Pages

Saturday, May 25, 2013

'अटी, अपेक्षा' मॅट्रीमनी

तो: आज आपण भेटलोय खरे...पण गेल्या चार भेटीत मला तुला विचारायचं सगळं विचारून झालंय!! मी 'हो' म्हणायचा निर्णय घेतलाय! अनलेस तुला काही प्रॉब्लेम असेल तर बोलू आपण! तुला मला अजून काही विचारायचं आहे का?
ती: एकदम भेटल्या-भेटल्या विचारू का? तुला घाई आहे का? नाहीतर आधी जरा कुठेतरी जाऊन बसुयात का?
(अनपेक्षित उत्तर मिळाल्यामुळे हिरमुसलेला 'तो' काहीच न बोलता तिच्याबरोबर चालायला लागतो)
ती: मी फोन केला होता लंचटाईममध्ये! फोन डेस्कवर विसरून गेलेलास का?
तो: नाही! सॉरी पण खूप बिझी होतो! क्लाएंटची अर्जंट रिक्वेस्ट आलेली! मी लंच केलाच नाहीये! नंतर सावेने खालच्या टपरीवरून वडा-सांबार मागवलं!
(ऑफिसजवळच्या टपरीवरचा तेलकट वडा आणि पांचट सांबार त्याला आवडत नाही हे गेल्या चार भेटीत गप्पांच्या ओघात तिला माहीत झालंय…ती चालायचं थांबून रिक्षाला हात करते)
तो (भांबावून): कुठे?
ती: तू काही खाल्लं नाहीयेस ना नीट? काहीतरी खाऊ…तिथेच बसून बोलू!
(दोघे रिक्षात बसतात. आपण या मुलीला होकार देऊन काहीच चूक करत नाहीये याची त्याला स्वतःच्याच मनाशी पुन्हा खात्री पटते. हिला मला अजून काय विचारायचं आहे या विचारात त्याचा रिक्षा प्रवास संपतो)

