Pages

Friday, April 27, 2012

प्रेम..वेल...अ..प्रेम..हं..


            पूर्वीच्या हिंदी-मराठी सिनेमांमध्ये, मालिकांकडे बरेचदा 'नाक्यावरचे प्रेमवीर' असायचे. गळ्यात लाल किंवा तसलासा भडक रुमाल, तोंडात सिगरेट नाहीतर 'ईस्टाइल' म्हणून धरलेली काडी, कसातरी खोचलेला शर्ट, डोक्यावर टोपी किंवा बांधलेला रुमाल वगैरे! अनिल कपूर (राम-लखन), जॅकी श्रॉफ (हिरो), आमीर खान (रंगीला), सलमान खान (तेरे नाम) या मंडळींनी अशा भूमिका लोकप्रिय केल्या. आपल्या प्रेयसीवर किती उदात्त, वेड्यासारखं प्रेम करावं याचं या व्यक्तिरेखा मूर्तिमंत उदाहरणं होती. 'प्रेम करावं भिल्लासारखं...' वगैरे वगैरे कविता सूट होतील त्यांच्या प्रेमाला! मी 'तेरे नाम' पहिला नाहीये म्हणजे 'मी प्रेम करायला नालायक आहे' असं देखील मला माझ्या एका मित्राने सांगितलं होतं. मग शारूक, सैफ यांच्यासारखं चकचकीत, पॉश प्रेम करणारे नायक आले. प्रेम व्यक्त करायच्या पद्धती बदलल्या. पण सगळं सुरळीत चालू होतं. मग र्कुट आलं, फेसबुक आलं आणि प्रेम या विषयावर लोकांचा एकूणच व्यासंग भयंकर वाढला. नाक्यावरच्या प्रेमवीरांपासून आपली 'तांत्रिक' आणि 'सांस्कृतिक' प्रगती होऊन आज 'वर्चुअल' प्रेमवीर अशी एक नवीन e-literate जमात उदयाला आलीय. या जमातीचे आणि त्यांच्या व्यासंगाचे माझ्यासारख्या अल्पमती माणसाच्या 'सामाजिक गुंत्यावर' (सोशिअल नेटवर्क हो!!) होणाऱ्या भल्या-बुऱ्या परिणामांची नोंद करायला हा खटाटोप..!     

जीवनावश्यक वस्तू खूप महाग होत चालल्यात असं म्हणून एकीकडे आपण हळहळत असतो दुसरीकडे प्रेम मात्र दिवसेंदिवस इतकं स्वस्त होत चाललंय की काही वर्षांनी खरंच प्रेम खाऊन-पिऊन जगायची तयारी करावी लागणारे. लोक 'सिंगल' ते 'इन अ रिलेशनशिप' इतक्या सहज जातात की ही माणसं लहानपणी डोक्यावर पडली होती अशी मला शंका आहे. 'इट्स कॉम्पलिकेटेड' म्हणजे नेमकं काये? एखादं सर्टीफिकेट मिरवल्यासारखं लोकांना रिलेशनशिप स्टेटस ही गोष्ट मिरवण्यात काय मजा येते हेही मला अजून उमगलेलं नाहीये. आपल्या प्रेयसीला नुसतं हृद्य नाही पण डोळा, किडनी, यकृत, फुफुस्से असे ऑलमोस्ट सगळे अवयव दिलेल्या प्रियकरांच्या गोष्टी मी 'Please Read Carefully' किंवा 'जगातली सगळ्यात दुर्दैवी प्रेमकथा' अशा शीर्षकाखाली वाचल्या आहेत. एक मुलगा छातीशी हात घट्ट धरून उभा आहे, खाली रक्ताचं थारोळ झालंय आणि एक मुलगी त्याचं 'हार्ट' घेऊन पाठमोरी जातेय अशा प्रकारची कित्येक हिंसक चित्रं लोकप्रिय आहेत. गुलाब, लाल बदाम, टेडी बेअर्स, चॉकलेट्स ही पारंपारिक प्रेम व्यक्त करणारी प्रतीकं मागे पडली आहेत आणि त्यांची जागा आता हातावर 'ब्लेड्बाजी' केलेल्या, नसा कापून घेतलेल्या फोटोंनी घेतली आहे. ऍबस्ट्रॅक्ट’ आर्ट का काय म्हणतात ते पूर्वी लोकांना कळायला कठीण जायचं, शतकानुशतकं पिकासोसारख्या मंडळींनी या कलाप्रकारावर अधिराज्य गाजवलं. पण आता- 'वर्चुअल' प्रेमवीरांचा विजय असो! त्यांच्यामुळे आपल्याला समजलं आहे की ऍबस्ट्रॅक्ट आर्ट म्हणजे काय! एखाद्या स्वच्छ पृष्ठभागावर पडलेले चार पाण्याचे थेंब किंवा एकत्र जळणाऱ्या दोन काड्या असे फोटोस जर का आपण काही वर्षांपूर्वी पाहिले असते तर 'रोल वाया घालवला' असं म्हणून आपण त्या फोटोसची थट्टा केली असती किंवा न कळणारं ऍबस्ट्रॅक्ट आर्ट म्हणून विषय सोडून दिला असता. पण आता आपण खात्रीने सांगू शकतो की ते पाण्याचे चार थेंब म्हणजे 'प्रेम', दोन जळणाऱ्या काड्या म्हणजे 'प्रेम', वाळूवर उमटलेली पावलं म्हणजे 'प्रेम', समुद्राच्या लाटा, आकाश, जेवण, दगड, विमान, बोटी, सगळं सगळं म्हणजे....करेक्ट कळलंय सगळ्यांना नाही का? प्रेमाचं मूर्तिमंत प्रतिक म्हटलं की सगळं जग 'ताजमहाल' असं नाव घेतात पण ज्या लोकांवर वर्चुअल प्रेमवीरांच्या व्यासंगाचा पगडा आहे ते चीनमधल्या कुठल्यातरी टेकडीत खोदलेल्या पायऱ्यांचीसुद्धा गोष्ट सांगतील. 'प्रेम पुरेसे आहे' किंवा 'दुसरे काळीज देईन तोडायला' अशा वैविध्यपूर्ण नावांचे गट आज फेसबुकावर अस्तित्वात आहेत आणि त्यांचा अभ्यास दांडगा आहे. माहितीचा अतिरेक म्हणजे गुगल किंवा विकिपीडिया नाहीच पण हे सगळे गट आहेत. तुम्हाला एखादी मुलगी/मुलगा आवडत असेल तर तुम्ही कसं वागलं, बोललं पाहिजे याचं प्रतीकात्मक प्रशिक्षण आज फुकट उपलब्ध आहे. तुम्ही प्रेमाची कबुली दिल्यावर तुम्हाला मिळू शकणारी आदर्श उत्तरं, नकारात्मक उत्तरं, त्यावर तुम्ही द्यायची उत्तरं हेसुद्धा तुम्हाला इथे कळतं. 

