Pages

Showing posts with label विज्ञान-तंत्रज्ञान. Show all posts
Showing posts with label विज्ञान-तंत्रज्ञान. Show all posts

Saturday, January 4, 2020

पर्सन ऑफ इन्टरेस्ट: उहापोह आणि चिंतन (भाग १)

        
 
(Image From: https://cutt.ly/drhUAXm)
  जोनाथन नोलन हा दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनचा भाऊ. ख्रिस्तोफर नोलनचा गाजलेल्या पहिल्या सिनेमाची- 'मेमेंटो'ची मूळ कथा जोनाथनची होती. नंतर 'द प्रेस्टिज', 'डार्क नाईट', 'डार्क नाईट रायझेस', आणि 'इंटरस्टेलर' अशा ख्रिस्तोफर नोलनच्या कित्येक गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथांवर त्याने काम केलंय. जोनाथनच्या या सगळ्या कामांचा उल्लेख इथे करण्याचं कारण म्हणजे या सगळ्याच्या तोडीस तोड असूनही, त्याची संकल्पना असणाऱ्या 'पर्सन ऑफ इंटरेस्ट' (POI)ला म्हणावी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. निव्वळ करमणूक सोडून बुद्धिजीवी लोकांना विचार करायला लावणारा, प्रचंड गुंतागुंत असणारा, भविष्याचा वेध घेणारा, प्रसंगी अचाट वा अशक्य गोष्टी आणि त्या गोष्टी करणाऱ्या 'लार्जर दॅन लाईफ' व्यक्तिरेखा असणारा शो म्हणून मला POI कायमच खूप आवडलाय. तो का आवडला किंवा त्यातल्या विचार करायला लावणाऱ्या गोष्टी यांच्याबद्दल लिहायचं खूप महिने मनात होतं. आज फायनली मुहूर्त सापडलाय...
            ११ सप्टेंबर २००१ ला न्यूयॉर्कच्या 'ट्विन टॉवर्स'वर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर अमेरिका हादरली आणि अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण, सुरक्षा, दळणवळण अशा सगळ्या महत्वाच्या गोष्टींवर दूरगामी परिणाम झाले. मध्य पूर्वेतली युद्धं अमेरिकेला नवीन नव्हती पण देशांतर्गत सुरक्षाप्रणालीत घोषित-अघोषित अनेक बदल झाले ते ९/११ नंतर. 'पर्सन ऑफ इंटरेस्ट' हा टीव्ही शो सुरु झाला २०११ मध्ये पण त्यात दाखवलेल्या गोष्टीची सुरुवात झाली ती २००१ मध्ये. शोच्या 'पायलट' अर्थात पहिल्या पर्वाच्या/सिझनच्या पहिल्या भागात आपण भेटतो जॉन रीसला. हा जॉन आधी सैन्यात होता, मध्यपुर्वेचे दौरे करून आला, नंतर सीआयएचा हेरसुद्धा होता- आता मात्र तो स्वतःला दारूमध्ये बुडवून, कुठलंतरी न सांगता येण्यासारखं दुःख कवटाळून बेघर भटकतोय. कुठल्याश्या लहानश्या मारामारीत त्याला पोलीस पकडतात आणि जेलमध्ये टाकतात. तेव्हा त्याची सुटका एक अनोळखी, एकलकोंडा आणि काहीसा अनाकलनीय माणूस- हॅरल्ड फिंच करतो. हॅरल्ड फिंच या माणसाची सरकारदफ्तरी कुठली नोंद नाही, त्यालासुद्धा जॉनसारखा कुणीही जवळचा नातेवाईक नाही. POIला शीर्षक गीत नाही. त्याऐवजी या हॅरल्डच्याच आवाजातलं एक निवेदन आहे जे साधारण शोची संकल्पना आपल्याला सांगतं. ते निवेदन ढोबळमानाने असं-

"तुमच्यावर पाळत ठेवली जातेय.
सरकारकडे एक गुप्त यंत्रणा, एक 'मशीन' आहे जे दर क्षणाला तुमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहे.
मला मशीनबद्दल माहितीय कारण ते मीच बनवलंय.
मी मशीन बनवलं ते दहशतवादी घातपातांच्या घटनांवर लक्ष ठेवायला,
पण मशीनचं लक्ष तर सगळ्या(जगा)वरच आहे, सगळ्या हिंसक गुन्ह्यांवर!
असे गुन्हे ज्यात तुमच्यासारखे लोक गुंतलेले असू शकतात,
असे गुन्हे ज्याला सरकार काही महत्व देत नाही,
सरकार काही करत नाही म्हणून मी (गुन्हे थांबवायला) काहीतरी करायचं ठरवलं..
पण मला या कामात एक जोडीदार हवा होता (जॉन रीस इथे पडद्यावर दिसतो), ज्याच्याकडे असे गुन्हे थांबवण्यासाठी लागणारी तंत्रं असतील...
यंत्रणा आमच्या मागावर आहेत, (म्हणून) आम्ही गुप्तपणे काम करतो..
तुम्ही आम्हाला शोधू शकणार नाही....
पण तुम्ही जर का (संभाव्य) गुन्हेगार किंवा गुन्ह्याला बळी पडणार असाल तर आम्ही तुम्हाला शोधू..."


गुन्हेविश्वावर आधारित टीव्ही शो अर्थात 'Crime Procedural' ही संकल्पना अजिबातच नवीन नाही. आजपर्यंत जगभरात शेकड्याने असे कार्यक्रम बनले असावेत ज्यात भागाच्या सुरुवातीला खून (कधीतरी चोरी) वगैरे होतो आणि वेगवेगळे स्टायलिश लोक आपापल्या पद्धतीने खुनी, चोर वगैरे शोधतात. POI चा पहिला सिझन हा एकूणच प्रत्येक भागाची स्वतंत्र कथा असणाऱ्या 'Crime Procedural' प्रकारात येत असला तरी गुन्ह्याची उकल करण्यापेक्षा 'गुन्हा थांबवणं' हा त्याची मुख्य 'थीम' आहे. त्यात 'मशीन'च्या कार्यपद्धतीमुळे नेहमी गुन्ह्याशी 'संलग्न व्यक्ती' अर्थात 'पर्सन ऑफ इंटरेस्ट' गुन्हा करणारे की गुन्ह्याला बळी पडणारे हे रीस किंवा फिंचला माहित नसतं. तेव्हा ते शोधणं हा ही एक रहस्याचा भाग! जॉन रीस फिंचच्या मदतीनं, निनावी राहून, पोलिसांपासून लपत-छपत, टिपटॉप सुटाबुटात फिरून न्यूयॉर्क शहरात घडणारे गुन्हे थांबवायला सुरुवात करतो. न्यूयॉर्कच्या पोलीस, गुन्हेगारांपासून ते पार एफबीआय, सीआयएपर्यंत 'सुटातला माणूस' अशा हास्यास्पद (पण चपखल) नावाने प्रसिद्ध होतो. सोबतच्या उपकथानकांमध्ये दोन पोलीस अधिकारी सहकारी पात्रं म्हणून दर भागात दिसतात. यातली एकजण 'जोस कार्टर' प्रामाणिक, निष्ठावंत डिटेक्टिव्ह आहे जिला 'सुटातल्या माणसाला' पकडायचंय आणि दुसऱ्या काहीश्या चांगल्या वृत्तीच्या पण भ्रष्ट्र डिटेक्टीव्ह 'लायनल फस्को'ला जॉनने त्याच्याविरुद्धचे काही पुरावे लपवून ठेवत स्वतःच्या बाजूला करून घेतलंय. न्यूयॉर्कमधल्या भ्रष्ट पोलिसांची एक संघटना जिचं नाव HR, तिथल्या गुन्हेगारी फॅमिलीज आणि त्यांच्यातला संघर्ष हेसुद्धा अगदी सहज या सिझनमध्ये येतं. मी वर लिहिलेली गुंतागुंत, भविष्याचा वेध, कृत्रिम बुद्धिमत्तेचा मनुष्याचा आयुष्यावर होऊ शकणारा परिणाम असे क्लिष्ट मुद्दे या पहिल्या सिझनमध्ये नाहीत. यातली लहान-मोठी उपकथानकं, इतर पात्रं चांगली असली तरी तोंड भरून कौतुक वगैरे करण्याजोगी नाहीत. जवळपास सगळे भाग स्वतंत्र आहेत आणि फक्त कार्यक्रमाची संकल्पना माहित असेल तर आधीचा भाग बघितलाच पाहिजे असं नाही. यातही 'जजमेंट', 'विटनेस', आणि 'बेबी ब्लु' हे माझे आवडते एपिसोड्स आहेत.