तो: तुला लेट होतोय ना माझ्यामुळे घरी पोहोचायला? हॉटेलमध्ये पण खूप वेळ गेला!
ती: घरी माहितीय की मी तुला भेटणारे! मम्मी-पप्पा पण माझ्या 'हो' म्हणण्याची वाट बघतायत. सो त्यांना हवं ते उत्तर मिळणार असेल तर उशीर झाल्याचं चालेल त्यांना!
तो: मग तू काय उत्तर द्यायचं ठरवलं आहेस?
ती: ते तुझ्या उत्तरांवर अवलंबून आहे!
तो: माझं उत्तर सांगितलं मी तुला!
ती: उत्तर नाही! 'उत्तरं' म्हटलं मी…'अनेकवचन'
तो गोंधळून बघत राहतो. मग काहीतरी कळल्यासारखं म्हणतो-
तो: ठीके! तुझ्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत? पार्टनर म्हणून? नवरा म्हणून? काहीही न संकोच करता विचार! मी जमेल तेवढ्या प्रामाणिकपणे 'उत्तरं' देईन….'अनेकवचन'
ती: अपेक्षा…अ...तसंही म्हणायला हरकत नाही! एक सांगते… माझ्या अपेक्षा फार माफक आहेत असं मला वाटतं आणि म्हणून मी त्यांच्याबद्दल रिजीड आहे!
तो: ओके! ते मीसुद्धा ठरवू का प्लीज?
ती: नक्कीच! पहिला प्रश्न किंवा अपेक्षा- आपण लग्न करायचं ठरवल्यावर आणि केल्यावरसुद्धा- बाहेर जेवायला गेलो, लग्नाला गेलो, फंक्शनला गेलो तर मला कुठेही ऑकवर्ड 'पब्लिक डिसप्लेज ऑफ अफेक्शन' चालणार नाहीत! तुझं काय मत आहे याच्यावर?
तो: अ….लग्न होईपर्यंत ठीके म्हणजे मला १००% मान्य पण आहे पण लग्न झाल्यावरसुद्धा?
ती: हो! नातं आपल्या दोघांचं असणारे! ती जगाला दाखवणं मला मान्य नाही! चालणारे का तुला?
तो: मला आधी बाकीचे प्रश्न ऐकायचेत!
ती: म्हणजे तुझं आधीच्या प्रश्नाला नकारार्थी उत्तर आहे?
तो: मुळात 'पब्लिक डिसप्लेज ऑफ अफेक्शन' म्हणजे तुला नेमकं काय अभिप्रेत आहे हेच मला समजून घ्यायचंय! पण मग विषय पर्सनल मोरओव्हर 'प्रायव्हेट' होतो…म्हणून त्याच्यावर शेवटी चर्चा करू…कारण आपण एकमेकांशी लग्न करायचंय की नाही हे त्या एका उत्तरावर डिपेंड असेल तर तशी चर्चा करता येईल!
(तिला थोडं कौतुक वाटलं! त्याने दिलेलं उत्तर ठोस नसलं तरी उडवून लावण्यासारखं पण नव्हतं)
ती: हरकत नाही! पुढचा मुद्दा- माझ्या मागे माझी लग्नाची बहिण आहे! अजून चार-दोन वर्षात तिचं लग्न होईल! तेव्हा तिच्या लग्नात मला आर्थिक हातभार लावायचाय!
तो: सो?
ती: म्हणजे? तुझी या गोष्टीला काहीच हरकत नसेल?
तो: का असावी? तुझी बहिण! तुम्ही दोघी एकत्र मोठ्या झालात! तिच्या लग्नात, तिची हौस-मौज करून द्यायची तुझी इच्छा असू शकते….
ती: तुझ्या घरच्यांचं काय?
तो: वेल…पप्पांना काही घेणं-देणं नाही! आई काही म्हणाली तर बघता येईल!
ती: तिने विरोध केला तर? तुझा सपोर्ट असेल मला?
तो: हे बघ! आपल्या घरचे आपलं लग्न ठरवतायत त्याचा अर्थ आपल्या आयुष्यातले निर्णयसुद्धा तेच घेणारेत असा नाही! तुझ्याशी लग्न 'मी' करतोय!
ती: गुड! पुढचा प्रश्न-
तो: एक मिनिट! जेव्हा मी म्हटलं की तुझ्या निर्णयांना माझा सपोर्ट असेल तेव्हा मला वाटलं होतं की तुझे प्रश्न संपले असतील…
ती: अजून एक महत्वाचा प्रश्न उरलाय! तुला डिवचायला नाही सांगत पण आपण भेटण्याआधी मी ज्या मुलाला भेटले त्याने निव्वळ या प्रश्नामुळे नकार दिला!
तो: व्हॉट डू यु मीन?
ती: सांगते- लग्नानंतर मी कागदोपत्री माझं नाव बदलणार नाही! चालेल तुला?
तो: नाव बदलणार नाही? म्हणजे?
ती: म्हणजे नाव बदलणार नाही!
तो: असं करता येतं?
ती: अर्थात! लग्नाविषयीचे कुठलेच कायदे मुलीला नाव बदलायला सांगत नाहीत!
तो: आणि मग लग्नात नाव बदलायला सांगतात ते?
ती: ते शास्त्र झालं! आणि माझ्या माहितीप्रमाणे ते बंधनकारक पण नाहीये!
(तो काही न बोलता विचारात पडला)
ती: नाही पटलं नां?
तो: वेल…मीसुद्धा तुला भेटण्याआधी तीन मुली पाहिल्या! कुणाला जेवण करता येत असणारा नवरा हवा होता, कुणाला मी राहत असलेलं घर माझ्या नावावर झालेलं पाहिजे होतं, एकीला तर माझ्याकडे बघून तिच्या एका बॉयफ्रेंडची आठवण यायची आणि ती ते मला सारखं ऐकवत होती, मी ते ऐकून घ्यावं अशी तिचीही 'माफक' अपेक्षा होती! बट, आय मस्ट से….'हे' मी अजिबात एक्स्पेक्ट केलं नव्हतं आणि आता तू हा विषय काढला आहेस आणि त्यातला सिरीयसनेस जाणवून मला एकूणच लग्नसंस्थेची गम्मत वाटायला लागलीय!
ती: ती का?
तो: लग्न संस्थेने, ती बनवणाऱ्या लोकांनी कधी 'मुलीचं नाव' या विषयाचा गांभीर्याने विचार केलाच नसेल का? तुला असं एकदम हे 'लग्नानंतरचं नाव' हा विषय कधी जाणवला?
ती: नक्की नाही माहीत…पण एक इंसिडंस आठवतोय! माझ्या एका शाळेतल्या मैत्रीणीने मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली! खूप वर्षं आमची काहीच भेट नव्हती! तिचं लग्न झालेलं मला माहित नव्हतं आणि लग्न तिला बरंच मानवलं होतं त्यामुळे मी तिला फोटोतून ओळखलं नाही! अशा वेळी ती माझी बाल मैत्रीण आहे हे मला कळायचा एकच सोर्स होता…तिचं नाव! पण मानसी कुलकर्णी नावाने मला माहित असलेली माझी शाळेतली मैत्रीण मला तिचं नाव अश्विनी देशमुख सांगायला लागली तर मी ओळखणार कसं तिला?
तो: (कपाळावर हात मारत) सोशल नेटवर्क! कुणाचं काय? नी कुणाचं काय?
ती: का? तुला पटलं नाही?
तो: पटलं की! पण मला तुझा दृष्टीकोण ऐकायचाय!
ती: एक उदाहरण पुरे नव्हतं का? अरे सिम्पल- तुला नाही वाटत का की मी माझं नाव बदलून माझी आयडेन्टीटी बदलतेय! तू मला लग्नात ठेवलेलं नाव! तुझं आडनाव! मानसी कुलकर्णी ते अश्विनी देशमुख! तू जिच्याशी लग्न करायला कधीचाच होकार दिला आहेस ती मुलगी मी राहणारच नाही!
तो: हा निव्वळ तुझा विचार झाला! नाव बदललं तरी तुझा स्वभाव नाही ना बदलणार? तू आहेस तशीच राहशील….तुझी आयडेन्टीटी बदलेल अशी भीती का वाटतेय तुला?
ती: मला वाटतेय…पण मला नाव बदलायचं नाही हे ऐकल्यावर तू का कावरा-बावरा झालायस? लग्नानंतर तुझी बायको तुझं नाव तिच्या नावापुढे लावणार नाही याने तुझ्या 'आयडेन्टीटी' मध्ये काही फरक पडतोय का?
तो: फरक पडत नाहीये! पण-
ती: पण काय?
तो: तुला असं नाही वाटत की तुला वयाच्या पंचविशीनंतर एक नवीन आयडेन्टीटी निर्माण करायचा चान्स मिळतोय! कित्येकदा होतं की आपल्याला आपल्या नावाशी जोडली गेलेली एखादी गोष्ट, घटना, व्यक्ती नको असते पण निव्वळ आपल्या नावामुळे ती आपल्याला चिकटून गेलेली असते! मग ते नावच राहिलं नाही तर? तू या सगळ्याकडे या बाजूने का नाही बघू शकत?
ती: म्हणजे नावाशी माणसाची पर्सनलिटी, आयडेन्टीटी जोडलेली असते हे तू मान्य करतो आहेस?
तो: आपण फक्त एकमेकांना प्रश्न विचारतोय! त्यापेक्षा मी उत्तर देतो!! येस, मी तुझा मुद्दा मान्य करतो! नावाशी पर्सनलिटी जोडलेली असते! पण लग्नानंतर खूप काही बदलतं मुलींच्या आयुष्यात! आता फक्त मुलींच्याच का? हा प्रश्न तुला पडणार असेल तर आपल्या गेल्या चार भेटी व्यर्थ होत्या! असो! तर लग्नानंतर मुलींच्या आयुष्यात खूप काही बदलतं हे तू मान्य केलंस तर नाव बदलणं खूप क्षुल्लक वाटायला लागेल- पूर्वी बायका नाव बदलायच्या की! आपलं माहेरचं नाव त्यांनी कधी टाकलं नव्हतं पण नवीन घर, नवीन नाव, नवीन संसार या सगळ्यात तितक्याच रमायच्या!! आपल्या आई-आजीने हेच केलं…पूर्वी कशाला लग्न मानवल्यामुळे तुला ओळखता न आलेली बाई अश्विनी देशपांडेच होती…कुलकर्णी नाही!
ती: अश्विनी देशमुख…देशमुख… देशपांडे नाही!
तो: करेक्ट! मला माहित होतं की तू मी चुकीचं घेतलेलं आडनाव मला बरोबर करून सांगणारेस! तुझ्याही ती आता तशीच लक्षात राहिली ना? आता ती खऱ्या अर्थाने 'देशमुख' झाली असं म्हणायला हरकत नाही!
ती: (खजील होत) ओह सो यु ट्रिक्ड मी?
तो: डीड आय?
ती: यु नो यु डीड!! पूर्वी लग्न लौकर व्हायची! मुली फारशा घराबाहेर पडत नव्हत्या! शिकत नव्हत्या! त्यामुळे त्यांना ते ट्रान्झिशन खूप सोप्पं वाटत असेल! आता परिस्थिती तशी नाही! आता मी शिकले, घराबाहेर पडले, नोकरी करायला लागले, मला माझं स्वतंत्र विश्व आहे! त्यात माझी स्वतःची एक ओळख आहे! या पोझिशनला मला माझ्या आई-वडिलांनी शिकवून, मला मोठं करून पोहोचवलं- त्यांचं नाव मी एकदम बदलून टाकायचं?? का?
तो: तू आई-वडिलांचं म्हणू नकोस…फक्त वडिलांचं म्हण! आणि मग तसं तरी का? कशाला? आय मीन आपण त्या श्रीलंकन नावांसारखी आपल्या चाळीस पिढ्यांची नावंच जोडू मागे!
ती: तू विषय बदलतो आहेस!! माझा मुद्दा खूप सोप्पा आहे! लग्नानंतर मला फक्त माझ्या नावाने ओळखलं जावं अशी माझी अपेक्षा आहे! माझं नाव म्हणजे जे नाव घेऊन मी गेली २५-२६ वर्षं वावरते आहे ते! बँकेपासून ड्रायव्हिंग लायसन्सवर सगळीकडे नावं बदलत मी नाही हिंडणार! तुला पटत नसेल तर सॉरी!
तो: पण मला तुझा मुद्दा मान्य आहे!
ती: काय?
तो: हो… मला तुझा मुद्दा मान्य आहे! तुझ्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये! लग्नानंतरचं तुझा नाव काहीही असो त्याने तू माझी बायको असशील हे बदलणार तर नाहीये! की तुझं आणि माझं आडनाव वेगळं आहे म्हणून आपलं नातं तुला अमान्य असणारे? आणि राहता राहिला तुझ्या आयडेन्टीटीचा मुद्दा- तुला आत्ता ओळखणारे लोक लग्नानंतर तुला एकदम वेगळ्या नावाने हाक मारणारच नाहीत! त्यांच्यासाठी तुझं नाव जे आत्ता आहे तेच राहील…अर्थात तुला लग्न मानवणार नसेल तर! बाकी- लग्नानंतर माझी बायको म्हणून लोकांना काय नाव सांगायचं याची लिबर्टी मी तुला आत्ताच देतो! आर वि ओके नाऊ??
ती: तुझी मतं नंतर बदलणार नाहीत ना?
तो: माझी मतं आहेत ती! इंडियन क्रिकेट टीमचा फॉर्म नाही!!
ती: क्रिकेटवरून आठवलं-
तो: आता तुला क्रिकेट आवडत नसेल तर मग मीच नकार देईन तुला!
ती: नाहीरे! उलट दर वर्षी आपण एकदातरी स्टेडीयममधेच मॅच बघायला जायचं असं म्हणणार होते मी!
तो: मलाही तुला एक प्रश्न विचारायचाय!! आणि तुला उत्तर देणं अजिबात कंपल्सरी नाहीये! फक्त विचार कर आणि सांग कधीतरी! मे बी लग्नानंतर!!
ती: काय प्रश्न?
तोः प्रश्न म्हणजे गम्मतच आहे खरं तर! आपली पुरुषप्रधान संस्कृती…आजच्या ग्लोबलाइझ्ड जगात त्याला आपण 'मेल चाऊनिस्ट कल्चर' म्हणायला लागलो…मग विमेन राईट्स आले, रिझर्वेशन्स आली, विमेन इक्वालिटी झाली आणि आता विमेन डॉमिनंसचा काळ आला! तू मगाशी मला म्हणालीस की विवाह कायद्यात मुलीने नाव बदलायची सक्ती नाही! पण तोच विवाह कायदा आजच्या विमेन डॉमिनंसच्या जमान्यात नवऱ्याला आर्थिक, सामाजिक गरजांसाठी जबाबदार मानतो!! हो ना? मग हेसुद्धा बदलायला नको? 
त्याच्या अचानक अशा प्रश्न विचारण्याने ती थोडी सैरभैर होऊन विचारात पडली! त्याने तिच्या डोळ्यापुढे हात फिरवून तिचं त्याच्याकडे लक्ष आहे याची खात्री केली आणि 'आत्ता विचार नको करूस' अशा अर्थाने नकारार्थी मान डोलावली. त्याने हसून तिच्याकडे पाहिल्यावर तीसुद्धा हसली!
तो: आणि हां, तुझा तो मगाचचा प्रश्न अर्धवट राहिलाय नाही का? बाकी सगळ्या उत्तरांवर आपलं एकमत आहे हे गृहीत धरून बोलायचं का त्यावर आता?