मला सगळ्यात जास्त अचंबित करतात ते वर्चुअल प्रेमकवी. शाळा आणि ज्युनिअर कॉलेजच्या दिवसात 'प्रेम' म्हणजे काय असतं ही अक्कल जरी नसली तरी पाडगावकरांची 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असतं' ही कविता माहित होती. कवितेतल्या 'पाच मुलं झाली तरी प्रेम कधीच केलं नाही' या ओळीला कोपरखळ्या व्हायच्या. नंतर खरे बुवा आले, त्यांची 'लव्ह लेटर' गाजली. नंतर या वर्चुअल वर्ल्डमध्ये प्रेमकवितांचा पाउस पडायला सुरुवात झाली. गद्यकविता, स्फुटे, चारोळ्या, गजल अशा प्रकारांनी उच्छाद मांडला. आधी लिहिल्याप्रमाणे दगड, माती, पाणी सगळं प्रेम असल्यामुळे या कवितादेखील तशाच..सुखं-दुःखं, ऊन-पाउस अशी साहित्यात पूर्वी सर्वसाधारण आयुष्याला उद्देशून वापरली जाणारी रुपकं प्रेमासाठी वापरली जायला लागली. चारोळी या काव्यप्रकाराने तर प्रत्येक इंग्लिश मिडीयमवाल्या मुलातसुद्धा दडलेला, त्याला कधीच न उमगलेला आणि उमगण्याची शक्यता नसलेला कवीदेखील जिवंत केला. या चारोळ्या वाचल्या की पुलंच्या 'असा मी असामी' मधलं 'यात काही यमक आहे का काव्य आहे?' हे वाक्य आठवलं नाही तर शपथ!!

तर या सर्व प्रेमवीरांबद्दल माझ्या मनात राग, लोभ, करुणा, प्रेम (?), दया, क्षमा अशा सगळ्या भावना आहेत. त्यांच्या भावनांबद्दल मला आदरयुक्त राग आणि भीती आहे. त्यांनी प्रेमाच्या जगातली त्यांची मुसाफिरी अशीच चालू ठेवावी आणि जगातल्या सगळ्या प्रेमेच्छुक तरुण-तरुणींच्या ज्ञानात भर घालत राहावी. मात्र माझ्यासारख्या पामर आणि प्रेमेच्छुक नसलेल्या माणसांच्या सामाजिक गुंत्यामधली गुंतागुंत अधिक वाढवू नये ही प्रार्थना ही क्युपिडच्या (हो तोच तो प्रेमाचा 'उडता' एंजल) चरणी मी करत आहे. 

ऑन अ सिरीयस नोट, मला खरंच असं वाटतं की सोशिअल नेट्वर्किंगमुळे एकूणच समाजभान वाढलं आहे की सुटत चाललंय याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. 'प्रेम' इतकं स्वस्त नसतं यार!! जगात खूप समंजस लोक आहेत यावर माझा विश्वास आहे आणि जर का काही समंजस लोकांना प्रेमासारख्या गोष्टी चव्हाट्यावर मांडाव्याशा वाटतात..तर-...वेल..सामाजिक गुंते वाढवताना भावनिक खच्चीकरण होतंय असं समजावं लागेल. माझं रिलेशनशिप स्टेटस ध्यानात घेता मी हे नमूद करू इच्छितो की हा लेख मी कोणतेही पूर्वग्रह न ठेवता किंवा पक्षपातीपणा न करता एक साधारण मनुष्य या नात्याने लिहिला आहे. तो विरंगुळा म्हणूनच वाचावा. त्यातून कुणाच्याही भावनेचा अपमान करायची इच्छा नाही. कुणी अपमान करून घेतल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही.    