दुसऱ्या पर्वात POI मालिका म्हणून हळूहळू 'सीरियलाईज्ड' व्हायला लागते. ज्याला 'आर्टिफिशियल सुपरइंटेलिजन्स' (ASI) म्हणता येईल असं मशीन अस्तित्वात असल्याची चाहूल लागलेले लोक, मशिनचं अस्तित्व जगाला कळू नये म्हणून सरकारी यंत्रणांचे चालू असणारे अथक प्रयत्न (ज्यात मुखत्वे मशीनबद्दल ठाऊक असलेल्या लोकांना जीवे मारणं  हेच त्याचं अस्त्रित्व लपवण्याचा मार्ग आहे हे मानणारे अधिकारी) ही मुख्य उपकथानकं इथे येतात. फिंचचा भूतकाळ, त्याने नेमक्या रीसलाच का जोडीदार म्हणून नेमलं, मशीन फिंचशी किंवा फिंच मशीनशी संपर्क कसे साधतात? या प्रश्नांची उत्तरं मिळतात. मशीनचा शोध लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे हेतू आहेत- कुणाला ते नष्ट करायचं आहे, कुणाला त्याच्यावर ताबा हवाय वगैरे वगैरे. या सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेक्षक 'मशीन' या यंत्रणेला एक पात्र म्हणून बघायला लागतो. दरम्यान पहिल्या पर्वात असणारी सहकारी पात्रं- कार्टर, फस्को, एलायस, रूट आता जास्त महत्वाची होतात. 'टीम मशीन' विस्तारते ज्यात आता रीस, फिंच सोडून कार्टर, फस्को, समीन शॉ सुद्धा सहभागी होतात. दुसऱ्या सिझनमध्येसुद्धा जवळपास प्रत्येक भागाला एक 'स्वतंत्र' कथानक आहे आणि काही प्रमाणात वर लिहिलेली उपकथानकं पुढे नेण्यावर भर आहे (जे पुढच्या सीझन्समध्ये अधिकाधिक होतं). एकूणच दुसरा सिझन मला आवडला असला तरी विशेष करून रीसला 'सुटातला माणूस' म्हणून एफबीआयचे लोक पकडतात तेव्हाचे २ भाग '2PiR' आणि 'प्रिसनर्स डायलेमा' मला खूपच आवडतात. सगळ्या १०३ एपिसोड्सपैकी जोनथन नोलनने दिग्दर्शित केलेला एकमेव, समीन शॉच्या पात्राची ओळख करून देणारा 'रिलेव्हन्स' नावाचा भागही जबर आहे!
२०१३ मध्ये एडवर्ड स्नोडेन हे नाव जगाला माहित झालं. स्नोडेनने अमेरिकची 'नॅशनल सिक्युरिटी एजन्सी' जगभरात लोकांवर बेकायदेशीर पाळत ठेवायचे कार्यक्रम राबवत असल्याचे उल्लेख असणारी कागदपत्रं जगजाहीर केली. स्नोडेनच्या या कामगिरीचे पडसाद अमेरिकेतच नाही तर जगभरात उमटले. त्याने जाहीर केलेल्या कागदपत्रांमध्ये कित्येक टेलिकॉम कंपन्या आणि युरोपियन देशातल्या सरकारांचादेखील उल्लेख होता. हा सगळाच विषय 'POI' च्या मध्यवर्ती संकल्पनेला इतका 'रिलेवंट' असल्याने त्यावर उहापोह होणं अपेक्षित होतं आणि तो झालासुद्धा. दुसऱ्या सीझनमध्ये आपण 'मशीन'ला पात्र म्हणून ओळखायला लागतो तेव्हा त्याच्या 'कोडिंग'मध्ये अर्थात जडणीघडणीमध्ये हॅरल्डच्या जगाकडे बघायच्या दृष्टिकोनाचा किती मोठा वाटा आहे हे लक्षात यायला लागलेलं असतं. तिसऱ्या सीझनपासून हे जास्तच अधोरेखित होतं. या सिझनमध्ये न्यूयॉर्क मधल्या भ्रष्ट पोलीस यंत्रणेला संपुष्टात आणण्यासाठी कार्टर करत असलेली धडपड, लोकांवर सरकारने बेकायदेशीर पाळत ठेवायच्या बातम्या/अफवा पसरायला लागल्यावर त्याच्या विरोधात सक्रिय झालेली सशस्त्र नागरी संघटना आणि 'मशीन'वर ताबा मिळवणं अवघड आहे याची जाणीव झाल्यावर तसंच दुसरं मशीन बनवायच्या मागे लागलेले लोक ही तीन मुख्य कथानकं आहेत. तिसऱ्या सीझनमधला 'डेविल्स शेअर' हा भाग अफलातून आहे. याच सीझनमधला ४C नावाच्या एपिसोडचं लिखाण हे मला त्यातल्या एक-दोन अचाट सीन्समुळे थोडं वीक वाटतं. पण एकूणच या सीझनपर्यंत POI ची 'मायथॉलॉजी' आणि रीस-फिंचचं 'सुपरहिरो' असणं मी प्रेक्षक म्हणून मान्य केलेलं असतं सो निदान मनोरंजनात खंड पडत नाही.

