Pages

Friday, July 29, 2011

...गुल्लू भाई!!!!

            फेसबुकवर नाळेशी बोलताना शिरूरचा विषय निघाला आणि इच्छा नसतानासुद्धा डोळ्यासमोरून तिथे घालवलेली चार वर्षं सरकून गेलीच!! तिथे असताना 'इथून कधी बाहेर पडतोय?' असं प्रत्येकाला होतं आणि आता ते दिवस आठवून खंत व्यक्त करणं हे बहुदा सगळ्याच नोकरीच्या रहाट-गाडग्यात अडकलेल्या लोकांचं होत असावं!असो. शिरूरने आम्हाला किती दिलं, किती शिकवलं याबद्दल निबंध लिहिण्यात मला गम्मत वाटत नाही. एवढंच म्हणेन की तिथे राहून 'फार्मसी'बद्दल फारसा शिकलो असं कधीच वाटलं नाही पण दुनियादारी, अक्कलदाढ, झोल-झाल या सगळ्या सगळ्या प्रकारांचं 'मास्टर्स' लेवलचं शिक्षण तिथे मिळालं. आमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलपासून गावात फिरणाऱ्या एका वेड्या माणसापर्यंत अनेकविध प्रवृत्ती पाहायला मिळाल्या. शिरूर आजही आठवतं ते तिथल्या माणसांमुळे आणि या माणसांशी संबधित घटनांमुळे!
            असाच एक शिरूरला भेटलेला आणि आयुष्यभर लक्षात राहील असा माणूस म्हणजे गुल्लू भाई! गुल्लू-भाईची नम्रताच्या चौकात दाबेलीची गाडी! शेवटची जवळ जवळ दोन वर्षं मी नित्य नेमाने त्याच्याकडे जायचो! येणाऱ्या जाणाऱ्या कित्येक लोकांसारखा मी एक. पण मी त्याच्या का लक्षात राहिलो हे मलाही माहित नाही! गुल्लू भाई मुळचा UP चा. तिथे त्याचे दोन मोठे भाऊ आणि आई-वडील असतात. मोठा भाऊ शाळेत शिक्षक आहे. गुल्लू भाई तेव्हा संध्याकाळची दाबेलीची गाडी चालवायचा आणि सकाळी पावाचा धंदा करायचा. त्याला स्वतःची बेकरी सुरु करायची होती. मी त्याला चांगला श्रोता वाटलो बहुदा म्हणून त्याने मला त्याच्या घरची परिस्थिती, तो धंद्यातून किती कमवतो आणि त्याला या पैशातून बेकरी कशी विकत घेता येईल हे सगळं सगळं सांगितलं त्या काळात! मी बरेचदा खात खात स्नेहाशी फोनवर बोलत असायचो. एक दिवस त्याने विचारलंच- "किस्से बात करते रेहते हो?" मी त्यावर हसून नकारार्थी मान डोलावली. मग तो स्वतःच म्हणाला- "भाभी है?" मी पुन्हा हसून होकारार्थी मान डोलवली. मी कुठल्यातरी मुलीशी गप्पा मारतोय कळल्यावर तर मला त्याने त्याच्याबद्दल अजून पर्सनल गोष्टी सांगायला सुरुवात केली- एक दिवस त्याने विचारलं "भाभी सुंदर है?" आता यावर मी काय उत्तर देणार?? मग थोडसं लाजत म्हणाला- "मै इस साल गाव जाऊंगा तो घरवाले मेरा निकाह करने की सोच रहे है", मी विचारलं- "लडकी देख के रखी है?" त्यावर म्हणाला- "हां, मेरे ही गाव की है, पास ही में रेहती है, उसके घर पे बात करने गयी थी मेरी दीदी!" मी हसत म्हणालो- "क्या बात है गुल्लू भाई, तो अगले साल भाभी को लेके आओगे आप!कैसी है भाभी?" मग त्याने मला ती कशी दिसते त्याचं त्याच्या शब्दात वर्णन केलं. एका UP च्या खेड्यात टिपिकल मुसलमान कुटुंबात वाढलेल्या, महाराष्ट्रात येऊन शिरूरसारख्या ठिकाणी दाबेलीचा धंदा करणाऱ्या एका पंचवीस-तीस वर्षाच्या माणसाचे लग्न, प्रेम, होणारी बायको याबद्दल विचार नेमके काय असतील याबद्दल मला थोडीशी उत्सुकता होती! आणि त्याच्या तोंडून हे सगळं ऐकायला गम्मत पण वाटली. त्याच्या मते त्याच्या घरच्यांनी पाहिलेली मुलगी ही त्यांच्या गावातली सगळ्यात भारी दिसणारी मुलगी होती, त्याला यावर्षी तिच्याशी लग्न करायचं होतं आणि दोन वर्षात शिरूरमध्ये बेकरी काढून सेटल व्हायचं होतं, तिला इथे आणायचं होतं. त्याच्याबरोबर त्याचा बारा-चौदा वर्षांचा एक भाचा इथेच रहाट होता. घरी अभ्यास करत नाही म्हणून त्याच्या आईने त्याला या 'मामू' कडे पाठवलं होतं. गुल्लू भाईची इच्छा होती की त्याच्या भाच्याने गावी परत जावं, अभ्यास करावा. प्रायमरी शाळेत शिक्षक झालेल्या त्याच्या मोठ्या भावाचा त्याला खूप अभिमान होता. मध्यंतरी कधीतरी गुल्लू भाई गावाला गेला. तो गावी असताना इथे त्याचा धंदा सांभाळायला त्याचा गावचा कुणीतरी भाऊ इथे आला. गावी जाताना त्याला गुल्लू भाईने माझ्यासाठी स्पेशल दाबेली, sandwich बनवायची सूचना देऊन ठेवली होती. मला खूप शेवटी शेवटी कळलं की त्याने दाबेलीचा भाव वाढवलेला असूनही माझ्या कडून जास्त पैसे कधीच घेतले नाहीत. मी आग्रह करूनसुद्धा नाही!