घराच्या बिल्डींगच्या पायऱ्या चढताना तिला धाकधूक वाटत होती. घरी आनंदाला पारावर उरणार नव्हता. त्याने तिच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली होती! पण त्याने विचारलेल्या प्रश्नाचं काहीतरी समाधानकारक उत्तर शोधायला हवं असा विचार करतच तिने घराची बेल वाजवली! 
 

Sunday, April 7, 2013

खिडक्या, यंत्रमानव, सफरचंद आणि काळबेरं!

दहा-एक वर्षांपूर्वी बिल्डींगमध्ये कुणी नवीन टीव्ही, मशीन, फ्रीझ असं काही घेतलं की त्याची चर्चा सुरु व्हायची! 'पहिल्या मजल्यावरच्या शिंदेंकडे आलेल्या नव्या टीव्हीला १०० चॅनेल्स आहेत' किंवा 'बाजूच्या नाडकर्णीनीपण आपल्यासारखंच सिंगल टब ऑटोमॅटिक मशीन घेतलंय' हे साधारण गप्पांचे विषय! (या सगळ्या वाक्यांमध्ये कौतुकाचा भाग कमी आणि असूया किंवा अपेक्षा जास्त हे आलंच!) मग 'काळ बदलतो' का काय म्हणतात ते झालं आणि फ्रीझ, मशीन अशा गृहोपयोगी वस्तू एकूणच कॉमन आणि अशा चर्चांसाठी दुय्यम झाल्या..असूया, अपेक्षा तशाच होत्या पण गप्पांचे विषय, वस्तू मात्र चंगळवादी झाले. 'मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा बघणं', 'परफ्युम्स आणि गॉगल्स' किंवा 'मोबाइल फोन्स' हे मिरवायचे, खिजवायचे विषय झाले. यापैकी मोबाईल फोनचा उल्लेख चंगळवादी वस्तूंमध्ये करायचा की नाही हा वादाचा मुद्दा असू शकतो पण मोबाईल फोन हा लोकांच्या चर्चेचा, लाईफस्टाईलचा अविभाज्य घटक झालाय हे खरंय..बाय द वे फोन मीन्स 'स्मार्टफोन' बरं का!! माणसं स्मार्ट असोत वा नसोत, फोन स्मार्ट असणं आवश्यक झालंय.