POIच्या जवळपास प्रत्येक एपिसोडसमध्ये प्रभावी कथानकं, उपकथानकं आहेत. रोचक वाटावेत असे 'पर्सन्स ऑफ इंटरेस्ट' आहेत आणि प्रत्येक मुख्य पात्राचा शोमध्ये पहिल्यांदा दिसण्यापूर्वीचा भूतकाळसुद्धा वेगवेगळ्या एपिसोड्सच्या कथानुकानुसार दाखवला गेलाय. याच अनुषंगाने आता POI च्या पात्रांबद्दल थोडं (खरंतर POI चे एकूण पाच सीझन्स आहेत पण उरलेल्या दोन सीझन्सबद्दल नंतर लिहिणारे आणि त्याचं कारणसुद्धा तेव्हाच देईन). जिम कवीझल POIच्या आधी 'पॅशन ऑफ द ख्राईस्ट' या सिनेमातल्या जिझस ख्राईस्टच्या भूमिकेमुळे लोकांना माहीत होता. त्या 'जिझस'ला सुटाबुटात मारामाऱ्या करताना, सराईतपणे बंदुका वापरताना बघणं हे काही लोकांना धक्कादायक वाटल्याचं वाचलेलं आठवतंय. एका अर्थी ही व्यक्तिरेखा एककल्ली आहे, पहिल्या एपिसोडमधली काही मिनिटं सोडल्यास आपल्याला प्रेक्षक म्हणून रीस काय करेल किंवा भूतकाळात त्याने काय केलं असेल याचा पुरेपूर अंदाज येतो. त्याला असणारं, न सांगता येणारं दुःख कोणतं आहे याचा उलगडा नंतर होतो पण याच अनुषंगाने लहान मुलं किंवा छळ होणाऱ्या बायकांशी संबंधित गुन्हा असला तर रीसचे आविर्भाव पाहण्यासारखे आहेत. कवीझलची इथली भूमिका जिझसच्या भूमिकेपेक्षा वेगळी असली तरी एखाद्या एपिसोडच्या शेवटी कुणालातरी सल्ला किंवा नैतिक बळ देणारा कवीझल पाहिला की 'पॅशन'ची थोडीशी आठवण होतेच. एकीकडे सतत लोकांमध्ये असूनही एकाकी असणारा रीस आणि दुसरीकडे निव्वळ एखाद्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपपुढे बसून रीसशी फोनवर बोलताना दिसणारा 'अक्षरशः एकाकी' फिंच. फिंचची भूमिका करणाऱ्या मायकल इमर्सनला त्याच्या 'लॉस्ट' मधल्या नकारात्मक भूमिकेसाठी एमी मिळालं होतं. लॉस्टमधली त्याची आधी खलनायकी आणि शेवटी चांगुलपणाकडे झुकलेली भूमिका त्याने जबर केलीच होती पण इथे तो मला अभिनेता म्हणून प्रचंड आवडलाय. हॅरल्ड फिंचचं पात्र हे एका अर्थी 'POI' विश्वाची आणि पर्यायाने मशीनची नैतिकता ठरवतं . तो वस्तुनिष्ठ आहे तरी आशावादीसुद्धा आहे. जीवापाड प्रेम करणारी माणसं असूनसुद्धा एकाकी आहे. आपण मशीन बनवून चूक केलं का बरोबर या चिरंतर मानसिक द्वंदात आहे. हे द्वंद चौथ्या-पाचव्या सीझनमध्ये जास्त ठळकपणे  येतं. इमर्सनला ही भूमिका करताना बऱ्याचदा नुसते कॉम्प्युटरपुढे बसून संवाद म्हणायचे असायचे, फोनवर दुसऱ्या बाजूला रीस आहे असं आपण जरी एडिटेड एपिसोडमध्ये पाहिलं तरी इमर्सनचे हे सिन्स एकट्यानेच शूट व्हायचे हे लक्षात घेतलं तर त्याच्या फोनवरच्या संभाषणामधल्या 'रिऍक्शनस' अजून आवडायला लागतात. फिंचच्या पात्राला एका अपघातामुळे आलेलं अपंगत्व दाखवायला त्याने घेतलेलं बेरिंग फ्लॅशबॅकमधले, अपघाताआधीचे सीन्स आले की जास्त अधोरेखित होतं आणि दाद मिळवून जातं. 
                                                       (Image from: https://cutt.ly/SrhUHp1)
या दोघांशिवाय सहाय्यक भूमिकांमध्ये असणारे सगळेच अभिनेते कमाल आहेत. एमी एकर अर्थात 'रूट'ची भूमिका ही सुरुवातीला केवळ एक-दोन स्वतंत्र भागांपुरती लिहिली होती पण पुढे तिची लांबी वाढून तिसऱ्या सीझनमध्ये तिला महत्व येतं. या व्यक्तिरेखेच्या परिस्थितीला रिऍक्ट व्हायच्या पद्धती अगदी शेवटपर्यंत काहीशा बेभरवशाच्या राहतात पण 'तुमच्या काम करण्याच्या पद्धतींपेक्षा काम करण्याचा हेतू किती शुद्ध आहे ते महत्वाचं' अशा साधारण तत्वांवर ती 'टीम मशीन'ची मेंबर बनते. अजून एक- एन्रिको कोलांटनीचा कार्ल एलायस- याच्या व्यक्तिरेखेचा ग्राफसुद्धा काहीसा रूटसारखा.आधी 'टीम मशीन' च्या विरोधात असणारा हा न्यूयॉर्कच्या गुन्हेगारी विश्वाचा बादशाह नंतर अज्ञातवासात राहून रीस-फिंचची मदत करतो ते काही सीन्स छान जमलेत. सरतेशेवटी उल्लेख लायनल फस्को अर्थात केविन चॅपमनचा. वाईट संगतीत राहून भ्रष्ट्र झालेला, पण वृत्तीने चांगला असणारा, सगळ्याच लार्जर दॅन लाईफ, जिनियस' पात्रांमध्ये काहीसा अर्धवट वाटणारा, 'टीम मशीन'साठी खूप सुरुवातीपासून मदत करूनही मशीनच्या अस्तित्वाबद्दल अगदी शेवटपर्यंत अनभिज्ञ असणारा फस्को हा सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधीत्व करतो असं मानायला हरकत नाही. स्वतःतले गुण आणि मुख्यत्त्वे मर्यादा त्याला पुरेपूर ठाऊक आहेत आणि त्या बोलून दाखवायला त्याला अजिबात कमीपणा वाटत नाही. मी POIचे सगळे भाग ५-६ वेळा तरी पहिले असतील, पण लक्षात राहणाऱ्या बऱ्याचश्या पंचलाईन्स फस्कोच्या वाट्याला आल्यायत. आता हे खरंच संवांदांचं क्रेडिट आहे की केविन चॅपमनच्या अभिनयाचं हे पाहणाऱ्याने ठरवायचं. याशिवाय कार्टरच्या भूमिकेत तराजी हेन्सन उत्तम पण POI नंतर तिने इतर अनेक चांगल्या भूमिका केल्यामुळे आता मला तिच्या या भूमिकेचं विशेष कौतुक वाटत नाही. सारा शाहीच्या व्यक्तिरेखेचा उल्लेख टाळत नाहीये पण मला त्यातल्या त्यात कमी आवडलेल्या व्यक्तिरेखांमध्ये ती येते एवढंच लिहीन. इथेही नमूद करण्याचा मुद्दा हा की POI च्या काही लँडमार्क एपिसोड्समध्ये (रिलेव्हन्स, इफ-देन-एल्स, ६,७४१) सारा शाहीची व्यक्तिरेखा खूप महत्वाची आहे.
        २१व्या शतकातली पहिली दोन दशकं संपली. आधीच्या २ शतकात विज्ञान-तंत्रज्ञानाची जेवढी प्रगती झाली नसेल तेवढी गेल्या दोन दशकात झाली. आज जगातले बहुतांश लोक या न त्या मार्गाने टेक्नॉलॉजीवर दैनंदिन गरजांसाठी अवलंबून आहेत. इंटरनेट आणि स्मार्टफोन्स या दोन गोष्टींनी संपूर्ण जग लिटरली आपल्या बोटांशी आणून ठेवलंय. मित्रांशी संपर्कात राहण्यासारख्या मानसिक गरजांपासून ते बँकेचे व्यवहार करण्याच्या आर्थिक गरजांपर्यंत इंटरनेटवर आपण विसंबून आहोत. 'तुमच्या आईपेक्षा गुगलला तुमच्याबद्दल जास्त माहीतीय' असा आशयाचा मेसेज आपण काहीतरी नक्कीच वाचलाय! म्हणजे खरंच- गुगलला किंवा तत्सम कुठल्या सिस्टमला अशी खरंच पाळत ठेवता येत असेल? पाळत ठेवायची म्हणजे आपल्याविषयीची ही सगळी माहिती नुसती जमा नाही करायची तर तिचा सारासार अभ्यास करून त्यातून अनुमानं काढायची, पुढे काय घडू शकेल याचे ठोकताळे बांधायचे आणि त्याप्रमाणे पुढच्या घडामोडींमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करायचा. या सिस्टमचं सर्वमान्य नाव म्हणजे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI). आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात 'कृत्रिम बुद्धिमत्ता' म्हणजे काय हे इंटरनेट वापरणाऱ्या सगळ्यांनाच साधारण माहिती असेल. आपण मित्राला 'प्रायव्हेट' चॅटवर विचारलं की नवीन 'प्लेस्टेशन'चा रिव्ह्यु काय ए? या वर्षी चांगला सेल असेल तर घ्यायचा विचार आहे' की लगेच आपल्याला गुगल, फेसबुकवर प्लेस्टेशन, एक्सबॉक्स वगैरे जाहिराती दिसायला लागतात. आपल्या लाईफमध्ये काही 'प्रायव्हसी' राहिलीच नाहीये वगैरे सात्विक संताप करण्यापलीकडे आपली मजल जात नाही. काही लोक 'टेक्नॉलॉजी कसली डेव्हलप झालीये' म्हणून कौतुकंसुद्धा करतात. नाही म्हणजे कौतुक वाटायला काही हरकत नाहीये पण हे किती 'भीतीदायक' आहे याचा सिरियसली विचार केलाय का आपण? POIचा चौथा आणि पाचवा सिझन साधारण याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा, देण्याचा प्रयत्न करतो. POI बद्दल भरभरून लिहावंसं वाटत होतं त्याला एकूणच एक चांगला टीव्ही शो बघितल्याचं कौतुक हा एक भाग होता आणि AI वर थोडं लाऊड थिंकिंग हा दुसरा हेतू होता.
काही वेळापूर्वी जाणवलं की हेच लिखाण बरंच लांबलंय म्हणून थोडा  ब्रेक घेऊन चौथ्या-पाचव्या सिझनबद्दल एक वेगळा भाग लिहितो. तूर्तास एवढंच पुरे!

