन्सला असायचा! या 'की-बोर्ड' च्या बटनांच्या रचनेमुळेच त्या फळाचं नाव या फोनला दिलं गेलं. २०१० च्या शेवटाकडे आयफोनने बाजारपेठ व्यापून टाकण्यापूर्वी हे फोन्स अनेक सरकारी, कॉर्पोरेट जगात ऑफिशिअली वापरले जायचे. 'काळ्याबेऱ्या संवाद'प्रकारची जबर हवा होती. या फोनच्या वेडाची तुलना अमली पदार्थांच्या व्यसनाशी केली गेली. हे फोन घेऊन फिरणारे लोक 'श्या…तुझ्याकडे बीबी मेसेजिंग नाहीये?' वगैरे विचारायचे! पण काळाच्या ओघात (म्हणजे अवघ्या वर्ष-दीड वर्षात) ह्या फोनची बाजारपेठ कमी झाली. आता हे फोन घेऊन फिरणाऱ्या लोकांना 'श्या…तुझ्याकडे अजून बीबीच आहे?' असं ऐकून घ्यावं लागतं! नवीन आलेल्या काही काळ्याबेऱ्या फोन्सना पारंपारिक 'की-बोर्ड नाही'…आता याला व्यावसायिक स्पर्धेत स्वतःची ओळख विसरणं म्हणायचं की स्पर्धेत टिकण्यासाठी बदलणं म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न! खिडक्या फोन या प्रकाराविषयी मला तशी बरीच कमी माहिती आहे! या प्रकारचे फोन्स गेली कित्येक वर्ष अनेक कंपन्यांच्या माध्यमातून उपलब्ध आहेत पण आधुनिक म्हणता येतील असे खिडक्या फोन गेल्या दोन-तीन वर्षातले! गेल्या सहा महिन्यात आपली लाडकी कंपनी 'नोकिया' ने खिडक्या सिस्टम असलेले काही चांगले फोन बाजारात आणलेत आणि निव्वळ सफरचंद किंवा यंत्रमानव फोन घ्यायचा नाही म्हणून मी लोकांना हे नोकियाचे फोन विकत घेताना बघतोय!निव्वळ तांत्रिक बाबींबाबत बोलायचं तर खिडक्यावाले फोन्स तोडीस तोड नसले तरी बऱ्यापैकी आधुनिक आहेत! सफरचंद आणि यंत्रमानव फोन्समध्ये असणाऱ्या प्रत्येक नव्या 'फिचर'ला सिमिलर 'फिचर' या फोन्समध्ये आहे. पण या इतक्या झपाट्याने बदलणाऱ्या क्षेत्रात या फोन्सनी आघाडी घेणं सध्यातरी अवघडच दिसतंय!    

'स्मार्टफोन' ही किती मोठी बाजारपेठ होऊ शकते हे सर्वप्रथम सिद्ध करणारी कंपनी अर्थात सफरचंद! iफोनने २००७ मध्ये रिलीज झाल्यापासून विक्रीचे अनेक उच्चांक प्रस्थापित केले. 'टचस्क्रीन' अर्थात बोटाच्या स्पर्शाने वापरायचा फोन! स्टायलस वापरायचे फोन्स नवीन असताना टचस्क्रीनने लोकांना अचंबित व्हायला लावलं (मी गेल्या काही महिन्यात अनेक टचस्क्रीन फोन पहिले पण जो सहजपणा 'सफरचंदाच्या स्पर्शात' आहे तो कुठल्याच फोनमध्ये नाही हे मी ठामपणे सांगू इच्छितो). बँकिंगपासून सोशियल नेट्वर्किंगपर्यंत सगळं या फोनने लोकांच्या अक्षरशः हाताशी आणून ठेवलं. अन्न, वस्त्र, निवारासारखी फोनला गरज बनवण्याचं श्रेय माझ्यामते iफोनलाच! iफोनचे खंदे समर्थक आहेत तसे विरोधकसुद्धा आहेत. गमतीचा भाग असा की या विरोधकांपैकी अर्ध्या लोकांनी तो कधी वापरलेलासुद्धा नाही. iफोनची किंवा सफरचंद कंपनीची मिळेल तेव्हा टीका करणारे लोक मला माहितीयत आणि त्यांच्या अतिशहाणपणाची मला गम्मत वाटते. माझ्या मते iफोन हा जगातला सगळ्यात सोप्पा फोन आहे. iफोनमध्ये किती फीचर्स कमी आहेत आणि वापरायला किती कटकट आहे वगैरे iफोन न वापरणारे अधिकाराने बोलले की मला 'गेल्या अनेक वर्षात घराबाहेर न पडलेल्या माणसाने वाढत्या ट्राफिकबद्दल चर्चा केल्यासारखं वाटतं!' आजघडीला 'एलेगन्स,क्लास, सिम्पलीसिटी' हे तिन्ही शब्द जर कुठल्या एका फोन प्रकाराला लागू होत असतील तर तो म्हणजे सफरचंद फोन! हेसुद्धा नमूद करायला हवं की विरोधक करतायत ती सगळीच टीका निरर्थक नाहीये. गेल्या ६ वर्षात सहा नवीन iफोन मॉडेल्स बाजारात आली पण त्यांच्या एकूण बाह्यरूपात आणि अंतर्रुपात काहीच मोठे फरक पडलेले नाहीत! या फोनमार्फत केलेल्या कित्येक गोष्टींवर कंपनीचं नियंत्रण आहे. फोन वापरण्यात काही बंधनं आहेत. पण असं सगळं असतानासुद्धा एकूणच बाजारात सफरचंदी फोन्स लोकप्रिय आहेत हे खरं! 