ता. क: हा ब्लॉग लिहिताना मी 'मैने तेरे लिये ही सात रंग के' ऐकत होतो. मजा आली. बरेच दिवसात ऐकलं नसेल तर नक्की ऐका. आणि आता 'P.S. I love you' बघायचा बेत केलाय. खूप सुंदर 'लव-इस्टोरी' आहे ती! खाली एक चित्र देतोय...त्या चित्रातून मला काय म्हणायचं आहे हे लेख वाचून तुम्हाला कळलं असेलच!




चैतन्य

Saturday, April 14, 2012

जळता शोध: 'मिसिसिपी बर्निंग'

जात, धर्म, भाषा यांच्या नावाखाली माणसांमध्ये सतत होणारा संघर्ष हा काही नवीन विषय नाही! भारतात जन्माला आलो की या सगळ्या पाचवीला पुजलेल्या गोष्टी आहेत. इतिहास म्हणतो की गेल्या काही दशकांमध्ये समाजसुधारणा झाली. प्रथा-परंपरा बदलल्या. कायदे बदलले, कायदे करणारे लोक बदलले. पण खरंच आपण माणसाशी माणूस म्हणून वागायला शिकलो आहे का? या प्रश्नाला १००% होकारार्थी उत्तर मिळणं कठीण आहे! याच विषयावर चर्चा सुरु असताना एक मित्र म्हणाला "आपण फक्त ठणाणा बोंबा मारायच्या बघ..आपण मारे कितीही सुधारणांच्या गप्पा मारल्या तरी वर्षानुवर्षांचे संस्कार (चुकीचे असले तरी) पार 'जीन्स' (GENES)मध्ये इतके भिनलेले असतात की हिंदूंना मुसलमानांबद्दल आणि मुसलमानांना हिंदूंबद्दल तेढ कायम राहणार; ब्राह्मणाची गांधी, आंबेडकर यांच्याबद्दलची मतं बदलायची नाहीत की शेड्युल कास्टवाल्यांची ब्राह्मणांबद्दलची आणि सावरकरांबद्दलची! कधी राजकारण, कधी समाजकारण आड येणार आणि हे असंच चालू राहणार! ब्राह्मण म्हणून तुझ्या घरी तुझ्यावर 'शाखेचे'च संस्कार होणार..तुझ्या आई-वडिलांनी केले नाहीत तर इतर लोक करणार" वगैरे वगैरे..तेव्हा वाटलं होतं की या देशात जन्माला येऊन फार मोठी चूक झाली. तिकडे दूर देशी (म्हणजे अर्थात अमेरिकेत वगैरे) जन्माला आलो असतो तर निदान हे प्रश्न तरी सहन करावे लागले नसते..आडनाव वाचून लोकांनी संस्कार आणि स्वभाव यांचे ताळेबंद तरी बांधले नसते. पण धत तेरे की-..तेव्हा तिकडे दूर देशी अस्तित्वात असणाऱ्या 'वर्ण द्वेषाच्या' दाहक वास्तवाची कल्पनाच नव्हती मुळी!अर्थात तिथे देखील संघर्ष झाला, सुधारणा झाल्या, प्रथा बदलल्या, कायदे बदलले, कायदे करणारे लोक बदलले आणि आज दिसायला तरी वर्णभेद नसणारा, सगळ्या जगाला प्रेमाने आपलंसं करणारा देश म्हणून अमेरिका आपल्याला माहितीय! हे सगळं रिकामटेकडं तत्वज्ञान सुचण्याचं कारण म्हणजे नुकताच पाहिलेला 'मिसिसिपी बर्निंग' हा सिनेमा.अमेरिकेत १९६० च्या सुमारास जो नागरी लढा झाला त्यादरम्यान घडलेल्या एका सत्य घटनेचं काल्पनिक-वास्तव चित्रण करणारा हा सिनेमा. 