क्रमशः

Sunday, April 7, 2013

खिडक्या, यंत्रमानव, सफरचंद आणि काळबेरं!

दहा-एक वर्षांपूर्वी बिल्डींगमध्ये कुणी नवीन टीव्ही, मशीन, फ्रीझ असं काही घेतलं की त्याची चर्चा सुरु व्हायची! 'पहिल्या मजल्यावरच्या शिंदेंकडे आलेल्या नव्या टीव्हीला १०० चॅनेल्स आहेत' किंवा 'बाजूच्या नाडकर्णीनीपण आपल्यासारखंच सिंगल टब ऑटोमॅटिक मशीन घेतलंय' हे साधारण गप्पांचे विषय! (या सगळ्या वाक्यांमध्ये कौतुकाचा भाग कमी आणि असूया किंवा अपेक्षा जास्त हे आलंच!) मग 'काळ बदलतो' का काय म्हणतात ते झालं आणि फ्रीझ, मशीन अशा गृहोपयोगी वस्तू एकूणच कॉमन आणि अशा चर्चांसाठी दुय्यम झाल्या..असूया, अपेक्षा तशाच होत्या पण गप्पांचे विषय, वस्तू मात्र चंगळवादी झाले. 'मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा बघणं', 'परफ्युम्स आणि गॉगल्स' किंवा 'मोबाइल फोन्स' हे मिरवायचे, खिजवायचे विषय झाले. यापैकी मोबाईल फोनचा उल्लेख चंगळवादी वस्तूंमध्ये करायचा की नाही हा वादाचा मुद्दा असू शकतो पण मोबाईल फोन हा लोकांच्या चर्चेचा, लाईफस्टाईलचा अविभाज्य घटक झालाय हे खरंय..बाय द वे फोन मीन्स 'स्मार्टफोन' बरं का!! माणसं स्मार्ट असोत वा नसोत, फोन स्मार्ट असणं आवश्यक झालंय.

'खिडक्या,यंत्रमानव….' असं वरकरणी अर्थहीन वाटणारं शीर्षक वाचून स्मार्ट लोकांना लिखाणाचा विषय लक्षात आलाच असेल. पण जे स्मार्ट नाहीयेत (नथिंग पर्सनल बरं का!) त्यांच्यासाठी थोडं स्पष्टीकरण- स्मार्ट फोनची दिवसेंदिवस वाढणारी बाजारपेठ सध्या चार मुख्य प्रकारच्या फोन्सनी व्यापली आहे! खिडक्या अर्थात 'विंडोस' फोन, यंत्रमानव म्हणजे ऍन्ड्रोइड फोन्स, सफरचंद म्हणजे ऍपलचा iफोन (न्यूटनचं सफरचंद नाही स्टीव्ह जॉब्सचं) आणि काळबेरं हा मी ब्लॅकबेरी फोनसाठी वापरलेला प्रतिशब्द आहे (या फळासाठीचा मराठी प्रतिशब्द कुणाला माहित असल्यास सांगावा). सहा-सात वर्षांपूर्वी भारतात फार थोड्या लोकांकडे नोकियाचा ९३०० अर्थात कम्युनिकेटर असायचा (आत्मस्तुती: माझ्याकडे पण होता). आपल्याकडे वापरला गेलेला तो पहिला स्मार्टफोन…पण तो स्मार्टफोन कमी आणि 'शोफोन' जास्त होता कारण त्याचा वापर दिखाव्यासाठीच जास्त व्हायचा. या फोनचे व्यावहारिक,तांत्रिक फायदे कुणी घेतलेले मी ऐकले नाहीयेत किंवा त्याच्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानसुद्धा तेव्हा उपलब्ध नव्हतं (इंटरनेट, थ्रीजी, वाय-फाय वगैरे). मग साधारण २००८ च्या आसपास स्मार्टफोनचा iगवगवा सुरु झाला. मोबाइल फोन ही गोष्ट एव्हाना कॉमन झाली होती पण iफोन प्रकार नवीन होता. स्टीव्ह जॉब्सने "मोबाइल फोन निव्वळ बोलण्यासाठी नसतो आणि त्याचा वापर इतर गोष्टींसाठी व्हायला हवा! फोन जीवनशैलीचा भाग व्हायला हवा" असं विधान iफोनसंदर्भात केल्याचं वाचलेलं आठवतंय! मला जेव्हा पहिल्यांदा iफोनच्या तंत्रज्ञानाबद्दल कळलं तेव्हा मला त्याचं अजिबात कौतुक वाटलं नव्हतं..कारणं पुन्हा एकदा- फोन वापरायला आवश्यक तंत्रज्ञानाचा अभाव आणि अवाजवी किंमत! माझ्या दृष्टीने तेव्हा नोकियाचे चांगले कॅमेरे असणारे किंवा सोनीचे गाणी ऐकायला बनवलेले फोन्स ही मोबाइल विषयक अपेक्षांची लिमिट होती! मग शिक्षणानिमित्त अमेरिकेला आलो आणि स्मार्टफोन लोकांच्या जीवनशैलीचा भाग होताना पाहिलं. सगळ्यांनी घेतला म्हणून, स्वस्तात मिळतोय म्हणून, गरज आहे म्हणून अशी वेगवेगळी कारणं स्वतःलाच देत शेवटी स्मार्टफोन घेतला आणि स्टीव्ह जॉब्सला मनातल्या मनात नमस्कार केला. 