'खिडक्या,यंत्रमानव….' असं वरकरणी अर्थहीन वाटणारं शीर्षक वाचून स्मार्ट लोकांना लिखाणाचा विषय लक्षात आलाच असेल. पण जे स्मार्ट नाहीयेत (नथिंग पर्सनल बरं का!) त्यांच्यासाठी थोडं स्पष्टीकरण- स्मार्ट फोनची दिवसेंदिवस वाढणारी बाजारपेठ सध्या चार मुख्य प्रकारच्या फोन्सनी व्यापली आहे! खिडक्या अर्थात 'विंडोस' फोन, यंत्रमानव म्हणजे ऍन्ड्रोइड फोन्स, सफरचंद म्हणजे ऍपलचा iफोन (न्यूटनचं सफरचंद नाही स्टीव्ह जॉब्सचं) आणि काळबेरं हा मी ब्लॅकबेरी फोनसाठी वापरलेला प्रतिशब्द आहे (या फळासाठीचा मराठी प्रतिशब्द कुणाला माहित असल्यास सांगावा). सहा-सात वर्षांपूर्वी भारतात फार थोड्या लोकांकडे नोकियाचा ९३०० अर्थात कम्युनिकेटर असायचा (आत्मस्तुती: माझ्याकडे पण होता). आपल्याकडे वापरला गेलेला तो पहिला स्मार्टफोन…पण तो स्मार्टफोन कमी आणि 'शोफोन' जास्त होता कारण त्याचा वापर दिखाव्यासाठीच जास्त व्हायचा. या फोनचे व्यावहारिक,तांत्रिक फायदे कुणी घेतलेले मी ऐकले नाहीयेत किंवा त्याच्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानसुद्धा तेव्हा उपलब्ध नव्हतं (इंटरनेट, थ्रीजी, वाय-फाय वगैरे). मग साधारण २००८ च्या आसपास स्मार्टफोनचा iगवगवा सुरु झाला. मोबाइल फोन ही गोष्ट एव्हाना कॉमन झाली होती पण iफोन प्रकार नवीन होता. स्टीव्ह जॉब्सने "मोबाइल फोन निव्वळ बोलण्यासाठी नसतो आणि त्याचा वापर इतर गोष्टींसाठी व्हायला हवा! फोन जीवनशैलीचा भाग व्हायला हवा" असं विधान iफोनसंदर्भात केल्याचं वाचलेलं आठवतंय! मला जेव्हा पहिल्यांदा iफोनच्या तंत्रज्ञानाबद्दल कळलं तेव्हा मला त्याचं अजिबात कौतुक वाटलं नव्हतं..कारणं पुन्हा एकदा- फोन वापरायला आवश्यक तंत्रज्ञानाचा अभाव आणि अवाजवी किंमत! माझ्या दृष्टीने तेव्हा नोकियाचे चांगले कॅमेरे असणारे किंवा सोनीचे गाणी ऐकायला बनवलेले फोन्स ही मोबाइल विषयक अपेक्षांची लिमिट होती! मग शिक्षणानिमित्त अमेरिकेला आलो आणि स्मार्टफोन लोकांच्या जीवनशैलीचा भाग होताना पाहिलं. सगळ्यांनी घेतला म्हणून, स्वस्तात मिळतोय म्हणून, गरज आहे म्हणून अशी वेगवेगळी कारणं स्वतःलाच देत शेवटी स्मार्टफोन घेतला आणि स्टीव्ह जॉब्सला मनातल्या मनात नमस्कार केला. 

सर्वप्रथम काळबेरं फोन आणि खिडक्या फोन याविषयी- आकडे काहीही सांगोत, मी तरी यंत्रमानव आणि सफरचंद फोन्सच्या तुलनेत बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांनी हे दोन प्रकारचे फोन वापरणारे लोक पाहिले आहेत! काळ्याबेऱ्या फोन्सचं वैशिष्ट्य म्हणजे कॉम्प्युटरला असतो तसा अख्खा 'की-बोर्ड' या फोन्सला असायचा! या 'की-बोर्ड' च्या बटनांच्या रचनेमुळेच त्या फळाचं नाव या फोनला दिलं गेलं. २०१० च्या शेवटाकडे आयफोनने बाजारपेठ व्यापून टाकण्यापूर्वी हे फोन्स अनेक सरकारी, कॉर्पोरेट जगात ऑफिशिअली वापरले जायचे. 'काळ्याबेऱ्या संवाद'प्रकारची जबर हवा होती. या फोनच्या वेडाची तुलना अमली पदार्थांच्या व्यसनाशी केली गेली. हे फोन घेऊन फिरणारे लोक 'श्या…तुझ्याकडे बीबी मेसेजिंग नाहीये?' वगैरे विचारायचे! पण काळाच्या ओघात (म्हणजे अवघ्या वर्ष-दीड वर्षात) ह्या फोनची बाजारपेठ कमी झाली. आता हे फोन घेऊन फिरणाऱ्या लोकांना 'श्या…तुझ्याकडे अजून बीबीच आहे?' असं ऐकून घ्यावं लागतं! नवीन आलेल्या काही काळ्याबेऱ्या फोन्सना पारंपारिक 'की-बोर्ड नाही'…आता याला व्यावसायिक स्पर्धेत स्वतःची ओळख विसरणं म्हणायचं की स्पर्धेत टिकण्यासाठी बदलणं म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न! खिडक्या फोन या प्रकाराविषयी मला तशी बरीच कमी माहिती आहे! या प्रकारचे फोन्स गेली कित्येक वर्ष अनेक कंपन्यांच्या माध्यमातून उपलब्ध आहेत पण आधुनिक म्हणता येतील असे खिडक्या फोन गेल्या दोन-तीन वर्षातले! गेल्या सहा महिन्यात आपली लाडकी कंपनी 'नोकिया' ने खिडक्या सिस्टम असलेले काही चांगले फोन बाजारात आणलेत आणि निव्वळ सफरचंद किंवा यंत्रमानव फोन घ्यायचा नाही म्हणून मी लोकांना हे नोकियाचे फोन विकत घेताना बघतोय!निव्वळ तांत्रिक बाबींबाबत बोलायचं तर खिडक्यावाले फोन्स तोडीस तोड नसले तरी बऱ्यापैकी आधुनिक आहेत! सफरचंद आणि यंत्रमानव फोन्समध्ये असणाऱ्या प्रत्येक नव्या 'फिचर'ला सिमिलर 'फिचर' या फोन्समध्ये आहे. पण या इतक्या झपाट्याने बदलणाऱ्या क्षेत्रात या फोन्सनी आघाडी घेणं सध्यातरी अवघडच दिसतंय!    