१९६०चा काळ. वर्णद्वेष दक्षिणेकडील विशेषतः मिसिसिपी, अलाबामा या राज्यांमध्ये जास्त प्रमाणात होता. कृष्णवर्णियांना हीन, अस्पृश्य वागणूक मिळायची! मग सर मार्टिन ल्युथर किंग सारखी माणसं आली आणि त्यांनी वर्णभेद नष्ट करायला राष्ट्रीय नागरी लढा सुरु केला. अमेरिकेतील निग्रोंना, आफ्रिकन-अमेरिकन लोकांना मतदानाचा हक्क मिळावा, इतर हक्क मिळावे यासाठी हा लढा होता. (इथे मुद्दाम नमूद करावसं वाटतं की हा लढा समान हक्कांसाठी होता, शैक्षणिक किंवा सरकारी सवलती मिळाव्या म्हणून नाही आणि हे वाक्य संस्कारापेक्षा जास्त बुद्धीवादातून आलं आहे.)  गौरवर्णीयांचे सामाजिक, राजकीय अधिपत्य कायम राहावे म्हणून झटणाऱ्या 'कु क्लक्स क्लान' नावाच्या संस्था अस्तित्वात होत्या (खरंतर आजही आहेत) ज्यांचे मिसिसिपीमधले गट नागरी लढ्यादरम्यान कार्यरत होते.मिसिसिपी राज्यातल्या नेशोबा कौंटीतले काही वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील या गटांचे सदस्य होते. कौंटीमध्ये १९६४च्या जून महिन्यात तीन समाजसेवकांची निर्घृण हत्या करण्यात आली. यातले दोन गौरवर्णी, ज्यू होते आणि एक कृष्णवर्णी होता. दोन्ही ज्यू मुलं उत्तरेकडून वर्ण समानता काँग्रेसकडून वर्णभेदाविरुद्ध प्रचार करायला आली होती. क्लानचे सदस्य आणि पोलीस अधिकारी यांनी मिळून या हत्या घडवून आणल्या. यासंबंधीची विस्तृत माहिती इथे वाचायला मिळेल. या हत्यानंतर राष्ट्रीय गहजब झाला. हत्यांची चौकशी करायला देशाच्या सरकारला मिसिसीपीला फेडरल ब्युरोचे लोक पाठवायला लागले आणि याच दरम्यान अमेरिकेतला वर्णभेदावर बंदी आणणारा 'कायदा' मंजूर झाला. इकडे मिसिसिपीत ब्युरोच्या लोकांनी जंगजंग पछाडूनदेखील काही तपास लागत नव्हता. शेवटी माहिती मिळवण्यासाठी पैशांच्या बक्षिसाचं आमिष दाखवायला लागलं. समाजसेवकांचे मृतदेह सापडले. नंतर सुरु झालेला खटला अनेक महिने चालला, गाजला, बंद पडला, पुन्हा सुरु झाला, शेवटी एकदाची काही लोकांना शिक्षा झाली. उणी-पुरी ४० वर्षं गेली या सगळ्यात. या सत्यघटनांवर बेतलेल्या काल्पनिक सिनेमात सगळा भर सामाजिक विषमता, वर्णद्वेष आणि त्याचे लोकांवर होणारे परिणाम यावर आहे. सिनेमामध्ये गुन्हेगार शेवटी पकडले जातात आणि त्यांना शिक्षा होते असं दाखवलं आहे.'गुड कॉन्कर्स इवील' असा सकारात्मक संदेश पोहोचणं अपेक्षित असावं. सिनेमा रिलीज झाला तेव्हा घटनेमागे असलेली राजकीयता लक्षात ठेवून त्यात कोणतीच मुळ नावं वापरलेली नाहीत. 

सिनेमा सुरु होतो तेव्हा दोन पाण्याचे नळ (फाउंटन्स) दिसतात. एक चांगल्या स्थितीत आहे आणि त्यावर 'व्हाईट' असा फलक आहे, दुसरा जुनाट नळ वाहतोय, त्यावर 'कलर्ड' असा फलक आहे. एक गौरवर्णी चांगल्या नळावर पाणी पिऊन जातो आणि एक लहान कृष्णवर्णी मुलगा वाहत्या नळावर. पुढे साधारण काय बघायला मिळणारे याची पुसटशी कल्पना इथेच येऊन जाते. श्रेयनामावली सुरु होते तेव्हा एक जळतं घर दिसतं आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळी नावं दिसतात. सुरुवातीला त्या जळक्या घराचं महत्व फारसं अधोरेखित होत नाही पण नंतर संपूर्ण सिनेमात जेव्हा अशी घरं जाळण्याचे प्रसंग येतात तेव्हा ते दर वेळी जास्त जास्त अंगावर येतात. पहिल्याच प्रसंगात तीन किशोरवयीन समाजसेवक मुलांचा होणारा पाठलाग आणि त्यांचा खून चित्रित केलाय. पुढच्या प्रसंगात फेडरल ब्युरोचे दोन अधिकारी मिसिसिपीतल्या काल्पनिक 'जेसप' कौंटीला यायला निघालेले असतात. सिनेमामधलं नाट्य निर्माण झालंय ते दोन्ही अधिकाऱ्यांच्या वैचारिक मतभेदांमधून! तरुण वाटणारा अधिकारी 'लन वॉर्ड' इन्चार्ज आहे,त्याला ब्युरोत तीनेक वर्षंच झाली आहेत, त्याचा पुस्तकी क्लुप्त्या, पद्धतींवर भर असणारे असं त्याच्या बोलण्यातून समजतं. दुसरीकडे वयस्कर वाटणारा अधिकारी रुपर्ट ऍन्डरसन निवांत आहे, तो कधी काळी मिसिसिपीमध्ये कुठल्यातरी कौंटीचा शेरीफ (वरिष्ठ पोलीस अधिकारी) होता. त्याला पुढे काय वाढून ठेवलं असणारे याची कल्पना आहे, तो वॉर्डला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो की सरळसोट मार्गांनी या केसचा निकाल लागणं शक्य नाही. जेसपमध्ये सगळे पोलीस अधिकारी गौरवर्णी आहेत आणि ते फेडरल ब्युरोकडून आलेल्या या दोन लोकांना अक्षरशः 'फाट्यावर' मारतात.(ब्युरोच्या लोकांना अशी वागणूक मिळालेली शक्यतो कुठल्याच सिनेमात पाहायला मिळत नाही.) मुलं गायब झाली आहेत किंवा त्यांचं अपहरण, खून असं काही झाल्याची शक्यतादेखील लोकल पोलीस मान्य करत नाहीत. ऍन्डरसन पेलनावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या बायकोशी मैत्री(?) करण्याचा प्रयत्न करतो. तिची भूमिका सिनेमात हळूहळू मध्यवर्ती होत जाते.