           शिरूर सोडायचा आदला दिवस! सगळ्या मित्रांचा निरोप घेणं सुरु होतं. त्या शेवटच्या दिवसात रात्री दारूच्या पार्ट्या व्हायच्या, रडारड व्हायची! जुनी उणी-दुणी निकालात निघत होती. शिरूरमध्ये भेटलेल्या लोकांना, ठिकाणांना अलविदा म्हणणं सुरु होतं! आज शिरूरच्या आठवणी काढून हळहळणारे  करणारे आम्ही सगळेच तेव्हा मात्र परत इथे परत यायचं नाही हे ठरवूनच आवरा-आवरी करत होतो. मी रात्री निघणार होतो, संध्याकाळी अर्धवट "बुंगलेल्या" सुश्याला घेऊन मी गुल्लू भाईला भेटायला गेलो. मी शिरूरमधून निघून जाणारे याची कल्पना त्याला होती आणि मी भेटायला गेल्यावर त्याला ते चटकन लक्षात आलं. "क्या खाओगे?" त्याने विचारलं. त्या वेळी मला अजिबात भूक नव्हती. पण त्याचं मनही मोडवत नव्हतं. मी त्याला एक दाबेली द्यायला सांगितलं. त्याने आम्हाला दोघांना एक एक दाबेली दिली आणि sandwich करायला घेतलं. मी नको नको म्हणत असतानाही त्याने ते आमच्या पुढ्यात ठेवलंच. खाऊन झाल्यावर मी त्याला पैसे देऊ केले आणि अर्थात ते त्याने घेतले नाहीत जे मला अपेक्षित होतं. मी फारसा आग्रहसुद्धा केला नाही. पण खरी गोष्ट नंतर घडली. त्याने खिशातून शंभरची नोट काढून मला दिली. माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. "ये किसलीये?" मी भारावून जात विचारलं. तो म्हणाला- " हम लोगो में रिवाज है, जब भी कोई छोटा भाई घर से बाहर निकलता है बडा भाई उसे कुच मदत करता है और आप मेरे छोटे भाई जैसे हो..मना मत करना" आता यावर मी काय उत्तर देणार? माझं आजूबाजूला लक्ष गेलं. बाजूला एक-दोन रिक्षावाले हा प्रकार बघत होते! येणाऱ्या-जाणाऱ्या एक दोघांनी त्याचं बोलणं ऐकलं होतं. एकीकडे माझं 'सोफेस्टीकेटेड' मन त्याच्याकडून पैसे घेणं कबूल करत नव्हतं."दाबेलीवाल्या भैय्याकडून पैसे?" तर दुसरीकडे आधीच सगळ्या मित्रांना निरोप देऊन हळवं झालेलं मन म्हणत होतं- "घे ते पैसे!" मी निमुटपणे पैसे घेतले आणि त्याला म्हटलं-" हम लोगो में भी एक रिवाज है, जब भी बडा कोई कुच देता है तो हम उसके पैर छुते है!" असं म्हणत मी शिरूरच्या त्या चौकात त्याच्या पाया पडलो. मला वर घेत तो म्हणाला- "एक बार गले मिलोगे?" मी काही ना बोलता त्याला मिठी मारली. बरोबर चार वर्षं शिकलेल्या प्रत्येक मित्राला निरोप देताना मनात ज्या भावना होत्या त्यापेक्षा काहीशा वेगळ्या भावना मनात आल्या होत्या! आज जवळजवळ ३ वर्षं उलटून गेलीयत पण त्या शब्दात नाही मांडता येणार! सुश्यानेसुद्धा पुढे होत त्याला मिठी मारली. 'फिर मिलेंगे' म्हणत निघालो. बोलायला काहीच सुचत नव्हतं. 

             नंतरच्या दिडेक वर्षात चार-पाचदा शिरूरला चकरा झाल्या. बहुतेक सगळ्याच कुठल्यातरी कागदपत्रांसाठी! बाकी सगळ्यांशी भेट झाली पण गुल्लू भाई काही भेटला नाही. कधी मी खूप घाईत होतो तर दोनदा तो गावी गेला होता. त्याला माझा इतकाच निरोप आहे की त्याच्यासारख्या लोकांमुळेच शिरूरला कधीतरी जायची माझी इच्छा अजूनही कायम आहे!आणि हो शिरूरला कधीतरी जावच लागेल, मगाशीच सागर म्हणत होता- 'भाईजानला मी ३ चहाचे पैसे द्यायचे आहेत म्हणे!!!"

चैतन्य