सर्वप्रथम काळबेरं फोन आणि खिडक्या फोन याविषयी- आकडे काहीही सांगोत, मी तरी यंत्रमानव आणि सफरचंद फोन्सच्या तुलनेत बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांनी हे दोन प्रकारचे फोन वापरणारे लोक पाहिले आहेत! काळ्याबेऱ्या फोन्सचं वैशिष्ट्य म्हणजे कॉम्प्युटरला असतो तसा अख्खा 'की-बोर्ड' या फोन्सला असायचा! या 'की-बोर्ड' च्या बटनांच्या रचनेमुळेच त्या फळाचं नाव या फोनला दिलं गेलं. २०१० च्या शेवटाकडे आयफोनने बाजारपेठ व्यापून टाकण्यापूर्वी हे फोन्स अनेक सरकारी, कॉर्पोरेट जगात ऑफिशिअली वापरले जायचे. 'काळ्याबेऱ्या संवाद'प्रकारची जबर हवा होती. या फोनच्या वेडाची तुलना अमली पदार्थांच्या व्यसनाशी केली गेली. हे फोन घेऊन फिरणारे लोक 'श्या…तुझ्याकडे बीबी मेसेजिंग नाहीये?' वगैरे विचारायचे! पण काळाच्या ओघात (म्हणजे अवघ्या वर्ष-दीड वर्षात) ह्या फोनची बाजारपेठ कमी झाली. आता हे फोन घेऊन फिरणाऱ्या लोकांना 'श्या…तुझ्याकडे अजून बीबीच आहे?' असं ऐकून घ्यावं लागतं! नवीन आलेल्या काही काळ्याबेऱ्या फोन्सना पारंपारिक 'की-बोर्ड नाही'…आता याला व्यावसायिक स्पर्धेत स्वतःची ओळख विसरणं म्हणायचं की स्पर्धेत टिकण्यासाठी बदलणं म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न! खिडक्या फोन या प्रकाराविषयी मला तशी बरीच कमी माहिती आहे! या प्रकारचे फोन्स गेली कित्येक वर्ष अनेक कंपन्यांच्या माध्यमातून उपलब्ध आहेत पण आधुनिक म्हणता येतील असे खिडक्या फोन गेल्या दोन-तीन वर्षातले! गेल्या सहा महिन्यात आपली लाडकी कंपनी 'नोकिया' ने खिडक्या सिस्टम असलेले काही चांगले फोन बाजारात आणलेत आणि निव्वळ सफरचंद किंवा यंत्रमानव फोन घ्यायचा नाही म्हणून मी लोकांना हे नोकियाचे फोन विकत घेताना बघतोय!निव्वळ तांत्रिक बाबींबाबत बोलायचं तर खिडक्यावाले फोन्स तोडीस तोड नसले तरी बऱ्यापैकी आधुनिक आहेत! सफरचंद आणि यंत्रमानव फोन्समध्ये असणाऱ्या प्रत्येक नव्या 'फिचर'ला सिमिलर 'फिचर' या फोन्समध्ये आहे. पण या इतक्या झपाट्याने बदलणाऱ्या क्षेत्रात या फोन्सनी आघाडी घेणं सध्यातरी अवघडच दिसतंय!    

'स्मार्टफोन' ही किती मोठी बाजारपेठ होऊ शकते हे सर्वप्रथम सिद्ध करणारी कंपनी अर्थात सफरचंद! iफोनने २००७ मध्ये रिलीज झाल्यापासून विक्रीचे अनेक उच्चांक प्रस्थापित केले. 'टचस्क्रीन' अर्थात बोटाच्या स्पर्शाने वापरायचा फोन! स्टायलस वापरायचे फोन्स नवीन असताना टचस्क्रीनने लोकांना अचंबित व्हायला लावलं (मी गेल्या काही महिन्यात अनेक टचस्क्रीन फोन पहिले पण जो सहजपणा 'सफरचंदाच्या स्पर्शात' आहे तो कुठल्याच फोनमध्ये नाही हे मी ठामपणे सांगू इच्छितो). बँकिंगपासून सोशियल नेट्वर्किंगपर्यंत सगळं या फोनने लोकांच्या अक्षरशः हाताशी आणून ठेवलं. अन्न, वस्त्र, निवारासारखी फोनला गरज बनवण्याचं श्रेय माझ्यामते iफोनलाच! iफोनचे खंदे समर्थक आहेत तसे विरोधकसुद्धा आहेत. गमतीचा भाग असा की या विरोधकांपैकी अर्ध्या लोकांनी तो कधी वापरलेलासुद्धा नाही. iफोनची किंवा सफरचंद कंपनीची मिळेल तेव्हा टीका करणारे लोक मला माहितीयत आणि त्यांच्या अतिशहाणपणाची मला गम्मत वाटते. माझ्या मते iफोन हा जगातला सगळ्यात सोप्पा फोन आहे. iफोनमध्ये किती फीचर्स कमी आहेत आणि वापरायला किती कटकट आहे वगैरे iफोन न वापरणारे अधिकाराने बोलले की मला 'गेल्या अनेक वर्षात घराबाहेर न पडलेल्या माणसाने वाढत्या ट्राफिकबद्दल चर्चा केल्यासारखं वाटतं!' आजघडीला 'एलेगन्स,क्लास, सिम्पलीसिटी' हे तिन्ही शब्द जर कुठल्या एका फोन प्रकाराला लागू होत असतील तर तो म्हणजे सफरचंद फोन! हेसुद्धा नमूद करायला हवं की विरोधक करतायत ती सगळीच टीका निरर्थक नाहीये. गेल्या ६ वर्षात सहा नवीन iफोन मॉडेल्स बाजारात आली पण त्यांच्या एकूण बाह्यरूपात आणि अंतर्रुपात काहीच मोठे फरक पडलेले नाहीत! या फोनमार्फत केलेल्या कित्येक गोष्टींवर कंपनीचं नियंत्रण आहे. फोन वापरण्यात काही बंधनं आहेत. पण असं सगळं असतानासुद्धा एकूणच बाजारात सफरचंदी फोन्स लोकप्रिय आहेत हे खरं! 