सफरचंदी फोनची इतकी स्तुती केल्यावर मी अर्थात सफरचंदी फोन वापरत असेन याचा तुम्ही अंदाज बांधला असेलच. पण तुमचा अंदाज चुकलाय…मी सफरचंदी नाही तर यंत्रमानव फोन वपरतो. गेल्या दहा वर्षात आयटी क्षेत्राशी संबंधित बहुतेक धंद्यांच्या यशात 'गुगल' नावाच्या अचाट कंपनीचा खूप मोठा वाटा आहे! त्यामुळे स्मार्टफोन्स क्षेत्राशी गुगल संलग्न नसलं असतं तर नवल होतं. यंत्रमानव फोन तंत्रज्ञान बनवणारी कंपनी गुगलने ८ वर्षांपूर्वी विकत घेतली आणि जवळपास ५ वर्षांपूर्वी 'एचटीसी'नावाच्या कंपनीमार्फत या फोन्सनी पदार्पण केलं. गेल्या पाच वर्षांत या फोन्सनी मागे वळून पाहिलेलंच नाही! यंत्रमानव तंत्रज्ञान असलेले फोन्स आज अनेक महत्वाच्या कंपन्या बनवून बाजारात आणतायत! यात सगळ्यात आघाडीवर आहे 'सॅमसंग'! सॅमसंग कंपनीचा फोन घ्यायला लोक कधीकधी तयार नसतात कारण दर दोन महिन्यात जास्त आधुनिक नवा फोन बाजारात येतो आणि 'आपण अत्याधुनिक किंवा लेटेस्ट फोन घेतला' या आपल्या 'अभिमाना'ला (वाचा: 'गर्व/माज') तडा जातो. गुगलचे जीमेल, गुगल प्लस, गुगल टॉक, युट्युब असे अनेक प्रोडक्टस वापरताना मिळणारी फ्लेक्सिबिलीटी हे फोन्स वापरताना मिळते. वेळ आल्यास फोन कोणत्याही कॉम्प्युटरला जोडून आपल्याला डेटा ट्रान्स्फर करता येतो. आयफोनच्या तोडीस तोड किंवा कांकणभर सरस तंत्रज्ञान या फोन्समध्ये दिसतंय! सॅमसंग आणि सफरचंद कंपन्यांमध्ये या स्मार्टफोन प्रकाराशी संबंधित 'एकाधिकारा'वर (पेटंट) चाललेला खटला प्रसिद्ध आहे. त्यात सफरचंदाने बाजी मारून अनेक कोटी डॉलर्स नुकसान भरपाई म्हणून वसूल केलं. मात्र या प्रकाराने सॅमसंग जणू पेटून उठलं आणि गेल्या वर्षभरात त्यांनी काही 'जबर' (दुसरा शब्दच नाही) फोन बाजारात आणले आहेत. आयफोनने प्रस्थापित केलेली मक्तेदारी मोडून काढण्याची अपेक्षा फक्त यंत्रमानव फोनकडून होतेय यातच सगळं आलं.
'घरात कुत्री असून त्याच्याबद्दल न बोलणारा मालक किंवा मालकीण मला अजून भेटायचा आहे' हे जसं पुलंनी म्हटलंय तसंच स्मार्टफोन असून त्याचं अजिबात कौतुक न करणारा किंवा करणारी व्यक्ती मला भेटायची आहे. याला मीसुद्धा अपवाद नाही. माझ्या सॅमसंग एस थ्रीचं मी उठसूट कौतुक करत असतो आणि कुणाला नवीन फोन घ्यायचा असेल तर 'एस थ्रीच घे' असे फुकटचे सल्लेपण देत असतो. पण अलीकडे अत्यावश्यक झालेला फोनचा वापर काही बेसिक प्रश्न उपस्थित करतो- फोनला जीवनशैलीचा भाग मानलं तर तुमचा फोन तुमच्याविषयी काय सांगतो? तुम्हाला तुमचा कमी फीचर्स असलेला जुना फोन परत वापरावा लागला तर तुमची तयारी असेल का? आणि सगळ्यात महत्वाचं स्मार्टफोन लोकांची बुद्धिमत्ता आणि नितीमत्ता खालावायला कारण ठरतो आहे का? या प्रश्नाचं उत्तर 'हो' असेल तर मग स्मार्टफोनला चांगलं म्हणायचं का वाईट? (कुणी मराठी शाळेत शिक्षक असाल तर पुढच्या चाचणी परीक्षेत निबंधाला हा एक विषय जरूर ठेवा 'मोबाइल फोन: शाप की वरदान?'). पहिल्या प्रश्नाला कोणतंही तर्कशुद्ध उत्तर नाही! फोनकडे बघून माणसाच्या व्यक्तीमत्वाविषयी तर्क करणं म्हणजे 'कुणी कुठले कपडे घातलेत याच्यावरुन तो सिगरेट ओढतो का नाही?' या असंबद्ध प्रश्नाचं उत्तर देण्यासारखं आहे! नवीन फोन वापरायला सुरुवात केली आणि अचानक कुणाकडेतरी आपला जुना फोन दिसला की आपल्याला हसायला येतं. आपण एकेकाळी हा 'फडतूस' फोन वापरायचो हे फिलिंग आयुष्यात एकापेक्षा जास्त वेळा फोन बदलेल्या लोकांना नक्की येउन गेलं असणारे. पण अशा वेळी दोन क्षण थांबून विचार करायला हरकत नाही. नवीन फोन घेऊन एक अचिव्हमेंट पूर्ण केल्याचा आनंद साजरा करायला आणि वेळ आलीच तर जुना फोन परत वापरायला लागेल याबाबतीत मनाची तयारी करायला हे दोन क्षण पुरेसे आहेत! शेवटचा प्रश्न- खालावती बुद्धिमत्ता आणि नितीमत्ता. या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवाने 'हो' असं आहे. स्मार्टफोन प्रकाराचा मी कितीही चाहता, पंखा असलो तरी स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांनी फोनच्या वापरावर वयाची आणि आय.क्यू. यांची किमान मर्यादा ठेवण्याची सोय करावी असं माझं वैयक्तिक मत आहे! "सहा-सात वर्षांच्या आमच्या मुलाला आय-फोन हवा म्हणून तो हट्ट करतोय आणि त्याला आयफोन थ्री दिला तर त्याला तो नकोय, आयफोन फोरच हवाय" हे कौतुकाने सांगणारी अमेरिकन बाई मला भेटली तेव्हा 'लटकनेसे हाईट नाही बढेगी,मम्मी को बोलो कॉम्प्लान पिलाये' सारखं मला तिला 'स्मार्टफोन इस्तेमाल करनेसे अकल नही बढेगी, अपने बच्चे को बेकार आदते ना लगाये' असं म्हणावसं वाटलं. स्मार्टफोनचा वापर जेवढा चांगल्या गोष्टींसाठी होतो तेवढाच वाईट गोष्टींसाठी होतोय. स्मार्टफोन आणि सोशियल नेटवर्किंग यांच्या कॉम्बीनेशनमुळे 'इंट्रोवर्ट' हा शब्द इंग्रजी डिक्शनरीतून आणि 'अंतर्मुख' हा शब्द मराठी शब्दकोशातून काढून टाकायला हरकत नाही. जगाला आरडाओरडा करून काय सांगायचं? काय दाखवायचं? याच्यावर निर्बंध राहिलेले नाहीत. मोबाईल फोन हे या सगळ्या बदलाचं(?) मोठं कारण आहे. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खत येत नाही तसंच स्मार्ट वाटला म्हणून आयुष्य फोनच्या स्वाधीन करता येत नाही किंबहुना करूच नये! फोन, कॉर्डलेस फोन,मोबाईल फोन, स्मार्ट फोन या बदलाचे आपण साक्षीदार आहोत आणि याचं मला कौतुक आणि अभिमान आहे! पण मग अचानक नारळीकरांचं 'वामन परत न आला' आठवतं आणि मग सहजच विचारसुद्धा येतो…नवीन कोनाद** तयार होण्याची स्मार्ट फोन ही सुरुवात तर नाहीये ना? 

**ज्यांनी 'वामन परत न आला' किंवा 'Return of Vaman" वाचलं नाहीये त्यांना हा संदर्भ कदाचित लक्षात येणार नाही… त्याबद्दल क्षमस्व!! पण मराठी ब्लॉग वाचणाऱ्या बहुतेकांनी नारळीकरांची पुस्तकं वाचली असावीत असा अंदाज आहे.

Monday, March 11, 2013

न-लोकोत्तर! अ-आदरणीय!!

                                      ।।श्री श्री श्री न-लोकोत्तर अ-आदरणीय महा-पुरुषाय(?) न-नमः।।  

गेल्या अनेक शतकांच्या इतिहासात कला-क्रीडा-राजकारण या सगळ्या क्षेत्रात अनेक श्रेष्ठ मंडळी भारताच्या इतिहासात होऊन गेली. आपल्या राजकारणाला आर्यचाणक्याचा वारसा आहे, कलेच्या क्षेत्रात कालिदासाच्या ग्रंथसंपदेपासून ते दादासाहेब फाळकेंच्या सिनेसृष्टीपर्यंत आपल्याकडे मिरवण्यासारख्या खंडीभर गोष्टी आहेत! क्रीडा क्षेत्रात खूप प्राचीन नावं नसली तरी हॉकीचा जादुगार ध्यानचंद ते क्रिकेटचा देवबाप्पा सचिन तेंडुलकरपर्यंत अनेक खेळाडू या देशासाठी खेळले आहेत! मात्र गेल्या दशकाकडे जरा तिरकस नजरेने पाहिलं की या सगळ्या क्षेत्रात काही अफाट 'न-लोकोत्तर', 'अ-आदरणीय' मंडळी वावरताना दिसतायत (मराठी व्याकरणात न-लोकोत्तर आणि अ-आदरणीय हे शब्द नाहीत हे मला माहितीय पण तरी मी मुद्दाम लिहिलेत. स्पष्टीकरण पुढे लिहीनच). यातल्या काही  'रत्नां'बद्दल लिहिण्याचा हा खटाटोप! राजकारण क्षेत्रात राजपुत्र चि. राहुल गांधी, क्रीडा क्षेत्रात श्री श्री श्री सर रवींद्रसिंहजी जडेजा, आणि कलाक्षेत्रात (?) थुसार कपूर (यांना श्री. , कु., चि. यातलं नेमकं काय लागू होतं याची कल्पना नसल्याने ? लिहिलं असून एका आकडेज्योतिषाच्या सांगण्यानुसार त्यांच्या नावाचा उच्चार आम्ही 'थुसार' असा करतो) हीच ती न-लोकोत्तर, अ-आदरणीय मंडळी! (मी हे नमूद करू इच्छितो की या तिन्ही क्षेत्रात अशी माणसं शेकड्याने असतील पण या तिघांवर माझा 'विशेष जीव' आहे)

