Pages

Monday, January 28, 2013

लिंग्वा फ्रांकाच्या दिशेने!

बायबलमधली एक खूप जुनी गोष्ट आहे. फार फार पूर्वी, महाप्रलय झाल्यावर जगातली सगळी माणसं एकत्र जमली. त्यांनी सगळ्यांनी मिळून एक उंचच उंच इमारत 'बेबल' बांधायचं ठरवलं. इतकी उंच की त्याचं शिखर (टॉवर) स्वर्गापर्यंत पोहोचलं पाहिजे. देवाला जेव्हा हे समजलं तेव्हा तो चपापला. ही माणसं खरंच स्वर्गापर्यंत येऊ शकतात हे त्याच्या लक्षात आलं आणि तो घाबरला. माणूस स्वर्गात पोहोचून त्याची जागा घेईल अशी भीती वाटली त्याला बहुतेक. जर का ही इमारत बांधणं थांबवायचं असेल तर लोकांमध्ये फुट पाडणं आवश्यक होतं. त्याने आवश्यक ती पावलं उचलली,इमारत तोडून टाकली आणि वेगवेगळ्या भाषा निर्माण केल्या. तोपर्यंत एकाच भाषेत बोलणारी सगळी माणसं वेगवेगळ्या भाषा बोलायला लागल्यावर त्यांच्यात फुट पडली. देवाचा हेतू साध्य झाला आणि बेबलचं काम अर्धवट राहिलं. एकमेकांशी संपर्क करण्याचं माध्यमचं माणसामध्ये गट निर्माण व्हायला कारणीभूत ठरलं हा सगळ्यात मोठा विरोधाभास. देवाने तेव्हा किती भाषा निर्माण केल्या याची मला कल्पना नाही, पण बायबलमधल्या या गोष्टीकडे वस्तुनिष्ठपणे पाहिलं की मला गंमत वाटते. सध्या जगभरात ६००० हून अधिक भाषा अस्तित्वात आहेत (इति विकिपीडिया). 

जगातील इतर सर्व सजीव (प्राणी) आणि माणूस यांच्यातल्या मुलभूत फरकांपैकी एक म्हणजे 'वाचा' त्याहीपेक्षा 'भाषा'..मार्क पॅगल या बायोलॉजीस्टच्या मतानुसार भाषा हे माणसाकडे असणारं सर्वाधिक धोकादायक हत्यार आहे. "तुम्ही तुमच्या डोक्यातली एखादी कल्पना भाषेच्या माध्यमातून कोणतीही शस्त्रक्रिया न करता दुसऱ्याच्या डोक्यात इम्प्लांट करू शकता" असं ते म्हणतात. भाषा ही मानवी उत्क्रांतीतली सगळ्यात महत्वाची पायरी असल्याचं ते नमूद करतात. 'होमो सेपियन' अर्थात आधुनिक माणूस जेव्हा भाषा बोलायला लागला, तेव्हा त्याचं सामाजिक शिक्षण इतर पूर्वजांच्या मानाने खूप चटकन झालं. पॅगल पुढे म्हणतात की असं असताना त्याने खूप विचित्र, अनाकलनीय कृत्य केलं- त्याने वेगवेगळ्या भाषा निर्माण केल्या. सेपियनच्या उदयानंतर गेल्या २ लाख वर्षांच्या काळात माणूस जगभर पसरला. काळानुसार, प्रदेशानुसार भाषेत काही अंशी होणारे बदल जरी गृहीत धरले तरी एखाद्या मोठ्या भूभागात साधारण एकच भाषा बोलणारी माणसं असायला हवीत. पण आकडे काहीतरी वेगळंच सांगतात. जगात जिथे जिथे जास्त लोकसंख्येची घनता जास्त आहे तिथे तिथे भाषांची विविधता जास्त आहे..भारत देश हे याचं उत्तम उदाहरण आहे. दोन अडीच लाख वर्षात प्रादेशिक गरजांनुसार, कधी एखाद्या विषयाशी संबंधित ज्ञान जपून ठेवायला, कधी सुरक्षिततेसाठी वेगवेगळ्या भाषा निर्माण झाल्या ही परिस्थिती सत्य मानली तरी गेल्या शे-दोनशे वर्षात हाच मायग्रेट झालेला माणूस पुन्हा जागतिकीकरणाच्या निमित्ताने जवळ येतोय..आणि या जवळ येण्याच्या प्रक्रियेत अडसर असणारा सगळ्यात मोठा घटक ठरतोय 'भाषा'. यावर उपाय- लिंग्वा फ्रांका! जगभरात सगळीकडे फक्त एकच भाषा अधिकृतपणे वापरण्यात यावी. कार्यालयीन, सामाजिक किंवा राजकीय व्यवहार हे त्या एकाच भाषेतून होतील. ही भाषा जागतिक शिक्षणाचं माध्यम असेल. एक विश्व..एक बोलीभाषा, कर्मभाषा! (पॅगल यांचा या संदर्भातला व्हिडीओ इथे पाहता येईल)