'स्मार्टफोन' ही किती मोठी बाजारपेठ होऊ शकते हे सर्वप्रथम सिद्ध करणारी कंपनी अर्थात सफरचंद! iफोनने २००७ मध्ये रिलीज झाल्यापासून विक्रीचे अनेक उच्चांक प्रस्थापित केले. 'टचस्क्रीन' अर्थात बोटाच्या स्पर्शाने वापरायचा फोन! स्टायलस वापरायचे फोन्स नवीन असताना टचस्क्रीनने लोकांना अचंबित व्हायला लावलं (मी गेल्या काही महिन्यात अनेक टचस्क्रीन फोन पहिले पण जो सहजपणा 'सफरचंदाच्या स्पर्शात' आहे तो कुठल्याच फोनमध्ये नाही हे मी ठामपणे सांगू इच्छितो). बँकिंगपासून सोशियल नेट्वर्किंगपर्यंत सगळं या फोनने लोकांच्या अक्षरशः हाताशी आणून ठेवलं. अन्न, वस्त्र, निवारासारखी फोनला गरज बनवण्याचं श्रेय माझ्यामते iफोनलाच! iफोनचे खंदे समर्थक आहेत तसे विरोधकसुद्धा आहेत. गमतीचा भाग असा की या विरोधकांपैकी अर्ध्या लोकांनी तो कधी वापरलेलासुद्धा नाही. iफोनची किंवा सफरचंद कंपनीची मिळेल तेव्हा टीका करणारे लोक मला माहितीयत आणि त्यांच्या अतिशहाणपणाची मला गम्मत वाटते. माझ्या मते iफोन हा जगातला सगळ्यात सोप्पा फोन आहे. iफोनमध्ये किती फीचर्स कमी आहेत आणि वापरायला किती कटकट आहे वगैरे iफोन न वापरणारे अधिकाराने बोलले की मला 'गेल्या अनेक वर्षात घराबाहेर न पडलेल्या माणसाने वाढत्या ट्राफिकबद्दल चर्चा केल्यासारखं वाटतं!' आजघडीला 'एलेगन्स,क्लास, सिम्पलीसिटी' हे तिन्ही शब्द जर कुठल्या एका फोन प्रकाराला लागू होत असतील तर तो म्हणजे सफरचंद फोन! हेसुद्धा नमूद करायला हवं की विरोधक करतायत ती सगळीच टीका निरर्थक नाहीये. गेल्या ६ वर्षात सहा नवीन iफोन मॉडेल्स बाजारात आली पण त्यांच्या एकूण बाह्यरूपात आणि अंतर्रुपात काहीच मोठे फरक पडलेले नाहीत! या फोनमार्फत केलेल्या कित्येक गोष्टींवर कंपनीचं नियंत्रण आहे. फोन वापरण्यात काही बंधनं आहेत. पण असं सगळं असतानासुद्धा एकूणच बाजारात सफरचंदी फोन्स लोकप्रिय आहेत हे खरं! 