या प्रत्येकाने काहीही विशेष करतासुद्धा यांच्याबद्दल जेवढं लिहिलं, बोललं जातं ते पाहून मला आश्चर्य वाटतं. राष्ट्रीय स्तरावर लोकांना माहीत असलेली ही तिन्ही माणसं निष्क्रिय माणसं आहेत का? उत्तर 'नाही'..पण यातल्या कुणीतरी प्रचंड कौतुकास्पद कामगिरी केलीय का? उत्तर 'नाही'..ही सगळी हुशार, जिनियस माणसं आहेत का? उत्तर 'नाही'.. ही सगळी मठ्ठ माणसं आहेत का? तर याचंही उत्तर 'नाही'! यातल्या कुणीच अनादर वाटावा, चीड यावी अशी कामगिरी (अजूनतरी) केलेली नाही पण म्हणून त्यांच्यातल्या कुणाबद्दलच मला जरासुद्धा आदर वाटत नाही म्हणून अ-आदरणीय. या सगळ्यांचीच आत्तापर्यंतची कामगिरी पाहून, वक्तव्यं ऐकून कधी गालातल्या गालात तर कधी पोट धरधरून हसायला येतं, यदाकदाचित यातल्या कुणीही काही कर्तुत्व गाजवलं तरी ते 'लक बाय चान्स' असेल असं मला वाटतं म्हणून हे तिघे एकविसाव्या शतकातले 'न-लोकोत्तर' पुरुष आहेत!  

चि. राहुल गांधी हे राजघराण्यात जन्माला आले हे त्यांचं कर्तुत्व नाही (मणिशंकर अय्यर यांना तसं वाटू शकतं). दाढीचे खुंट वाढलेला चेहरा घेऊन आणि खादीचे कपडे घालून आजी-पणजोबांच्या पुण्याई(?)वर संपूर्ण देशभर भटकणाऱ्या ४३ अ-संसारी, युवा पुढाऱ्यामध्ये आदर वाटावा असं काहीच नाही! त्यांच्या शैक्षणिक पात्रतेपासून त्यांच्या नागरिकत्वापर्यंत प्रत्येक गोष्टीवर वाद आहेत. देशाच्या अजून अस्तित्वात असलेल्या सगळ्यात जुन्या राजकीय पक्षाची धुरा (उपाध्यक्ष) त्यांना देण्यात आली आणि या पक्षाच्या घराणेशाहीवर शिक्कामोर्तब झालं. त्यांनी जीव- तोडून उत्तर प्रदेशमध्ये प्रचार केला पण पक्षाला त्याचा अजिबात फायदा झाला नाही. त्यांनी या पराभवाची जबाबदारी मान्य केली (लॉल) आणि पुन्हा त्यांचा उदोउदो झाला. आपल्या सारख्या सामान्य लोकांनी काही चांगलं केलं तरी कौतुक होत नाही..पण राजपुत्राची गोष्टच वेगळी..त्याच्या हरण्याचं पण कौतुक करायला लोक तयार असतात ही शोकांतिका! भ्रष्टाचार, दहशतवाद या महत्वाच्या विषयांवर त्यांनी कधीच ठोस मतं मांडलेली नाहीत. तूर्तास ते २०१४ च्या लोकसभा निवडणुकींसाठी तयारी करत असल्याचं समजतं. त्यांच्या नेतृत्वामुळे उत्तर प्रदेशातल्या निकालांची पुनरावृत्ती राष्ट्रीय पातळीवर होवो अशी माझी अपेक्षा आहे (पण याचबरोबर मुलायम-माया-करुणा-ममता असे सोज्वळ शब्द नावात असलेल्या कोणत्याही नेत्याच्या पक्षाकडे देशाच्या राजकारणाच्या नाड्या जाऊ नयेत ही कळकळीची प्रार्थनासुद्धा आहे)

थुसार कपूर हेसुद्धा घराणेशाही कोट्यातून सिनेसृष्टीत आलेल्या फरदीन-उदय-झायेद-हर्मन यांच्यातलं एक नाव, जे बालाजीच्या कृपेने आजही तग धरून आहे! 'मुझे कूच कहना है' अशा नावाच्या सिनेमातून चंदेरी दुनियेत आलेल्या थुसारला काय सांगायचं होतं ते अजून इतक्या वर्षांनीसुद्धा कुणाच्या बहुतेक लक्षातच आलेलं नाहीये. गोलमाल नामक चित्रपट मालिकेत केलेली मूक-बधिर 'लकी'ची भूमिका लोकांमध्ये बरीच फ़ेमस आहे. या भूमिकेसाठी त्याला अभिनयाचा पुरस्कार वगैरे पण मिळालाय जे बघून त्याच्या वडलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याचे आपण पाहिलंय (लॉल). खरंतर त्याचा केकाटणे-गोंगाट स्वरूपी अभिनय पाहून 'अभी नय' भाई बस करो असं म्हणायची खूप इच्छा होते पण पुन्हा एकदा आपलं ऐकायला कुणीच नसतं ही शोकांतिका! 'खाकी' हा त्याची  भूमिका असलेला एकमेव चित्रपट सोडून मी त्याचा एकही चित्रपट सिरीयसली बघू शकलेलो नाही..'शूटआउट एट लोखंडवाला' नामक सिनेमात त्याला कुख्यात शार्प शूटर दिलीप बुवाची भूमिका करताना पाहणं हा माझ्या मते त्या गुंडाचा अपमान होता. तर असे गुंडाचे आणि हिरोचे 'जबरदस्त' रोल करणाऱ्या थुसारला अमेरिकेत कुठल्यातरी पब का क्लबच्या बाहेर तो 'अंडर-एज' असल्याचा संशय येउन अडवलं होतं हे वाचल्याचं आठवून पण मी 'लोळतो'! स्वतःच्या नावामध्ये एक निष्कारण 'h' घालून तो थांबलेला नाही..नुकतंच त्याच्या सांगण्यावरून एका चित्रपटाचं नाव "ब"जाते रहो ऐवजी "भ"जाते रहो केलं गेलंय… (पुन्हा लॉल). सरतेशेवटी थुसार हा एक 'अभिनेता'(?) आहे आणि तो ज्या कुठल्या भूमिका करेल त्याला तो त्याच्या अनोख्या,विनोदी शैलीतच करणार हे मी गृहीत धरलंय आणि त्याला कधीतरी काहीतरी जमेल ही शक्यता बाद केली आहे.      