सफरचंदी फोनची इतकी स्तुती केल्यावर मी अर्थात सफरचंदी फोन वापरत असेन याचा तुम्ही अंदाज बांधला असेलच. पण तुमचा अंदाज चुकलाय…मी सफरचंदी नाही तर यंत्रमानव फोन वपरतो. गेल्या दहा वर्षात आयटी क्षेत्राशी संबंधित बहुतेक धंद्यांच्या यशात 'गुगल' नावाच्या अचाट कंपनीचा खूप मोठा वाटा आहे! त्यामुळे स्मार्टफोन्स क्षेत्राशी गुगल संलग्न नसलं असतं तर नवल होतं. यंत्रमानव फोन तंत्रज्ञान बनवणारी कंपनी गुगलने ८ वर्षांपूर्वी विकत घेतली आणि जवळपास ५ वर्षांपूर्वी 'एचटीसी'नावाच्या कंपनीमार्फत या फोन्सनी पदार्पण केलं. गेल्या पाच वर्षांत या फोन्सनी मागे वळून पाहिलेलंच नाही! यंत्रमानव तंत्रज्ञान असलेले फोन्स आज अनेक महत्वाच्या कंपन्या बनवून बाजारात आणतायत! यात सगळ्यात आघाडीवर आहे 'सॅमसंग'! सॅमसंग कंपनीचा फोन घ्यायला लोक कधीकधी तयार नसतात कारण दर दोन महिन्यात जास्त आधुनिक नवा फोन बाजारात येतो आणि 'आपण अत्याधुनिक किंवा लेटेस्ट फोन घेतला' या आपल्या 'अभिमाना'ला (वाचा: 'गर्व/माज') तडा जातो. गुगलचे जीमेल, गुगल प्लस, गुगल टॉक, युट्युब असे अनेक प्रोडक्टस वापरताना मिळणारी फ्लेक्सिबिलीटी हे फोन्स वापरताना मिळते. वेळ आल्यास फोन कोणत्याही कॉम्प्युटरला जोडून आपल्याला डेटा ट्रान्स्फर करता येतो. आयफोनच्या तोडीस तोड किंवा कांकणभर सरस तंत्रज्ञान या फोन्समध्ये दिसतंय! सॅमसंग आणि सफरचंद कंपन्यांमध्ये या स्मार्टफोन प्रकाराशी संबंधित 'एकाधिकारा'वर (पेटंट) चाललेला खटला प्रसिद्ध आहे. त्यात सफरचंदाने बाजी मारून अनेक कोटी डॉलर्स नुकसान भरपाई म्हणून वसूल केलं. मात्र या प्रकाराने सॅमसंग जणू पेटून उठलं आणि गेल्या वर्षभरात त्यांनी काही 'जबर' (दुसरा शब्दच नाही) फोन बाजारात आणले आहेत. आयफोनने प्रस्थापित केलेली मक्तेदारी मोडून काढण्याची अपेक्षा फक्त यंत्रमानव फोनकडून होतेय यातच सगळं आलं.
'घरात कुत्री असून त्याच्याबद्दल न बोलणारा मालक किंवा मालकीण मला अजून भेटायचा आहे' हे जसं पुलंनी म्हटलंय तसंच स्मार्टफोन असून त्याचं अजिबात कौतुक न करणारा किंवा करणारी व्यक्ती मला भेटायची आहे. याला मीसुद्धा अपवाद नाही. माझ्या सॅमसंग एस थ्रीचं मी उठसूट कौतुक करत असतो आणि कुणाला नवीन फोन घ्यायचा असेल तर 'एस थ्रीच घे' असे फुकटचे सल्लेपण देत असतो. पण अलीकडे अत्यावश्यक झालेला फोनचा वापर काही बेसिक प्रश्न उपस्थित करतो- फोनला जीवनशैलीचा भाग मानलं तर तुमचा फोन तुमच्याविषयी काय सांगतो? तुम्हाला तुमचा कमी फीचर्स असलेला जुना फोन परत वापरावा लागला तर तुमची तयारी असेल का? आणि सगळ्यात महत्वाचं स्मार्टफोन लोकांची बुद्धिमत्ता आणि नितीमत्ता खालावायला कारण ठरतो आहे का? या प्रश्नाचं उत्तर 'हो' असेल तर मग स्मार्टफोनला चांगलं म्हणायचं का वाईट? (कुणी मराठी शाळेत शिक्षक असाल तर पुढच्या चाचणी परीक्षेत निबंधाला हा एक विषय जरूर ठेवा 'मोबाइल फोन: शाप की वरदान?'). पहिल्या प्रश्नाला कोणतंही तर्कशुद्ध उत्तर नाही! फोनकडे बघून माणसाच्या व्यक्तीमत्वाविषयी तर्क करणं म्हणजे 'कुणी कुठले कपडे घातलेत याच्यावरुन तो सिगरेट ओढतो का नाही?' या असंबद्ध प्रश्नाचं उत्तर देण्यासारखं आहे! नवीन फोन वापरायला सुरुवात केली आणि अचानक कुणाकडेतरी आपला जुना फोन दिसला की आपल्याला हसायला येतं. आपण एकेकाळी हा 'फडतूस' फोन वापरायचो हे फिलिंग आयुष्यात एकापेक्षा जास्त वेळा फोन बदलेल्या लोकांना नक्की येउन गेलं असणारे. पण अशा वेळी दोन क्षण थांबून विचार करायला हरकत नाही. नवीन फोन घेऊन एक अचिव्हमेंट पूर्ण केल्याचा आनंद साजरा करायला आणि वेळ आलीच तर जुना फोन परत वापरायला लागेल याबाबतीत मनाची तयारी करायला हे दोन क्षण पुरेसे आहेत! शेवटचा प्रश्न- खालावती बुद्धिमत्ता आणि नितीमत्ता. या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवाने 'हो' असं आहे. स्मार्टफोन प्रकाराचा मी कितीही चाहता, पंखा असलो तरी स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांनी फोनच्या वापरावर वयाची आणि आय.क्यू. यांची किमान मर्यादा ठेवण्याची सोय करावी असं माझं वैयक्तिक मत आहे! "सहा-सात वर्षांच्या आमच्या मुलाला आय-फोन हवा म्हणून तो हट्ट करतोय आणि त्याला आयफोन थ्री दिला तर त्याला तो नकोय, आयफोन फोरच हवाय" हे कौतुकाने सांगणारी अमेरिकन बाई मला भेटली तेव्हा 'लटकनेसे हाईट नाही बढेगी,मम्मी को बोलो कॉम्प्लान पिलाये' सारखं मला तिला 'स्मार्टफोन इस्तेमाल करनेसे अकल नही बढेगी, अपने बच्चे को बेकार आदते ना लगाये' असं म्हणावसं वाटलं. स्मार्टफोनचा वापर जेवढा चांगल्या गोष्टींसाठी होतो तेवढाच वाईट गोष्टींसाठी होतोय. स्मार्टफोन आणि सोशियल नेटवर्किंग यांच्या कॉम्बीनेशनमुळे 'इंट्रोवर्ट' हा शब्द इंग्रजी डिक्शनरीतून आणि 'अंतर्मुख' हा शब्द मराठी शब्दकोशातून काढून टाकायला हरकत नाही. जगाला आरडाओरडा करून काय सांगायचं? काय दाखवायचं? याच्यावर निर्बंध राहिलेले नाहीत. मोबाईल फोन हे या सगळ्या बदलाचं(?) मोठं कारण आहे. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खत येत नाही तसंच स्मार्ट वाटला म्हणून आयुष्य फोनच्या स्वाधीन करता येत नाही किंबहुना करूच नये! फोन, कॉर्डलेस फोन,मोबाईल फोन, स्मार्ट फोन या बदलाचे आपण साक्षीदार आहोत आणि याचं मला कौतुक आणि अभिमान आहे! पण मग अचानक नारळीकरांचं 'वामन परत न आला' आठवतं आणि मग सहजच विचारसुद्धा येतो…नवीन कोनाद** तयार होण्याची स्मार्ट फोन ही सुरुवात तर नाहीये ना? 