लन पार्कर या दिग्दर्शकाने सिनेमाचा वेग व्यवस्थित सांभाळला आहे. कुठलाच प्रसंग कंटाळवाणा किंवा अनावश्यक नाही. वॉर्ड इन्चार्ज असल्याने तो आणि ऍन्डरसन सुरुवातीला त्याच्याच मार्गांनी शोध घेत राहतात. त्यांच्यात त्यावरून उडणारे खटके हा एक भाग, दुसरीकडे ऍन्डरसन आणि पोलीस अधिकाऱ्याच्या बायकोमध्ये निर्माण होणारी जवळीक हाही एक महत्वाचा भाग आहे. तीन मुलांची गाडी सापडते पण प्रेतं सापडत नाहीत. वॉर्ड ब्युरोची १००-१५० माणसं कामाला लावून गाडी सापडलेल्या दलदलीच्या भागात शोधाशोध सुरु करतो. एकीकडे कृष्णवर्णीयांच्या घरांवर हल्ले सुरु असतात. अख्खं घर जाळून टाकायचं आणि लोकांना बेघर करायचं ही कुटील कल्पना. लोकल पोलिसांच्या आणि क्लानच्या भीतीने स्वतःचं घर जळताना पाहिलेली माणसंसुद्धा काही बोलायला तयार नाहीत हे बघून कीव येते. दोन्ही अधिकारी राहत असलेल्या हॉटेलवर देखील हल्ला होतो. तेव्हा वॉर्ड काम करायला शहरातलं एक थेटर भाड्याने घेतो. एका रात्री गायब असलेल्या तीन लोकांसारखं आणखी एका कृष्णवर्णीयाला त्रास द्यायचा प्रयत्न होतो. ऍन्डरसनला बातमी मिळालेली असते. तो आणि वॉर्ड त्या मुलाला पळवणाऱ्या गाडीचा पाठलाग करतात. पण वॉर्डच्या बुजऱ्या पद्धतींमुळे त्यांना उशीर होतो आणि मुलाचा शारीरिक छळ होऊन त्याला टाकून देण्यात येतं. तरी तो मुलगा अधिकृत तक्रार करायला तयार नसतो. सिनेमावर टीका झाली ती त्यातल्या 'कृष्णवर्णी लोकांचं इतकं भेदरलेलं असणं' खुप टोकाचं (आणि अर्थातच अतिशयोक्त) दाखवलं आहे म्हणून. आजचे अमेरिकन कृष्णवर्णी पहिले तर ही टीका रास्त वाटते, अर्थात सिनेमात मात्र वेगवेगळ्या प्रसंगात वर्णभेदाविरुद्ध चाललेल्या एका मोर्चाला शिवीगाळ करणारे लोक, प्रार्थना करत असणाऱ्या एका लहान मुलाला मारणारे लोक, जाहीर सभांमध्ये गौरवर्णीयांचा आणि त्यांच्या वर्णश्रेष्ठपणाचा उदोउदो करणारे लोक पाहिले की गौरवर्णीय लोकांबद्दलची चीड वाढत राहते. एकीकडे वॉर्ड लोकल पोलिसांची तीन मुलं बेपत्ता असण्यासंदर्भात उलट तपासणी घ्यायला सुरुवात करतो. यावर उत्तर म्हणून शहराचा महापौर (मेयर) येऊन त्याला धमकावून जातो. वॉर्डची सहनशक्ती संपायला लागलेली असते. त्याला ऍन्डरसनचं म्हणणं पटायला लागलेलं असतं. अजून एका घरावर हल्ला होतो. एक स्थानिक कृष्णवर्णी मुलाच्या साक्षीने तीन लोकांविरुद्ध खटला उभा राहतो पण कोर्ट त्यांना मुक्त करतं हा प्रसंग पाहून चीड येते. खटल्याचा निकाल लागल्यावर पुन्हा एक हल्ला होतो. यावेळी घर तर जाळलं जातंच शिवाय घराच्या मालकाला एका झाडाला लटकावून गळफास लावून मारतात. दुसरीकडे सगळ्या घटनांनी सैरभैर झालेली, ऍन्डरसनशी जवळीक निर्माण झालेली पेलची बायको त्याला तीन मुलांची प्रेतं कुठे पुरली आहेत ते सांगते. प्रेतं सापडतात आणि निव्वळ बेपत्ता असण्याची केस अधिकृतपणे 'मर्डर'ची केस बनते. पेलला सत्य कळल्यावर तो बायकोला मारहाण करतो. तिला हॉस्पिटलला ऍडमिट करतात. ऍन्डरसनचं डोकं फिरतं आणि तो वॉर्डच्या पद्धतींवर चिडत पेलला मारायला निघतो. दोघांमध्ये एकमेकांबद्दल असलेला असंतोष उफाळून येतो आणि एक लहानशी मारामारी होते. शेवटी वॉर्ड ऍन्डरसनच्या पद्धतींनी केस पुढे चालवायला तयार होतो. त्या पद्धती काय असतात ते सांगितलं तर चित्रपट पाहण्याची गम्मत जाईल. पण मी आधी सांगितलं तसं- सत्य घटनेतला आणि सिनेमातला मुख्य फरक म्हणजे इथे गुन्हेगारांना शिक्षा झालेली दाखवली आहे त्याने सिनेमात गुंतलो असू तर 'सुख' वाटतं. शेवटच्या प्रसंगात मरण पावलेल्या समाजसेवकाच्या थडग्यासमोर शोकगीत गाणारे लोक उभे असल्याचं दृश्य आहे. लोकांमध्ये कृष्णवर्णी आणि गौरवर्णीसुद्धा आहेत. त्याच्याकडे लांबून पाहत काहीसे सर्द आणि भावूक वॉर्ड आणि ऍन्डरसन परत जायला निघतात. 