सफरचंदी फोनची इतकी स्तुती केल्यावर मी अर्थात सफरचंदी फोन वापरत असेन याचा तुम्ही अंदाज बांधला असेलच. पण तुमचा अंदाज चुकलाय…मी सफरचंदी नाही तर यंत्रमानव फोन वपरतो. गेल्या दहा वर्षात आयटी क्षेत्राशी संबंधित बहुतेक धंद्यांच्या यशात 'गुगल' नावाच्या अचाट कंपनीचा खूप मोठा वाटा आहे! त्यामुळे स्मार्टफोन्स क्षेत्राशी गुगल संलग्न नसलं असतं तर नवल होतं. यंत्रमानव फोन तंत्रज्ञान बनवणारी कंपनी गुगलने ८ वर्षांपूर्वी विकत घेतली आणि जवळपास ५ वर्षांपूर्वी 'एचटीसी'नावाच्या कंपनीमार्फत या फोन्सनी पदार्पण केलं. गेल्या पाच वर्षांत या फोन्सनी मागे वळून पाहिलेलंच नाही! यंत्रमानव तंत्रज्ञान असलेले फोन्स आज अनेक महत्वाच्या कंपन्या बनवून बाजारात आणतायत! यात सगळ्यात आघाडीवर आहे 'सॅमसंग'! सॅमसंग कंपनीचा फोन घ्यायला लोक कधीकधी तयार नसतात कारण दर दोन महिन्यात जास्त आधुनिक नवा फोन बाजारात येतो आणि 'आपण अत्याधुनिक किंवा लेटेस्ट फोन घेतला' या आपल्या 'अभिमाना'ला (वाचा: 'गर्व/माज') तडा जातो. गुगलचे जीमेल, गुगल प्लस, गुगल टॉक, युट्युब असे अनेक प्रोडक्टस वापरताना मिळणारी फ्लेक्सिबिलीटी हे फोन्स वापरताना मिळते. वेळ आल्यास फोन कोणत्याही कॉम्प्युटरला जोडून आपल्याला डेटा ट्रान्स्फर करता येतो. आयफोनच्या तोडीस तोड किंवा कांकणभर सरस तंत्रज्ञान या फोन्समध्ये दिसतंय! सॅमसंग आणि सफरचंद कंपन्यांमध्ये या स्मार्टफोन प्रकाराशी संबंधित 'एकाधिकारा'वर (पेटंट) चाललेला खटला प्रसिद्ध आहे. त्यात सफरचंदाने बाजी मारून अनेक कोटी डॉलर्स नुकसान भरपाई म्हणून वसूल केलं. मात्र या प्रकाराने सॅमसंग जणू पेटून उठलं आणि गेल्या वर्षभरात त्यांनी काही 'जबर' (दुसरा शब्दच नाही) फोन बाजारात आणले आहेत. आयफोनने प्रस्थापित केलेली मक्तेदारी मोडून काढण्याची अपेक्षा फक्त यंत्रमानव फोनकडून होतेय यातच सगळं आलं.
'घरात कुत्री असून त्याच्याबद्दल न बोलणारा मालक किंवा मालकीण मला अजून भेटायचा आहे' हे जसं पुलंनी म्हटलंय तसंच स्मार्टफोन असून त्याचं अजिबात कौतुक न करणारा किंवा करणारी व्यक्ती मला भेटायची आहे. याला मीसुद्धा अपवाद नाही. माझ्या सॅमसंग एस थ्रीचं मी उठसूट कौतुक करत असतो आणि कुणाला नवीन फोन घ्यायचा असेल तर 'एस थ्रीच घे' असे फुकटचे सल्लेपण देत असतो. पण अलीकडे अत्यावश्यक झालेला फोनचा वापर काही बेसिक प्रश्न उपस्थित करतो- फोनला जीवनशैलीचा भाग मानलं तर तुमचा फोन तुमच्याविषयी काय सांगतो? तुम्हाला तुमचा कमी फीचर्स असलेला जुना फोन परत वापरावा लागला तर तुमची तयारी असेल का? आणि सगळ्यात महत्वाचं स्मार्टफोन लोकांची बुद्धिमत्ता आणि नितीमत्ता खालावायला कारण ठरतो आहे का? या प्रश्नाचं उत्तर 'हो' असेल तर मग स्मार्टफोनला चांगलं म्हणायचं का वाईट? (कुणी मराठी शाळेत शिक्षक असाल तर पुढच्या चाचणी परीक्षेत निबंधाला हा एक विषय जरूर ठेवा 'मोबाइल फोन: शाप की वरदान?'). पहिल्या प्रश्नाला कोणतंही तर्कशुद्ध उत्तर नाही! फोनकडे बघून माणसाच्या व्यक्तीमत्वाविषयी तर्क करणं म्हणजे 'कुणी कुठले कपडे घातलेत याच्यावरुन तो सिगरेट ओढतो का नाही?' या असंबद्ध प्रश्नाचं उत्तर देण्यासारखं आहे! नवीन फोन वापरायला सुरुवात केली आणि अचानक कुणाकडेतरी आपला जुना फोन दिसला की आपल्याला हसायला येतं. आपण एकेकाळी हा 'फडतूस' फोन वापरायचो हे फिलिंग आयुष्यात एकापेक्षा जास्त वेळा फोन बदलेल्या लोकांना नक्की येउन गेलं असणारे. पण अशा वेळी दोन क्षण थांबून विचार करायला हरकत नाही. नवीन फोन घेऊन एक अचिव्हमेंट पूर्ण केल्याचा आनंद साजरा करायला आणि वेळ आलीच तर जुना फोन परत वापरायला लागेल याबाबतीत मनाची तयारी करायला हे दोन क्षण पुरेसे आहेत! शेवटचा प्रश्न- खालावती बुद्धिमत्ता आणि नितीमत्ता. या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवाने 'हो' असं आहे. स्मार्टफोन प्रकाराचा मी कितीही चाहता, पंखा असलो तरी स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांनी फोनच्या वापरावर वयाची आणि आय.क्यू. यांची किमान मर्यादा ठेवण्याची सोय करावी असं माझं वैयक्तिक मत आहे! "सहा-सात वर्षांच्या आमच्या मुलाला आय-फोन हवा म्हणून तो हट्ट करतोय आणि त्याला आयफोन थ्री दिला तर त्याला तो नकोय, आयफोन फोरच हवाय" हे कौतुकाने सांगणारी अमेरिकन बाई मला भेटली तेव्हा 'लटकनेसे हाईट नाही बढेगी,मम्मी को बोलो कॉम्प्लान पिलाये' सारखं मला तिला 'स्मार्टफोन इस्तेमाल करनेसे अकल नही बढेगी, अपने बच्चे को बेकार आदते ना लगाये' असं म्हणावसं वाटलं. स्मार्टफोनचा वापर जेवढा चांगल्या गोष्टींसाठी होतो तेवढाच वाईट गोष्टींसाठी होतोय. स्मार्टफोन आणि सोशियल नेटवर्किंग यांच्या कॉम्बीनेशनमुळे 'इंट्रोवर्ट' हा शब्द इंग्रजी डिक्शनरीतून आणि 'अंतर्मुख' हा शब्द मराठी शब्दकोशातून काढून टाकायला हरकत नाही. जगाला आरडाओरडा करून काय सांगायचं? काय दाखवायचं? याच्यावर निर्बंध राहिलेले नाहीत. मोबाईल फोन हे या सगळ्या बदलाचं(?) मोठं कारण आहे. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खत येत नाही तसंच स्मार्ट वाटला म्हणून आयुष्य फोनच्या स्वाधीन करता येत नाही किंबहुना करूच नये! फोन, कॉर्डलेस फोन,मोबाईल फोन, स्मार्ट फोन या बदलाचे आपण साक्षीदार आहोत आणि याचं मला कौतुक आणि अभिमान आहे! पण मग अचानक नारळीकरांचं 'वामन परत न आला' आठवतं आणि मग सहजच विचारसुद्धा येतो…नवीन कोनाद** तयार होण्याची स्मार्ट फोन ही सुरुवात तर नाहीये ना? 

**ज्यांनी 'वामन परत न आला' किंवा 'Return of Vaman" वाचलं नाहीये त्यांना हा संदर्भ कदाचित लक्षात येणार नाही… त्याबद्दल क्षमस्व!! पण मराठी ब्लॉग वाचणाऱ्या बहुतेकांनी नारळीकरांची पुस्तकं वाचली असावीत असा अंदाज आहे.

Monday, March 11, 2013

न-लोकोत्तर! अ-आदरणीय!!

                                      ।।श्री श्री श्री न-लोकोत्तर अ-आदरणीय महा-पुरुषाय(?) न-नमः।।  

गेल्या अनेक शतकांच्या इतिहासात कला-क्रीडा-राजकारण या सगळ्या क्षेत्रात अनेक श्रेष्ठ मंडळी भारताच्या इतिहासात होऊन गेली. आपल्या राजकारणाला आर्यचाणक्याचा वारसा आहे, कलेच्या क्षेत्रात कालिदासाच्या ग्रंथसंपदेपासून ते दादासाहेब फाळकेंच्या सिनेसृष्टीपर्यंत आपल्याकडे मिरवण्यासारख्या खंडीभर गोष्टी आहेत! क्रीडा क्षेत्रात खूप प्राचीन नावं नसली तरी हॉकीचा जादुगार ध्यानचंद ते क्रिकेटचा देवबाप्पा सचिन तेंडुलकरपर्यंत अनेक खेळाडू या देशासाठी खेळले आहेत! मात्र गेल्या दशकाकडे जरा तिरकस नजरेने पाहिलं की या सगळ्या क्षेत्रात काही अफाट 'न-लोकोत्तर', 'अ-आदरणीय' मंडळी वावरताना दिसतायत (मराठी व्याकरणात न-लोकोत्तर आणि अ-आदरणीय हे शब्द नाहीत हे मला माहितीय पण तरी मी मुद्दाम लिहिलेत. स्पष्टीकरण पुढे लिहीनच). यातल्या काही  'रत्नां'बद्दल लिहिण्याचा हा खटाटोप! राजकारण क्षेत्रात राजपुत्र चि. राहुल गांधी, क्रीडा क्षेत्रात श्री श्री श्री सर रवींद्रसिंहजी जडेजा, आणि कलाक्षेत्रात (?) थुसार कपूर (यांना श्री. , कु., चि. यातलं नेमकं काय लागू होतं याची कल्पना नसल्याने ? लिहिलं असून एका आकडेज्योतिषाच्या सांगण्यानुसार त्यांच्या नावाचा उच्चार आम्ही 'थुसार' असा करतो) हीच ती न-लोकोत्तर, अ-आदरणीय मंडळी! (मी हे नमूद करू इच्छितो की या तिन्ही क्षेत्रात अशी माणसं शेकड्याने असतील पण या तिघांवर माझा 'विशेष जीव' आहे)