आपल्या देशाबद्दल बोलायचं तर भारताच्या सामाजिक वैविध्यातला महत्वाचा घटक आहे 'भाषा'! हिंदी ही राष्ट्रभाषा सोडून वीसच्यावर अधिकृत, आणि शेकड्याने अनधिकृत भाषा आपल्याकडे आहेत..इतकंच काय तर आपल्या राज्यसीमा या भाषांवर आधारित आहेत (आणि अर्थात सीमावाद्सुद्धा). कित्येक भाषांमध्ये विपुल प्रमाणात काव्य,शास्त्र, साहित्य, कला निर्मिती होते. प्रत्येक राज्याचं, त्यातल्या लोकांचं अमुक-एक भाषेवर प्रेम आहे आणि या प्रेमातूनच कित्येक प्रादेशिक राजकीय पक्षसुद्धा आपल्याकडे अस्तित्वात आहेत. धर्म, जात, वर्ण या सगळ्यांवरून भांडण्याच्या भानगडीत हा भाषेचा मुद्दा थोडा दुर्लक्षित झाला असं म्हणावं लागेल. पण सोशियल नेटवर्किंग, व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या हायटेक जगात 'विविध भाषा' हा प्रकार खरंच अनावश्यक वाटतो. मला माहितीय की या विधानाला कित्येक संस्कृती 'रक्षकांची' एक भुवई ऑलरेडी वर झाली असेल. पण यासंदर्भात जॉन मॅकव्होर्टर नावाच्या भाषाशास्त्राच्या प्राध्यापकाचा मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो- 'भाषा हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे ही गोष्ट खरी. संस्कृती संपली की भाषा संपते पण भाषा संपली की संस्कृती संपत नाही.' तसं असतं ज्ञानेश्वरांनी लोकांना कळावी म्हणून 'सोप्प्या' मराठीत लिहिलेली 'ज्ञानेश्वरी' पुढच्या चार-पाच शतकात बदललेल्या मराठीबरोबर कालबाह्य झाली असती. संस्कृती नष्ट होणं आणि संस्कृती विकसित होणं या दोन गोष्टीतला फरक बदलत्या काळात समजून घेणं अत्यावश्यक आहे. बदलती भाषा, कालबाह्य होणारी भाषा या गोष्टींकडे संस्कृती विकासाच्या दृष्टीने पाहणं महत्वाचं! यालाच जोडून अजून एक मुद्दा- भाषेच्या नाशाबरोबर संस्कृतीचा ऱ्हास होणं अटळ असतं तर संस्कृत, लॅटीन, पाली, अर्धमागधी या भाषा नष्ट झाल्या तेव्हा मनुष्य प्राणीच नष्ट झाला असता. 'भाषा संस्कृतीवर अवलंबून असते...संस्कृती भाषेवर नाही!' सो संस्कृतीचा जवळपास ९०% लोकांच्या दृष्टीने 'मुख्य' असणारा मुद्दा जर का बाजूला ठेवला तर मग भाषेच्या वैविध्याचा अट्टाहास बाजूला ठेवता येईल. त्याचे फायदेसुद्धा कित्येक आहेत. भारतातला 'अधिकृत राज्यभाषा' हा प्रकार काढून टाकला तर भारतातले कित्येक सीमाप्रश्न संपतील. जगाचा विचार करायचा तर युरोपियन युनियन दर वर्षाकाठी त्यांच्या चर्चांसाठी निव्वळ भाषांतरावर करत असलेला कोट्यावधींचा खर्च कमी होईल. अमेरिकन्सच्या दृष्टीने म्हटलं तर चायनीज आणि मेक्सिकन लोकांशी किमान आवश्यक संवाद सहज साधता येईल. लोकांची धर्म, जात वर्ण यांच्या नावाखाली जगभर होणारी गटबाजी एक भाषा या छत्राखाली कदाचित काही अंशी कमी होईल.  