वॉर्डच्या भूमिकेत विलेम डॅफो (स्पायडरमनचा सिनियर ग्रीन गॉबलीन) आणि ऍन्डरसनच्या भूमिकेत जीन हॅकमन आहेत. त्यांनी आपापल्या भूमिका अर्थात सुरेख वठवल्या आहेत. सिनेमा वेगवेगळ्या ऑस्करससाठी नामांकित झाला. त्यापैकी सर्वोत्कृष्ठ छायाचित्रणाचं ऑस्कर त्याला मिळालं. उत्तम पार्श्वसंगीत आणि दिग्दर्शन या अजून काही जमेच्या बाजू. ऑस्कर सोहळ्याला बहुतेक कायम वर्णद्वेष या विषयाचं आकर्षण वाटत आलेलं आहे. म्हणूनच की काय २००४ मध्ये क्रॅ नावाच्या याचं विषयावरच्या सिनेमाला सर्वोत्कृष्ठ सिनेमाचा पुरस्कार मिळाला. या वर्षी, याचं विषयाशी, याचं काळाशी (१९६०, मिसिसिपी) संबंधित गोष्टीवर बनलेला 'द हेल्प' ऑस्करच्या शर्यतीत होता. आपल्याकडे मिसिसिपी बर्निंगवर आधारित 'आक्रोश' बनवला (जुना नाही, प्रियदर्शनचा २०१०चा सिनेमा), क्रॅशवर बेतलेला 'ये मेरा इंडिया' एन. चंद्रांनी बनवला. हे चित्रपट चांगले नव्हते की ते कुणी पाहिलेच नाहीत कुणास ठाऊक!!(मी पण आक्रोश पहिला नाहीये). पण त्यांना खूप थंड प्रतिसाद मिळाला. याउलट 'आरक्षण' नावाचा तद्दन बंडल सिनेमा ज्यात 'आरक्षण' हा मुद्दा सोडून सगळं आहे तो लोकांनी पहायची हिम्मत केली. असं झालं की मला नेहमी लोकांच्या उद्देशांबद्दल शंका यायला लागते.

सिनेमा बघितल्यावर तो आवडणं वेगळं, तो पटणं वेगळं, त्याच्याशी रिलेट करता येणं अजून वेगळं! मिसिसिपी बर्निंगशी रिलेट व्हायला अर्थात गेल्या ४-५ वर्षात फार प्रतिष्ठेचा असलेला आरक्षणाचा मुद्दा होता. आपण भारतातल्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक विषमतेबद्दल हळहळतो. मी आधी लिहिलं तसं- आडनाव वाचून माणसांबद्दल भली-बुरी मतं बनवून टाकतो. नावं बदलता येतात, धर्म बदलता येतो, पण शरीराच्या रंगाचं काय करायचं? तो कसा बदलणार? आणि तो बदलणं जर का शक्य नाही यावर सगळ्यांचं एकमत असेल तर शरीरांच्या आतली गोरी-काळी-तपकिरी-पिवळी माणसं कधी बदलणार?
***

*सारी चित्रे विकिवरून साभार.