या प्रत्येकाने काहीही विशेष करतासुद्धा यांच्याबद्दल जेवढं लिहिलं, बोललं जातं ते पाहून मला आश्चर्य वाटतं. राष्ट्रीय स्तरावर लोकांना माहीत असलेली ही तिन्ही माणसं निष्क्रिय माणसं आहेत का? उत्तर 'नाही'..पण यातल्या कुणीतरी प्रचंड कौतुकास्पद कामगिरी केलीय का? उत्तर 'नाही'..ही सगळी हुशार, जिनियस माणसं आहेत का? उत्तर 'नाही'.. ही सगळी मठ्ठ माणसं आहेत का? तर याचंही उत्तर 'नाही'! यातल्या कुणीच अनादर वाटावा, चीड यावी अशी कामगिरी (अजूनतरी) केलेली नाही पण म्हणून त्यांच्यातल्या कुणाबद्दलच मला जरासुद्धा आदर वाटत नाही म्हणून अ-आदरणीय. या सगळ्यांचीच आत्तापर्यंतची कामगिरी पाहून, वक्तव्यं ऐकून कधी गालातल्या गालात तर कधी पोट धरधरून हसायला येतं, यदाकदाचित यातल्या कुणीही काही कर्तुत्व गाजवलं तरी ते 'लक बाय चान्स' असेल असं मला वाटतं म्हणून हे तिघे एकविसाव्या शतकातले 'न-लोकोत्तर' पुरुष आहेत!  

चि. राहुल गांधी हे राजघराण्यात जन्माला आले हे त्यांचं कर्तुत्व नाही (मणिशंकर अय्यर यांना तसं वाटू शकतं). दाढीचे खुंट वाढलेला चेहरा घेऊन आणि खादीचे कपडे घालून आजी-पणजोबांच्या पुण्याई(?)वर संपूर्ण देशभर भटकणाऱ्या ४३ अ-संसारी, युवा पुढाऱ्यामध्ये आदर वाटावा असं काहीच नाही! त्यांच्या शैक्षणिक पात्रतेपासून त्यांच्या नागरिकत्वापर्यंत प्रत्येक गोष्टीवर वाद आहेत. देशाच्या अजून अस्तित्वात असलेल्या सगळ्यात जुन्या राजकीय पक्षाची धुरा (उपाध्यक्ष) त्यांना देण्यात आली आणि या पक्षाच्या घराणेशाहीवर शिक्कामोर्तब झालं. त्यांनी जीव- तोडून उत्तर प्रदेशमध्ये प्रचार केला पण पक्षाला त्याचा अजिबात फायदा झाला नाही. त्यांनी या पराभवाची जबाबदारी मान्य केली (लॉल) आणि पुन्हा त्यांचा उदोउदो झाला. आपल्या सारख्या सामान्य लोकांनी काही चांगलं केलं तरी कौतुक होत नाही..पण राजपुत्राची गोष्टच वेगळी..त्याच्या हरण्याचं पण कौतुक करायला लोक तयार असतात ही शोकांतिका! भ्रष्टाचार, दहशतवाद या महत्वाच्या विषयांवर त्यांनी कधीच ठोस मतं मांडलेली नाहीत. तूर्तास ते २०१४ च्या लोकसभा निवडणुकींसाठी तयारी करत असल्याचं समजतं. त्यांच्या नेतृत्वामुळे उत्तर प्रदेशातल्या निकालांची पुनरावृत्ती राष्ट्रीय पातळीवर होवो अशी माझी अपेक्षा आहे (पण याचबरोबर मुलायम-माया-करुणा-ममता असे सोज्वळ शब्द नावात असलेल्या कोणत्याही नेत्याच्या पक्षाकडे देशाच्या राजकारणाच्या नाड्या जाऊ नयेत ही कळकळीची प्रार्थनासुद्धा आहे)

थुसार कपूर हेसुद्धा घराणेशाही कोट्यातून सिनेसृष्टीत आलेल्या फरदीन-उदय-झायेद-हर्मन यांच्यातलं एक नाव, जे बालाजीच्या कृपेने आजही तग धरून आहे! 'मुझे कूच कहना है' अशा नावाच्या सिनेमातून चंदेरी दुनियेत आलेल्या थुसारला काय सांगायचं होतं ते अजून इतक्या वर्षांनीसुद्धा कुणाच्या बहुतेक लक्षातच आलेलं नाहीये. गोलमाल नामक चित्रपट मालिकेत केलेली मूक-बधिर 'लकी'ची भूमिका लोकांमध्ये बरीच फ़ेमस आहे. या भूमिकेसाठी त्याला अभिनयाचा पुरस्कार वगैरे पण मिळालाय जे बघून त्याच्या वडलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याचे आपण पाहिलंय (लॉल). खरंतर त्याचा केकाटणे-गोंगाट स्वरूपी अभिनय पाहून 'अभी नय' भाई बस करो असं म्हणायची खूप इच्छा होते पण पुन्हा एकदा आपलं ऐकायला कुणीच नसतं ही शोकांतिका! 'खाकी' हा त्याची  भूमिका असलेला एकमेव चित्रपट सोडून मी त्याचा एकही चित्रपट सिरीयसली बघू शकलेलो नाही..'शूटआउट एट लोखंडवाला' नामक सिनेमात त्याला कुख्यात शार्प शूटर दिलीप बुवाची भूमिका करताना पाहणं हा माझ्या मते त्या गुंडाचा अपमान होता. तर असे गुंडाचे आणि हिरोचे 'जबरदस्त' रोल करणाऱ्या थुसारला अमेरिकेत कुठल्यातरी पब का क्लबच्या बाहेर तो 'अंडर-एज' असल्याचा संशय येउन अडवलं होतं हे वाचल्याचं आठवून पण मी 'लोळतो'! स्वतःच्या नावामध्ये एक निष्कारण 'h' घालून तो थांबलेला नाही..नुकतंच त्याच्या सांगण्यावरून एका चित्रपटाचं नाव "ब"जाते रहो ऐवजी "भ"जाते रहो केलं गेलंय… (पुन्हा लॉल). सरतेशेवटी थुसार हा एक 'अभिनेता'(?) आहे आणि तो ज्या कुठल्या भूमिका करेल त्याला तो त्याच्या अनोख्या,विनोदी शैलीतच करणार हे मी गृहीत धरलंय आणि त्याला कधीतरी काहीतरी जमेल ही शक्यता बाद केली आहे.      