मग पुढचा प्रश्न येतो...की जगातल्या सगळ्या लोकांनी एकाच भाषेत बोलायचं तर ती भाषा कुठली? इंग्लिशचा नंबर अर्थात सगळ्यात वर असेल...चायनीज दोन नंबर वगैरे वगैरे...म्हणजे पुन्हा एकदा मेजोरीटीने हे ठरणार..उत्तर आहे 'नाही'..जगभरात जर का एकच भाषा बोलीभाषा म्हणून वापरायचं ठरलं तर ती भाषा इंग्लिश असलीच पाहिजे असं नाही..त्यातले कित्येक शब्द, वाक्प्रचार हे जगभरातल्या तमाम भाषांवरून ठरवले जातील. कदाचित मूळ पाया म्हणून इंग्लिशचा वापर करावा लागेल..पण त्यात सर्व युरोपियन, आशियाई, आफ्रिकन भाषांमधले शब्द असतील. अशी भाषा अस्तित्वात आली तर मग सगळ्या  जुन्या किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या भाषांचं काय? उत्तर सोप्पं आहे! आज संस्कृत,पाली, अर्धमागधी, लॅटीन या भाषांची जी काही स्थिती आहे ती अजून पाचशे वर्षांनी मराठी, तमिळ, हिब्रू, जर्मन भाषांची असेल. सध्याच्या काळात लोक नुसता नाच शिकत नाहीत- भरतनाट्यम,कुच्चीपुडी, वेस्टर्न, साल्सा असे त्यातले प्रकार शिकतात तसे अजून काही शतकांनी लोक वेगवेगळ्या भाषा शिकतील...तसे तर लोक आजही भाषा शिकतात पण भाषा हा पोटापाण्याचं साधन असण्यापेक्षा आर्ट फॉर्म,हॉबी म्हणून मान्य होईल. कम्युनिकेशन अर्थात संवाद घडणं या एका अनोख्या गुणधर्मामुळे माणूस पृथ्वीवर श्रेष्ठ ठरला. पॅगल या प्रकाराला सोशियल लर्निंग म्हणतात.माणूस एक भाषा बोलायला लागला. मग त्याने अनेकविध भाषा निर्माण केल्या. आजही नवीन भाषा तयार होण्याची प्रक्रिया अव्याहत सुरु आहे. पण हे कुठेतरी थांबायला हवं! नवीन भाषा निर्माण होण्याने खरंच सोशियल लर्निंगमध्ये भर पडतेय की समाजामध्ये फुट पडतेय हे भाषाकर्त्यांनी आणि तिच्या रक्षकांनी ठरवायला हवं! ( या नोटवर माझ्या डोक्यात जाती, धर्म 'निर्माण' करणाऱ्या लोकांचाही विचार आलाच...पण त्याच्यावर उहापोह नंतर कधीतरी) 