Monday, April 9, 2012

एक सुस्त रविवार

ब्लॉग वाचण्यापूर्वी ही बातमी जरूर वाचा 
                                                                             **
"सर, सगळे गेलेत, आता साधारण तासभर आम्ही कुणाला आत येऊन देणार नाही..तुमचं सावकाश आटपू द्या" एक सफारी घातलेला माणूस येऊन सांगून गेला. झरूनी त्याचं कौतुक करायला त्याचं नाव आठवण्याचा प्रयत्न केला पण अहं..त्यांना काही नाव आठवलं नाही.
"चलिये आसिफ भाई" मागून मन्नुजींनी येऊन पाठीवर थाप मारली.."सगळे खोळंबलेत"
"अ हो.. हो..चला" म्हणत दोघे प्रशस्त डायनिंग टेबलकडे आले. 
"हा तुमचा मिडिया फार तापदायक प्रकार आहे हो..आम्ही तिकडे बसून नुसते ऐकतो..आज पाहिलं बुवा" झरु म्हणाले.
"सगळे आगाऊ, लबाड आहेत हो..मी तर त्यांच्यासमोर काही बोलायलाच जात नाही..पराचा कावळा करतात हो.." मन्नुजी हतबल होत म्हणाले.
"तुम्ही आता बोलतच बसणार आहात की जेवणार पण आहात? या राजकारण, मिडिया असल्या वायफळ चर्चा होत राहतील..मन्नू काका, मम्मी नाहीये तर तुमची बडबडच सुरु झाली" प्लेटवर काटे-चमचे आपटत राहुल्या बोलला.
"अरे मी कधीचं तेच विचारणार होतो, मॅडम कुठे गेल्या?" झरुनी विचारलं.
"मॉम इस्टरच्या प्रोग्रॅमला गेलीय..तिने तुम्हाला वेलकम विशेस पाठवल्या आहेत, मी सांगायलाच विसरलो"
"ओके ओके.."
"जेवायचं का? मला तर खूप भूक लागलीय" म्हणत राहुल्याने अधाशासारखे पानात पदार्थ वाढून घेतले.
'याची मम्मी समोर असती तर आत्ता तिने डोळे मोठे केले असते..मेला पोट भरायला खातो की साठवून ठेवायला खातो हे मला अजून कळलेलं नाही..' मन्नूनी मनातल्या मनात म्हटलं.
झरूंनी अल्लातालाचं नाव घेतलं आणि बिस्मिल्लाह केला. दोन तीन घास खाऊन झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की मन्नुजी काही खातच नाहीयेत.
"मन्नूजी, आजचा मेनू तुमच्या विशेष आवडीचा दिसत नाही.."
"अ..नाही नाही..जेवतो की.."
"कसला विचार करताय?"
"तुमच्याशी एक-दोन मुद्द्यांवर चर्चा करायची होती..ती कधी करता येईल त्याचा विचार करत होतो.."
"काय मन्नू साहेब? मी तुमच्याशी चर्चा-बिर्चा करायला इथे आलेलो नाहीये..काल मुद्दाम मिडीयाला स्टेटमेंट दिलं मी तसं..मी संडे एन्जॉय करायला आलोय..आपण आत्ता मस्त जेवूया..मग थोडावेळ टीव्ही बघू वेळ असेल तर..तुमचा तो डान्स इंडिया डान्स नावाचा कार्यक्रम आमच्याकडे फार लोकप्रिय आहे..तुम्ही पाहता का?"
"अहो झरु अंकल, अख्ख्या इंडियातल्या लोकांना वाटतं की माझी मम्मी यांनाच गेली कित्येक वर्ष डान्स करायला लावतेय..ते कसला प्रोग्रॅम बघणारेत??" राहुल्याने पुन्हा थट्टा करायची संधी सोडली नाही. 
"गोश तो एकदम टेस्टी बना है..मला तर जामच आवडलं" इतका वेळ शांत बसलेला बिल्लू बाळ बडबडला.
"सेम पिंच.." राहुल्याने त्याच्या हाताला चिमटा काढत म्हटलं.  
"मन्नुजी तुम्ही आत्ता जेवून घ्या..नंतर आमच्यासाठी अरेंज केलेलं कॉप्टर थोडं १०-१५ मिनिटं थांबवू आणि तेवढ्या वेळात करू काय ती चर्चा..नेहमीचेच तर विषय असणारेत.."
"मन्नू काका, जेवून घ्या..मम्मी नाहीये म्हणून नीट तोंड उघडून जेवता येईल तुम्हाला" (हे वाक्य कोण बोललं असेल हे.सां. न.)
बिल्लू बाळ जेवताना मच-मच आवाज करत जेवतो हे मन्नुजींच्या लक्षात आलं होतं पण डिप्लोमॅटिक इम्युनिटीमुळे त्याला काही बोलता येत नव्हतं. दुसरीकडे राहुल्या उगाच त्यांची चेष्टा करत होता पण मॅटर्नल इम्युनिटीमुळे त्यालाही काही बोलता येत नव्हतं. त्यांची चिडचीड झाली होती. 
गेला दीडेक आठवडा मिडीयाने झरुंच्या या ट्रीपची जरा जास्तच हाईप केली होती. त्यात अमेरिकेने हफिझ सैद असं नवीन नाव जागतिक चर्चेला पुरवलं होतं. आधीच काय प्रॉब्लेम्स कमी आहेत? त्यात नुकतंच सियाचीनमधल्या हिमवादळात काहीशे पाकिस्तानी सैनिक सापडल्याचं त्यांना कळलं होतं. हा झरू त्यांना सोडवायला मदत करा असं सांगणार याची त्यांना खात्री होती. झरूने येताना मोठी शक्कल लढवली होती. दिलेल्या वेळेपेक्षा तो तब्बल दिडेक तास उशिरा आला होता. त्यामुळे ठरलेल्या वेळेतला उरलासुरला वेळ हा वेळ काढत जेवणार आणि काढता पाय घेणार हे त्यांच्या लक्षात आलं. बरं त्याला जास्त वेळ थांबवला तर मिडिया बोंबलणार, राहुल्या चुगल्या करणार आणि मग मॅडम काहीतरी बोलणार! मॅडम पण लई हुशार आहेत, स्वतः इस्टरचं नाव काढून आल्या नाहीत आणि या बिंडोकला दिलं पाठवून! चीनकडून पण या भेटीबद्दल काहीतरी भोचक विधान होणार! आता काहीतरी डोकं लावायलाच पाहिजे. मांडीवर घेतलेला रुमाल बाजूला करत गुडघा खाजवत त्यांनी सेक्रेटरीला हाक मारली. तो लगबगीने पळत आला. त्याच्या कानात काहीतरी कुजबुजत त्यांनी त्याला परत पाठवलं. झरुने त्यांच्याकडे पाहत मान हलवत, भुवई वर करून 'काय?' असा प्रश्न विचारला.