सरतेशेवटी, लास्ट बट ऑफकोर्स नॉट द लीस्ट- श्री श्री श्री सर रविन्द्रजी जडेजा! मुळात मी या महा-पुरुषांबद्दल आत्ता अचानक लिहायला घेतलं याचं मुख्य कारण 'सर' आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या अतर्क्य, अचाट, अफाट, अबब कामगिरीने मला इतक्या दिवसांनी लिहायला प्रोत्साहन दिलंय! त्यांच्या केशरचनेपासून त्यांच्या नृत्यकौशल्यापर्यंत प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीचं कौतुक झालंय. निव्वळ ३ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 'बॉल ऑफ द सेन्चुरी' टाकलाय आणि समस्त क्रिकेट विश्वाला 'आर्ट ऑफ लिविंग' चा धडा घालून दिलाय! स्थानिक कसोटी सामन्यात त्यांनी ३०० धावांचा बेंचमार्क सेट केलेला असल्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांनी धावा केल्या नाहीत की त्यांची चेष्टा होते जी त्यांच्या पंख्यांना मान्य नाही! सचिन तेंडुलकर आणि झहीर खान यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी 'जड्डू' नावाचं एक हॉटेल पण काढलंय. सर बहुचर्चित IPLच्या पहिल्या सिझनमध्ये विजेत्या राजस्थान रॉयल संघात होते. हा संघ इतर सगळ्यांपेक्षा 'लिंबूटिंबू' मानला गेला होता पण तेव्हा सरांबद्दल कुणालाच माहीत नव्हतं. सरांमुळे राजस्थान जिंकलं. सर भारतीय संघात आल्यापासून आपण एकही कसोटी सामना हरलेलो नाही. थुसार आणि चि. गांधी यांची इतकी थट्टा केल्यावर मी सर जडेजा यांच्याबद्दल असं काहीतरी लिहू शकेन अशी मला अपेक्षा होती. पण माझी हिम्मतच होत नाहीये..शेन वॉर्न सारखा महान खेळाडू सरांना 'रॉकस्टार' म्हणतो तर मी बापडा त्यांना काय विशेषणं लावणार? (मराठीत 'रॉक' म्हणजे दगड नाही का?)  

अशा काही घटना आहेत ज्या कधीच घडू नयेत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. १) सर जाडेजांना 'विस्डेन' चा 'क्रिकेटर ऑफ द यिअर' पुरस्कार मिळणं २) थुसार कपूरला अभिनयाचं ऑस्कर मिळणं..आणि ३) चि. राहुल गांधींना नोबेल शांतता पुरस्कार मिळणं. या सर्व अ-आदरणीय लोकांची गेल्या पाच-सात वर्षातली कामगिरी आणि मी उल्लेख केलेल्या सर्व पुरस्कारांची गेल्या कित्येक दशकांमधली क्रेडिबिलीटी पाहता या सगळ्या गोष्टी अशक्यच वाटतायत..पण काही गोष्टी मात्र नक्की शक्य आहेत. १) सर जडेजा १५-२० कसोट्या आणि अजून ३०-४० वन डे खेळून आधी कमेंटेटर आणि नंतर राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष बनणार २) थुसार कपूरला २०२० साली पद्म पुरस्कार आणि २०३५ सालचा अभिनयाचा राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार मिळणार आणि ३) चि. गांधींना इतर जवळपास सर्व माजी 'खांग्रेस' पंतप्रधानांसारखा 'भारतरत्न' मिळणार (ही शेवटची गोष्ट कधीच होऊ नये अशी खरंच खूप खूप जास्त इच्छा आहे म्हणून ती लिहिणार पण नव्हतो पण गेल्या सहा-सात दशकातला कारभार पाहता या सगळ्या विनोदी कल्पनांमध्ये भीषण वास्तवाचा उल्लेख असावा असं वाटलं म्हणून लिहिली) 

मला शाळेत नेहमी शिकवलं गेलंय की कोणत्याही लिखाणाची सुरुवात आणि शेवट चांगला असला तर वाचणाऱ्यांच्या मनात त्याचा 'ठसा' उमटतो. हे डोक्यात ठेवून लिहायची सुरुवात करताना चाणक्य, तेंडुलकर ही नावं लिहिली. पण शेवट गोड कसा करू? कडू, खारट असं काही चुकून खाल्लं गेलं की साखर खाऊन तोंड गोड करता येतं पण चुकून खूप गरम चहा-कॉफीचा घोट घेऊन जीभ भाजली की काहीच करता येत नाही…पुढचे काही तास, दिवस कशालाच चव लागत नाही. थुसार, सर जडेजा आणि चि. गांधी यांची इतकी स्तुती वाचून कुणी शेवटपर्यंत हे सगळं वाचणारे का याचीच खात्री नाहीये! पण इतकंच म्हणतो की आपल्याला माहित असलेल्या प्रत्येक क्षेत्रात एकतरी अशी व्यक्ती सापडते जिच्याशी आपलं कधीच पटत नाही. जिव्हाळा नसतो, भांडणंदेखील नसतात पण तरी उगाचच आपल्याला काहीतरी खटकत राहतं! अशा मला खटकणाऱ्या माणसांबद्दल जाहीर मंचावर 'स्तुती' करण्याची माझी हौस मी भागवून घेतली. त्यांची उघडपणे थट्टा करण्यात कोणाच्याही आणि 'कोणत्याही' भावनांना ठेच लागली असली तर सॉरी पण 'नो सॉरी'!! येत्या काळात ही मंडळी देशाचं, त्यांच्या त्यांच्या क्षेत्राचं अतोनात नुकसान न करता आपल्याला (स्पेसिफिकली मला) अशीच हसवत राहतील अशी बालाजीचरणी प्रार्थना!

पुन्हा एकदा-
                             ।।श्री श्री श्री न-लोकोत्तर अ-आदरणीय महा-पुरुषाय(?) न-नमः।।

Monday, January 28, 2013

लिंग्वा फ्रांकाच्या दिशेने!

बायबलमधली एक खूप जुनी गोष्ट आहे. फार फार पूर्वी, महाप्रलय झाल्यावर जगातली सगळी माणसं एकत्र जमली. त्यांनी सगळ्यांनी मिळून एक उंचच उंच इमारत 'बेबल' बांधायचं ठरवलं. इतकी उंच की त्याचं शिखर (टॉवर) स्वर्गापर्यंत पोहोचलं पाहिजे. देवाला जेव्हा हे समजलं तेव्हा तो चपापला. ही माणसं खरंच स्वर्गापर्यंत येऊ शकतात हे त्याच्या लक्षात आलं आणि तो घाबरला. माणूस स्वर्गात पोहोचून त्याची जागा घेईल अशी भीती वाटली त्याला बहुतेक. जर का ही इमारत बांधणं थांबवायचं असेल तर लोकांमध्ये फुट पाडणं आवश्यक होतं. त्याने आवश्यक ती पावलं उचलली,इमारत तोडून टाकली आणि वेगवेगळ्या भाषा निर्माण केल्या. तोपर्यंत एकाच भाषेत बोलणारी सगळी माणसं वेगवेगळ्या भाषा बोलायला लागल्यावर त्यांच्यात फुट पडली. देवाचा हेतू साध्य झाला आणि बेबलचं काम अर्धवट राहिलं. एकमेकांशी संपर्क करण्याचं माध्यमचं माणसामध्ये गट निर्माण व्हायला कारणीभूत ठरलं हा सगळ्यात मोठा विरोधाभास. देवाने तेव्हा किती भाषा निर्माण केल्या याची मला कल्पना नाही, पण बायबलमधल्या या गोष्टीकडे वस्तुनिष्ठपणे पाहिलं की मला गंमत वाटते. सध्या जगभरात ६००० हून अधिक भाषा अस्तित्वात आहेत (इति विकिपीडिया). 