शेवटी भाषा भाषा म्हणजे तरी काय? आपल्या भावना,विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यमच नाही का? आपण लहानपणापासून एक सर्टन भाषा शिकतो,बोलतो म्हणून आपल्याला तिचा अभिमान,कौतुक वाटतं! आपल्या भावना आपल्याला त्या सर्टन भाषेत सहज व्यक्त करता येतात ('एक वैश्विक भाषा' या विषयावर मी मराठीत का लिहितोय असा प्रश्न ज्यांना ज्यांना पडला असेल त्याचं उत्तर हेच). उद्या प्रत्येक भारतीयाला त्याच्या भावना स्वाहिलीमध्ये व्यक्त करता आल्या तर आपण स्वाहिली बोलायला लागू. अगदी आजच्या मराठी बोलीभाषेतले आपले कित्येक शब्द फारसी, उर्दू, हिंदी आणि अशा कित्येक परकीय भाषांमधून आले आहेत. 'बांधिलकी भावनांशी,विचारांशी आधी आणि भाषेशी नंतर असायला हवी' हा साधा,सरळ, व्यावहारिक दृष्टीकोन आहे! आज इंग्लिशमध्ये सहज वापरले जाणारे कित्येक शब्द, वाक्प्रचार इतर भाषांमधून आले आहेत. उदाहणार्थ- 'कर्म/कर्मा' हा शब्द आपल्या साहित्यात जेवढा वापरला जात नाही तेवढा अमेरिकन सिनेमांमध्ये वापरला जातो. 'बॉन अपेटित' हा फ्रेंच वाक्यप्रयोग 'वदनी कवळ घेता' चं जागतिक व्हर्जन आहे. 'बॉन वोयेज' सगळं जग सहजपणे वापरतं. 'के सेरा सेरा' हा रोमन वाक्प्रयोग जगभरातल्या अनेक वक्त्यांनी त्याच्यातल्या व्याकरणाच्या चुकांसकट वापरला आहे. 'हमाल दे धमाल' मधलं लक्ष्याचं 'मी आलो मी पाहिलं मी जिंकून घेतलं सारं' हे गाणं प्रसिद्ध ' आय केम, आय सॉ, आय कॉनकर्ड' या वाक्प्रचारावर आधारित. हा वाक्प्रचार 'व्हीनी व्हीडी व्हीची' या लॅटीन वाक्यावरून घेतलेला..खूप लोक वापरतात. ही सगळी उदाहरणं मला जगातल्या भाषांचं किती ज्ञान आहे हे सांगायला लिहिलेली नाहीत...उलट 'के सेरा सेरा'ची भाषा कोणती हे मला शोधायला लागलं. इतकी वर्षं वापरताना हा प्रश्न पडला नव्हता. अर्थ माहितीय...कुठे वापरायचा कळलं...विषय संपला!   
मी अमेरिकेला आलो तेव्हा मी नॉर्थ इंडिअन असल्याचा शोध मला लागला. महाराष्ट्र, मध्य प्रदेशच्या रांगेतली आणि वरची सगळी राज्य नॉर्थ इंडिया आणि खालची सगळी राज्य साउथ इंडिया (त्यातही वर्चस्व हैद्राबादी लोकांचं..हा मूळ शोधसुद्धा बहुतेक त्यांचाच) असं इथे वर्गीकरण असतं. शांतपणे विचार केला तेव्हा जाणवलं की भाषेचा एक फरक सोडला तर काही फरक नाही जगात कुणातच..भारतीयांचं सोडाच! सण-वार, खाद्य संस्कृती वेगळी असणं हा सपशेल गौण मुद्दा आहे..बाजुबाजुच्या महाराष्ट्रीयन घरात एकाच दिवशी जेव्हा एकीकडे उकडलेल्या बटाट्याची आणि दुसरीकडे कांदा घालून रस्सा भाजी होते तेव्हा त्यांची खाद्य संस्कृती लगेच वेगळी होत नाही आणि झालीच तर ती सामाजिक दृष्टीने बाधक किंवा घातक नाही..पण दोन घरात लोक वेगळ्या भाषा बोलत असतील तर किमान संवाद, विचारांची देवाणघेवाण या सामाजिक गरजा भागवल्या जात नाहीत..जागतिक एकता,'एक विश्व-एक राष्ट्र' वगैरेचे जे पुरस्कर्ते आहेत त्यांनी जात, धर्म, वर्ण बाजूला ठेवून या भाषेच्या मुद्द्याकडे जरा बघाच! सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने 'भाषेचा ऱ्हास' आणि जागतिक 'लिंग्वा फ्रांका'चा अर्थात एकाच अधिकृत बोलीभाषेचा,कार्यभाषेचा उदय होणं हे लोकांनी जवळ यायचं लक्षण ठरणारे!  येत्या चार-पाचशे वर्षांच्या काळात काय घडतंय ते बघायला आपल्यातलं कुणीच नसेल पण 'वाढ आणि विकास' ही जीवनाची लक्षणं ध्यानात ठेवली तर जागतिक लिंग्वा फ्रांका अस्तित्वात येणं नक्की घडेल असं मला वाटतं! एक दिवस असा असेल की एकाच वर्गात गुप्ते, शर्मा, सुब्रमन्यम, खान, डिकास्टा, पॉवेल, अल-नझर, एबरहर्ट, गोर्बाचेव्ह, मोरेना, ताओ चंग, कुरोसावा, अरमानी अशा सगळ्या आडनावांची मुलं एकाच वर्गात (अर्थात वर्चुअल क्लासरूम), एकाच भाषेत शिकत असतील..!


ता.क. मागे मी मराठी माध्यम, मराठी भाषेत शिक्षणाची अवस्था या विषयावर लिहिलं होतं. आता जागतिक बोलीभाषेबद्दल लिहितोय...या सगळ्यातून मराठीचा 'उपमर्द' करण्याचा माझा हेतू नाही. मला मराठी आवडत नाही असं तर मुळीच नाही! मराठीसारखी इतकी 'शब्दसंपदा' असणारी भाषा माझी मातृभाषा आहे याचा मला अभिमान आहे! मराठीत व्यक्त होणं सोप्पं वाटतंय तोपर्यंत मराठीतच लिहीत राहीन..पण माझी बांधिलकी लेखनाशी आणि त्यातल्या भावनांशी जास्त असेल एवढं मात्र नक्की! 

4 comments:

हेरंब said...

मस्त लिहिलंयस.. पटलं !

'के सेरा सेरा' चं माझ्याही बाबतीत झालंय :).. काही वर्षांपूर्वी या शब्दाचा अर्थ कळला. तोवर नुसतं माधुरी आणि प्रभुदेवाचं गाणं वाटायचं (And not to mention the same film company by RGV)

Chaitanya Joshi said...

आभार्स हेरंबदादा!! :) :)
असे खूप खूप लोकल-ग्लोबल शब्द आहेत!! लोक वापरतात..आणि शुद्ध बोलता-लिहिता न येता एकाच भाषेचा अभिमान (तूच मागे लिहिलं होतंस तसा खरंतर 'गर्व'/माज) बाळगत राहतात!! :/

हेरंब said...

अरे आणि दादा वगैरे नको प्लीज. :)

Chaitanya Joshi said...

ओके...यापुढे नो 'दादा' :)