"आपलं ते १०-१५ मिनिटं उशीर करायचं हो.." म्हणत त्यांनी विषय थांबवला. झरूजी परत जेवणात बिझी झाले. 
बिल्लू आणि राहुल्या जेवता-जेवता एकमेकांशी आय-फोनची प्स डिस्कस करत होते. अनेक गोड पदार्थांपैकी झरूंना बासुंदी आवडल्याचं दिसत होतं. पण ती ते भातात घालून खायला लागल्याचं मन्नुजींना दिसताच त्यांनी बाकी काही न खाता शेवटचा दही-भात पानात वाढून घेतला. 
**
"फार छान सुपारी आहे हो..मला थोडी पार्सल देता का?" झरूंनी विचारलं. त्यांनी ऑलरेडी तीन-चार वेळा सुपारी खाऊन झाली होती. 
"हो हो..आमच्याकडून भारतभेटीनिमित्त तुम्हाला तेवढीच भेट" मन्नु हसत म्हणाले आणि त्यांनी मागे उभ्या माणसाला खूण केली. तो सुपारीची पाकिटे अरेंज करायला पळाला.
मागून एकमेकांना टाळ्या देत, खिदळत बिल्लू आणि राहुल्या आले. 
"मन्नु अंकल, मला जेवण फार आवडलं..एक नंबर..मी आत्ताच हिंदुस्तानात अमन राहो म्हणून ट्विटपण केलं"
"बेटा, तुम्ही खुश तर आम्ही खुश..काय झरू साहेब बरोबर ना...??"
"अलबत..शेवटी आमची गद्दी तुम्हीच तर चालवणार आहात.." झरूंनीही दाद दिली. 
('माझी गादी टिकेल का नाही तेच माहित नाही..बिल्लुला आयुष्यभर झोपायला गादी मिळाली तरी खूप झालं' झरूच्या डोक्यात आलेला विचार, 'या राहुल्याला सायकल चालवता येत नाही, गादी काय चालवणार?' मन्नुच्या डोक्यातला विचार)
''चलो अंकल, आम्ही जातो जरा पुढे..आमच्या जरा वेगळ्या गप्पा चालल्या आहेत" म्हणत बिल्लू राहुल्याचा हात धरून निघाला. राहुल्या जाताना आपल्याकडे डोळे वटारून बघत आपल्याला दटावतो आहे असं मन्नुजींना वाटत राहिलं.
मुलं पुढे गेल्याचं बघून झरूंनी विचारलं-
"बोला साहेब, तुम्हाला कसली चर्चा करायची होती? दारापर्यंत चालता चालता बोलू..."
"अ..ते आपलं हे..असं म्हणत त्यांनी मागेमागे चालणाऱ्या सेक्रेटरीच्या हातातून एक कागद घेतला. "हे आमचं मिडिया स्टेटमेंट..आमचे पक्ष प्रवक्ते आपण 'या' गोष्टी बोललो म्हणून सांगतील.." म्हणत तो कागद झरूंना दिला. झरूनी कोटाच्या खिशातून चाळीशी काढली आणि डोळ्यावर चढवत तो कागद वाचला. 
"ठीके..चालतंय..तेवढा कसाबवाला मुद्दा काढून टाका..जुना झालाय हो तो..आमच्याकडे खात्रीशीर रिपोर्ट आहेत की हिंदुस्तानी लोक विसरलेत त्याला.."
"अहो पण.."
"अहो कसलं पण आणि काय...हा हफिझ सैदवाला मुद्दा आपण का मांडलाय? लोकांनी त्या कसाबला विसरून जावा म्हणून..मुळात हा हफिझ सैद अस्तित्वात तरी आहे का मला सांगा..?" झरू डोळा मारत म्हणाले.
"अ..तेही खरंच.."
"आणि हो, त्या सियाचीनच्या दुर्घटनेचं कानावर आलं असेल तुमच्या..त्याचं काहीतरी पहा.."
"अ..हो..मॅडमशी बोलेन मी त्याच्याबद्दल"
"मॅडमसमोर तोंड उघडणार नसाल तर त्यांना लिहून कळवा" झरुंनीही मन्नुजींची थट्टा केली. मन्नुजी ओशाळून हसले.
"आणि हो, अजून एक..राहुल्या आणि बिल्लूचं चांगलं जमलेलं दिसतंय..एखादं वाक्य ते पण टाकून द्या...मॅडमपण खुश होतील" 
मन्नुजींनी मागे उभ्या सेक्रेटरीला खूण केली, त्याने मुद्दा हातातल्या नोटपॅडवर खरडला.
"असेच बोलवा परत कधीतरी..पुढच्या वेळी आल्यासारखे राहून जाऊ २-३ दिवस काय.?" झरू म्हणाले.
हो हो जरूर.."
"आणि तुम्हीसुद्धा या कधीतरी..आमच्याकडे बघायला जाम भारी काय काय आहे.."
"खरंच??" मन्नुजींनी एक निसटता वार करायची संधी साधली. पण तोपर्यंत झरू समोर आलेल्या मिडीयाच्या लोकांना अभिवादन करण्यात गुंतले होते.
**
तो दुपारचं जेवण जेवून निवांत पडला होता. रविवारी सगळ्यांना एक स्वीट मिळतं. आजूबाजूच्या दोन-तीन लोकांच्या पानातलं हात घालून घालून त्याने खाल्लं होतं. एका हवालदाराने येऊन काठी गजांवर आपटली. त्याने त्रासून हवालदाराकडे पाहिलं-
"काये?" 
"चिठ्ठी!!"
त्याने उडी मारत उठुन ते चिठोरं घेतलं. आणि उघडून वाचायला सुरुवात केली-
"जनाब
रविवारची मेजवानी यशस्वी..निघायची वेळ जवळ आलीय...तयार व्हा"
***