जगातील इतर सर्व सजीव (प्राणी) आणि माणूस यांच्यातल्या मुलभूत फरकांपैकी एक म्हणजे 'वाचा' त्याहीपेक्षा 'भाषा'..मार्क पॅगल या बायोलॉजीस्टच्या मतानुसार भाषा हे माणसाकडे असणारं सर्वाधिक धोकादायक हत्यार आहे. "तुम्ही तुमच्या डोक्यातली एखादी कल्पना भाषेच्या माध्यमातून कोणतीही शस्त्रक्रिया न करता दुसऱ्याच्या डोक्यात इम्प्लांट करू शकता" असं ते म्हणतात. भाषा ही मानवी उत्क्रांतीतली सगळ्यात महत्वाची पायरी असल्याचं ते नमूद करतात. 'होमो सेपियन' अर्थात आधुनिक माणूस जेव्हा भाषा बोलायला लागला, तेव्हा त्याचं सामाजिक शिक्षण इतर पूर्वजांच्या मानाने खूप चटकन झालं. पॅगल पुढे म्हणतात की असं असताना त्याने खूप विचित्र, अनाकलनीय कृत्य केलं- त्याने वेगवेगळ्या भाषा निर्माण केल्या. सेपियनच्या उदयानंतर गेल्या २ लाख वर्षांच्या काळात माणूस जगभर पसरला. काळानुसार, प्रदेशानुसार भाषेत काही अंशी होणारे बदल जरी गृहीत धरले तरी एखाद्या मोठ्या भूभागात साधारण एकच भाषा बोलणारी माणसं असायला हवीत. पण आकडे काहीतरी वेगळंच सांगतात. जगात जिथे जिथे जास्त लोकसंख्येची घनता जास्त आहे तिथे तिथे भाषांची विविधता जास्त आहे..भारत देश हे याचं उत्तम उदाहरण आहे. दोन अडीच लाख वर्षात प्रादेशिक गरजांनुसार, कधी एखाद्या विषयाशी संबंधित ज्ञान जपून ठेवायला, कधी सुरक्षिततेसाठी वेगवेगळ्या भाषा निर्माण झाल्या ही परिस्थिती सत्य मानली तरी गेल्या शे-दोनशे वर्षात हाच मायग्रेट झालेला माणूस पुन्हा जागतिकीकरणाच्या निमित्ताने जवळ येतोय..आणि या जवळ येण्याच्या प्रक्रियेत अडसर असणारा सगळ्यात मोठा घटक ठरतोय 'भाषा'. यावर उपाय- लिंग्वा फ्रांका! जगभरात सगळीकडे फक्त एकच भाषा अधिकृतपणे वापरण्यात यावी. कार्यालयीन, सामाजिक किंवा राजकीय व्यवहार हे त्या एकाच भाषेतून होतील. ही भाषा जागतिक शिक्षणाचं माध्यम असेल. एक विश्व..एक बोलीभाषा, कर्मभाषा! (पॅगल यांचा या संदर्भातला व्हिडीओ इथे पाहता येईल)

आपल्या देशाबद्दल बोलायचं तर भारताच्या सामाजिक वैविध्यातला महत्वाचा घटक आहे 'भाषा'! हिंदी ही राष्ट्रभाषा सोडून वीसच्यावर अधिकृत, आणि शेकड्याने अनधिकृत भाषा आपल्याकडे आहेत..इतकंच काय तर आपल्या राज्यसीमा या भाषांवर आधारित आहेत (आणि अर्थात सीमावाद्सुद्धा). कित्येक भाषांमध्ये विपुल प्रमाणात काव्य,शास्त्र, साहित्य, कला निर्मिती होते. प्रत्येक राज्याचं, त्यातल्या लोकांचं अमुक-एक भाषेवर प्रेम आहे आणि या प्रेमातूनच कित्येक प्रादेशिक राजकीय पक्षसुद्धा आपल्याकडे अस्तित्वात आहेत. धर्म, जात, वर्ण या सगळ्यांवरून भांडण्याच्या भानगडीत हा भाषेचा मुद्दा थोडा दुर्लक्षित झाला असं म्हणावं लागेल. पण सोशियल नेटवर्किंग, व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या हायटेक जगात 'विविध भाषा' हा प्रकार खरंच अनावश्यक वाटतो. मला माहितीय की या विधानाला कित्येक संस्कृती 'रक्षकांची' एक भुवई ऑलरेडी वर झाली असेल. पण यासंदर्भात जॉन मॅकव्होर्टर नावाच्या भाषाशास्त्राच्या प्राध्यापकाचा मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो- 'भाषा हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे ही गोष्ट खरी. संस्कृती संपली की भाषा संपते पण भाषा संपली की संस्कृती संपत नाही.' तसं असतं ज्ञानेश्वरांनी लोकांना कळावी म्हणून 'सोप्प्या' मराठीत लिहिलेली 'ज्ञानेश्वरी' पुढच्या चार-पाच शतकात बदललेल्या मराठीबरोबर कालबाह्य झाली असती. संस्कृती नष्ट होणं आणि संस्कृती विकसित होणं या दोन गोष्टीतला फरक बदलत्या काळात समजून घेणं अत्यावश्यक आहे. बदलती भाषा, कालबाह्य होणारी भाषा या गोष्टींकडे संस्कृती विकासाच्या दृष्टीने पाहणं महत्वाचं! यालाच जोडून अजून एक मुद्दा- भाषेच्या नाशाबरोबर संस्कृतीचा ऱ्हास होणं अटळ असतं तर संस्कृत, लॅटीन, पाली, अर्धमागधी या भाषा नष्ट झाल्या तेव्हा मनुष्य प्राणीच नष्ट झाला असता. 'भाषा संस्कृतीवर अवलंबून असते...संस्कृती भाषेवर नाही!' सो संस्कृतीचा जवळपास ९०% लोकांच्या दृष्टीने 'मुख्य' असणारा मुद्दा जर का बाजूला ठेवला तर मग भाषेच्या वैविध्याचा अट्टाहास बाजूला ठेवता येईल. त्याचे फायदेसुद्धा कित्येक आहेत. भारतातला 'अधिकृत राज्यभाषा' हा प्रकार काढून टाकला तर भारतातले कित्येक सीमाप्रश्न संपतील. जगाचा विचार करायचा तर युरोपियन युनियन दर वर्षाकाठी त्यांच्या चर्चांसाठी निव्वळ भाषांतरावर करत असलेला कोट्यावधींचा खर्च कमी होईल. अमेरिकन्सच्या दृष्टीने म्हटलं तर चायनीज आणि मेक्सिकन लोकांशी किमान आवश्यक संवाद सहज साधता येईल. लोकांची धर्म, जात वर्ण यांच्या नावाखाली जगभर होणारी गटबाजी एक भाषा या छत्राखाली कदाचित काही अंशी कमी होईल.  

मग पुढचा प्रश्न येतो...की जगातल्या सगळ्या लोकांनी एकाच भाषेत बोलायचं तर ती भाषा कुठली? इंग्लिशचा नंबर अर्थात सगळ्यात वर असेल...चायनीज दोन नंबर वगैरे वगैरे...म्हणजे पुन्हा एकदा मेजोरीटीने हे ठरणार..उत्तर आहे 'नाही'..जगभरात जर का एकच भाषा बोलीभाषा म्हणून वापरायचं ठरलं तर ती भाषा इंग्लिश असलीच पाहिजे असं नाही..त्यातले कित्येक शब्द, वाक्प्रचार हे जगभरातल्या तमाम भाषांवरून ठरवले जातील. कदाचित मूळ पाया म्हणून इंग्लिशचा वापर करावा लागेल..पण त्यात सर्व युरोपियन, आशियाई, आफ्रिकन भाषांमधले शब्द असतील. अशी भाषा अस्तित्वात आली तर मग सगळ्या  जुन्या किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या भाषांचं काय? उत्तर सोप्पं आहे! आज संस्कृत,पाली, अर्धमागधी, लॅटीन या भाषांची जी काही स्थिती आहे ती अजून पाचशे वर्षांनी मराठी, तमिळ, हिब्रू, जर्मन भाषांची असेल. सध्याच्या काळात लोक नुसता नाच शिकत नाहीत- भरतनाट्यम,कुच्चीपुडी, वेस्टर्न, साल्सा असे त्यातले प्रकार शिकतात तसे अजून काही शतकांनी लोक वेगवेगळ्या भाषा शिकतील...तसे तर लोक आजही भाषा शिकतात पण भाषा हा पोटापाण्याचं साधन असण्यापेक्षा आर्ट फॉर्म,हॉबी म्हणून मान्य होईल. कम्युनिकेशन अर्थात संवाद घडणं या एका अनोख्या गुणधर्मामुळे माणूस पृथ्वीवर श्रेष्ठ ठरला. पॅगल या प्रकाराला सोशियल लर्निंग म्हणतात.माणूस एक भाषा बोलायला लागला. मग त्याने अनेकविध भाषा निर्माण केल्या. आजही नवीन भाषा तयार होण्याची प्रक्रिया अव्याहत सुरु आहे. पण हे कुठेतरी थांबायला हवं! नवीन भाषा निर्माण होण्याने खरंच सोशियल लर्निंगमध्ये भर पडतेय की समाजामध्ये फुट पडतेय हे भाषाकर्त्यांनी आणि तिच्या रक्षकांनी ठरवायला हवं! ( या नोटवर माझ्या डोक्यात जाती, धर्म 'निर्माण' करणाऱ्या लोकांचाही विचार आलाच...पण त्याच्यावर उहापोह नंतर कधीतरी) 