**ज्यांनी 'वामन परत न आला' किंवा 'Return of Vaman" वाचलं नाहीये त्यांना हा संदर्भ कदाचित लक्षात येणार नाही… त्याबद्दल क्षमस्व!! पण मराठी ब्लॉग वाचणाऱ्या बहुतेकांनी नारळीकरांची पुस्तकं वाचली असावीत असा अंदाज आहे.

Sunday, July 22, 2012

देवकण, सृष्टीरहस्य, वगैरे वगैरे..

१९२५ साली अमेरिकेतील टेनेसी राज्यात 'स्कोपेस मंकी ट्रायल' नावाचा खटला गाजला होता. स्कोपेस नावाचा शिक्षक शाळेतल्या मुलांना 'इवल्युशन' अर्थात उत्क्रांती विषय शिकवत होता म्हणून राज्य सरकारने त्याच्याविरुद्ध खटला भरला आणि त्यात तो दोषीही ठरला. 'बटलर' नावाच्या कायद्यानुसार बायबलमधल्या नोंदींच्या विरोधात जाऊन माणसाच्या अस्तित्वाबद्दल/जन्माबद्दल/उगमाबद्दल सरकार प्रमाणित शाळा किंवा विद्यापीठांमध्ये शिकवणं कायद्याने गुन्हा होता. आज अचानक या खटल्याबद्दल आठवण्याचं कारण म्हणजे अलीकडे लागलेला देवकणाचा अर्थात 'हिग्ग्स बॉसोन' नावाच्या 'गोष्टीचा' शोध! जगाच्या उत्पत्तीचा शोध लावण्याचं काम बहुतेक जगाच्या उत्पत्तीपासून सुरु असावं! पण गेल्या शतकात माणसाने विज्ञान क्षेत्रात क्रांतिकारी प्रगती केली आणि अखेर संशोधन फळाला येऊन त्याला 'देवकण' गवसला. सोप्या शब्दात जर का या बॉसोनच्या तयार होण्याबद्दल सांगायचं तर एकमेकांच्या दिशेने येणारे दोन वेगवान शक्तीस्त्रोत जर का एकमेकांवर आदळले तर त्यातून वास्तविक अस्तित्व असणारे, वस्तुमान असणारे पदार्थ निर्माण होतील. परंतु या पदार्थांचं अस्तित्व जाणवून, त्यांचं वस्तुमान काढेपर्यंत हे पदार्थ टिकत नाहीत कारण ते खूप अस्थिर असतात. शिवाय त्यांचं वस्तुमान काढण्याइतका मोठा कण जर का मिळवायचा असेल तर टक्कर होणारे स्त्रोत तितकेच शक्तिशाली असले पाहिजेत. अलीकडे लागलेल्या शोधात स्थिर बॉसोन शोधण्यात शास्त्रज्ञाना यश आलं आहे. 


हा शोध कसा केला गेला?कुणी केला?कधी केला?त्याचं महत्व काय? वगैरे वगैरे प्रश्नांची उत्तरं वेळोवेळी हे संशोधन करणाऱ्या मंडळींनी दिली आहेत. पण माझा प्रश्न फार मुलभूत आहे. कदाचित त्याचं वस्तुनिष्ठ उत्तर मिळणं अवघड आहे. प्रश्न वस्तुनिष्ठ असण्यापेक्षा जास्त तत्वनिष्ठ म्हणता येईल कदाचित...तर 'नमनाला घडाभर तेल' घालून झाल्यावर प्रश्न काय तेही सांगतो- हा बॉसोन शोधण्याचा अट्टाहास का? म्हणजे जगाच्या निर्मितीचं रहस्य जाणून घेण्यात माणसाला रस आहे हे जरी मला संपूर्णपणे मान्य असलं तरी हा शोध जगापुढे इतकी प्रसिद्धी देऊन मांडण्यात मिडीयाने, संशोधकांनी काय साधलं असा प्रश्न मला पडतो. संशोधक म्हणतात की आत्तापर्यंतचा सर्वात मोठा शोध आहे. पण जगातल्या तमाम जनतेला हा शोध नीट कळला आहे का या  प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं असेल. काही दशकांपूर्वी जेव्हा इलेक्ट्रोनचा शोध लागला तेव्हासुद्धा लोकांना त्या शोधाचं महत्व कळलं नव्हतं पण आज आपण पाहत असलेली तांत्रिक प्रगती ही त्या एका शोधामुळे झाली असं स्पष्टीकरण तज्ञ देताना दिसतायत. याच प्रकारे येत्या काळात बॉसोनच्या शोधानेसुद्धा क्रांतिकारी बदल होतील अशी अपेक्षा आपण करूया असं त्यांना म्हणायचं आहे. भौतिकशास्त्र हा विषयाबद्दल माझा आकस नाही परंतु गेल्या शतकातला सगळ्यात मोठा शोध म्हणून आईनस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताकडे पाहिलं जातं. पण त्या सापेक्षता सिद्धांताचा आपण व्यावहारिक (Applied) जगात नेमका काय उपयोग केला? हॉलीवूडला काही अफलातून साय-फाय सिनेमे निर्माण करायला मिळालेला एक विषय सोडून विशेष काहीच नाही. या बॉसोनच्या शोधाच्या बाबतीत ही शक्यता नाकारता येत नाही. 

जगाच्या रहाटगाडग्याकडे पाहण्याचे लोकांचे ठराविक दृष्टीकोण आहेत. काही अखंड कर्मयोगाची कास धरतात, त्यांना जगाच्या निर्मितीशी काही घेणं-देणं नसतं. रोजची आठ तासाची मेहनत, दोन वेळेचं जेवण, स्पर्धा-असूया-कौतुक, आठ तासाची झोप आणि इतर वेळेत मनोरंजन, नामस्मरण वगैरे करणं हा त्यांचा आयुष्याकडे, जगाकडे पहायचा दृष्टीकोण. दुसऱ्या प्रकारचे लोक स्पिरिचुअल, रिलिजिअस टाईप मध्ये येतात. जगाला कंट्रोल करणाऱ्या कुठल्यातरी शक्तीची ते उपासना करतात आणि त्या शक्तीशी कनेक्ट होणं हे आयुष्याचं अंतिम उद्दिष्ठ असतं. जगनियत्यांच्या योजनेत आपल्याला एक भूमिका राखून ठेवली आहे आणि जगाचा कर्ता-करविता आपली काळजी घेणार आहे याची या दैववादी लोकांना खात्री असते. तिसऱ्या प्रकारचे बुद्धिवादी असतात.त्यांची कर्मवाद किंवा दैववाद अशी विशेष भूमिका नसते आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या बुद्धीला पटणाऱ्या गोष्टी करायला आवडतात. ते करत असलेल्या प्रत्येक कृतीचं समर्थन करता येणं त्यांना शक्य असतं. जर का जगातल्या लोकांचे ढोबळपणे पडणारे हे तीन प्रकार आपण मान्य केले तर आता पुन्हा मुळ विषयावर येतो. यापैकी कुठल्याही प्रकारच्या मंडळींना बॉसोनच्या शोधाने काय विशेष फायदा होणारे? 