सरतेशेवटी, लास्ट बट ऑफकोर्स नॉट द लीस्ट- श्री श्री श्री सर रविन्द्रजी जडेजा! मुळात मी या महा-पुरुषांबद्दल आत्ता अचानक लिहायला घेतलं याचं मुख्य कारण 'सर' आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या अतर्क्य, अचाट, अफाट, अबब कामगिरीने मला इतक्या दिवसांनी लिहायला प्रोत्साहन दिलंय! त्यांच्या केशरचनेपासून त्यांच्या नृत्यकौशल्यापर्यंत प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीचं कौतुक झालंय. निव्वळ ३ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 'बॉल ऑफ द सेन्चुरी' टाकलाय आणि समस्त क्रिकेट विश्वाला 'आर्ट ऑफ लिविंग' चा धडा घालून दिलाय! स्थानिक कसोटी सामन्यात त्यांनी ३०० धावांचा बेंचमार्क सेट केलेला असल्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांनी धावा केल्या नाहीत की त्यांची चेष्टा होते जी त्यांच्या पंख्यांना मान्य नाही! सचिन तेंडुलकर आणि झहीर खान यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी 'जड्डू' नावाचं एक हॉटेल पण काढलंय. सर बहुचर्चित IPLच्या पहिल्या सिझनमध्ये विजेत्या राजस्थान रॉयल संघात होते. हा संघ इतर सगळ्यांपेक्षा 'लिंबूटिंबू' मानला गेला होता पण तेव्हा सरांबद्दल कुणालाच माहीत नव्हतं. सरांमुळे राजस्थान जिंकलं. सर भारतीय संघात आल्यापासून आपण एकही कसोटी सामना हरलेलो नाही. थुसार आणि चि. गांधी यांची इतकी थट्टा केल्यावर मी सर जडेजा यांच्याबद्दल असं काहीतरी लिहू शकेन अशी मला अपेक्षा होती. पण माझी हिम्मतच होत नाहीये..शेन वॉर्न सारखा महान खेळाडू सरांना 'रॉकस्टार' म्हणतो तर मी बापडा त्यांना काय विशेषणं लावणार? (मराठीत 'रॉक' म्हणजे दगड नाही का?)  

अशा काही घटना आहेत ज्या कधीच घडू नयेत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. १) सर जाडेजांना 'विस्डेन' चा 'क्रिकेटर ऑफ द यिअर' पुरस्कार मिळणं २) थुसार कपूरला अभिनयाचं ऑस्कर मिळणं..आणि ३) चि. राहुल गांधींना नोबेल शांतता पुरस्कार मिळणं. या सर्व अ-आदरणीय लोकांची गेल्या पाच-सात वर्षातली कामगिरी आणि मी उल्लेख केलेल्या सर्व पुरस्कारांची गेल्या कित्येक दशकांमधली क्रेडिबिलीटी पाहता या सगळ्या गोष्टी अशक्यच वाटतायत..पण काही गोष्टी मात्र नक्की शक्य आहेत. १) सर जडेजा १५-२० कसोट्या आणि अजून ३०-४० वन डे खेळून आधी कमेंटेटर आणि नंतर राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष बनणार २) थुसार कपूरला २०२० साली पद्म पुरस्कार आणि २०३५ सालचा अभिनयाचा राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार मिळणार आणि ३) चि. गांधींना इतर जवळपास सर्व माजी 'खांग्रेस' पंतप्रधानांसारखा 'भारतरत्न' मिळणार (ही शेवटची गोष्ट कधीच होऊ नये अशी खरंच खूप खूप जास्त इच्छा आहे म्हणून ती लिहिणार पण नव्हतो पण गेल्या सहा-सात दशकातला कारभार पाहता या सगळ्या विनोदी कल्पनांमध्ये भीषण वास्तवाचा उल्लेख असावा असं वाटलं म्हणून लिहिली) 

मला शाळेत नेहमी शिकवलं गेलंय की कोणत्याही लिखाणाची सुरुवात आणि शेवट चांगला असला तर वाचणाऱ्यांच्या मनात त्याचा 'ठसा' उमटतो. हे डोक्यात ठेवून लिहायची सुरुवात करताना चाणक्य, तेंडुलकर ही नावं लिहिली. पण शेवट गोड कसा करू? कडू, खारट असं काही चुकून खाल्लं गेलं की साखर खाऊन तोंड गोड करता येतं पण चुकून खूप गरम चहा-कॉफीचा घोट घेऊन जीभ भाजली की काहीच करता येत नाही…पुढचे काही तास, दिवस कशालाच चव लागत नाही. थुसार, सर जडेजा आणि चि. गांधी यांची इतकी स्तुती वाचून कुणी शेवटपर्यंत हे सगळं वाचणारे का याचीच खात्री नाहीये! पण इतकंच म्हणतो की आपल्याला माहित असलेल्या प्रत्येक क्षेत्रात एकतरी अशी व्यक्ती सापडते जिच्याशी आपलं कधीच पटत नाही. जिव्हाळा नसतो, भांडणंदेखील नसतात पण तरी उगाचच आपल्याला काहीतरी खटकत राहतं! अशा मला खटकणाऱ्या माणसांबद्दल जाहीर मंचावर 'स्तुती' करण्याची माझी हौस मी भागवून घेतली. त्यांची उघडपणे थट्टा करण्यात कोणाच्याही आणि 'कोणत्याही' भावनांना ठेच लागली असली तर सॉरी पण 'नो सॉरी'!! येत्या काळात ही मंडळी देशाचं, त्यांच्या त्यांच्या क्षेत्राचं अतोनात नुकसान न करता आपल्याला (स्पेसिफिकली मला) अशीच हसवत राहतील अशी बालाजीचरणी प्रार्थना!

पुन्हा एकदा-
                             ।।श्री श्री श्री न-लोकोत्तर अ-आदरणीय महा-पुरुषाय(?) न-नमः।।