शेवटी भाषा भाषा म्हणजे तरी काय? आपल्या भावना,विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यमच नाही का? आपण लहानपणापासून एक सर्टन भाषा शिकतो,बोलतो म्हणून आपल्याला तिचा अभिमान,कौतुक वाटतं! आपल्या भावना आपल्याला त्या सर्टन भाषेत सहज व्यक्त करता येतात ('एक वैश्विक भाषा' या विषयावर मी मराठीत का लिहितोय असा प्रश्न ज्यांना ज्यांना पडला असेल त्याचं उत्तर हेच). उद्या प्रत्येक भारतीयाला त्याच्या भावना स्वाहिलीमध्ये व्यक्त करता आल्या तर आपण स्वाहिली बोलायला लागू. अगदी आजच्या मराठी बोलीभाषेतले आपले कित्येक शब्द फारसी, उर्दू, हिंदी आणि अशा कित्येक परकीय भाषांमधून आले आहेत. 'बांधिलकी भावनांशी,विचारांशी आधी आणि भाषेशी नंतर असायला हवी' हा साधा,सरळ, व्यावहारिक दृष्टीकोन आहे! आज इंग्लिशमध्ये सहज वापरले जाणारे कित्येक शब्द, वाक्प्रचार इतर भाषांमधून आले आहेत. उदाहणार्थ- 'कर्म/कर्मा' हा शब्द आपल्या साहित्यात जेवढा वापरला जात नाही तेवढा अमेरिकन सिनेमांमध्ये वापरला जातो. 'बॉन अपेटित' हा फ्रेंच वाक्यप्रयोग 'वदनी कवळ घेता' चं जागतिक व्हर्जन आहे. 'बॉन वोयेज' सगळं जग सहजपणे वापरतं. 'के सेरा सेरा' हा रोमन वाक्प्रयोग जगभरातल्या अनेक वक्त्यांनी त्याच्यातल्या व्याकरणाच्या चुकांसकट वापरला आहे. 'हमाल दे धमाल' मधलं लक्ष्याचं 'मी आलो मी पाहिलं मी जिंकून घेतलं सारं' हे गाणं प्रसिद्ध ' आय केम, आय सॉ, आय कॉनकर्ड' या वाक्प्रचारावर आधारित. हा वाक्प्रचार 'व्हीनी व्हीडी व्हीची' या लॅटीन वाक्यावरून घेतलेला..खूप लोक वापरतात. ही सगळी उदाहरणं मला जगातल्या भाषांचं किती ज्ञान आहे हे सांगायला लिहिलेली नाहीत...उलट 'के सेरा सेरा'ची भाषा कोणती हे मला शोधायला लागलं. इतकी वर्षं वापरताना हा प्रश्न पडला नव्हता. अर्थ माहितीय...कुठे वापरायचा कळलं...विषय संपला!   
मी अमेरिकेला आलो तेव्हा मी नॉर्थ इंडिअन असल्याचा शोध मला लागला. महाराष्ट्र, मध्य प्रदेशच्या रांगेतली आणि वरची सगळी राज्य नॉर्थ इंडिया आणि खालची सगळी राज्य साउथ इंडिया (त्यातही वर्चस्व हैद्राबादी लोकांचं..हा मूळ शोधसुद्धा बहुतेक त्यांचाच) असं इथे वर्गीकरण असतं. शांतपणे विचार केला तेव्हा जाणवलं की भाषेचा एक फरक सोडला तर काही फरक नाही जगात कुणातच..भारतीयांचं सोडाच! सण-वार, खाद्य संस्कृती वेगळी असणं हा सपशेल गौण मुद्दा आहे..बाजुबाजुच्या महाराष्ट्रीयन घरात एकाच दिवशी जेव्हा एकीकडे उकडलेल्या बटाट्याची आणि दुसरीकडे कांदा घालून रस्सा भाजी होते तेव्हा त्यांची खाद्य संस्कृती लगेच वेगळी होत नाही आणि झालीच तर ती सामाजिक दृष्टीने बाधक किंवा घातक नाही..पण दोन घरात लोक वेगळ्या भाषा बोलत असतील तर किमान संवाद, विचारांची देवाणघेवाण या सामाजिक गरजा भागवल्या जात नाहीत..जागतिक एकता,'एक विश्व-एक राष्ट्र' वगैरेचे जे पुरस्कर्ते आहेत त्यांनी जात, धर्म, वर्ण बाजूला ठेवून या भाषेच्या मुद्द्याकडे जरा बघाच! सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने 'भाषेचा ऱ्हास' आणि जागतिक 'लिंग्वा फ्रांका'चा अर्थात एकाच अधिकृत बोलीभाषेचा,कार्यभाषेचा उदय होणं हे लोकांनी जवळ यायचं लक्षण ठरणारे!  येत्या चार-पाचशे वर्षांच्या काळात काय घडतंय ते बघायला आपल्यातलं कुणीच नसेल पण 'वाढ आणि विकास' ही जीवनाची लक्षणं ध्यानात ठेवली तर जागतिक लिंग्वा फ्रांका अस्तित्वात येणं नक्की घडेल असं मला वाटतं! एक दिवस असा असेल की एकाच वर्गात गुप्ते, शर्मा, सुब्रमन्यम, खान, डिकास्टा, पॉवेल, अल-नझर, एबरहर्ट, गोर्बाचेव्ह, मोरेना, ताओ चंग, कुरोसावा, अरमानी अशा सगळ्या आडनावांची मुलं एकाच वर्गात (अर्थात वर्चुअल क्लासरूम), एकाच भाषेत शिकत असतील..!


ता.क. मागे मी मराठी माध्यम, मराठी भाषेत शिक्षणाची अवस्था या विषयावर लिहिलं होतं. आता जागतिक बोलीभाषेबद्दल लिहितोय...या सगळ्यातून मराठीचा 'उपमर्द' करण्याचा माझा हेतू नाही. मला मराठी आवडत नाही असं तर मुळीच नाही! मराठीसारखी इतकी 'शब्दसंपदा' असणारी भाषा माझी मातृभाषा आहे याचा मला अभिमान आहे! मराठीत व्यक्त होणं सोप्पं वाटतंय तोपर्यंत मराठीतच लिहीत राहीन..पण माझी बांधिलकी लेखनाशी आणि त्यातल्या भावनांशी जास्त असेल एवढं मात्र नक्की! 

Thursday, January 3, 2013

उपाय, उपक्रम, प्रतिबंध: पण मुद्द्याला धरून!