काही वेळासाठी आपण असं गृहीत धरूया की जगाची उत्पत्ती हे रहस्य कधीच नव्हतं किंवा जगाची निर्मिती कशी झाली हे शोधण्याचा अट्टाहास बाजूला ठेवून जर का जगाकडे निव्वळ एक साधं नियंत्रित, अखंड कार्यरत यंत्र (Simple Perpetual Controlled Machine) म्हणून पाहिलं आणि त्याची उत्पत्ती कशी झाली हे शोधायचं थांबवलं तर जगात आजघडीला महत्वाच्या कितीतरी समस्या आहेत. ग्लोबल वॉर्मिंग याच वेगाने सुरु राहिलं तर जगच राहणार नाही, एड्स आणि कॅन्सरने आज जगात निर्माण केलेली भीती जर का नष्ट करायची असेल तर या आजारांवर उपाय शोधणं जास्त महत्वाच आहे, आण्विक युद्धाची टांगती तलवार डोक्यावर लटकते आहे. मला असलेल्या अल्प-स्वल्प माहितीप्रमाणे या कुठल्याच समस्येवर हा बोसॉन उत्तर देऊ शकणार नाही. आईनस्टाईनला आपण गेल्या शतकातला सर्वात मोठा भौतिक शास्त्रज्ञ मानतो. त्याने न्यूटनच्या भौतिकशास्त्रातल्या संकल्पना समूळ बदलल्या. लोकांना काळ या चौथ्या मितीबद्दल कळलं. पण या शतकातल्या सर्वात मोठ्या शोधाकडे- बोसॉनकडे या काळ संकल्पनेबद्दल आणि त्यापुढे पर्यायाने विचारल्या जाणाऱ्या काल भ्रमण यंत्राबद्दल (टाईम मशीन) कुठलीही उत्तरं नाहीत. गेली काही शतकं माणूस चंद्रापासून ते सगळ्या आकाशगंगेत कुठली जीवसृष्टी, पाणी किंवा तत्सम काहीही आहे का ते शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पण बिचारा बोसॉन या बाबतीतसुद्धा काही उपयोगाचा नाही. मग त्याला शोधण्याचा अट्टाहास का? त्यासाठी अब्जावधीने पैसा खर्च करणं का?कशासाठी?    

मला कधी कधी खूप नवल वाटतं. आपण आपल्यासमोर असणाऱ्या खऱ्या समस्यांचा गांभीर्याने विचार करण्याऐवजी विश्व्युत्पत्ती, माणसाचा उगम या गोष्टींवर उहापोह करतो. संशोधक, लोकनेते, समाजाभिमुख माणसांनी भौतिक आयुष्यात येणाऱ्या समस्या आधी सोडवाव्यात. विश्वाच्या उत्पत्तीचा शोध अजून ५०..१००...किंवा ५०० वर्षांनी लागला तरी हरकत नाही पण तोपर्यंत जग वाचवणारं संशोधन होणं आणि निसर्गात समतोल निर्माण करणं हे अतिशय गरजेचं आहे. जसं विज्ञानाचं आहे तसंच आपल्या दैनंदिन आयुष्याचं! आपण रोजघडीला जगत असणारं आयुष्य जसंच्या तसं स्वीकारणं जास्त चांगलं. आपण करत असलेलं काम इमानेइतबारे, जगनिर्मात्याच्या कुठल्याही योजनेचा विचार न करता केलं तर सोप्पं जाणार नाही का? स्वतःशी, लहानपणापासून शिकवल्या गेलेल्या नितीमुल्यांशी प्रामाणिक राहून, आजूबाजूच्या माणसांना, प्राण्यांना मदत केली तर असा कुणी जग निर्माता खरोखर असेल तर तो नक्की भेटेल आणि त्याची सिक्रेट योजना आणि त्यातली आपली भूमिका तो आपल्याला नक्की सांगेल. (हा परिच्छेदाचा दुसरा भाग आध्यात्मिक प्रगतीच्या गप्पा मारत जगरहाट समजावणाऱ्या मंडळींसाठी)

का?कसं?कधी?कोण? असे ककारी प्रश्न पडणं हे मनुष्याची बुद्धी शाबूत असल्याचं, जिवंत असल्याचं लक्षण आहे. नव्हे, इतर प्राणी आणि माणूस यांच्यातला तोच सगळ्यात मोठा फरक आहे. या फरकामुळेच आज जगावर माणसाची एकहाती सत्ता आहे. हा अखंड फाफटपसारा मांडल्यावर त्याचं नियंत्रण करणं आणि जगात समन्वय राखणं हे अर्थात माणसाचं काम आहे. तेव्हा ते कसं नीट करता येईल याकडे लक्ष देणं ही प्रायोरिटी असली पाहिजे. बॉसोनच्या बाबतीत बोलायचं तर हे संशोधन करावं किंवा त्यावर इतका अब्जावधी पैसा खर्च करावा की नाही यावर भाष्य करण्याचा मला अर्थार्थी अधिकार नाही परंतु मला असं जरूर वाटतं की जी प्रसिद्धी आज या संशोधनाला मिळाली तशीच प्रसिद्धी व्यावहारिक जगातल्या समस्यांच्या उपायांवर चाललेल्या संशोधनाला मिळायला हवी. ग्लोबल वॉर्मिंग पासून ते पाणी प्रश्नापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी होत असलेलं संशोधन लोकांना कळायला हवं, त्यांचं महत्व कळायला हवं, त्यांची भीषणता जाणवायला हवी. 

विज्ञान आणि धर्म यांच्यात चाललेलं शीतयुद्ध काही शतकं जुनं झालंय. २१व्या शतकात शिक्षण झाल्यामुळे, चार बुकं वाचल्यामुळे मी अर्थात विज्ञानाच्या बाजूचा आहे. पण त्याचा अर्थ माझा देवावर विश्वास नाही असा होत नाही. जग चालवणारी एक अदृश्य शक्ती आहे आणि तिच्यावर माझा विश्वास आहे. येत्या काळात आपल्याला विश्व कसं निर्माण झालं हे कळलं तर कदाचित पुढच्या पिढ्यांचा देवावर किंवा तत्सम कुठल्याही शक्तीवर विश्वास राहणार नाही अशी शंका वाटते. आपण राहतो ते जग समजून घेण्याचा हा 'बॉसोन' प्रयत्न म्हणूनच जास्त हास्यास्पद वाटतो.   


टीप : खरंतर मी ब्लॉग समर्पित करायच्या भानगडीत पडत नाही परंतु या विषयावर माझ्या विना-अधिकार कल्पनांवर मैत्रीच्या अधिकाराने दिलखुलास टीका करणाऱ्या गौरवला हा ब्लॉग समर्पित! :D 

  
चैतन्य