अल्बर्ट आईनस्टाईनचं एक वाक्य आहे- "माझ्याकडे एखादा प्रश्न सोडवायला जर का एक तास असेल तर मी ५५ मिनिटं प्रश्नावर विचार करेन आणि ५ मिनिटं त्याच्या उत्तरावर विचार करण्यात घालवेन..." आपल्या इथे थोडं वेगळं आहे! आपल्याला प्रश्न ५ मिनिटात नाही १ मिनिटातच कळलाय आणि उत्तरसुद्धा ५ नाहीतर १० गेला बाजार २० मिनिटात मिळेल...पण सगळं संपून जाइल ना? मिडीयाला ब्रेकिंग न्युज कशा मिळतील? आम्ही जागरूकता कशी दाखवणार? फेसबुकवर, ट्विटरवर आम्ही आमचा संताप, आमच्या परसेप्शनस कशा काय पोस्ट करणार? हो मी दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीत घडलेल्या सामुहिक बलात्काराच्या दुर्दैवी घटनेबद्दल बोलतोय! मी या विषयावर लिहायचं मुद्दाम टाळत होतो कारण घटनेचे डीटेल्स वाचून काहीही लिहायचं धारिष्ट्यच होत नव्हतं. वाढत्या प्रसारमाध्यमांमुळे आणि आपल्या हक्काच्या वैश्विक गुंत्यांमुळे (फेसबुक, ट्विटर इत्यादी) अलीकडे बातमी चटकन जुनी होत नाही. त्यात ही घटना लौकर जुनी होण्यासारखी नव्हतीच. स्त्रीला स्वतःच्या 'असण्याचीच' असुरक्षितता वाटावी यासारखी शरमेची गोष्ट नाही. सगळे दोषी  नराधम पकडले गेले आणि त्या दुर्दैवी मुलीवर दिल्लीमध्ये उपचार सुरु झाले. देशातला असंतोष, चीड, उद्वेग बाहेर यायला लागला. त्या मुलीला वाचवण्यासाठी सिंगापोरला पाठवलं गेलं. मग ती दुर्दैवी मुलगी 'गेली' आणि इथे गोंधळ सुरु झाला. तसा तो हे प्रकरण समोर आल्यापासून सुरूच होता पण गेल्या चार दिवसात तो वाढला आणि मूळ मुद्दा भरकटला. मला आठवते आहे तशी गोंधळाची यादी-

१) 'सचिन तेंडुलकरची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती' हे सरकारने त्याला करायला लावलेलं बलिदान असून बलात्कार प्रकारावरचा मिडिया फोकस कमी व्हावा म्हणून म्हणे सरकारने त्याला तसं करायला लावलं.     मुळात क्रिकेट, तेंडुलकर, बलात्कार प्रकरण, सरकार हे चारही सर्वस्वी भिन्न मुद्दे आहेत. (येस..क्रिकेट आणि 'सचिन तेंडुलकर' हेसुद्धा एका अर्थाने भिन्न मुद्देच!त्याबद्दल पुन्हा केव्हातरी). पण काहीतरी बातमी काढायची म्हणून ट्विटरवर कुणीतरी पिल्लू सोडतं आणि चर्चा सुरु! ट्विटर या माध्यमाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी किती होतो आणि त्यातून वादग्रस्त छायाचित्र, कमेंट्स किती पोस्टल्या जातात हासुद्धा एक चांगला सामाजिक संशोधनाचा मुद्दा होऊ शकतो.असो! जर हे दुर्दैवी प्रकरण घडलं नसतं तर मोदींच्या गुजरात विजयाला कमी कव्हरेज मिळावं म्हणून सरकारने सचिनला निवृत्ती घ्यायला लावली असा सूर याच माणसांनी लावला असता!

२) २६ जानेवारीचं सेलिब्रेशन आणि मग न्यू-यिअर सेलिब्रेशन: बलात्काराच्या निषेधार्थ २६ जानेवारी साजरा करायचा नाही असा फतवासुद्धा निघाला होता. मुळात गेल्या ६२ वर्षात कधी नवीन कपडे घालून, फटाके फोडून, कौतुकाने आपण २६ जानेवारी साजरा करत होतो की आता एकदम निषेध म्हणून त्याच्या साजरा करण्यावर प्रश्नचिन्ह उभी करतोय? मी मुद्दाम २६ जानेवारी आणि ६२ वर्षं लिहिलं....कारण २६ जानेवारी म्हणजे नेमका स्वातंत्र दिन असतो की प्रजासत्ताक दिन असतो हेसुद्धा कित्येकांना माहित नसतं...मी दर वर्षी १५ ऑगस्टला लोकांना रिपब्लिक डे सेलिब्रेट करताना बघतो आणि २६ जानेवारीला इंडिपेंडस डे! मग सोशियल नेटवर्क नावाचं कोलीत हातात मिळाल्यावर अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली हीच सगळी माणसं(कडं) जेव्हा बलात्काराच्या घटनेचा निषेध म्हणून २६ जानेवारी साजरा 'न' करण्याचं ठरवतात तेव्हा त्या घटनेइतकाच संताप होतो. मग कुणीतरी असंही सुचवलं की करायचाच आहे तर ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनला विरोध करा म्हणून म्हणे यंदा ३१ च्या रात्री मुंबईत काही 'हजार' तळीराम कमी पकडले गेले. मलातरी दिल्ली घटनेच्या निषेधार्थ ३१ डिसेंबर साजरा केला नाही असं जाहीर करणारा कुणी दिसला नाही.

३) हनी सिंगची हानी: हनी सिंग नावाच्या एका गायकाचं मात्र मला विशेष वाईट वाटलं. त्याने सहा सात वर्षांपूर्वी काही खूप अश्लील, असभ्य शब्द असलेली काही गाणी गायली होती. त्यात 'मै बलात्कारी' नावाचं एक गाणं होतं. दिल्ली घटनेनंतर कुठल्यातरी 'समाजाभिमुख' मंडळींना हे जाणवलंय. अशा गाण्यांमुळे बलात्काराला प्रोत्साहन मिळतं म्हणून त्याच्यावर एक खटला दाखल करण्यात आलाय! ही गाणी गेले सहा वर्ष लोक लपून-छपून ऐकतायत मात्र ती अश्लील, असभ्य आहेत हे कळायला 'या' सद्पुरुषांना मात्र दिल्लीची घटना घडायची वाट बघावी लागली?? कालचीच अजून एक बातमी होती की मुंबईतल्या कुठल्यातरी बारमध्ये 'बलात्कारी' नावाचं ड्रिंक मिळतं म्हणून कुठल्यातरी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी तिथे मोर्चा काढला. याच लॉजिकने कित्येक गोष्टींवर निर्बंध आणावे लागतील, कित्येक लोकांवर खटले भरावे लागतील. प्रश्न असा आहे की हा सगळा खरंच संताप म्हणायचा की लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला प्रयत्न??   

४) मुलीच्या नावाचा कायदा: या सगळ्या मुद्द्यांमध्ये मी सत्ताधारी पक्षाबद्दल काहीही लिहिलं नाही. कारण बलात्कारासारखी घटना कोणत्याही पक्षाचं सरकार असताना होऊ शकते असं मी (नाईलाजाने) गृहीत धरलंय आणि पकडलेल्या दोषी लोकांना शिक्षा देण्याचा प्रश्न असला की सरकार लोकशाहीच्या नावाखाली त्यांच्या (संथ) प्रक्रियेने जाणार हे मी आता (वैतागून) मान्य केलं आहे! तर- सरकार आता बलात्कार विरोधी कायदा कडक करणार आहे. म्हणजे नेमकं काय होणारे हे जाणून घेण्यात कुणाला रस नाहीये पण त्या नवीन कडक कायद्याला त्या मुलीचं नाव द्यायचं की नाही यावरून नवीन वाद सुरु झालाय. शशी थरूर नावाने वावरणाऱ्या एका इसमाने हा वाद सुरु केला आहे. किरण बेदींनी त्याला सपोर्ट पण केलाय. (तसं तर त्या अण्णा हजारेंना पण सपोर्ट करत होत्या पण तेव्हा त्यांच्या सपोर्टला काही किंमत नव्हती) या सगळ्यात मुलीच्या आई-वडिलांनी या कल्पनेला संमती दिलीय आणि आता या गोष्टीचा राजकीय मुद्दा करून त्याचं श्रेय लाटण्याचा एक नवीन खेळ सुरु झालाय. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर अजूनही कित्येक लोक आरोपींना फाशी द्या, त्यांना नपुसंक करा या मागण्यांवर ठाम आहेत. मानवाधिकारवाल्यांनी ऑलरेडी बलात्काराचा निषेध करून फाशीला विरोध केला आहे (खरंतर मानवाधिकार ऐवजी पेटावाल्यांनी काहीतरी बोलणं अपेक्षित होतं). स्वातंत्रलढावाले हजारे, आंबा माणूस पार्टीचे केजरीवाल, योगावाले रामदेव सगळी मंडळी गायब आहेत. भाजपचा एखादा नेता नेहमीप्रमाणे काहीतरी बालिश कमेंट देऊन पूर्ण पक्षाचं हसं करतोय. देशात अजूनही बलात्कार होणं सुरूच आहे. किंवा कदाचित या घटनांना आता जास्त मिडिया कव्हरेज मिळतंय. सध्याची पत्रकारिता ही इतकी हीन दर्जाची झालीय की सगळं असंच चालू राहिलं तर व्हेदर फोरकास्ट सारखी ही मंडळी रेप फोरकास्ट करायला पुढे मागे पाहणार नाहीत. बलात्कार झाला हे दुर्दैवी सत्य आहे हे मान्य करून भविष्यात या घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्या आहेत याचा कुणीच डोळसपणे, व्यापकपणे विचार करताना दिसत नाहीये. मीसुद्धा इथे निव्वळ माझ्या सामाजीक संवेदना प्रखर आहेत अशी बोंबाबोंब करून मुळीच थांबणार नाहीये. मला काही प्रतिबंध सुचवणं जास्त महत्वाचं वाटतं.

या घटनेचे एकूणच तीव्र पडसाद उमटल्यामुळे पोलिस संख्येत वाढ, गुन्हेगारांच्या मनात भीती,स्त्रियांच्या मानसिक आणि काही अंशी शारीरिक सबलीकरणासाठी सामाजिक उपक्रम येत्या काही महिन्यात राबवले जातील हे निश्चित. (नाही गेले तर मात्र खरंच २१ डिसेंबरला जग बुडायला हवं होतं अशी परिस्थिती निर्माण होईल) दूरदृष्टीने विचार करता, बलात्कारासारखी घटना जेव्हा घडते तेव्हा तीन मुद्दे विचारात घ्यावेसे वाटतात- शिक्षण, संस्कार, आणि संस्कृती. तिन्ही जड आणि व्यापक शब्द आहेत त्यामुळे थोडे सोप्पे करून उलगडण्याचा प्रयत्न करतो. शिक्षणाचा अभाव ही आपल्याकडे कित्येक समस्या निर्माण होण्याच्या मागचं मूळ कारण आहे. नैतिक मुल्यशिक्षण नावाचा विषय अभ्यासात आणला गेला हे खरं पण तो शिकवला जात नाही आणि आचरणात आणणं होत नाही.  संस्कार ही यापुढची पायरी. आज कित्येक ग्रामीण आणि काही शहरी घरांमध्ये स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते. तिथे वाढणाऱ्या पिढ्या काय स्त्रीचा आणि तिच्या चारित्र्याचा आदर करणार? या मुद्द्यावर राहवत नाहीये म्हणून विषयांतर करतोय- सावंतांच्या युगंधरमध्ये कृष्णाच्या तोंडी एक सुरेख वाक्य आहे- 'स्त्री म्हणजे कन्या, पुत्र जन्माला घालणारं यंत्र नव्हे, स्त्री म्हणजेच वात्सल्य आणि वात्सल्य म्हणजेच स्त्री. स्त्री माता, भगिनी, पत्नी, कन्या, काकी, मामी, आत्या, सेविका म्हणूनच नव्हे तर केवळ स्त्री म्हणून सर्वदा वंदनीयच असते' कदाचित असंच शिक्षणाचं, संस्कारांचं बाळकडू जर का प्रत्येकाला मिळालं तर काहीतरी चांगलं निश्चित होऊ शकतं.  शेवटचा मुद्दा संस्कृती. हा तर फार मोठा शब्द आहे. पण आपली संस्कृती -तेच ते इंग्लिशमधलं कल्चर- आपल्याला कुठलीही सामाजिक भीती घालत नाही. देशावर,देशाच्या संसदेवर हल्ला केलेले दहशतवादी अनेक वर्ष सरकारी पाहुणचार घेतात, राष्ट्रपती दयेच्या अर्जांकडे वर्षानुवर्ष ढुंकून बघतसुद्धा नाहीत तिथे बलात्कार करण्याची भीती कशाला वाटली पाहिजे? आमच्याकडच्या सिनेमांमध्ये रेप होतो आणि मग रेप करणारा त्या मुलीशी लग्न करतो. आमचा कायदापण अशी काहीतरी सूट देतो. हे झालं कायद्याचं, सरकारचं. दुसरीकडे अमेरिकन सिनेमे बघून त्यातलं नेमकं काय घ्यायचं हे समाज म्हणून कळायला पाहिजे. ग्लोबलाईझ होणं म्हणजे कुठल्या बाबींमध्ये प्रगती आणि कुठे अधोगती झाली पाहिजे हेसुद्धा ज्याचं त्याला कळलं पाहिजे. आणि हो, हा मुद्दा स्त्रियांना (टू बी स्पेसिफिक मॉडर्न तरुणींना) सुद्धा काही अंशी लागू होतो. स्त्री-पुरुषांनी एकमेकांच्या मुलभूत क्षमता आणि मर्यादा समजून घेणं गरजेचं आहे. अर्थात हे सगळे प्रतिबंधात्मक उपाय, उपक्रम वगैरे करूनही काही करंट्या लोकांची सदसतविवेक बुद्धी त्यांना अशी हीन, बिभत्स कृत्य करायला प्रवृत्त करणार हे दुर्दैवी सत्य आहे. त्यावेळी शिक्षा काय असली पाहिजे याचं मात्र निःपक्ष उत्तर माझ्याकडे नाही हे मी कबूल करतो. मिडल-इस्टमधल्या अनेक देशातल्या शिक्षा मी वाचल्या आहेत पण लोकशाहीचं बिरुद मिरवणाऱ्या आपल्या देशाला हे करणं शक्य होणार नाही. देहांत शिक्षा देणं कदाचित योग्य पर्याय ठरणार नाही तर लिंग-छाटणं हा अघोरी पर्याय ठरेल. दिल्लीसारख्या अघोरी घटनांना कदाचित असा अघोरी उपाय करावासुद्धा लागेल पण योग्य शिक्षा नेमकी काय असली पाहिजे हे मी ठरवू शकलेलो नाही.

सरतेशेवटी, सर्व प्रकारच्या वैश्विक गुंत्यांवर या विषयावरील आपला संताप शिव्या देऊन, विरोध करून, काळ्या वर्तुळाचे फोटो लावून व्यक्त करणाऱ्या सर्व लोकांचं मी अभिनंदन करतो. ज्यांनी कोणताही विरोध केला नाहीये किंवा ज्यांना या घटनेबद्दल काहीच माहित नाहीये त्यांच्याबद्दल मला कोणतीही सहानभूती, कौतुक किंवा रागसुद्धा नाही. पुन्हा एकदा डोळसपणे या घटनेकडे बघून मुळ विषयापासून न भरकटता, मुद्द्याला धरून काही सुचत असेल, लिहायचं असेल, करायचं असेल तर जरूर करा. हा मुद्दा राजकीय, भाषिक, पक्षीय, भ्रष्टाचारविषयक नसून त्यात प्रत्येक सुजाण माणसाने किमान जागरूकता, संवेदनशीलता आणि स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन या मुद्द्यांबद्दल स्वतःकडेच सिंहावलोकन करावं अशी अपेक्षा आहे.
आणि हो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! नवीन वर्ष सर्वाना आर्थिक भरभराटीचं आणि सुरक्षिततेचं जावो!


चैतन्य